म. टा. प्रतिनिधी, नाशिक
समाजातील दुर्बल घटक, मध्यवर्गीय घटकांची आर्थिक उपलब्धतेची गरज भागविण्यासाठी नागरी सहकारी बँकांची कामगिरी महत्त्वाची असते. अशा बँकांनी पारदर्शी प्रशासन आणि जनहिताच्या माध्यमातून लोकजीवनाला आधार दिला आहे, असे निरीक्षण माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मांडले.
विश्वास को ऑपरेटीव्ह बँकेला पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पवार म्हणाले, की विश्वास बँकेने तळागाळातील घटकांचा विश्वास जपला आहे. सद्यस्थितीत बँकींग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. काळानुसार बदल स्वीकारणाऱ्या आणि काळाच्या बरोबरीने चालणाऱ्या बँकाच नवी आव्हाने पेलू शकतील. अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन हे बँकेच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबित्वाची प्रयोगशील जाणीव सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे महत्वाचे कार्य सहकारी बँकांनी केले आहे, या कार्यात विश्वास बँकेचा सहभागही उल्लेखनीय असल्याचा गौरवही पवार यांनी केला.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी स्वागत व प्रास्तविक केले. बँकेच्या दोन दशकांच्या कालावधीतील एकूणच वाटचालीची, आगामी उद्दिष्टांची माहिती पवार यांनी घेतली. यावेळी रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ, विश्वास ज्ञान प्रबोधिनी रिसर्च इसिन्स्टट्यूट, यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय आदी उपक्रमांची माहिती यावेळी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पवार यांना देण्यात आली. देशातील नागरी सहकारी बँकांची आर्थिक स्थिती, सहकारी बँकांसाठी असलेले कायदे, ग्रामीण बँकांची परिस्थिती आदी विषयांवर यावेळी पवार यांनी संवाद साधला.
यावेळी विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक अजित मोडक, जनसंपर्क संचालक मंगेश पंचाक्षरी, संचालक डॉ. सुभाष पवार, डॉ. चंद्रकांत संकलेचा, शशिकांत पारख, घन:श्याम येवला आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट