Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

माझी आक्का!

$
0
0

फर्स्ट पर्सन : डॉ. विजया वाड

__

माझी आक्का!

--

लहानपणी आमच्या मोगऱ्याला पहिले मोगऱ्याचे फूल आले, ते चिमुकल्या ओंजळीत पकडून मी जिच्यासाठी धावत तिच्या अभ्यासिकेत घेऊन गेले होते ती माझी आक्का गेली... गोरीपान, नाकेली, सडसडीत नि हुशार तर इतकी, की मालतीताई बेडेकर या सुप्रसिद्ध साहित्यिका एसएससीची तिची बक्षिसे देताना म्हणाल्या, ‘मला वाटते रजनीची बक्षिसे संपतात की नाही!’

होय! एसएससीला ती पहिली आली होती. कधीच दुसरी नव्हती. हो! इंटरला, एमएला, मतिमंदांच्या कोर्सला... तिचा झेंडा उंच सर्वांत... दादा, नाना, आक्का, नीरू सारे बरोबरीचे. मी तेवढी नऊ वर्षांनी लहान. एक अपघाती अपत्य! साऱ्यांचा खर्च भागवताना आई मेटाकुटीस येई. पण, आक्का नेहमी सारे बक्षिसाचे पैसे आईस देई. माझे बाबा मी अकराची असताना गेले. आक्का इंटरला. दोघे भाऊ एम.एस्सीला. प्रिन्सिपॉल घरी आले. ‘रजनीला कॉलेजातून काढू नका!’ पण, तिने ऐकले नाही. लग्नच करून टाकले. अठराव्यात! म्हणाली, ‘बाबा अकाली गेले. दादावर भार नको.’

पण, नागेश लिमयांनी रजनी दातारला शिकविले. स्वत: पाणी भरले, केर काढला, मुलीस सांभाळले... पण रजनीस शिकवले. आक्काची अंजू आता आजारपण काढताना भक्त पुंडलिकासाठी किती सेवा!

आक्काचा गौतम मतिमंद झाला म्हणून ती रडत बसली नाही. नाशिकमध्ये तिने मतिमंदांसाठी शाळा काढली. दारोदार जाऊन मुलं जमवली. कुमुदताई ओकांनी आपल्या सिनेमागृहात एक शेड दिली. आक्का ४ मुलांसकट गौतम शाळा भरवी. आज चारशे मुलं प्रबोधिनीच्या भव्य इमारतीत आपलं जग शोधत आहेत. आणखी एक शाळा सुनंदा केले. सातपुरात वाढतेय मतिमंदांसाठी होस्टेल आहे. कॅनडाच्या वाणी साहेबांचा फार जीव! वाणी साहेबांनी तिला अमेरिका, कॅनडा येथल्या शाळा (मतिमंदांच्या) दाखवल्या. तिची व्याख्याने ठेवली.

आक्का ग्रेट होती! राष्ट्रपती पुरस्कार, सावित्रीबाई पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गतवर्षी सन्मान. १५ लाख रुपये शाळेस!

सर्वस्व शाळा! ध्यानीमनी प्रबोधिनी! ना गर्व ना अहंकार. परवाच मी, निशिगंधा, दीपक तिला भेटायला गेलो होतो. चांगली जागती होती. दीपकला म्हणाली, ‘चॅनल हेड झालास ना! शाळेला देणगी पाठव.’ सदाही प्रबोधिनीचाच विचार.

सिंगापूरला व्याख्यानाला गेली तर कमिटीने विचारले, ‘पैसे कोणाच्या परवानगीने काढले?’ आक्काने आपले पासबूक दाखवले. ‘स्वखर्चाने गेले हो’ कमिटी गप्पगार! अशी सत्त्वशील आक्का.

माझ्या भाचीच्या लग्नात ती ठाण्यास आली होती. गौतमला आमच्यापाशी ठेवून दोन तास म. पा. भावे यांच्याकडे कविता ऐकायला गेली होती. पण, गौतम जो घाबरून टेबलाखाली बसला तो येईनाहो बाहेर. आई आल्यावर रडायला लागला.

‘किती उशीर?’ नीरू म्हणाली, जीव रमला गं ! पण तुम्हाला माझं उणं लेकरू नाही सांभाळता आलं दोन तास, मी जीवनभर सांभाळतेय. तुम्ही कसले गं बहीणभाऊ? तुम्हीही बघेच.’ आमची तोंडे उतरली, किती रडलो.

माझ्या प्राजू, निशूंना दर सुटीत आक्कामावशीच हवी असे. अवघ्या नाशिकला लिमयेबाईंचा अभिमान! आक्का तू कधीच पुसली जाणार नाहीस...

जोवर प्रबोधिनी आहे.. तू आहेस, तू आहेस...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्यांच्या’ जीवनात पेरला आनंद...

$
0
0

‘त्यांच्या’ जीवनात पेरला आनंद...

--

विशेष मुलांच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या रजनीताईंबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना...

--

साधी, सात्त्विक अन् प्रामाणिक

माझी मावशी आम्हा सर्वांसाठी आदर्श होती. माझी मोठी बहीण प्राजक्तासह आम्हा सर्वांवर तिचा अतोनात जीव होता. ती खरोखर कर्मयोगिनी होती. साधी, सात्त्विक अन् प्रामाणिक. तिने स्वत:साठी कधीच कोणाकडे काही मागितले नाही. तिचे घर आजही अत्यंत साधे आहे. जे करायचे ते माझ्या शाळेतील मुलांसाठी करा, असे ती म्हणे. देहदान व नेत्रदान करीत तिने अखेरपर्यंत कशाचाच मोह ठेवला नाही.

-निशिगंधा वाड, अभिनेत्री व रजनीताईंच्या भाची

--

श्रेष्ठ कर्मयोगिनी...

प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करणे हे रजनीताईंकडून शिकण्यासारखे आहे. मानसिक विकलांग मुलगा जन्माला आल्यानंतर आजचे पालक हातपाय गाळून बसतात. मात्र, बाईंनी त्यांच्यासाठी शाळा सुरू केली. या मुलांच्या जीवनात आनंद फुलवला. त्या श्रेष्ठ कर्मयोगिनी होत्या असेच त्यांचे वर्णन करता येईल.

-श्रीकांत पूर्णपात्रे, अध्यक्ष, आधाराश्रम

--

पालकांनाही दिला दिलासा

रजनीताईंनी स्वत:च्या मुलासाठी संस्था सुरू केली. मात्र, अनेक मुलांचे भवितव्य उज्ज्वल केले. अनेक मानसिक विकलांग मुलांना स्वत:च्या पायावर उभे केले. नॉर्मल नसलेल्या मुलांच्या पालकांनाही दिलासा दिला. आपण काही करू शकतो, असा आत्मविश्वास दिला. त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते.

-प्रा. निशा पाटील, समाजसेविका

--

या मुलांना धीट बनवा!

बाईंचा व माझा परिचय २०१२ मध्ये झाला. मतिमंद मुलांसाठी नाटक बसवावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी मला बोलावले होते. मी, माझ्या सौ तेथे जात असू. या मुलांच्या बोलण्यात प्रगती करून घेणे असा त्यांचा त्यामागचा हेतू होता. बाई सांगायच्या, की या मुलांना धीट बनवा. त्यांनी संपूर्ण जीवन मतिमंद मुलांसाठी खर्ची घातले. मी त्या मुलांमध्ये रमलो. बाईंचे जाणे आमच्यासाठी धक्का आहे.

-रवींद्र ढवळे, ज्येष्ठ दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबोधिनी ट्रस्टच्या रजनीताईंचे ‌निधन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानसिक अपंगांच्या विकासासाठी असलेल्या प्रबोधिनी ट्रस्ट संस्थेच्या संस्थापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या रजनीताई नागेश लिमये (वय ८१) यांचे त्र्यंबकरोडवरील निमा हाऊसशेजारील मुथा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पती नागेश लिमये, मुलगी गितांजली हत्तंगडी व मुलगा गौतम असा परिवार आहे. रजनीताई यांचे मेडिकल कॉलेजला देहदान व नेत्रदान करण्यात आले.

रजनीताईंचा जन्म १७ मे १९३७ मध्ये झाला. त्यांना सर्वजण बाई म्हणूनच ओळखत. मानसिक विकलांगता हे आयुष्याला लागलेले पाप आहे असा समज पसरलेला असताना, या समाजाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहण्याचे धाडस रजनीताई लिमये यांनी दाखवले. त्यांनी मानसिक विकलांगांसाठी नाशिकमध्ये पहिली शाळा काढली. दरम्यान, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव प्रबोधिनी शाळेच्या अंगणात ठेवण्यात आले होते.


आनंदभूवनात शाळेचा रचला पाया

१ जानेवारी १९७७ या दिवशी सम्राट हॉटेल शेजारील ‘आनंदभुवन’ या वास्तूत पाच मानसिक विकलांग मुलांना घेऊन शाळेला त्यांनी सुरुवात केली. मानसिक विकलांगांना वेडे ठरविले जात होते, त्या काळात रजनीताईंनी दाखवून दिले की, या मुलांना योग्य शिक्षण दिल्यावर ती त्यांच्या पायावर उभी राहू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाभावाचा आदर्श; रजनीताई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

१ जानेवारी १९७७ या दिवशी सम्राट हॉटेलशेजारील ‘आनंदभुवन’ या वास्तूत पाच मानसिक विकलांग मुलांना घेऊन रजनीताईंनी शाळेचा श्रीगणेशा केला. या धाडसी कामासाठी रजनीताईंना थोर शिक्षक प्र. ग. अकोलकर यांचे मार्गदर्शन, डॉ. शिरीष सुळे यांचे वैद्यकीय साहाय्य, कमलताई सारडा यांची आर्थिक मदत व रावसाहेब ओक यांनी शाळेसाठी दिलेली जागा, अशी मदत मिळाली.

प्रबोधिनीला सरकारी मान्यता मिळविताना समाजकल्याण विभागाने घातलेल्या तीन अटी पूर्ण करताना रजनीताईंची दमछाक झाली. परंतु, त्या ठाम राहिल्या. शाळेला मोठी जागा, मुलांची सरासरी हजेरी पंधरा व शिक्षक प्रशिक्षित असावा, ही अट थोडी कठीण होती. प्रशिक्षित शिक्षक कुठून आणायचे, हा प्रश्न होता. मानसिक विकलांगांच्या पालनपोषणाचे शिक्षण पुण्याला जाऊन घ्यायला कुणीही तयार होत नव्हते. त्यावेळी ताईंनी स्वतः पुण्याला जाऊन ते प्रशिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांचे पती भाई अर्थात, नागेश लिमये यांनी मोलाची साथ दिली. हळूहळू प्रबोधिनीचा विस्तार होत गेला. पाच मुलांना घेऊन एका रूममध्ये सुरू केलेली शाळा मोठ्या इमारतीत भरू लागली.

रजनीताईंनी सेवाभावीवृत्तीने हे काम केले. द्रष्टा विचार करून त्यांनी मानसिक विकलांगांसाठी शाळा सुरू केली नसती, तर काय झाले असते, हा विचारदेखील आज असह्य करणारा आहे. या शाळांमधून आज कितीतरी पालकांना आपली चिमुरडी भविष्य कवेत घेताना दिसतात, त्याचे श्रेय सर्वस्वी रजनीताई लिमये यांनाच जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बाजार एक ‘समृद्ध अडगळ’

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

पेठरोड, फुलेनगर परिसरातील रहिवाशांना विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून ‘पेठरोड पालिका बाजार’ची इमारत बांधण्यात आली. मात्र, सध्या ही इमारत ‘समृद्ध अडगळ’ ठरली आहे. या इमारतीत एकूण २२ गाळे आहेत. मात्र, भाडेवाढीमुळे व्यावसायिकांनी २० गाळ्यांना कुलूप लावले आहे. तूर्तास दोनच गाळे सुरू असून, इमारतीला अवकळा प्राप्त झाली आहे. भंगार आणि अतिक्रमणातील जप्त केलेल्या वस्तू ठेवण्यासाठीच या इमारतीचा वापर होत आहे. यावरून या इमारतीची वाताहत स्पष्ट होते.

पेठरोडच्या फुलेनगरसारख्या झोपडपट्टी भागात २००१ मध्ये या पालिका बाजाराच्या कामाला मंजुरी मिळाली. इमारत तीन वर्षांत उभी राहिली आणि २००४ मध्ये तिचे लोकार्पण झाले. दोन मजली असलेल्या या इमारतीत २२ गाळे उपलब्ध करून देण्यात आले. सुरुवातीला या सर्व गाळ्यांमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय थाटण्यात आले होते. त्या वेळी ९०० रुपये भाडे आकारले जात होते. आता भाडेवाढ केल्यामुळे येथील व्यावसायिकांना ते परडवत नाहीत. त्यामुळे त्यांनी हे गाळे सोडले आहेत. त्यामुळे येथे फक्त दोनच गाळे सुरू आहेत. त्यात एक दवाखाना आणि दुसऱ्या गाळ्यात किरकोळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू आहेत.

धर्मार्थ दवाखानाही बंद
पालिका बाजारात (कै.) रामाशेठ धोत्रे चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. त्यात पॅथॉलॉजी कलेक्शन आणि ट्रिपल पोलिओ सेंटरही सुरू करण्यात आले होते. झोपडपट्टी भागासाठी ही चांगली सुविधा होती. आता तीही बंद पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच इमारतीसमोर आमदार निधीतून पिकअप शेड उभारण्यात आले आहे. या शेडचीही दुरवस्था झालेली आहे. त्याच्या फरशा उखडल्या आहेत. जवळच असलेली गटार उघडी पडली आहे. तिच्या आजूबाजूला उंदरांचा सुळसुळाट वाढला असून, बिळांमुळे हा भाग पोखरला गेला आहे. त्यात एखाद्या व्यक्तीचा पाय अडकून गंभीर दुखापत होण्याची भीती आहे. तेथेच विजेचे लोखंडी खांबही आडवे पडलेले आहेत. परिसराची स्वच्छता होत नसल्यामुळे हा भाग गलिच्छ बनला आहे.

इमारतीचे गोदाम
महापालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेनंतर जप्त केलेला माल या पालिका बाजारातच टाकण्यात येतो. मंदिराचे अतिक्रमण काढल्यानंतर त्या मंदिराचे दगड, लोखंडी रेलिंग आदी साहित्यही या इमारतीत टाकण्यात आलेले आहे. काही हातगाडे, कॉट, रस्त्यावर दुकाने मांडणाऱ्यांचे टेबल, होर्डिंग आदी वस्तूंचेही ही इमारत म्हणजे गोदाम झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स झोनला राजकीय खोडा

$
0
0

विनोद पाटील/ प्रवीण बिडवे, नाशिक
शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे थेट सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही, केवळ राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आणि प्रशासनाने निवड केलेल्या चुकीच्या जागांमुळे हॉकर्स झोन समोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. प्रशासनाने घाईघाईत थेट नागरी वस्त्यांमध्येच हॉकर्स झोन तयार केल्याने फेरीवाल्यांसह स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या दबावामुळे राजकीय नेत्यांकडून वारंवार जागा बदलाच्या सूचना केल्या जात आहेत, तर फेरीवाल्यांच्या फेरसर्वेक्षणाच्या मागणीपुढे हॉकर्स झोनची अंमलबजावणी रखडली आहे. सोबतच हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने अंमलबजावणीत मोठा खोडा निर्माण झाला आहे.
सुप्रीम कोर्टाचाच आदेश असल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील हॉकर्स आणि ‘नो हॉकर्स झोन’चे सर्वेक्षण केले. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याची कारवाई करण्यात आली. या कक्षाकडून सर्वेक्षण केल्यानंतर १६५ हॉकर्स झोन, ६१ रिस्ट्रिक्टेड हॉकर्स झोन आणि ८३ नो हॉकर्स झोनची निश्चिती करण्यात आली. या जागा निवडताना प्रशासनाने आपल्या मर्जीप्रमाणे जागांची निवड केल्याने अंमलबजावणीतला तो मोठा अडथळा ठरला आहे. प्रशासनाने हॉकर्स झोन तयार करताना फेरीवाल्यांना विश्वासात घेतले नाही. प्रशासनाने रस्त्यावरील फेरीवाल्यांची वर्दळ कमी करण्यासाठी हॉकर्स झोनसाठी नागरी वस्त्यांमधील कमी वर्दळीच्या जागांची निवड केली आहे. परंतु, प्रशासनाने निवड केलेल्या जागांना फेरीवाल्यांचा विरोध असून, मालाची विक्री होणार नसल्याचे सांगत, स्थलांतरास नकार दिला आहे. त्यासाठी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीतही सदस्यांनी तीव्र विरोध केला आहे. विशेष म्हणजे समितीच्या बैठकीत हे हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोनची मंजुरी न घेताच थेट महासभेकडून मंजूर केल्याचा फेरीवाल्यांचा आक्षेप आहे. फेरीवाल्यांच्या विविध संघटनांकडून महापालिकेवर धडक मोर्चे काढून थेट अंमलबजावणीलाच आव्हान दिले गेले आहे. त्यामुळे प्रशासनाने आस्तेकदम घेत, सोयीच्या हॉकर्स झोनवर भर दिला आहे. सोबतच प्रशासनाने निवडलेल्या ९ हजार ६२० हॉकर्सच्या संख्येवरही आक्षेप घेत नव्याने फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा हॉकर्सचा शोध घेऊन फेरसर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे अंमलबजावणीला उशीर होत आहे.

राजकीय अडथळा
प्रशासनानेही निवड केलेल्या बहुतांश जागा या नागरी वस्त्या आणि उपनगरांमध्ये आहेत. उपनगरांमध्ये रस्त्यांवर व्यवसाय थाटणारे व्यवसायिक लोकप्रत‌िनिधींचे किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांचे मतदार, कार्यकर्ते असतात. चरितार्थाचा प्रश्न असल्याने कारवाई होऊ नये, यासाठी हे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करतात. त्यामुळे त्यांना सांभाळण्यासाठी लोकप्रतिनिधीच अनेकदा पाठबळ पुरवितात. तर दुसरीकडे नागरी वस्त्यांमधील मतदारांचाही या हॉकर्स झोनला विरोध असतो. त्यांच्याकडूनसुद्धा थेट हॉकर्स झोनला विरोध केला जातो. त्यामुळे फेरीवाल्यांसह मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेते अंमलबजावणीत अडथळा आणत आहेत. त्याचे पडसाद स्थायी समिती, महासभेत उमटून जागांची अदलाबदल, फेरसर्वेक्षणासारखे मुद्दे पुढे केले जात असल्याने हॉकर्स झोनच्या यशस्वी अंमलबजावणीला मर्यादा येऊ लागल्या आहेत. सिडको, सातपूरसह शहराच्या बहुतांश भागात त्यामुळेच ‘नो हॉकर्स’च्या अंमलबजावणीला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने महासभेकडून मंजूर केलेल्या हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोनबाबत महासभेचीही दिशाभूल केली आहे. शहर फेरीवाला समितीने मंजुरी दिली नसतानाही, प्रशासनाने मर्जीप्रमाणे झोन तयार केले आहेत. त्यामुळे हे झोन आम्हाला मान्य नाहीत. तसेच संघटनांनी सुचविलेल्या पर्यायांवरही विचार विनिमय केला जात नसल्याने आमचा याला विरोध कायम आहे.
- शांताराम चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियन

तयार केलेले हॉकर्स झोन आणि नो हॉकर्स झोनसंदर्भात लोकप्रतिनिधींचेही आक्षेप आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांचा विरोध आहे. त्याबाबत फेरविचार सुरू आहे. हॉकर्सचेही फेरसर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे थोडा कालावधी लागत आहे.
- हरिभाऊ फडोळ, उपायुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृह कधी?

$
0
0

मटा इम्पॅक्ट

--

वाट स्वच्छ आरोग्याची

---

महिला स्वच्छतागृह कधी?

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील मुख्य बाजारपेठांत स्वतंत्र महिला स्वच्छतागृह नसल्याने मॉल आणि शोरूम्समध्ये महिला खरेदीला पसंती देत आहेत. यामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांवर परिणाम होत असल्याच्या ‘मटा’तील वृत्ताची दखल राष्ट्रवादी महिला काँग्रेसने घेतली आहे. या प्रकरणी महिला पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह कधी उभारण्यात येईल, अशी विचारणा केली आहे.
नाशिक शहरात दैनंदिन कामांसाठी वारंवार महिलांना खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठेत जावे लागते. सोबत घरातील लहान मुलीदेखील असतात. अशा वेळी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी दहिपूल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, भाजी बाजार, सिडको या ठिकाणी महिलांना स्वच्छतागृहाची उणीव जाणवते. अनेकदा गर्भवती आणि मधुमेही महिलांना स्वच्छतागृहाअभावी आरोग्याची समस्या उद्भवते. लहान मुलींचीदेखील यामुळे गैरसोय होते. अनेकदा मागणी करूनही महिलांच्या बाबतीत महापालिका महिला स्वच्छतागृहांसंदर्भात अकार्यक्षम ठरत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. संपूर्ण शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. एकीकडे संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवीत असताना नाशिक महापालिका मात्र महिलांसाठी किमान स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध करून देत नाही, ही बाब चिंताजनक आहे, असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातील बजेटमध्ये तरतूद करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. स्वच्छतेसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. स्वच्छतागृहाची मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, नगरसेविका समीना मेमन, शोभा साबळे, माजी जिल्हाध्यक्ष शोभा मगर, रजनी चौरसिया, संगीता गांगुर्डे, सुरेखा पठाडे, रशिदा सय्यद, पंचशीला वाघ आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
--
११९ ठिकाणी नियोजन
याप्रसंगी आयुक्त कृष्णा यांनी सांगितले, की शहरात ११९ ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५५ ठिकाणचे काम सध्या सुरू आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी स्वच्छतागृहे बांधकामास विरोध केल्याने काम बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजी-माजी आमदारांच्या घरांवर आयकरचे छापे

$
0
0

धुळे

काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमरीश पटेल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापे टाकले. आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी या दोघांच्या घरांसह त्यांच्या उद्योगांचीही कसून चौकशी केली.

धुळे व शिरपूर शहरात आयकर विभागाचे पथक आज सकाळी दाखल झाले. आमदार अमरीश पटेल आणि माजी आमदार कदमबांडे या दोघांच्या घरांवर छापा टाकत त्यांच्या संपत्तीची कसून चौकशी केली. शहरात आयकर विभागाची धाड पडल्याची बातमी पसरताच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू झाली. अमरीश पटेल यांच्यासह त्यांचे सहकारी राजगोपाल भंडारी, प्रभाकर चव्हाण, अशोक कलाल, अॅड. सी. बी. अग्रवाल, बबन अग्रवाल, कर सल्लागार विजय राठी, किसान अॅग्रो, देवता गरमेंट्स यांची देखील चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु, यांची चौकशी करण्यात आल्यानंतर आयकर विभागाने त्यांच्याविरोधात काय कारवाई केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पचरित्र

$
0
0


अल्पचरित्र


मानसिक विकलांग मुलांसाठी शाळा सुरू करून रजनीताईंनी समाजावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्या चिमुरड्यांच्या सेवेत जशा तत्पर होत्या तशाच साहित्यसेवेतही मागे राहिल्या नाहीत. त्यांच्या नावावर तीन पुस्तके आहेत.

‘गोडुली गाणी’ हे बालकांची गाणी असलेले पुस्तक, ‘जागर’ हे या क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांचे संकलन आणि ‘ध्यानी मनी प्रबोधिनी’ ही तीन पुस्तके त्यांनी लिहिली. २५ वर्षे माध्यमिक शाळेत सेवा, सहशिक्षिका म्हणून कार्यास प्रारंभ व उपप्राचार्या म्हणून १९८९ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या प्रबोधिनी न्यासाच्या कार्यवाह, प्रबोधिनी शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख समन्वयक, तसेच प्रबोधिनी ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या.

रजनीताईंना १९८६ चे माध्यमिक शिक्षकांसाठीचे राष्ट्रपती पारितोषिक तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. मागासवर्गीय जनतेसाठी उपयुक्त कार्य केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारचे राज्यस्तरीय पारितोषिक दलितमित्र सन्मान मिळालेला आहे. १९९९ चा लोककल्याण पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, ममता पुरस्कार, संस्कृतिवैभव पुरस्कार, दादरचा वनिता समाज पुरस्कार समाजसेविका पुरस्कार, सेवाभावी समाजकल्याण संस्थेचा सेवादीप पुरस्कार, पुणे विद्यापीठाकडून जीवन साधना गौरव पुरस्कार, हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप कोल्हापूरतर्फे अपंगमित्र पुरस्कार आदींनी त्यांना गौरविले गेले. त्या पुणे विद्यापीठ सिनेट सदस्यादेखील होत्या.



रजनीताईंनी १९९१, ९२, ९४ मध्ये राज्य पातळीवरील लेख लिहिले. ‘कौटुंबिक सहानुभूतीची आवश्यकता’ या विषयावर १९९४ मध्ये नवी दिल्ली येथे सहाव्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी शोधनिबंध वाचन केले होते. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड या देशांतील ४० दिवसांचा अभ्यासदौरा, विविध प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रांना भेटी, सिंगापूर येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी शोधनिबंध वाचन केले होते. प्रबोधिनी पालक समितीच्या त्या अध्यक्षा होत्या, तसेच मानसिक विकलांग मुलांच्या पालकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या त्या सदस्या होत्या. प्रबोधिनी ट्रस्ट ही सुसज्ज शाळा त्यांनी उभारली. फिजिओथेरपी सेंटर, मोठी कार्यशाळा, बालवाडी, सुंदर बगीचा, बसेस या गोष्टी त्यांनी देणगीदारांच्या मदतीने केल्या. प्रबोधिनी विद्यामंदिर, प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा, सुनंदा केले विद्यामंदिर, हे मानसिक विकलांगांसाठी जणू वटवृक्षच झाले. मुलांच्या वर्तनसमस्या कमी करून त्यांना त्यांच्या कुटुंबात व समाजात सुरक्षित स्टँडर्ड मिळवून देणे, हे मुख्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून मतिमंदत्त्व या विषयावर दीर्घ अभ्यास, संशोधन करून वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या इमारती ट्रस्टने उभ्या केल्या. मुलांच्या बौद्धिक व शारीरिक कुवतीनुसार छोटे छोटे गट पाडून त्यांच्याकडे व्यक्तीशः लक्ष देण्यात येते. शाळेच्या पहिल्या पाचमधील एका विद्यार्थ्याचे वय आज पन्नास वर्षे आहे, त्यांचे आई-वडील पंच्याऐंशीच्या घरात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी शनिवारी शिक्षा

$
0
0

नाशिक :

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सहा जणांना शनिवारी २० जानेवारी रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. ​सोनई हत्याकांडाने रामायणातील राक्षसांची आठवण झाल्याचं सांगत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाले होते.

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र व सत्र न्यायालयाने १५ जानेवारी रोजी सहा जणांना दोषी ठरवले होते. या सहाही जणांना आज शिक्षा ठोठावण्यात येणार होती. त्यामुळे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम या सुनावणीला आज न्यायालयात हजर होते. संपूर्ण राज्याचे लक्षही या सुनावणीकडे लागले होते. न्यायालय परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाल्याने आता शनिवारी आरोपींना शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.

यावेळी निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १३ मुद्दे उपस्थित केले. ​आरोपींनी केलेलं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली. तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं. ज्या पद्धतीने तुकडे करून खून केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला.

या हत्याकांडाचा आरोपींना कुठला पश्चाताप झालेला नाही, त्यांनी तशी भावना कोर्टात व्यक्त केली नाही. हा कट असून परिस्थितिजन्य पुराव्यांआधारे सिद्ध झालं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या प्रकरणासारखंच हे प्रकरण आहे. त्यामुळे आरोपींना मृत्यूदंड द्यावा, अशी मागणी निकम यांनी केली. तर आरोपींचे वकील एस. एस. आदास यांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली. एका आरोपीचं वय खूपच कमी आहे, तर अन्य आरोपीचं वय खूपच जास्त आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यातील सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी. एड. चे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'पद्मावत' चित्रपटावर बंदीची मागणी

$
0
0

मोर्चाने दणाणले जळगाव

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

'माँ पद्मावती राणी के सन्मान मैं क्षत्रिय मैदान मैं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, आवाज कुणाचा राजपूतांचा' अशा गगनभेदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते. माँ पद्मावती सन्मान मोर्चात शुक्रवारी (दि. १९) जिल्ह्यातून समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिली. मोर्चाद्वारे निवेदन देऊन संजय भन्साळी निर्मित चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली.

क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून निर्माता संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाच्या विरोधात माँ पद्मावती सन्मान कृती समितीतर्फे शुक्रवारी, सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी १० वाजेपासून जिल्ह्यातून राजपूत समाजबांधव नूतन मराठा कॉलेजमध्ये येत होते. या वेळी मोर्चाच्या सुरुवातीला माँ पद्मावती सन्मान कृती समितीतील विद्यार्थिनींनी मनोगताद्वारे माँ पद्मावती यांच्या इतिहासाला उजाळा दिला.

या मोर्चासाठी जिल्ह्यातून येणार्या समाजबांधवांना एकत्र येण्यासाठी नूतन मराठा कॉलेजच्या प्रांगणावर मंडप टाकण्यात आला होता. मोर्चास्थळी येणार्या प्रत्येक समाजबांधवांना कृती समितीतर्फे प्रवेशद्वाराजवळ कुंकूवाचा क्षत्रिय टिळा लावण्यात येत होता. कॉलेजच्या प्रांगणात उपस्थित असलेले माजी आमदार आर. ओ. पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह कृती समितीतील सदस्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या सन्मान मोर्चाचे नेतृत्व महिला व युवतींनी केले. अग्रस्थानी महिला व युवती होत्या. त्यानंतर पुरूष आणि तरुण सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या तरूणांनी हातात भगवे झेंडे घेत ते फडकविले जात होते.

शिस्तबद्ध नियोजन

माँ पद्मावती सन्मान कृती समितीतर्फे काढण्यात आलेला मोर्चा हा अत्यंत शिस्तबद्ध होता. समाजबांधव दोन जणांच्या ओळीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. हा मोर्चा नूतन मराठातून डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या रुग्णालयाजवळून रिंगरोड मार्गे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ पोहोचला. मोर्चा बहिणाबाई चौकात आल्यानंतर याठिकाणी कृती समितीतर्फे महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हापेठ मार्गे स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला.

महिलांतर्फे प्रशासनाला निवेदन

जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चात सहभागी झालेल्या युवती आणि महिलांतर्फे माँ पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात आले. माँ पद्मावती सन्मान मोर्चाच्या निमीत्ताने राजपुत समाजबांधवांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या मोर्चास हिंदु संघटनांनीही पाठिंबा दिला.

रावेरला बॅनर फाडल्याने तणाव

रावेर : रावेर तालुक्यातील खानापूर येथे राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाबाबत बॅनर लावण्यात आले होते. ते फाडल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पद्मावती चित्रपटावर बंदी आणण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी, जळगावला मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याने समाज बांधवांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. हा प्रकार उघडकीस आल्याने खानापूर येथील राजपूत समाजबांधव बसस्थानक परिसरात जमले होते. संबंधीत बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनी कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला. रावेर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली असून, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरी, देवेंद्र राजपूत, सुनील राजपूत, युवराज राजपूत, शंभू राजपूत, बाळू राजपूत, जीवन राजपूत आदींसह राजपूत समाज बांधवांतर्फे कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सिनेमागृहांना नोटीस

धुळे : नंदुरबार जिल्ह्यात 'पद्मावती' या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात अनेक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार शहरातील चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित केल्यास कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे होणाऱ्या नुकसानास चित्रपटगृह मालक जबाबदार राहणार, अशा आशयाची नोटीस नंदुरबार शहर पोलिसांनी चित्रपटगृह मालकांना दिल्या आहेत. ही माहिती पोलिस निरीक्षक संजय मथुरे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनई हत्याकांड: सहा दोषींना फाशीची शिक्षा

$
0
0

नाशिक: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर येथील सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं सहाही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या सहाही जणांना १५ जानेवारी रोजी दोषी ठरविण्यात आलं होतं. न्यायालयाच्या निकालानंतर पीडितांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

नेवासा तालुक्यातील सोनई येथे १ जानेवारी २०१३ रोजी प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड झाले होते. सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. 'आरोपींचं कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने त्यांनी पीडितांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आलं. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. हे कृत्य खूपच निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा

$
0
0

नाशिक

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 'गोदावरी गौरव' पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

सुदर्शन शिंदे, महेश साबळे या दोघांना 'साहस'चा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंडित सत्यशील देशपांडे यांना गायनसाठी तर डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांना लोकसेवेसाठीचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (नाट्य-चित्रपट), डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान) सुभाष अवचट (चित्र) यासाठीचा पुरस्कार देण्यात येणार आहेत. २१ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या १० मार्च रोजी मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुण’म्हणून माफीची विनंती फेटाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोनई हत्याकांडात दोषी ठरवलेल्यांचे वय लक्षात घेऊन कमीत कमी शिक्षा व्हावी, असा मुद्दा बचाव पक्षाने शिक्षेवरील युक्तिवादादरम्यान उपस्थित केला होता. मात्र, हत्या झालेले तिन्ही युवक तरुण, अविवाहित होते. त्यांची हत्या करताना आरोपींनी हा विचार का केला नाही, असा प्रश्न जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी उपस्थित करत हा मुद्दा फेटाळून लावला.

प्रेमप्रकरणातून झालेल्या या हत्या प्रकरणात चार वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने सहाही जणांना १५ जानेवारी रोजी दोषी ठरवले होते व शनिवारी शिक्षा सुनावण्यात आली. 'या हत्या प्रकरणामुळे जातीव्यवस्थेचा विखारी प्रकार यामुळे समोर आला असून, अशा प्रकारांना कडक शासन देऊन आळा घातला नाही, तर तो एड्स रोगासारखा फैलू शकतो', असे निरीक्षणही न्यायाधीशांनी मांडले.

सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, 'या निकालामुळे जातीय द्वेष पसरविणाऱ्यांना चाप बसेल. घटनेतील क्रौर्य निर्घृण असून, दयामाया दाखवण्यासारखा हा प्रकारच नाही. सचिन घारू याचे एका सवर्ण मुलीवर प्रेम होते. याचा राग मनात धरून त्याचा आणि त्याच्या दोन मित्रांचा १ जानेवारी, २०१३ रोजी खून करण्यात आला. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी मांडून गुन्हा सिद्ध करण्यात यश मिळाले'.

मृतांच्या कुटुंबीयांना समाधान

सुनावणीसाठी मृत तरुणांच्या कुटुंबीयांसह आरोपींच्या नातेवाइकांनीही गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच मृतांच्या नातेवाईकांना आनंदाश्रू अनावर झाले. जिल्हा न्यायालयाच्या फाशीच्या निर्णयावर हायकोर्ट शिक्कामोर्तब करेल. येथेही दोषींना हीच शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा नातेवाईकांनी व्यक्त केली. मागील पाच वर्षांच्या दबावातून मुक्त झाल्यासारखे वाटत असल्याची भावना सचिन घारू याच्या भावाने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या पत्नीलाही पोटगीचा हक्क मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीलाही पतीकडे पोटगी मागण्याचा हक्क आहे. विवाहाचे आमिष दाखवून प्रस्थापित केलेले संबंध हा सर्वात मोठा कौटुंबिक हिंसाचार आहे, असे निर्वाळा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एच. मोरे यांनी दिला आहे. दिंडोरी तालुक्यातील एका आदिवासी विवाहितेसंदर्भात त्यांनी नुकताच ऐतिहासिक निकाल दिला. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेचा संघर्ष सुरू होता.

पीडित विवाहितेचा दिंडोरीचे माजी सरपंचाशी परिचय होता. त्यांच्यामध्ये मधल्या काळात प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तुझे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करेन, असे त्याने पीडितेला आश्वासन दिले होते. दरम्यानच्या काळात आरोपीमुळे पीडिता गर्भवती राहिली. विवाहाचे आश्वासन न पाळल्याने पीडितेने २००७ मध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार केली. त्यानंतर माजी सरपंचाने पीडितेशी तडजोड करण्याची तयारी दर्शविली. यात त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला तसेच जन्म झालेल्या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचा लेखी बाँड दिला. सन २०१२ मध्ये पीडितेशी पुन्हा विवाह केला आणि पंचवटी परिसरात भाडे तत्वाने घर घेऊन सोबत नांदण्यास सुरुवात केली. एक दिवस अचानक माजी सरपंचाने पीडितेकडे लेखी बाँड मागितला. मिळालेला बाँड त्यांनी फाडून टाकला. 'मी तुझा आणि तुझ्या मुलाचा स्वीकार करणार नाही', असे सांगत मारहाण करीत पीडितेला घराबाहेर काढून दिले. यानंतर पीडितेने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली आणि दरम्यानच्या काळात मुलाच्या पालनपोषणासाठी कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी अर्ज केला. डीएनए चाचणी अहवालाच्या आधारे कोर्टाने एप्रिल २०१५ मध्ये मुलासाठी दरमहा १० हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले.

कौटुंबिक हिंसाचार गुन्ह्याखाली सुरू असलेल्या खटल्यात प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पीडितेचा अर्ज फेटाळून लावला. पहिली पत्नी असताना दुसऱ्या पत्नीस पतीविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा दावा करता येणार नाही, असा निकाल तत्कालीन न्यायाधीशांनी दिला होता. या निकालास पीडितेने जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले.

बाँण्डसह साक्ष ठरली मोलाची

माजी सरपंचाने पीडितेशी तडजोड करताना २०१२ मध्ये केलेला बाँड या खटल्यात मोलाचा ठरला. पीडितेशी भांडण करताना माजी सरपंचाने तो बाँड फाडून टाकला होता. त्या बाँडचे सगळे तुकडे गोळा करीत पीडितेने ते जोडले. कोर्टात तो बाँड सादर करण्यात आला. कोर्टाने तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला. या बाँडवर साक्षीदार म्हणून सही असलेल्या व्यक्तीची कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. तसेच पीडितेचे पतीच्या नावाने असलेले पॅनकार्ड व आधारकार्डही कोर्टाने मान्य केले. त्या आधारावर न्या. एस. एच. मोरे यांनी पीडितेला दरमहा सात हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले. अॅड. मनीषा जाधव-फोफालिया यांनी फिर्यादीची कोर्टात बाजू मांडली.

विवाहाचे आमिष दाखवून पीडितेचे शोषण झाले होते. अशिक्षित आणि कोणताही कौटुंबिक आधार नसलेल्या या महिलेची आर्थिक जबाबदारी नाकारली जात होती. कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालाने तिला दिलासा मिळाला आहे.
- अॅड. मनीषा जाधव-फोफालिया,फिर्यादीच्या वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हे दाम्पत्य, अवचट आदींना गौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘गोदावरी गौरव’ यंदा सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, चित्रकार सुभाष अवचट, अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, बालरोगतज्ज्ञ-शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख, गायक पंडित सत्यशील देशपांडे आणि कमला मिल आगीवेळी बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना जाहीर झाला आहे. शनिवारी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रारंभी कुसुमाग्रजांनी पुरस्काराची रक्कम ११ हजार रु. ठरवली होती परंतु कालमानानुसार ही रक्कम कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे या रकमेत १० हजारांची भर घालून २१ हजार रुपये करण्यात आली.शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, आमदार हेमंत टकले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह मकरंद हिंगणे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीत शिर्डीत मॅरेथॉन स्पर्धा

$
0
0

मालेगाव : येत्या ११ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे साईबाबा समाधीच्या शताब्दी निमित्त इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक व विशेष सरकारी वकील शिशिर हिरे व आंतरराष्ट्रीय धावक रवींद्र शर्मा यांनी दिली.

स्पर्धेत ३ कि. मी., ५कि. मी., १० कि. मी., २१ कि. मी. आणि ४२ कि. मी. असे वर्ग करण्यात आले आहेत. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ पासून स्पर्धेला शिर्डी येथे प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेमध्ये हिंदी फिल्म सृष्टीतील नामवंत कलाकार माधुरी दीक्षित, अजय देवगण व पोलिस अधिकारी कृष्णप्रसाद हे प्रमुख पाहुणे सहभागी होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी HYPERLINK "http://www.saimarathon.com"www.saimarathon.com या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन रवींद्र शर्मा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

`समाजाभिमुख उद्योगांतून गरिबी निर्मूलन शक्य`

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये गरिबी हा देखील प्राधान्याचा प्रश्न आहे. आजमितीस तंत्रज्ञान हे सर्व समस्यांवर जालीम उत्तर ठरले आहे. तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराने गरिबीसारखा सामाजिक प्रश्न मिटविणे शक्य आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करताना उद्योगांना नफेखोरीच्या केंद्रापासून दूर करीत समाजाभिमुख दृष्टिकोनातून बळ द्यावे लागेल. समाजाभिमुख उद्योग व्यवसाय गरिबी निर्मूलनाचा अजेंडा निश्चितपणे राबवू शकतात, असा विश्वास महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी व्यक्त केला.

डॉ. नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रगती अभियान यांच्या वतीने या व्याख्यानाचे संयोजन कुसुमाग्रज स्मारकमधील स्वगत हॉल येथे करण्यात आले होते.

सावंत म्हणाले, की सद्यस्थितीतील युगाचे अर्थकारण हे उद्योगाभिमुख आहे. शेती ही आपली प्रमुख अर्थव्यवस्था असली तरीही शेतीसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशावेळी मोठे मनुष्यबळ आशेने उद्योग धंद्यांकडे बघते. यामुळे उद्योग क्षेत्रावरील सामाजिक जबाबदारी नक्कीच वाढते. मात्र, सामाजिक प्रश्नांसाठी झटणे हे केवळ सरकार, समाज आणि एनजीओ संस्थांचे काम आहे अशी उद्योगांची धारणा होऊ लागल्याने जास्तीत जास्त नफेखोरीचे उद्दिष्ट आणि त्यासाठी शोषणाचे मार्ग हा उद्योगधंद्यांचा मार्ग बनला आहे. पण गरिबी निर्मूलनासाठी शाश्वत उपाय शोधताना उद्योगांनी समाजाभिमुख विचार करायला हवा. परस्पर सहकार्य आणि सामाजिक स्तर उंचाविण्याचे ध्येय बाळगून देशात अत्यंत अफाट यश मिळवू शकलेली आदर्श उदाहरणे आहेत. त्यापासून इतर उद्योगांनी प्रेरणा घ्यायला हवी, असे आवाहन करतान सावंत यांनी अशा उद्योग समूहांचा स्लाईड शो उपस्थितांपुढे सादर केला. उद्योग उभारणी आणि गरिबी निर्मूलनाच्या उद्दीष्टासाठी उपयुक्त ठरू शकणारे अॅप आणि महत्वाच्या वेबसाईट्सचीही माहिती सावंती यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - ग्रामसेवक धरणे आंदोलन

$
0
0

सीईओंची बदली करण्याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या कार्यपध्दती विरोधात ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पंधरा पंचायत समिती कार्यालयांसमोर सोमवारी सामूहिक रजा टाकून एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या अगोदरच ग्रामसेवकांनी १७ जानेवारीपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील १३८१ ग्रामपंचायतीतील १२५० ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आहेत. ते सर्व या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचारी, विस्तार अधिकारी व मुख्य सेविकाही सहभागी झाले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यापासून ग्रामसेवकांचे प्रश्न प्रलंबित ठेवणे, जिल्हास्तरावरून वितरीत होणाऱ्या निधी फाइलवर त्रूटी काढून ती पुन्हा पाठवणे, कोणतीही चौकशी न करता ग्रामसेवकांना निलंबित करणे यासारखे अनेक आरोप करीत ग्रामसेवकांनी हे आंदोलन पुकारले आहे. मीना यांची बदली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची त्यांची भूमिका आहे. दि. १७पासून असहकार आंदोलन पुकारल्यानंतर २२ रोजी धरणे व आता दि. २९ जानेवारीला जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले जाणार आहे. त्यानंतर ५ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त कार्यालयासमोरही आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनात कंत्राटी ग्रामसेवक सेवा नियमित करणे, ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती करणे, निलंबित ग्रामसेवक, अधिकारी यांना पुनर्स्थापित करणे, ग्रामसेवक संवर्गातील पात्र कर्मचाऱ्यांना स्थायीत्व मंजूर करणे यासारख्या तब्बल १४ मागण्या मांडून निवेदन देण्यात आले.

नाशिक तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नाशिक तालुक्यातील ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तालुकाध्यक्ष बळीराम पगार, सचिव सुभाष गायकवाड यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिले. नाशिकबरोबरच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व पंचायत समितीवर हे निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यातील पंधरा पंचायत समित्यांसमोर सोमवारी ग्रामसेवकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, मुख्य सेविका हे सुध्दा सहभागी झाले. विविध मागण्या व जिल्हा परिषदेच्या सीईओच्या कार्यपध्दतीविरोधात हे धरणे आंदोलन करण्यात आले.

- कैलासचंद्र वाघचौरे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील दरेगाव व पवारवाडी भागातील अवैध हड्डी कारखाने, साबण कारखाने व कत्तलखाणे यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत राज्याचे लोकायुक्त एम. एल. तेहलानिया यांनी चिंता व्यक्त करीत याबाबत कायदेशीरबाबी तपासून नियमानुसार सहा महिन्यांत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विनापरवाना सुरू असलेल्या कारखान्याबाबत हरित लवादाकडे तक्रार नोंदवावी, असे आदेश त्यांनी महापालिकेला दिले आहेत.

शहरातील दरेगाव व पवारवाडी भागात असलेले अवैध हड्डी कारखाने, साबण कारखाने, कत्तलखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या कारखान्यातील पाणी गिरणा, मोसम नदीपत्रात सोडले जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते निखील पवार यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली केली होती. या तक्रारीबाबत मुंबई येथे झालेल्या सुनावणीत लोकायुक्तांनी वरील आदेश दिले आहेत. सुनावणीस सहतक्रारदार अब्दुल सलाम अमीर अहमद, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, नगररचनाकार संजय जाधव, संकीर्ण कर अधीक्षक एखलाक अहमद उपस्थित होते.

सुनावणी दरम्यान पवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या २३ मे २०१६ रोजीच्या निर्णयानुसार कत्तलखाने यांचे बांधकाम हरितपट्ट्यात असून ते अनधिकृत आहेत. ड वर्ग महापालिका यांच्यासाठी प्रमाणित विकास नियंत्रण नियमावलीस मंजुरी प्राप्त झाल्यानंतर महापालिका कत्तलखाने व कोल्ड स्टोरेज यांना बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्र देण्याची नियमानुसार कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे कत्तलखाने तत्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी केली. सुनावणीत अवैध हड्डी कारखाने, साबण कारखाने, कत्तलखाने यांच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त करीत सहा महिन्यांत कारवाई करण्याचे आदेश दिले.

मनपाकडे पूर्णवेळ नगररचनाकार नाही

सुनावणीत मनपा आयुक्त संगीता धायगुडे म्हणाले, हड्डी उकळविण्याचे कारखाने पूर्णतः बंद आहेत. मनपातर्फे चार साबण बनविण्याचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. सहा कारखानदारांनी स्वतःहून कारखाने बंद केले. तर सात साबण कारखानदारांनी उच्च न्यायालयात दावा दाखल करून मनाई हुकूम मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता आली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील काळात मनपा करवाई करेल. स्लॅटर हाऊस, कोल्ड स्टोरेज यांनी मनपाकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी सन २०१३ मध्ये अर्ज केला असून, त्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मनपाकडे पूर्णवेळ नगररचनाकार नाही. त्यामुळे कायदेशीर बाबी तपासण्यात अडचणी येत आहेत. नगररचनेच्या सहाय्यक संचालकांशी चर्चा करून मनपा लवकर कारवाई करेल असे आश्वासन धायगुडे यांनी दिले.

...तर उच्च नायालयात जाणार

शहरातील हद्दवाढ भागाचा विकास नियंत्रण नियमावली तयार करून त्यास शासन मंजुरी देत नाही तोपर्यंत मनपा अवैध कत्तलखान्यांना बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र देऊ शकत नाही. लोकायुक्तांच्या आदेशानुसार सहा महिन्यांच्या आत मनपाने अवैध कत्तलखाने सील न केल्यास मनपा विरुद्ध लोकायुक्तांकडे किंवा उच्च न्यायालायत दाद मागणार. राजकीय दबावापोटी मनपा जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे.

- निखिल पवार, तक्रारदार



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images