pravin.bidve@timesgroup.com
Tweet : BidvePravinMT
हिरव्यागार पानांच्या ज्या पत्रावळीवर अनेक पिढ्यांच्या पंगती उठल्या, ज्या पत्रावळीवरील खाद्यपदार्थांनी उदरभरणासह तृप्ततेचा ढेकर देता आला ती पळसाच्या पानांची पत्रावळी आज अखेरच्या घटका मोजत आहे. विविध कारणांमुळे ही अस्सल नैसर्गिक पत्रावळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता प्लास्टिक बंदीनंतर या पत्रावळीच्या कारागिरीला 'अच्छे दिन' येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
--
पूर्वी ग्रामीण भागात मराठी शाळेच्या मैदानावर लांबच लांब पंगत बसली, की अस्सल नैसर्गिक पत्रावळीचे वाटप केले जायचे. भात, वरण, भाजी, पुरी, बुंदी, बर्फी, मटकी, मसालेभात असे एकेक करून पदार्थ या पत्रावळीवर उतरायचे. कुणाला हिरवीगार, तर कुणाला काहीशी तांबूस पत्रावळी मिळत असे. या पत्रावळींवर उतरणाऱ्या गरमागरम पदार्थांची लज्जतच न्यारी होती. अजूनही ग्रामीण भागात अन् शहरातही काही प्रमाणात अशा पंगती बसतात. परंतु, ते नैसर्गिक भोजनपात्र त्यामधून गायब झाले आहे. प्लास्टिक, कागदी आणि थर्माकोलच्या पत्रावळ्यांमुळे पळसाच्या पानांची अस्सल नैसर्गिक पत्रावळी कालबाह्य ठरू लागली आहे. कळवण तालुक्यातील ओतूर गावाच्या अर्थव्यवहाराला या पत्रावळीचा मोठा आधार होता. परंतु, पत्रावळीच नामशेष होऊ लागल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचाच रोजगार बुडाला आहे.
ओतूर गावाने सामाजिक ऐक्याची ज्योत सदैव तेवत ठेवली. या गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा धोडप किल्ला आहे. दक्षिण व पश्चिमेच्या टोकाला मार्कंडेय ऋषींचा डोंगर, पूर्वेकडे चौरंगीनाथ मंदिर, तर विखाऱ्या डोंगरावर गोरक्षनाथाचे समाधी मंदिर आहे. या गावाची निर्मिती १३ व्या शतकातील आहे, असे ग्रामस्थ सांगतात. त्या काळी हे गाव उतानपात या राजाची राजधानी मानली जात असे. राजाच्या नावामुळे या गावाला पूर्वी उतानपातनगरी असे म्हटले जाई. गावात पाणीपुरवठ्यासाठी वापरात येणारी पेशवेकालीन मजबूत दगडांमध्ये बांधलेली विहीर पुरातन काळाची साक्ष देते.
अशी बनते पत्रावळी
आदिवासी बांधवांकडून खरेदी केलेल्या पळसाच्या पानांना सुतळीद्वारे गुंफून त्यांची माळ तयार केली जाते. अशा माळा पोटमाळ्यावर किंवा जेथे जागा असेल तेथे साठवून ठेवल्या जातात. पत्रावळी बनवायची असेल, तेव्हा त्यापैकी एक-दोन माळा पाण्यात भिजवितात. कडक झालेली पाने टाचण्यासाठी नरम व्हावीत हा त्यामागे उद्देश असतो. प्रत्यक्ष पत्रावळी बनविण्यास घेण्यापूर्वी पानांची माळ मोकळी करवून घेतली जाते. या पानांचे देठ कापून पाने एकावर एक रचून ठेवली जातात. ही पाने एकमेकांना टाचण्यासाठी बोरू साळला जातो. त्याच्या बारीक अन् टोकदार काड्या तयार केल्या जातात. हे काम कठीण असते. अस्सल कारागीरच ते अत्यंत सफाईदारपणे करू शकतो. पळसाची पाने कडक असतील, तर बोरूची काडीही ते टाचताना मोडते. तसे होऊ नये याकरिता या पानांवर पाणी मारून ती नरम केली जातात. त्यानंतर कारागीर एक-एक पान गोलाकार जोडत ते टाचत जातो. साधारणतः एक पत्रावळी बनविण्यासाठी सात ते आठ पाने टाचली जातात. परंतु, तयार पत्रावळी काहीशा ओबडधोबड आकारात असते. अशा काही पत्रावळी तयार झाल्या, की त्यांना एकसारखा गोल आकार देणे आवश्यक असते. त्यासाठी दगडी जात्याच्या तळीची मदत घेतली जाते. ही तळी पत्रावळींवर ठेवून त्याबाहेर आलेला भाग कात्रीने कापून घेतला जातो. गोलाकार पत्रावळी अर्थात, भोजनपात्र तयार होते. सुख-दु:खाच्या कुठल्याही कार्यात ते वापरले जाते.
शेकड्याला दीडशे रुपये भाव
साधारणतः दीडशे रुपये शेकडा याप्रमाणे ग्राहकांकडून कारागीर दर आकारतात. १५०० रुपयांत १००० पत्रावळ्या म्हणजेच दीड रुपया प्रतिपत्रावळी एवढा दर ग्राहकांकडून आकारला जातो. परंतु, हा दरही ग्राहकांना अधिक वाटू लागला आहे. पत्रावळीची ऑर्डर देण्यासाठी कारागिरांकडे येणारे ग्राहक दराच्या बाबतीत घासाघीस करतात. परंतु, ही पत्रावळी बनविण्यामागील मेहनत विचारात घेतली जात नाही. १०० पत्रावळ्यांसाठी १५० रुपये आकारण्यात येतात. काही पत्रावळ्यांना छिद्रे पडलेली असतात, तर काहींची पाने खराब असतात. त्यामुळे १०० पत्रावळींच्या गठ्ठ्यात ८० ते ९० पत्रावळ्याच चांगल्या असतात. पत्रावळी बनविण्यासाठी पळसाची पाने २५ ते ३० रुपये माळ याप्रमाणे खरेदी केली जातात. एका माळेत साधारणतः ५०० ते ६०० पाने असतात. त्यापासून ५० ते ६० पत्रावळ्या बनतात.
जंगलातील मुक्कामाचा आनंद विरला
अगदी पाच-दहा वर्षांपूर्वी ओतूरमधील शंभरांवर घरात पत्रावळ्या बनविल्या जात असत. एप्रिल-मेमध्ये पत्रावळी बनविणारे कारागीर कुटुंबातील काही सदस्यांसह पळसाची पाने आणण्यासाठी घराबाहेर पडत. जंगलाच्या जवळपास त्यांचा चार-आठ दिवसांचा मुक्काम असे. सर्व शिधा ते सोबत घेऊन जात. दिवसभर पळसाची पाने गोळा करून त्यांच्या माळा तयार करून ठेवणे हा त्यांचा दिनक्रम असे. अशा भरपूर माळा तयार झाल्या, की त्या टेम्पो, ट्रॅक्टर ट्रॉली यांमध्ये भरून ते घरी परतत. त्यानंतर गरज भासेल तशी ही पाने भिजवून ती पत्रावळी बनविण्यासाठी वापरली जात असत. जंगलाजवळील हा मुक्काम म्हणजे छोटेखानी सहलच होती. परंतु, या आनंदालाही आता कारागीर आणि त्यांची कुटुंबे मुकली आहेत. ज्या कारागिरांना जंगलात मुक्काम करून पाने आणणे शक्य होत नसे ते कारागीर आदिवासी बांधवांकडून या पानांच्या माळा खरेदी करत. १० वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती होती. परंतु, हळूहळू पत्रावळ्यांची मागणी कमी होत गेली तशी परिस्थितीही बदलत गेली. बाबापूर, मुळाणे, खिरमाडे, भातवडा, वंजारमुळाणे, पायरपाडा, गोलदरी, अहिंतवाडी, गोपाळखडे येथून ही पाने येत असत.
नैसर्गिक पत्रावळीला सरकारी मदतीची गरज
केळीच्या पानांवर जेवणाचे आरोग्याच्या बाबतीत जसे महत्त्व आहे, तसे पळसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणेही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे कागदी, थर्माकोल आणि प्लास्टिकच्या भोजनपात्रांचे बाजारपेठेत आगमन झाले त्या सुरुवातीच्या काळात जुन्या पिढीतील लोक कुठल्याही शुभकार्यात किंवा पंगती उठविण्यासाठी पत्रावळीचाच आग्रह धरत असत. परंतु, अन्य पर्याय माफक दरात उपलब्ध झाल्यामुळे पत्रावळ्यांची मागणी कमी होत गेली. पळसाची झाडे आणि पर्यायाने पाने कमी झाल्याचेही ग्रामस्थ सांगतात. परंतु, राज्य सरकारने प्लास्टिकबंदी करतानाच भोजनपात्र म्हणून पत्रावळी वापराचा आग्रह धरायला हवा. या व्यवसायाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी काही योजना अथवा धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा हे कारागीर व्यक्त करू लागले आहेत. या अस्सल नैसर्गिक भोजनपात्राला नवसंजीवनी लाभणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
--
पळसाची पाने बोरूच्या काडीने टाचून पत्रावळी बनविली जाते. हे काम अत्यंत कष्टाचे आहे. त्याला तेवढे दामही मिळत नसल्याने पूर्वी घराघरांत बनणारी पत्रावळी आता क्वचितच कुणी बनविते. सरकारने या स्वयंरोजगार वाढीला प्रोत्साहन द्यायला हवे.
-हरिभाऊ सोनवणे, कारागीर, ओतूर
\Bलोगो : ऑन द स्पॉट रिपोर्ट\B