म. टा. प्रतिनिधी, सातपूर
गंगापूर धरणामुळे शहराला मुबलक पाणी मिळते खरे, परंतु महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे. यात सातपूर भागात असलेल्या दीडशेपैकी ठराविकच व्हॉल्व ऑपरेट होतात. यासाठी समतोल पाणीपुरवठा करण्याची मागणी रहिवाशी करत आहेत.
महापालिकेच्या सातपूर विभागातील पाणीपुरवठा विभागाकडून असमतोल पाण्याचा पुरवठा होत असल्याचे रहिवाशांचा आरोप आहे. यात अनेक भागात पाणी पुरवितांना कमी-अधिक प्रमाणात असल्याने अनेकदा नगरसेवक व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना रहिवाशांच्या संतापाला सामोरे जावे लागते. त्यातच सातपूर भागात सात प्रभागात १५० व्हॉल्व आहेत. परंतु, यापैकी काही मोजकेच व्हॉल्व महापालिकेच्या व्हॉल्वमनकडून ऑपरेट केले जातात. यात केवळ महापालिकेचे जलकुंभ असलेल्या ठिकाणांचे बहुतांश व्हॉल्व कार्यरत आहेत. मात्र, एकाच भागात पिण्याचा पाण्याचा पुरवठा असमतोल प्रमाणात होत असल्याने रहिवाशी नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे काही भागात १२ तासांपेक्षा अधिक काळ पाणी मिळते तर काही भागात २ ते ३ तास पाणीपुरवठा होतो. उंचावर राहणाऱ्या रहिवाशांना उतारावर घरे असलेल्या नागरिकांचे नळ बंद झाल्याशिवाय पाणी मिळत नाही. अनेकदा कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्यावर उंच भागातील रहिवाशांना पाण्याविनाच राहण्याची वेळी येते. यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सातपूर भागातील सात प्रभागात बसविण्यात आलेल्या १५० व्हॉल्वचे नियोजनबद्ध वेळ ठरविल्यास समतोल पाणी पुरवठा करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
महापालिकेकडून मुबलक पाण्याचा पुरवठा सातपूर भागात होतो. परंतु, यात समतोल नाही. महापालिकेने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. यात महापालिकेच्या पाण्याची देखील बचत होण्यास मदत होईल.
- अशोक शिंदे, रहिवाशी, सातपूर
एकाच गल्लीत वेगवेगळ्या वेळी पाणी
सातपूर कॉलनीतील वीस हजार म्हाडा वसातहतीतील एकाच गल्लीत दोन वेगवेगळ्या वेळी पाणी येते. यात चाळीतील एका लाइनला पहाटे सहा वाजता तर दुसऱ्या लाइनला साडेआठनंतर पाण्याचा पुरवठा होतो. तसेच पिंपळगाव बहुला परिसरातील भावले गल्ली, कोळीवाडा या उंचावर असलेल्या भागातही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. याप्रश्नी नागरिकांनी अनेकदा आंदोलन केले आहे. मात्र, परिस्थितीत विशेष फरक पडू शकलेला नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट