मटा डिबेट
--
मना सज्जना
--
मुक्त संवादाने तणावावर करा मात
अलीकडे जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनातदेखील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत ताण-तणाव निर्माण होताना दिसतात. परंतु, सकारात्मक विचार, छंद जोपासणे, यश मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे केलेली मेहनत व प्रत्येक गोष्टीचे नियोजन, आपल्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षक, पालकांशी मुक्त संवाद साधणे या गोष्टी केल्यास नक्कीच ताण-तणाव दूर सारून आयुष्यात यशस्वी होता येते, असा आशावाद मेंटल वेलनेस संकल्पनेंतर्गत आयोजित ‘मटा डिबेट’मध्ये व्यक्त झाला. क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेत पार पडलेल्या या उपक्रमास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
--
(संकलन ः अक्षय शिनकर, अक्षय सराफ कॉलेज क्लब रिपोर्टर)
--
तज्ज्ञांकडून मोलाचा सल्ला...
‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे मेंटल वेलनेस या संकल्पनेनुसार ‘मना सज्जना’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात वृत्तमालिकेच्या माध्यमातून विषयाची मांडणी झाल्यानंतर आता ‘मटा डिबेट’च्या माध्यमातून थेट तरुणांशी संवाद साधला जात आहे. नाईक शिक्षण संस्थेत झालेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परीक्षा, करिअरमधील अपयश, कौटुंबिक व वैयक्तिक समस्या, प्रेमभंग, साध्या-साध्या गोष्टी व प्रसंगांमधून येणारे अपयश या विषयांवर मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. ‘युवकांच्या मनावर येणारा ताणतणाव व कारणे’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात कॉलेजमधील मानसशास्त्र विभागप्रमुख जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे एकूण घेत या विषयावर मार्गदर्शन केले. आज विद्यार्थी व पालकांचा संवाद हरवत चालला आहे. विद्यार्थी एकलकोंडे बनत चालले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी पालकांना प्रतिसाद देत नाहीत, तर काही ठिकाणी पालकांना आपल्या मुलांसाठी वेळच नाही, असे प्रकर्षाने जाणवते. आजची तरुणाई व विद्यार्थी हे मोबाइल फोन, सोशल मीडिया यातच व्यस्त दिसतात. आपल्या मनातील प्रश्न व समस्या शेअर न केल्याने त्यांच्यात तणाव वाढत असून, ते नैराश्याच्या गर्तेत सापडताना दिसतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्यांचा पालक व शिक्षकांशी मुक्त संवाद वाढणे, चांगले मित्र-मैत्रिणी निवडणे, अपयशातून यशाकडे यशस्वी वाटचाल केलेल्या व्यक्तींचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे, असा सल्लाही पाटील यांनी दिली.
--
कारणांएेवजी शोधावेत यशाचे मार्ग
यश-अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुरूच असते. परंतु, विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता आपले ध्येय समोर ठेवून यशाकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. अपयशाची करणे शोधण्याएवजी यशाचे मार्ग शोधावेत, असे मार्गदर्शन उपप्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी केले. १५ ते २० या वयोगटातील तरुण नैराश्याला जास्त बळी पडल्याचे दिसून येते, याचे कारण म्हणजे व्यसनाधीनता व नातेसंबंध असल्याचे दिसून येते. ज्या वयात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांत स्वतःला झोकून देऊन करिअर घडविणे गरजेचे आहे त्या वयात तरुण व्यसनाधीनता व नातेसंबंध या गोष्टींकडे वळत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर टीव्ही, चित्रपटांतील नकारात्मक प्रसंगांचा प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. मोबाइल, सोशल मीडिया या गोष्टींचा सदुपयोग करण्याएेवजी दुरुपयोगच जास्त होत असल्याचे दिसून येते अादी मुद्देही यावेळी पुढे आले.
---
विद्यार्थी म्हणतात...
--
करिअर निवडीचे हवे स्वातंत्र्य
बऱ्याचदा विद्यार्थ्याला आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असते. मात्र, पालक दबाव टाकून त्याला भलत्याच क्षेत्रात करिअर करायला लावतात. परंतु, त्यात जर अपयश येत आहे असे दिसले, तर संबंधित विद्यार्थी तणावग्रस्त होताना दिसतात. त्यामुळे पालकांनी हे टाळायला हवे.
-किशोर नागरे
--
प्रत्येकाने करावे व्यवस्थापन
माझ्यावर शैक्षणिक परीक्षेच्या अभ्यासाचा ताण बऱ्याचदा येतो. इतरांशी याबाबत चर्चा करून मी आता अभ्यासात सातत्य ठेवून माझा अभ्यासवरील ताण दूर केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या परीने तणावाचे असे व्यवस्थापन करण्याची आवश्याकत आहे.
-आदित्य देव
--
मोबाइल नियंत्रित जीवनशैली
सोशल मीडियामुळे अनेक तरुण रात्री लवकर झोपत नाहीत, परिणामी सकाळी लवकर उठतही नाहीत. त्यांचे सर्व जीवन हे जणू मोबाइलवर चालताना दिसते. आपल्या पालकांशीदेखील ते संवाद साधत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात ताणतणावाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
-अमित खराटे
--
योग्य नियोजनाची निकड
अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास न करता ऐनवेळी पेपरच्या महिनाभर अगोदर जास्त वेळ अभ्यास करून किंवा रात्रभर जागे राहून अभ्यास करताना आढळतात. त्यामुळे ते निष्कारण ताणतणाव ओढावून घेताना दिसतात. हे टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.
-उमेश शेलार
--
वाईट संगत टाळावी
बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा वाईट संगतीमुळे अनेकदा लहान वयातच विद्यार्थी व्यसनांच्या अाहारी जाताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यातील एकलकोंडेपणा वाढताना दिसतो. त्यांच्या व्यसनाची बाब पालकांना कळल्यावर ताण-तणाव वाढतो. त्यासाठी व्यसने टाळावीत.
-समित सातवी
--
अवास्तव अपेक्षा लादू नयेत
बरेच पालक आपले स्वप्न पूर्ण करता न आल्यामुळे आपल्या पाल्याने आपले स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा बाळगताना दिसतात. मात्र, पाल्यांचा कल वेगळ्याच क्षेत्रात असल्यास अशा विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होऊन ताण-तणाव वाढण्याची शक्यता वाढते. हे टाळायला हवे.
-शंकर ईस्ते
--
वास्तवाचे राखावे भान
अलीकडच्या काळात मित्र-मैत्रीण करणे, फिरणे, मजा करणे अशीच काहीशी प्रेमाची व्याख्या तरुणाईने बनविली आहे. परंतु, यामध्ये ज्यावेळी अडचणी येतात, त्यावेळी अशा विद्यार्थ्यांत ताण-तणाव वाढून दुर्दैवी घटना घडताना दिसतात. त्यासाठी वास्तवाचे भान राखणे गरजेचे आहे.
-गणेश भावळे
--
खेळ, योगाला द्यावे प्राधान्य
अनेक विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांच्या कालावधीत किंवा इतर प्रसंगांमध्ये मानसिक तणाव येताना दिसतो. त्यामुळे अशा तणावावर मत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी निकटच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासह मैदानी खेळ खेळावेत, योगा करावा, ज्यामुळे मन शांत होण्यास निश्चितच मदत होऊ शकेल.
-कावेरी आहेर
--
आप्तांशी सुसंवाद गरजेचा
अनेकदा मित्रांच्या छोट्याशा वादाचे रुपांतर भांडणात होताना दिसते. अशावेळी संवादाअभावी पालक अन् समाजही त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांत ताण-तणाव निर्माण होतो. हे टाळण्यासाठी निकटच्या व्यक्तींशी सुसंवाद ठेवणे उपयक्त ठरू शकेल.
-दीक्षा राहंगडाळे
--
प्राधान्यक्रम ठरवू द्या!
बऱ्याचदा विद्यार्थ्यांना नाटकात, खेळामध्ये, संगीतामध्ये सहभागी व्हायचे असते. परंतु, त्यांच्या पालकांकडून त्यांना अशा गोष्टींसाठी पाठिंबा नाही मिळत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नको असलेल्या विषयांनाच प्राधान्यक्रम द्यावा लागतो. परिणामी त्यांच्यात तणाव वाढतो. अशी बाब टाळावी.
-मयूर वाघ
--
ध्येयासक्तीने लाभ शक्य
जर सर्वच विद्यार्थी नियोजनबद्धतेने आणि सातत्य ठेवून अभ्यास करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतील, तर मला नाही वाटत की अशा विद्यार्थ्यांत ताणतणाव निर्माण होईल. त्यामुळे ध्येयाप्रति पुरेशी आसक्ती ठेवून नियोजन केल्यास नक्कीच लाभदायक ठरू शकेल.
-मयूर चव्हाण
--
पालकांनी द्यावे पुरेसे स्वातंत्र्य
पालकांनी विद्यार्थ्यांना समाजात वावरण्याचे, राहण्याचे स्वातंत्र्य द्यावे. बऱ्याचदा अनेक विद्यार्थी स्वातंत्र्य न मिळाल्यामुळे आईवडिलांशी पुरेसा संवादाच साधत नाहीत. प्रसंगी त्यांच्या मनाविरुद्ध कृती करतानाही दिसतात. त्यामुळे कुटुंबामध्ये तणाव निर्माण होतो.
-अदिती मोढे
---
गुरुजन म्हणतात...
--
पालकांना दोष देणे टाळावे
विद्यार्थ्यांनी पालकांच्या प्रेमाचा कधीही गैरफायदा घेऊ नये. पालकांना दोषी ठरवून अपयशाची करणे शोधू नयेत, तर यशाची कारणे शोधावीत. सकारात्मक बनावे, जेणेकरून सर्व ताणतणाव दूर होईल.
-प्रा. शरद काकड
--
वेळच्या वेळी करावा अभ्यास
बऱ्याचदा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कळताच तणाव जास्त प्रमाणात जाणवताना दिसतो. विद्यार्थ्यांनी दररोज कॉलेज, लेक्चर अॅटेंड करून वेळच्या वेळी अभ्यास केल्यास नक्कीच तणाव दूर होईल.
-डॉ. वसंत वाघ, माजी प्राचार्य
--
चर्चेतील सकारात्मक मुद्दे...
--
-कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये.
-पालक, नातेवाईक, मित्र यांच्याशी मुक्तपणे साधावा संवाद.
-पालकांनी मुलांना आपले क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी.
-आपल्या अपेक्षांचे ओझे पालकांनी मुलांवर लादू नये.
-वेगवेगळे छंद जोपासावेत, मोबाइलऐवजी मैदानी खेळांकडे वळावे.
-प्राणायाम व योगा या गोष्टींमुळेदेखील तणाव कमी होतो.
-मोबाइल व सोशल मीडियाचा मर्यादित व सदुपयोग करावा.
-प्रारंभापासूनच मानसशास्त्र विषयाची अभ्यासक्रमात गरज.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट