अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच इच्छुक लागले कामाला केशव ढोन्नर, त्र्यंबकेश्वर मकरसंक्रांतपूर्वी अवकाशात झेपावणाऱ्या पतंगांची काटाकाटी सुरू व्हावी, तशी येथे त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी इच्छुकांनी परस्परांचे दोर कापण्यास प्रारंभ केला आहे. स्वत:साठी मोर्चेबांधणी करीत असताना इतरांचे दोर कसे कापले जातील याची व्यूहरचनादेखील आखली जात आहे. खरोखरच योग्य व्यक्ती विश्वस्त म्हणून संस्थेवर नियुक्त झाली पाहिजे, अशी रास्त अपेक्षा काहींच्या अर्जामागे आहे, तर त्याचसोबत कुरघोडीच्या राजकारणात यापूर्वीचे हिशेब चुकते करण्यासाठी देखील जोरदार प्रयत्न होत आहेत. विद्यमान विश्वस्तांची निवड ४ जून २०१३ रोजी झालेली आहे. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यास अद्याप ४० दिवसांचा अवधी आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाची याबाबतची अद्याप कोणतीही सूचना जाहीर झालेली नाही. गतवेळी मे २०१३ मध्ये जाहीर सूचना प्रसिध्द झाली होती. अर्थात गतवेळेस झालेली निवड ही प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेने विश्वस्त मंडळाचा आराखडा निश्चित झाला. त्यानंतर निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. संबंधित विभागाची निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वीच विश्वस्त कामाला लागले आहेत. या पाच वर्षात विश्वस्तपदाला फारच महत्त्व आले आणि अनेकांना त्याचे आकर्षण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये विश्वस्त मंडळाने वेळोवेळी घेतलेले निर्णय नेहमीच चर्चेत राहिले. त्यातून आपणही विश्वस्त का होऊ नये? अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर शहराची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. येथे विश्वस्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या सर्व घटकांचा विचार झाला तरच येथील अर्थकारणास गती प्राप्त होण्याची आशा आहे. त्र्यंबकेश्वर येथील नगरपरिषद या संस्थेच्या कारभाऱ्यांनी येथील अर्थव्यवस्थेस सकारात्मक परिणाम साधेल असे नियोजन करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टनेदेखील दर्शनाचे नियोजन करणे गरजेचे आहे. आजमितीस २०० रुपये देणगी शुल्क आकारून देवस्थान आपल्या उत्पन्नात वाढ करत आहे. परंतु, या उत्पन्नवाढीचा शहरातील बेरोजगार घटकांना कितपत फायदा होतो? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना भेडसावतो. फूल, प्रसाद, नारळ आदी साहित्य विक्रीतून येथे व्यावसायिक उदरनिर्वाह करीत असताना मध्यंतरी फुलबंदी आणि आतापर्यंत नारळबंदी करून नेमके काय साध्य केले जाते? अशा एक ना अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या मालिका या पाच वर्षात निर्माण झाल्या आहेत. त्यातूनच यापुढे विश्वस्त नेमणूक होताना काय निकष बाळगावेत याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. यामध्ये काही सामाजिक संघटनादेखील उतरल्या असून, यपुढील कालावधीत अर्ज आणि निवेदनांचे युध्द सुरू झाल्यास नवल वाटायला नको. सुविधा पुरवण्यास अपयशी वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न दानाच्या स्वरूपात मिळविणारे देवस्थान येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उभे राहण्याची सुखदायी सुविधा देण्यास असफल ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाविकांच्या सेवा-सुविधांबाबत अशाच प्रकारची उदासीनता कायम आहे. सर्वसामान्य नागरिकांना विश्वस्त कोण होणार याची काळजी नाही. मात्र भाविकांच्या सेवा-सुविधांची जाण असलेल्यांनीच तेथे जावे, अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट