भालचंद्र नेमाडे यांचे प्रतिपादन; गिरणागौरव पुरस्काराचे वितरण
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंग्रजी शाळांचे आक्रमण ही चिंतेची बाब आहे. साम, दाम, दंड, भेद वापरा परंतु इंग्रजीचे हे वर्चस्व झुगारून द्या. आपल्या मुलांना मराठी शाळेत घाला, इंग्रजी शाळेत घालून त्यांचे प्राण घेऊ नका, अफूवर जशी बंदी घालण्यात आली आहे. तशी आपण एकजूट करून इंग्रजीवर बंदी आणण्यासाठी चळवळ उभी करा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार घोषित, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा पहिला जीवनगौरव पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार अत्यंत वेगळ्या पध्दतीने विसापूर (ता. कळवण) येथील शेतकरी दाम्पत्य भास्कर गुंजाळ व सरस्वती गुंजाळ यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देताना नेमाडे म्हणाले, की इंग्रजी ही भाषा म्हणून शिकण्यासाठी हरकत नाही; परंतु तिचा दबाव घेण्याचे कारण नाही. आपण जगाचे जितके आकलन आपल्या मातृभाषेतून करू शकतो तितके इतर कोणत्याच भाषेतून करून शकत नाही. दीडशे वर्षे ज्यांनी आपल्यावर राज्य केले त्यांचा पगडा सोडायलाच आपण तयार नाही. अगदी झोपडपट्टी इंटरनॅशनल स्कूल नावाने इंग्रजी शाळा सुरू झाली तर त्यात आपल्या पाल्याचे अॅडमिशन घ्यायला आपण मागेपुढे पहाणार नाही, असेही नेमाडे म्हणाले.
नेमाडे म्हणाले, की शहरी माणूस हा आयते खाणार असतो त्यामुळे त्याने आता शेतकऱ्यांसाठी टॅक्स देण्याची गरज आहे. त्याला शेतकरी टॅक्स असेच संबोधण्यात यावे. त्यासाठी मी आता चळवळ उभारण्याच्या तयारीत आहे. अडाणी, असंस्कृत लोकांनीच आतापर्यंत संस्कृती टिकवली आहे. ते आतापर्यंत वहात असलेला संस्कृतीचा भार आता आपण आपल्या खांद्यावर घ्यायला हवा. नवता ही परंपरेतच असते, बाहेर कोठेही नसते हे समजून घ्यावे असा सल्लाही नेमाडे यांनी यावेळी दिला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आनंद अॅग्रोचे उध्दव आहेर, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार यांची उपस्थिती होती. दीपक चव्हाण लिखित 'बांधावरचा उद्योजक' या पुस्तकाचे व सुगंधदान या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उध्दव आहेर म्हणाले, की गारपीटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून सावरायला हवे, आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायला हवा. आत्महत्या करण्यापेक्षा उभारी घेऊन दाखवावी, त्यातच शेतकरी राजाचे कल्याण सामावलेले आहे.
याप्रसंगी सुरेश खानापूरकर, संजय पाटील, विजय हाके, विलास पाटील, दीप्ती राऊत, सुभाष नंदन, डॉ. दिग्विजय शहा, स्मिता तांबे, कृष्णा बच्छाव, अभिमन जाधव, सुनीता पाटील अविनाश भामरे, प्रतिभा होळकर, व कवी कमलाकर देसले यांचा गिरणा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पूरस्कारमूर्तींच्या वतीने स्मिता तांबे व कमलाकर देसले यांनी छोटेखानी भाषण केले.
वैशाली आहेर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश पवार व दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन तर नेमाडे यांचा दीपक करंजीकर यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. पुरस्कार स्विकारताना संबळ वाजविण्याची विलक्षण कल्पना यावेळी राबविण्यात आली. ते वाजविणारे कृष्णा साबळे व पार्टीचा सत्कार यावेळी नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
डोळ्यांना सुखावणारे नेपथ्य
कलादिर्ग्शक अरुण रहाणे यांनी संपूर्ण कालिदास कलामंदिराचा वापर करून डोळ्यांना सुखावणारे नेपथ्य तयार केले होते. यात कलामंदिराच्या मेनगेटवर चंद्रमौळी झोपडीसारखे साकारण्यात आले होते. मेनगेटमधून आत येताच वडाच्या झाडाचा चौथरा व त्यावर स्थापित ग्रामदेवता अशी रचना करण्यात आली होती तर स्टेजवर आदिमाया सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराची कमान व प्रतिमा ठेवण्यात आली होती.
पुढचे साहित्य संमेलन काश्मिरमध्ये
अगदी मराठीचा वास जेथे येईल तेथे साहित्य संमेलन भरविण्याची प्रथा साहित्य परिषद पाडत आहे. त्यामुळे पुढील संमेलन जम्मू-काश्मिरमध्ये भरवले गेले तर त्याचे नवल वाटायला नको अशी कोपरखळी भालचंद्र नेमाडे यांनी मारली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट