सिंहस्थ पर्वणीकाळात रेल्वे प्रशासनाकडून भाडेवाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, या निर्णया विरोधात विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी दंड थोपटले आहेत. ही भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी सोमवारी साधु महंत रस्त्यावर उतरले.
सिंहस्थासाठी देश विदेशातून कोट्यवधी लोक येणार आहेत. प्रवासी वाहतुकीमध्ये रेल्वे सर्वात मोठी भूमिका बजावणार आहे. सर्वाधिक भाविक रेल्वेद्वारेच येणार आहेत. मात्र सिंहस्थ काळात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांकडून अतिरिक्त प्रवासभाडे आकारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सिंहस्थ हा हिंदूंचा सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने १५ स्वतंत्र गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बदल्यात त्यांनी अन्यायकारक पद्धतीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या भाढेवाढीमुळे भाविकांना १७५ ते ४२० रुपये अधिक मोजावे लागण्याची भिती साधू-महंतांकडून व्यक्त होऊ लागली आहे. या व्यतिरिक्त सप्टेंबर २०१५ पर्यंत नाशिक येथून कोणत्याही रेल्वेचे तिकिट काढणाऱ्या भाविकांना नियमित तिकीटदरापेक्षा ५ ते १० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा लाखो भाविकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. म्हणूनच या निषेधार्थ मंगळवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नंदकुमार जाधव म्हणाले, हिंदूंच्या उत्सवांवर कर लादून तो पैसा अन्य पंथियांच्या यात्रांना दिला जातो. अन्य पंथियांवरील ही उधळपट्टी मागे घेतल्यास हिंदूंच्या यात्रांवर अशा प्रकारचा कर लावण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे शासनाने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी. हज यात्रेला अनुदान आणि सिंहस्थ पर्वाला भाडेवाढ हे हिंदू कदापि सहन करणार नाही. ही भाडेवाढ एका आठवड्याच्या कररहित करा, तसेच भाविकांना सर्वातोपरी सोयीसुविधा पुरवा अशी मागणी त्यांनी केली. खासदारांनी या विषयात लक्ष घालून ही भाडेवाढ हाणून पाडावी अशी प्रतिक्रिया महंत ग्यानदास महाराज यांनी नोंदविली आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत भक्तीचरणदास, महामंडलेश्वर गोपीकृष्णदास, सनातनचे नंदकुमार जाधव, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट