Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जुन्या भांडणाच्या वादात तरुणाची हत्या

$
0
0

म टा प्रतिनिधी, नाशिक

जुन्या भांडणाची कुरापत काढत लोखंडी रॉड तसेच धारदार शस्त्राने वार करून पंचवटी येथील फुलेनगरमध्ये २५ वर्षीय युवकाची टोळक्याने खून केल्याची घटना घडली. घटना आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांना अवघ्या तासाभरातच पंचवटी पोलिसांनी अटक केली.

अनिल सुखलाल गुंजाळ (वय २५, रा. वैशाली नगर, पेठरोड पंचवटी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जयराम गायकवाड (वय ४४) सुरज गायकवाड (वय १८), श्रीराम गायकवाड (३६), दशरथ गायकवाड (३४), ऋतिक गायकवाड (२०) अंबिका पवार सर्व राहणार लक्ष्मीनगर पेठरोड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अनिल गुंजाळ हा फुलेनगर रोडने जात असताना जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयितांनी अचानक त्याच्या डोक्यात मिरचीची पूड टाकून लोखंडी रॉड, धारदार शस्राने मारण्यास सुरुवात केली.

चाकूचा वार वर्मी बसल्याने अनिल जागीच कोसळला तर त्याच्यासोबत असलेला मित्र संपत माने हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यातील जखमी अनिल गुंजाळ व संपत माने पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच अनिलचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर मानेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयितांची नावे समजताच पोलिसांनी अवघ्या तासाभरातच सर्वांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहीर शंतनू कांबळे यांचं निधन

$
0
0

नाशिक:

विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू कांबळे यांचं आज दुपारी दीर्घ आजारानं नाशिक येथे निधन झालं. ते ३९ वर्षाचे होते. कांबळे यांच्या निधनावर जागर लढाऊ लोककला आघाडी, लोकसांस्कृतिक मंचसह विविध विद्रोही सांस्कृतिक संघटनांनी दु:ख व्यक्त केले आहे.

शाहीर शंतनू कांबळे गेल्या काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. तब्येत बिघडल्याने गेल्या आठवड्यात त्यांना नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. गेल्या ५-६ दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. आज प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. नव्या शाहीरांसाठी प्रेरणादायी असलेले शंतनू हे मुळचे सांगलीतील तासगावचे होते. मुंबईतल्या वडाळा येथे राह्यचे. मात्र आजारपणानंतर ते नाशिकला स्थायिक झाले होते.

२००५ मध्ये शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी अटक केली होती. रायपूर येथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १०० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तपासाअंती कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी तुरुंगात प्रचंड मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अंथरुणाला खिळले होते. त्यातच त्यांना क्षयाची लागण झाली होती. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी वडाळ्याहून नाशिकला मुक्काम हलवला होता. मात्र नाशिकमध्ये आल्यानंतरही आजाराने त्यांची पाठ सोडली नव्हती.

अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि जातीअंताच्या लढाईत ते अग्रेसर होते. गाणी आणि कवितातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता आणि मानवतावादावर भाष्य करत असायचे. 'दलिता रे हल्ला बोल ना...श्रमिका रे हल्ला बोलं ना...' आणि 'समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं...' त्यांची आदी गीते चळवळीत लोकप्रिय होती. अत्यंत गाजलेला 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते. त्यांच्या अकस्मिक निधनावर जागर लढाऊ लोककला आघाडी, लोकसांस्कृतिक मंचसह विविध विद्रोही सांस्कृतिक संघटनांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात टँकर्सची शंभरीकडे वाटचाल

$
0
0

जून अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रहिवाशांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील आणखी १९ गावे आणि ७५ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १८ टँकर्सला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांची तहान भागविण्यासाठी धावणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ झाली असून शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.

जिल्हावासीयांनी यंदा तप्त उन्हाच्या झळांचा सामना केला. उन्हाच्या दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे उपलब्ध स्त्रोतही आटू लागले आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकर्सची मागणी होऊ लागली. ७७ टँकरद्वारे २६८ गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा सुरू होता. आणखी ९२ गावे आणि वाड्यांसाठी १८ टँकर्सला प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ होणार आहे.

बागलाण, येवल्यात सर्वाधिक झळा

येवला, बागलाण आणि सिन्नर तालुक्यात टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन कराव्या लागत आहेत. या तीन तालुक्यांमध्ये ५२ टँकर सुरू असून आणखी दोन टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मालेगाव व नांदगावमध्ये देखील प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १०३ गावे आणि १६५ वाड्यांसाठी ७७ टँकर्सद्वारे दररोजच्या २५७ फेऱ्या होत आहेत. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या गावांसाठी दोन दिवसांत १८ टँकर धावण्यास सुरूवात होणार आहे. याखेरीज पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

..

नव्याने मंजूर केलेले टँकर

चांदवड तालुक्यातील एका गावासाठी, सिन्नर तालुक्यातील १० वाड्या आणि दोन गावे, सुरगाणा तालुक्यातील १३ गावे व २९ वाड्या, नांदगावमधील तीन गावे व ३४ वाड्यांसाठी टँकरला मान्यता देण्यात आली आहे. तसेच देवळा, त्र्यंबकेश्‍वर आणि मालेगाव तालुक्यातही ९ वाड्यांसाठी नव्याने टँकर सुरू करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या स्वागताची जोरदार तयारी

$
0
0

अडीच वर्षानंतर नाशकात आगमन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ हे अडीच वर्षांनंतर गुरुवारी (दि. १४) दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरात दाखल होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समता परिषदेकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक व शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी दिली आहे.

येवल्याचे आमदार छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे अडीच वर्षांनंतर नाशिक जिल्ह्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकार्त्यामध्ये चैत्यन्य संचारले आहे. छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांचे इगतपुरी, वाडीवऱ्हे पाथर्डी फाटा सह शहरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरात प्रवेश करताच प्रथम पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन त्यानंतर गणेशवाडी, पंचवटी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व शालीमार येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते अभिवादन करणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास ते मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

सहा दिवसाचा दौरा

छगन भुजबळ यांचा सहा दिवसाचा नाशिक जिल्हा दौरा आहे. या काळात ते विविध धार्मिक स्थळांनाही भेट देणार आहे. त्यात सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वर व शिर्डी येथे जाणार आहे. गुरुवार १४ जूनपासून सुरु होणारा त्यांचा दौरा मंगळवार १९ जूनपर्यंत असणार आहे.

येवल्यात जोरदार तयारी

मतदारसंघातून सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या छगन भुजबळांचे येवल्यात जोरदार स्वागत करण्यासाठी तयारी केली जात आहे. तुरुंगात असतानाही त्यांनी येवल्याचे विविध प्रश्न पत्रातून मांडले. तसेच मतदारासंघांच्या विविध कामांसाठी भरघोस निधी मिळविला होता.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला तहसीलदारांना ‘आंबा’ भेट

$
0
0

भिडे गुरुजींच्या कथित वक्तव्याचा 'स्वारीप'कडून निषेध

म. टा. वृत्तसेवा, येवला

फळांचा राजा आंबा गेल्या काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. भिडे गुरुजींच्या या कथित वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघताना विशेषतः आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून भिडेंचा निषेध केला जावू लागला आहे. येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ येवला तहसील कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना 'आंबा' भेट देण्यात आली.

माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ले, की जोडप्यांना मुले होतात, असे कथित वक्तव्य मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी यांनी दोन दिवसांपूर्वी केल्यानंतर राज्यात मोठे वादळ उठले आहे. विशेषतः भिडे गुरुजींना गेल्या काही महिन्यात 'लक्ष्य' करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटनांनी भिडे गुरुजींना आंदोलनात्मक मार्गाने घेरण्याचा पवित्रा घेतला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी येवला तहसीदार नरेशकुमार बहिरम यांना आंबा भेट देवून भिडेंच्या कथित वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. येवला तहसीलबाहेरील आवारात अनेकांनी आपल्या हाती आंबा धरत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी तहसील इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'स्वारीप'च्या महिला कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनावर स्वारीप महिला आघाडीचे महेंद्र पगारे, रेखा साबळे, रंजना पठारे, आशा आहेर, ज्योती पगारे, शोभा घोडेराव, वाल्हुबाई जगताप, कांताबाई गरुड, विजय घोडेराव, आकाश घोडेराव, शशिकांत जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालमजुरीच्या उच्चाटनासाठी जनजागृती गरजेची’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बालकांना शिक्षण व जगण्याचा हक्क मिळावा यासाठी जनजागृतीपर बालमजुरी प्रथा विरोधी दिन साजरा केला जातो. मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव शहरात बालमुजरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अल्पवयीन बालकांना मजुरीसाठी प्रवृत्त करणे अथवा त्यांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. शहरातून बालमजुरीचे समुळ उच्चाटन होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी येथे केले.

येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात बुधवारी बालमजुरी प्रथा विरोधी जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प व कामगार कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा रथ काढण्यात आला. बालमजुरी प्रथा विरोधात शहरात जनजागृती करण्यात येणार असून, विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी अनिल खरे यांनी दिली.

शहरातील देवीचा मळा, म्हाळदे शिवार, अख्तराबाद आदी परिसरात बालमजुरी प्रथा विरोधी जनजागृती चित्ररथाची फेरी काढण्यात आली. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमास नायब तहसीलदार आर. के. सायंकर, जे. पी. निकम, विवेक पाटील, अभिषेक चोळके, विलास गायकवाड, दीपक हेडे आदींसह बालकामगार प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस दलातर्फे इफ्तार पार्टी

$
0
0

पोलिस दलातर्फे इफ्तार पार्टी

मालेगाव : मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान पर्व सध्या सुरू असून, शनिवारी रमजान ईद साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील शहर पोलिस ठाण्यातील सुसंवाद सभागृह येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक तसेच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीस जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उप अधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, पालिका उपायुक्त राजू खैरनार आदींसह शांतता कमिटीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते .

उपायुक्तांची पठारे यांची बदली

मालेगाव : येथील महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची बदली करण्यात आली आहे. अहमदनगर महापालिकेचे उपायुक्त म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेर नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कापडणीस हे अहमदनगर येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिफेन्स सेमिनारच्या पूर्वतयारीचा आढावा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे शुक्रवारी (दि. १५) होणाऱ्या डिफेन्स वेंडरशीप डेव्हलपमेंटच्या सेमिनारच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यात आली. या सेमिनारमुळे नाशिकच्या उद्योगक्षेत्रात व रोजगाराबाबतीत स्थानिक विकासाचा प्रचंड फायदा होणार आहे.

बैठकीत डिफेन्स प्रॉडक्शनचे जॉइन सेक्रेटरी संजय जाजू, डॉ. प्रशांत पाटील, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सारिका बच्छाव, ज्ञानेश्वर गोपाळे, चेबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या, अमोल जाधव, 'आयमा'चे ललित बूब, योगिता आहेर लघुउद्योग भारतीचे मिलिंद कुलकर्णी, संजय महाजन, 'सीआयआय'चे तुषार पटवर्धन, 'एचएएल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजीतसिंग सिंगल, पूनम श्रीवास्तव, अजित अधळकर, तरुण गोस्वामी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेस कामगारांचे निलंबन बिनशर्त मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोडच्या नोटप्रेसमधील अधिकाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी गणेश काळे आणि एस. जी. घुगे या कामगारांना व्यवस्थापनाने कारणे दाखवा नोटीस न देताच मंगळवारी (दि. १२) निलंबित केले होते. व्यवस्थापनाने बिनशर्तपणे कारवाई मागे घेतल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी बुधवारी दिली. निलंबन मागे घेतल्याने प्रेसमधील तणाव निवळला आहे.

जुंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीसाठी दिल्लीहून प्रेस महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक विजय गुप्ता, व्यवस्थापक अंजन दुर्गाप्रसाद आणि ए. के. श्रीवास्तव यांची समिती आली होती. समितीने दोन दिवस व्यवस्थापन व अधिकारी वर्गाशी चर्चा केली. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, माधवराव लहांगे, सिद्धार्थ पवार, संदीप बिश्वास, किरण खर्डे यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनीही आपल्याला मारहाण झाली नसल्याचे सांगितले. कामगार व अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाले. अधिकाऱ्यांना लोटले असताना मारहाण झाल्याचे चुकीचे वृत्त दिल्लीला पाठविण्यात आले. त्रिसदस्यीय समितीलाही त्यात तथ्य आढाळले नाही. त्यामुळे निलंबन मागे घेऊन कामगारांना रुजू करून घेण्याचे आदेश नाशिकरोड प्रेसचे जनरल मॅनजेर एस. पी. वर्मा यांना देण्यात आले. त्यांनी दोन्ही कामगारांना बुधवारी रुजू करून घेतले.

एकजुटीचा विजय

निलंबन मागे घ्यावे यासाठी कामगार नेते तीन दिवसांपासून प्रयत्न करत होते. दोन्ही कामगारांना कारणे दाखवा नोटीस न देताच निलंबित केल्याच्या निषेधार्थ कामगारांनी स्वयंस्फूर्तीने दोन तास कामबंद आंदोलन केले. दरम्यान, सुरक्षेचे वॉटरमार्क नसलेल्या नोटा काही वर्षांपूर्वी छापण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी येथील नोट प्रेसममधील तीन जणांना निलंबित करण्यात आले होते. नंतर ही कारवाई मागे घेण्यात आली होती. आता पुन्हा निलंबन मागे घेण्यात आले. त्यामुळे आपली ताकद दाखवून दिल्याचे कामगारांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यातील सहा जणांची अपहारप्रकरणी चौकशी

$
0
0

अमळनेर पोलिसांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, अमळनेर

धुळे येथील महामार्गावरील उड्डाणपुलासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदलाच्या आर्थिक अपहारप्रकरणी धुळे येथील दोन प्रतिष्ठीत व्यक्तींसह सहा जणांची अमळनेरला पोलिसांकडून तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. या सहाही जणांना समज देण्यात आली असून, पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अमळनेर पोलिसांकडून ही चौकशी करण्यात आली. अधीक्षकांनी याबाबत निरीक्षक अनिल बडगुजर व मारवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना माहिती देत खासगी बँकेत जाऊन आर्थिक अपहारप्रकरणी धुळे येथील दोन प्रतिष्ठीत व्यक्तींसह सहा जणांची चौकशी करण्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तब्बल सात तास चौकशी करीत त्यांना समज देऊन सोडून दिले. रात्री उशिरापर्यंत याबाबतच्या घडामोडी सुरू होत्या. तसेच, जिल्हा पोलिस अधीक्षक अमळनेरला भेट देणार होते. यामध्ये धुळ्यातील शिवसेना महानगरप्रमुख सतीश दिगंबर महाले, माजी नगरसेवक विनायक वालचंद शिंदे यांच्यासह जितेंद्र गंगाराम भिल, अनिल गुलाब खैरनार, बबलू सोनू मोरे, रुपसिंग गेंदा भिल यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती निरीक्षक बडगुजर यांनी दिली.

असे आहे प्रकरण...

दिनेश विकास ठाकरे (रा. पिंपरी, ता. धुळे) ह. मु. रामबोरीस यांच्या वडिलांची जमीन महामार्गावर उड्डाणपुलासाठी संपादित झाली आहे. तत्पूर्वी विकास ठाकरे यांनी ही जमीन धुडकू मोरे यांना विकली होती. त्यावेळी त्यांना २६ लाख रुपये मिळाले होते. त्यादरम्यान विकास ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि ही जमीन विकास ठाकरे यांच्या नावावरून वारसदार दिनेश ठाकरे यांच्या नावावर झाली. शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रकल्पात संपादित जमिनीचा वाढीव मोबदला मिळणार असल्याचे कळताच धुळे येथील भरत जाधव यांच्यासह काही व्यक्तींनी दिनेशशी करार करीत वाढीव मोबदला मिळवण्याचे आमिष दिले. दिनेशचे यापूर्वी धुळे येथील खासगी बँकेत खाते होते. मात्र, तेथे मर्यादित रक्कम निघत होती म्हणून दिनेशने २९ मे २०१८ रोजी अमळनेर येथील खासगी बँकेत खाते उघडले. अमळनेर येथे एक कोटी २८ लाख रुपये जमा झाले होते. त्यापैकी भरत जाधव यांनी १० ते १२ लोकांच्या नावावर नेटबँकिंगच्या माध्यमातून ५० लाख रुपये वळते केले. याबाबत दिनेश ठाकरे यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, माझा भ्रमणध्वनी भरत जाधव यांच्या ताब्यात असून, नेटबँकिंग व्यवहार त्यांनीच केले आहेत. या आर्थिक व्यवहाराबाबत बँक व इतरांचा काय सबंध यासाठी बँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले होते.

राष्ट्रीय महामार्गाबाबत यापूर्वी मी विधानसभेत या प्रकरणात ३५ कोटींचा अपहार झाल्याचे बोललो होतो. तो प्रकार अमळनेरच्या आजच्या आर्थिक व्यवहाराच्या गुन्ह्याच्या माध्यमातून हळूहळू बाहेर येत आहे. या प्रकरणात आदिवासींची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.
- अनिल गोटे, आमदार, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे स्थलांतर

$
0
0

नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे स्थलांतर झाले असून कार्यालयास करण्यात येणारा संपर्क, गोपनीय पत्रव्यवहार, अर्ध शासकीय पत्रे व इतर महत्त्वाची पत्रे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जुने केंद्रीय कार्यालय इमारत, पहिला मजला, जुना मुंबई-आग्रा रोड, नाशिक या पत्यावर पाठवावीत तसेच संपर्कासाठी ०२५३-२९७२१२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक संचालक सं. पा. चाटे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर जलवाहिनी स्वच्छ

$
0
0

दूषित पाण्याच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी केली पाहणी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील साईबाबानगर व महाकाली चौक परिसरातील अनेक घरांमध्ये चार दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता. मंगळवारी पाण्यात आळ्या किंवा अन्य जीवजंतू आढळल्याने नागरिकांनी तक्रार केली होती. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी करून संपूर्ण जलवाहिनी स्वच्छ केली असून, ड्रेनेज व जलवाहिनीची पाहणीही सुरू केली आहे.

सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर व महाकाली चौक परिसरात मागील चार दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही काहीही उपयोग होत नव्हता. मंगळवारी या परिसरातील नळांमधून आलेल्या पाण्यात आळ्या किंवा अन्य जीवजंतू आढळून आल्याने संतप्त नागरिकांनी स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे तक्रार केली होती. शहाणे यांनी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपासून महापालिकेच्या पाणीपुरवठाचे अधिकारी दौलत घुले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून जलवाहिनी पूर्णपणे स्वच्छ केली. या वेळी काही घाण आढळल्याने नागरिकांनी सांगितलेल्या गोष्टीत तथ्य असल्याचे दिसून आले. त्यानुसार बुधवारी संपूर्ण परिसरात ड्रेनेजलाइन व जलवाहिनी एकत्र येत असलेल्या परिसराची पाहणी करून ज्या ठिकाणी लिकेज असले तेथे सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.

सिडकोत परिसरातील याच भागात नव्हे तर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा करणारी लाईन एकत्र झाल्याचे दिसून आले आहे. आता या दोन्ही लाईन बदलण्यासाठी महापालिकेने खास तरतूद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा प्रकारे दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवितहानी झाली तर याची जबाबदारी महापालिका घेणार काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सिडकोत अनेक ठिकाणी ड्रेनेज व पाण्याच्या लाईन जवळजवळ असल्याने असे प्रकार होत असतात. नागरिकांच्या जीविताशी हा खेळच होत असून, आयुक्‍तांनीच या प्रकरणी लक्ष द्यावे. तसेच या परिसराची पाहणी करीत या समस्येपासून सिडकोवासियांची सुटका करावी.

- मुकेश शहाणे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौफुली बनली ‘अपघात केंद्र’

$
0
0

गणेशनगर कॅनलजवळ अपघातात दुचाकीस्वार जखमी; नागरिकांचा संताप

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरात वाढलेल्या वाहनांच्या संख्येत अपघातही सातत्याने वाढत आहेत. सातपूर एमआयडीसीकडून पाइपलाइन रोडवरून गंगापूररोडला जाणाऱ्या गणेशनगर कॅनल चौफुली अपघातांचे केंद्रच बनली आहे. बुधवारी (दि. १३) पहाटे झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाने दुचाकी चालकास गंभीर दुखापत केली.

गणेशनगर कॅनल चौफुलीवर झालेल्या श्या अपघातात दुचाकी चालकास दुखापत झाली असून, त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सदर चौफुलीवर नेहमीच अपघात होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. परंतु, याकडे महापालिका व पोलिस प्रशासन दुर्लक्ष देत असल्याने यावर उपाय शोधणार कोण, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.

गंगापूररोडला पर्याय रस्ता म्हणून धरणाच्या उचव्या कालव्याला लागून महापालिकेने नवीन रस्ता तयार केला. यामुळे काही प्रमाणात का होईना गंगापूररोडवर होणारी वाहनांची गर्दी कॅनलरोडच्या बाजूने वाहतूक करावयास लागली. याच कॅनलरोडवर असलेल्या गणेशनगर चौफुलीवर रोजच अपघात होत असल्याने गतिरोधक टाकण्याची मागणी रहिवाशांनी केली. बुधवारी पहाटे सहावाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाने दुचाकी चालकास जोरदार धडक देत गंभीर जखमी केल्याने पुन्हा ही मागणी जोर धरू लागली आहे.

किमान दोन बाजूला गतिरोधक आवश्यक

गणेशनगर कॅनलरोडच्या चौफुलीवर अनेकदा झालेल्या अपघातात चार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकदा महापालिका व पोलिस प्रशासनाकडे धोकेदायक झालेल्या चौफुलीवर किमान गतिरोधक टाकावेत, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली. याकडे मात्र स्थानिक नगरसेवकांसह महापालिका व पोलिस प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. चौफुलीवर एकाबाजूने उतार असल्याने वेगाने वाहन चालवितांना ब्रेक लावणे चालकालाच कठीण होते. यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवताना अपघात होण्याची संख्या वाढली आहे. चौफुलीच्या किमान दोन बाजूला गतिरोधक टाकले जाणे आवश्यक बनले आहे.

गणेशनगरला लागून असलेल्या कॅनलरोड चौफुली अपघात केंद्रच बनले आहे. यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाकडे किमान रस्त्याच्या दोन बाजूला गतिरोधक टाकण्याची मागणी केली होती. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.

अरुण काळे, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगदेवतेच्या उत्सवाकडे नाशिककरांची पाठ!

$
0
0

नाट्य संमेलनामध्ये …अत्यल्प सहभाग

Fanindra.Mandlik@timesgroup.com

नाशिक : कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांच्यासारख्या दिग्गज नाटककरारांची नगरी असलेल्या आणि सद्यस्थितीत येथील नाटकांचा राज्यभरात उदोउदो होत असताना रंगदेवतेच्या उत्सवाकडे नाशिककरांनी पाठ फिरविल्याची बाब समोर येत आहे. ही बाब नाट्यवर्तुळात आश्चर्य व्यक्त करणारी ठरत आहे.

नाशिक शहराला वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांच्यासारख्या नाटककारांची परंपरा आहे. त्यांनी नाट्य सृष्टीला अनेक नाटके देऊन नाशिकचे नाव अजरामर केले आहे. पूर्वी नाट्य संमेलन म्हटले, की शहरातून नाट्यसंमेलनाला जाण्यासाठी कलावंत मंडळीची रीघ लागत असे. वातावरणही ढवळून निघायचे. हीच बाब राज्य नाट्य स्पर्धेच्या बाबतीत घडायची. मात्र, सध्या यातील काहीच होताना दिसत नसल्याचे रंगकर्मींचे म्हणणे आहे. केवळ स्वत:ला रंगकर्मी म्हणून मिरवून घेण्यातच नाशिकमधील काही लोकांना धन्यता वाटते, असा सूर नाट्य क्षेत्रातून आळवला जात आहे. मुंबईतील मुलूंड येथे नाट्य संमेलनाला सुरुवात झाली असून या ठिकाणी विविध नाटके, एकांकिका यांचे सादरीकरण होणार आहे. मात्र, शहरातील बोटावर मोजण्या इतक्या रंगकर्मींनी तेथे हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणाले, की नाशिक शहरातील काही रंगकर्मी स्वत:ची शेखी मिरवून घेण्यातच धन्यता मानतात. या ठिकाणी सादर होणाऱ्या नाटकातून आपल्याला काहीतरी चांगले शिकायला मिळेल, चांगल्या कलाकृती पहायला मिळतील यासाठी तरी आपण संमेलनाला जावे असे त्यांना वाटत नाही. आपण जे करू ते चांगले अशी मानसिकता शहरातील काही कलाकारांची झाल्याने दुसऱ्या कलाकृतींकडेही ते कानाडोळा करीत असतात.

नाशिकमधून संमेलनाला जाणाऱ्यांमध्ये सचिन शिंदे, सुरेश गायधनी, सुनील ढगे,रवींद्र ढवळे, नंदकुमार देशपांडे, प्राजक्त देशमुख, प्रणव प्रभाकर, प्रफुल्ल दीक्षित, आनंद ओक, सिद्धार्थ बोडके, श्रीपाद देशपांडे, शुभांगी सदावर्ते, गिरीश गर्गे, अनिता दाते यांचा समावेश आहे. शहरातील कलाकारांच्या संख्येच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे. या नाट्य संमेलनात लोककलांवर आधारित कलाप्रकार पहायला मिळणार आहेत. तसेच काही विदर्भातील नाटकेही सादर होणार आहेत. त्यामुळे वेगळा फॉर्म पाहण्याची संधी मिळणार आहे. पण, त्याकडे नाशिककरांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

कलाकारांची सातत्याने घट

मराठवाड्यातील परळी येथे झालेल्या नाट्य संमेलनात नाशिकच्या 'खंडोबाचं लगीन'चा प्रयोग झाला होता. त्यावर्षी शहरातून प्रयोगाव्यतिरिक्त शंभराच्या वर रंगकर्मी हजर होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यात सातत्याने घट होत आहे. हौशी रंगकर्मींबरोबर स्वत:ला व्यावसायिक नट म्हणून मिरवणाऱ्यांनीही या संमेलनाकडे पाठ फिरविल्याचे नाट्य क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. यंदा नाशिकच्या नाटकांचाही संमेलनात समावेश नसल्याने येथील नटांची नाराजी आहे.

नाशिकच्या नाट्यवर्तुळात वावरतांना आपण काही तरी नवीन शिकावे या उद्देशाने रंगकर्मींनी संमेलनाला येणे गरजेचे आहे. नाटक हे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करण्याचे साधन नाही, हे नाशिकच्या रंगकर्मींना समजायला हवे.

- सचिन शिंदे, सदस्य,

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ

मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ खाणावळींवर होणार कारवाई

$
0
0

अवैध मद्यविक्री रोखण्याची पोलिस अधीक्षकांकडून ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळी पर्यटनासाठी त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यात जाणाऱ्या पर्यटकांना तेथील ढाबे आणि घरगुती खाणावळी चालविणारे दारू उपलब्ध करून देतात. अशी बेकायदा दारू विक्री करून गैरप्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी दिला आहे.

मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात सलामी दिली असून यंदा सरासरीएवढा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानेही वर्तविला आहे. पाऊस पडू लागला, की पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतात. पावसामुळे बहरणाऱ्या निसर्गाची विविध रुप डोळ्यात साठविण्यासाठी पर्यकांचे जथ्थे ग्रामीण भागात धाव घेतात. त्र्यंबक-घोटी रस्त्यावरील पहिने परिसर असो किंवा इगतपुरी तालुक्यातील भावली धरणासह भंडारदरा मार्गावरील पर्यटन स्थळे असो, तेथे पर्यटकांचा ओढा अधिक असतो. अशा परिसरात पर्यटकांची गर्दी होते. त्यामध्ये टवाळखोरही असतात. त्यांच्याकडून मद्य पिऊन धिंगाणा घातला जातो. छेडछाडीसारखे प्रकारही घडतात. पोलिस स्टेशन दूर असल्याने अशा गैरप्रकारांविरोधात आवाज उठवून ते रोखण्यातही मर्यादा येतात. अशा प्रकारांविरोधात तक्रारी प्राप्त होत असल्याने यंदा पोलिसांनी या परिसरावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहनांची होणार तपासणी

नाकाबंदी करून वाहनांची तपासणी, ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेस केल्या जाणार आहेत. बेकायदेशीररित्या मद्य विक्री करणाऱ्या खानवळी तसेच ढाब्यांवरही कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक दराडे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मलनि:सारण केंद्राचे काम बंद पाडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेने अमृत योजनेअंतर्गत गंगापूरोडवरील बेंडकुळेनगर भागात मलजल उपसा केंद्र म्हणजेच मलनिःसारण केंद्राचे काम सुरू केले होते. परंतु, रहिवाशांच्या सेवा सुविधा असलेल्या भूखंडावर मलनिःसारण केंद्राचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक महिलांनी खोदलेल्या खड्ड्यात उतरत काम बंद पाडले होते. यानंतर पुन्हा बुधवारी महापालिकेच्या ठेकेदाराने काम पूर्ववत सुरू केल्याने स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवत पुन्हा काम बंद पाडले.

यावेळी रहिवाशांनी जागा बदलून मलनिःसारण केंद्राचे काम केले जात असल्याचा आरोप केला. मंजूर जागेवर मलनिःसारण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, रहिवाशांचा विरोध बघता शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे, भाजपा नेते वसंत गिते, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे यांनी रहिवाशांची भेट घेत चर्चा केली. मलनिःसारण केंद्र रहिवाशी भागाला लागून करण्यात येऊ नये, अशी मागणी रहिवाशांनी नगरसेवक तसेच महापालिका अधिकाऱ्यांकडे केली. विशेष म्हणजे अमृत योजनेत मंजूर असलेला निधी परत जाऊ नये, यासाठी रहिवाशांच्या सेवा सुविधा भूखंडांवर मलनिःसारण केंद्र उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

नाशिक महानगरपालिकेला मलनिःसारण केंद्र (एसटीपी) प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून निधी देण्यात आला आहे. यातून नियोजित कालावधीमध्ये नाशिक मनपास सदर निधी खर्च करण्यास सांगण्यात आले आहे. योजनेअंतर्गत गंगापूर गाव येथे १८ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलनिःसारण केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. सदर मलनिःसारण केंद्रासाठी ले-आऊटप्रमाणे बेंडकुळेनगर, आनंदवली परिसरातील चिखलीनाला, सर्व्हे क्रमांक ६२ व ६३ येथे जागा आरक्षित केलेली आहे. तसा बांधकामाबत स्थायी समितीत ठराव करून निविदादेखील मागवण्यात आल्या होत्या. परंतु, सदर जागा अद्याप सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून, नाशिक महानगरपालिकेने ही जागा हस्तांतरीत केलेली नाही.

ट्रस्ट सदर जागा जमिनीच्या चालू बाजारभावाप्रमाणे पालिकेला देण्यास तयार आहे. परंतु, मनपाची आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे कारण पुढे करीत अद्याप सदर जागा ताब्यात

घेण्यात आलेली नाही. दुसरीकडे अमृत योजनेअंतर्गत काम करण्याचा कालावधी संपत आल्याने व एसटीपी प्रकल्पाचा निधी परत जाऊ नये यासाठी पालिकेने बेंडकुळेनगरच्या रहिवाशी परिसरामध्येच साईदेवेश्वर गृहनिर्माण संस्थेच्या जागेमधील नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी असलेल्या ५ टक्के राखीव जागेवरच मलजल उपसा केंद्राचे बांधकाम सुरू

केले आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक रहिवाशांनी आरोग्यास धोका असल्याचे सांगत या ठिकाणचे बांधकाम बंद पाडले.

बेंडकुळेनगर भागात सर्वांचेच बंगले आहेत. यात बंगल्यांना लागून महापालिका मलनिःसारण केंद्र उभारत असल्याने त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागणार आहे. मंजूर असलेल्या जागेवरच मलनिःसारण केंद्र उभारले पाहिजे. केवळ निधी परत जाऊ नये, म्हणून रहिवाशांना त्रास देणे योग्य नाही.

- शरद बेंडकोळी, स्थानिक रहिवाशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंतनू कांबळे निधन

$
0
0

(पान-१साठी)

लोकशाहीर शंतनू कांबळे यांचे निधन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रसिद्ध विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू नाथा कांबळे (वय ४१) यांचे बुधवारी (दि. १३) दुपारी दीर्घ आजाराने नाशिकरोड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली आणि मुलगा कनिष्क, वडील नाथा आणि आई लक्ष्मी असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता शंतनू यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सामाजिक विषमतेविरुद्ध शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर जनजागृती केली. जागर लढाऊ लोककला आघाडी, लोकसांस्कृतिक मंचसह विविध विद्रोही सांस्कृतिक संघटनांनी शंतनू यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून २००५ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली होती. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेले शंतनू मूळचे शेटफळे, ता. आटपाडी, जिल्हा सांगली येथील होते. वडील मुंबईत नोकरीस असल्याने ते मुंबईतील वडाळा येथे स्थायिक झाले होते. २००८ साली ते नाशिकमध्ये वास्तव्यास आले. नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकर नगर येथे ते वास्तव्यास होते.

(सविस्तर वृत्त...३)

\Bशाहिरी बाणा काळाच्या पडद्याआड

\Bम. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रसिद्ध विद्रोही कवी आणि लोकशाहीर शंतनू नाथा कांबळे (वय ४१) यांचे बुधवारी दुपारी दीर्घ आजाराने नाशिकरोड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली आणि मुलगा कनिष्क, वडील नाथा आणि आई लक्ष्मी असा परिवार आहे.

शंतनू मागील काही वर्षांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त होते. तब्येत बिघडल्याने गेल्या आठवड्यात त्यांना नाशिकच्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

पाच-सहा दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर, शाहीर विलास घोगटे यांच्या प्रबोधनात्मक गितांचा त्यांच्यावर बालपणीच प्रभाव पडल्याने पुढे चालून ते शाहिरीकडे वळले. राज्यभर त्यांनी विद्रोही चळवळीच्या एकीकरणासाठी प्रयत्न केले. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या नेत्या सुमन वाघ यांचे ते जावई होत.

तीन महिने होते पोलिस कोठडीत

२००५ मध्ये शंतनू यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रायपूर येथे आदिवासींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना १०० दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, तपासाअंती न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी तुरुंगात प्रचंड मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते अंथरुणाला खिळले होते. त्यातच त्यांना क्षयाची लागण झाली. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी वडाळ्याहून नाशिकला मुक्काम हलवला होता. मात्र, नाशिकमध्ये आल्यानंतरही आजाराने त्यांची पाठ सोडली नव्हती.

सामाजिक विषमतेवरील भाष्यकार

शंतनू अनेक वर्षांपासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि जातीअंताच्या लढाईत ते अग्रेसर होते. त्यांच्या कविता आणि गाण्यातून ते जातीय अत्याचार, शोषण, आर्थिक-सामाजिक विषमता आणि मानवतावादावर भाष्य करत असायचे. 'दलिता रे हल्ला बोल ना... श्रमिका रे हल्ला बोलं ना...' आणि 'समतेच्या वाटेनं, खणकावत पैंजण यावं तू यावं, तू यावं, तू यावं बंधन तोडीत यावं...' अशी काही त्यांची गीते चळवळीत लोकप्रिय होती. अत्यंत गाजलेला 'कोर्ट' हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर बेतलेला होता. ते 'विद्रोही' मासिकाच्या संपादक मंडळावरही होते.

--

कोट

--

विद्रोही चळवळ त्यांचा प्राण होता. सामाजिक विषमतेवर त्यांनी शाहिरी रचली व सादर केली. लोकशाहिची तत्त्वे अंगिकारून वंचितांचे प्रबोधनाचे काम त्यांनी केले. त्यांच्या अवेळी जाण्याने विद्रो चळवळीची मोठी हानी झाली आहे.

-प्रा. गंगाधर आहिरे, साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन वीज देयकावर अतिरिक्त शुल्क नाही

$
0
0

ऑनलाईन देयक भरणा कोणत्याही शुल्कविना

राज्यभरातील वीजग्राहकांना दिलासा

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

ऑनलाइन व्यवहार केल्यावर त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागते. त्यातच बरेदा वीज बिल किवा इतर देयकांसाठी संबंधित कंपन्यांकडून सुविधेबद्दल शुल्क आकारण्यात येते. मात्र, आता महावितरणने ऑनलाइन वीज देयक भरल्यावर त्यावर कुठलेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता यावा व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रेडीट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिटकार्ड व युपीआय पध्दतीने विजदेयकाचा भरणा केल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क केली आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in) व महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे ग्राहक विजदेयकाचा ऑनलाईन भरणा करु शकतात. ऑनलाईन विजदेयकाचा भरणा करताना केवळ क्रेडीटकार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पध्दतीने (नेटबँकींग, युपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) विजदेयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर Payment History तपासल्यास वीजबील भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाईन वीजबील भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असून यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधूशकतात.

ग्राहकांनी वीजबील भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून वीजबील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन वीजबील भरणा सेवांचा फायदा घ्यावा व विजदेयकाचा भरणा ऑनलाईन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटीस पाठवायची कुठे?

$
0
0

भिडे गुरुजींचा पत्ता शोधण्यासाठी पोलिसांकडे धाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर मुले होतात', शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त विधानाची चौकशी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरू केली आहे. चौकशीसंदर्भात आरोग्य संचलनालयाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय विभागाकडून पहिल्या टप्प्यात भिडे गुरुजींना नोटीस पाठविली जाणार आहे. परंतु, भिडे गुरुजींचा नेमका पत्ता नसल्याने नोटीस कुठे पाठवायची अशा संभ्रमात अधिकारी पडले असून, त्यासाठी आता पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी (दि. १०) नाशिकमधील कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले. त्यावर चौफेर टीका झाल्यानंतर भिडे समर्थकांकडून सारवासारवरही करण्यात आली. 'लेक लाडकी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या पुणे येथील अतिरिक्त संचालकांकडे भिडे यांच्या विधानासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्यानुसार आरोग्य संचलनालयाने विधानाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाला दिले. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना विधानाची खातरजमा करण्यासाठी पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चिकित्सा कायद्यानुसार भिडे यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीच्या पहिल्या टप्प्यात भिडे यांना नोटीस पाठविली जाणार आहे, तर सभेला हजर असलेल्या काही लोकांचे जाबजबाब नोंदविण्याबरोबरच भाषणाची व्हिडिओ क्‍लिप तपासली जाणार आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल सोमवारी (दि. १८) होणाऱ्या समितीच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी दिली आहे.

व्हिडीओ तपासणीचा पेच

भिडे यांच्या वक्तव्यामुळे गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चिकित्सा कायद्याचे उल्लंघन झाले का, याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी भिडे यांना नोटीस पाठविली जाणार आहे. महापालिकेच्या नोटिसीवर त्यांच्याकडून उत्तर प्राप्त न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, भिडे यांच्या वास्तव्याचा पत्ता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नाही. तसेच, भिडे हे सतत राज्यभर दौऱ्यावर असतात. त्यामुळे त्यांना नोटीस नेमकी कुठे द्यायची, अशा पेचात अधिकारी आहेत. शिवाय, त्यांचा व्हिडीओ खरा की खोटा ही तांत्रिक बाब वैद्यकीय विभाग कशी तपासणार हा सुद्धा पेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसचा मार्ग बदलणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका 'स्मार्ट रोड'चे काम एका बाजूने सुरू झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरील सिटी बसच्या दररोजच्या १०१८ फेऱ्या कॅनडा मार्गावरुन वळविण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अशोकस्तंभ, रविवार कारंजा व पंचवटीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्याचप्रमाणे सिटी बसच्या प्रवासाचे अंतर वाढणार असून, त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मंगळवारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व एसटीचे अधिकारी यांची पंचवटीच्या विभागीय कार्यालयात बैठक झाली. त्यात सिटी बसच्या मार्गावर चर्चा झाली. या चर्चेत एसटीने सिटी बसचा मार्ग बदलण्यापेक्षा एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या विषयावर निर्णय झाला नसला तरी एसटीने पर्यायी मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून या स्मार्ट रोडचे शासकीय कन्या शाळेच्यासमोरील सीबीएस ते मेहरपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर स्मार्ट डिव्हायडर टाकून दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच रस्त्यावरून सुरू करण्यात आली आहे. पण, सिटी बसमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे सांगत स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने एसटीलाच मार्ग बदलण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे एसटीने तूर्त मार्ग बदलल्यास त्याचे अंतर किती पडेल व त्याची प्रवाशांना किती चाट पडेल व त्यातून किती जणांची गैरसोय होईल त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

असा असेल सिटी बसचा मार्ग

सीबीएस ते मेहेरपर्यंत सिटी बसचा रस्ता बंद केला तर बसचा मार्ग बदलणार आहे. नाशिकरोडहून येणाऱ्या बस शालिमारवर आल्यानंतर त्या सीबीएसहून कॅनडा कॉर्नरपर्यंत जातील. त्यानंतर त्या गंगापूररोडवरुन चोपडा लॉन्स, रामवाडीवरुन निमाणी बस स्थानकावर सोडण्याचा विचार सुरू आहे. एसटीने मार्ग बदलल्यास प्रवाशांच्या गैरसोयीबरोबरच अंतर व भाडे वाढणार असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्ग एकेरी करावा व एसटीला कोर्ट व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीच्या बाजूच्या रस्त्यावरून जागा सोडावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. अशोक स्तंभाकडून येणाऱ्या बस व इतर वाहतूक एमजी रोडवरून शालिमारकडे वळवावी असे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images