Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आजाराचं घेऊन ओझं, जगणं शोधतो आहे...

$
0
0

नाशिक ः एचआयव्हीबाधित मायबापांच्या पोटी जन्म घेतला इतकाच त्यांचा गुन्हा... अवघ्या दोन ते अडीच दशकांचं आयुष्य हाताशी आलेलं असताना खेळण्याबागडण्याच्या वयातच कोणाचे डोळे निकामी झालेत, तर कोणाला रक्त बदलण्यासाठी खेट्या घालाव्या लागताहेत. भरीस भर म्हणून आई-वडिलांच्या माघारी रक्ताची नातीही या निष्पाप लेकरांशी नाबोलती झाली आहेत. ही करूण कहाणी आहे एचआयव्हीबाध‌ित अनाथ मुलांची...!

बंटी, मोनिका आणि महेश (नावे बदलली आहेत) ही यातलीच काही दुर्दैवी मुले. सध्या ही मुले महिंद्रा अँड महिंद्रा आणि यश फाऊंडेशन यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्राच्या आधारे उरलेले आयुष्य जगण्याची केव‌िलवाणी धडपड करीत आहेत.

मोनिका ही पंधरा वर्षांची मुलगी जन्मत:च एचआयव्ही बाधित ही अवघी १५ वर्षांची मुलगी. एचआयव्हीबाधित बनून आई-वडिलांचं छत्र एकापाठोपाठ तिच्या लहानपणीच हरपले. त्यावेळी वडिलांच्या नातेवाईकांपैकी कोणीही मोनिकाचा सांभाळ करण्याचं औदार्य दाखविलं नाही. आजी आणि एमआयडीसीमध्ये कष्टकरी वर्गात कार्यरत असणाऱ्या मामा-मामीने मात्र मोनिकाची जबाबदारी खांद्यावर घेत तिला स्वत:च्या मुलांच्या बरोबरीने सांभाळण्यास सुरुवात केली. जेमतेम घर चालेल अशा परिस्थितीत मोनिकाचा सांभाळ होत असतानाच बालवयातच नवी सृष्‍टी बघण्याअगोदर तिची दृष्टी हरपली. नियतीचे चटके इतक्यावरही थांबायला तयार नाहीत. आता मोनिकाला फिट्सचाही त्रास सुरू झाला आहे. दिवसातून कुठल्याही क्षणाला फिट्स येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कुटूंबातील व्यक्ती तिची चोवीस तास सावलीसारखी पाठराखण करतात.

बंटीचीही कहाणी मोनिकासारखीच आहे. बंटीही जन्मत:च एचआयव्हीबाधित आणि बालवयातच दृष्टी गमावलेला. बंटी हा एका नामांकित महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचेही आई-वडिल एचआयव्हीची लागण होऊन दिवंगत झाले. इतर नातेवाईकांनी संबंध तोडले, तर त्याची सख्खी बहीणही अनोळखी बनली. त्यामुळे पूर्णत: एकट्या पडलेल्या या लेकराला आधार दिला त्याच्या रिक्षा चालविणाऱ्या काकांनी. घरामध्ये काका, आजी, चुलत बहीण आणि बंटी अशी चार माणसं राहतात. पण आजीचंही वय भरपूर झालं आहे. बहिणीसाठी लग्नाची स्थळं येतात. त्यामुळे तीदेखील परक्याचं धन आहे. अशा स्थितीत पोट भरण्यासाठी काका भटकंतीला गेल्यानंतर बंटीचं पालकत्व कोण निभावणार, असा सवाल आहे.

असे अनेक अनुत्तरीत प्रश्न घेऊन ही मुलं जगत आहेत. या मुलांसाठी महिंद्रा अँड महिंद्राच्या मदतीने यश फाऊंडेशन ही संस्था शक्य तितकी मदत करते आहे. जिल्ह्यात एकूण १४ हजारांवर एचआयव्ही बाधित मुले आहेत. पैकी सुमारे ३५० एचआयव्हीबाधित मुलांची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे. त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीपासून तर त्यांच्या इतर सर्व गरजांची पूर्तता किंवा समन्वयासाठी यश फाऊंडेशनचे कार्यकर्ते तळमळीने कार्यरत आहेत. पण एकूण बाधित मुलांच्या तुलनेत प्रत्यक्षात त्यांच्यासाठी धडपडणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांची संख्या अतिशय तोकडी आहे.


एचआयव्ही बाधितांच्या या मुलांच्या व्यथा ऐकूण केवळ हळवे सांत्वन करणारे शब्द खूप कानावर येतात. खरी गरज आहे ती या मुलांचे पालकत्व घेणाऱ्या सामाजिक घटकांची. अल्प आयुष्य घेऊन येणाऱ्या या बालजीवांसाठी उत्पन्नाचा थोडासा हिस्सा सामाजिक दायित्व म्हणून समाजघटकांनी त्यांच्यासाठी अर्पण करायला हवा.

- रवी पाटील, अध्यक्ष, यश फाऊंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात अवघे साडेचार हजार भाडेकरू?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात केवळ चार हजार ६४३ भाडेकरू असल्याची माहिती महापालिकेने एटीएसकडे सुपूर्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एटीएसच्या सूचनेनुसार महापालिकेने सहा विभागांकडून मागवलेल्या माहितीत पालिकेच्या दप्तरी केवळ साडेचार हजार भाडेकरूंची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांपाठोपाठ पालिकेकडे भाडेकरूंची नोंदणी करण्यात नागरिक तत्पर नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या दप्तरी घरात भाडेकरूची नोंद झाल्यास, घरपट्टीचे दर वाढतात. त्यामुळे नागरिक घरात भाडेकरू असल्याची नोंद करत नसल्याचे चित्र आहे.

शहरात रोजगारासह व्यवसायासाठी दररोज बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी असून, निवासासाठी ते भाड्याच्या घराचा आश्रय घेतात. परंतु, अनेक घरमालकांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली असली तरी संबंधित भाडेकरूंची माहिती घेण्याची तसदी अनेक घरमालक दाखवत नाहीत. तसेच त्यांची नोंद पोलिस स्टेशन आणि महापालिकेकडे करत नाहीत. दिवाळीच्या काळात पाथर्डी फाटा येथे एका घरातून पोलिसांनी गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले होते. संबंधित गुन्हेगारांनी हे घर भाड्याने घेतले होते. त्या संदर्भातील कोणतीही माहिती पोलिस अथवा महापालिकेकडे नव्हती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील भाडेकरूंच्या माहितीची जमवाजमव पोलिसांपाठोपाठ दहशतवाद विरोधी पथकानेही सुरू केली होती. त्यासंदर्भात महापालिकेकडे विचारणा केली होती.

एटीएसने महापालिकेला पत्र पाठवून शहरातील भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेने सहा विभागाकडून भाडेकरूंच्या नोंदीची माहिती मागवली होती. ही माहिती सहा विभागांकडून मुख्यालयाला प्राप्त झाली असून, पालिकेच्या दप्तरी केवळ ४ हजार ६४३ भाडेकरूंची नोंद आढळून आली आहे. त्यासंदर्भातील माहिती पालिकेडून एटीएसला देण्यात आली आहे. महापालिकेकडून घरात भाडेकरू राहत असल्यास अतिरिक्त कराची आकारणी केली जाते. त्यामुळे घरमालकाने भाडेकरू राहात असल्याची नोंद केल्यास त्याच्या घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ केली जाते. वाढत्या घरपट्टी व पाणीपट्टीमुळे शहरातील बहुतांश घरमालक महापालिकेकडे नोंदणीच करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेकडेही मोठ्या प्रमाणावर भाडेकरूंची नोंदणी होत नसल्याचे वास्तव आहे.

भाडेकरूची माहिती

विभाग- संख्या

सातपूर ३६६

पंचवटी ५३६

नवीन नाशिक ७३५

नाशिकरोड ८४३

नाशिक पश्चिम ११८०

नाशिक पूर्व ९८३


फेरतपासणी करणार

घरमालकाने घरात भाडेकरू ठेवला असेल तर त्या मालमत्तेवर दुपटीने घरपट्टी आकारली जाते. त्यामुळे मालमत्ताधारक भाडेकरूची नोंद घरपट्टी सदरी करीत नाहीत. मिळकत सर्वेक्षणांतर्गत भाडेकरूंची फेरतपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याअंतर्गत सर्वेक्षणादरम्यान मालमत्ताधारक राहत असलेल्यांचे ओळखपत्र तपासण्यात येत आहे. ओळखपत्रात असलेल्या व्यक्तीची मिळकतसदरी नोंद असली तरच ती घरमालक समजण्यात येईल. अन्यथा भाडेकरू म्हणून नोंद केली जाणार आहे. याद्वारे भाडेकरूंची वास्तव संख्या समोर येईल, असा विश्वास उपायुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्लाबोल मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सरकारविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असा आरोप गुरुवारी (दि. ३०) धुळे शहरात काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाद्वारे करण्यात आला. केंद्रातील सरकारच्या नोटबंदी, जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे यासर्व बाबींचा विचार करीत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

मालेगाव रोडलगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जुना आग्रा रोडमार्गे गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्याठिकाणी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष मनोज मोरे, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी महापौर मोहन नवले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जावेद बिल्डर, आसिफ शहा, महेंद्र शिरसाठ, रजनीश निंबाळकर, जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते.

या वेळी मोर्चेकरांनी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना मागण्याचे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आलेले खासगी क्षेत्रातील विशेष कार्याधिकाऱ्यांनी राज्याचे प्रशासन ताब्यात घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असलेले विषय प्राधान्यक्रमानुसार न घेता बुलेट ट्रेन व समृद्धी महामार्गसारख्या अवाढव्य योजनांसाठी राज्याचा महसूल वळविला जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आत्महत्या हा विषय शेतकरी आणि शेतमजूर यांच्यापुरता सीमित न राहता इतर अनेक क्षेत्रातही कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर परिस्थिती या सरकारने निर्माण केली आहे. तसेच जनता आता हवालदिल झाली आहे. त्यामुळेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या समाज घटकांतील विविध मागण्या सरकारने मान्य कराव्या, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचोलीतील जवानाची पत्नीसह हत्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)च्या जवानाने आपल्या पत्नीसह सहकारी जवान आणि त्याची पत्नी अशा तिघांची १६ गोळ्या झाडून हत्या केली. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे ही तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. मृत झालेला जवान आणि त्याची पत्नी सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चिंचोली येथील जवान राजेश किरण केकाणे आणि त्याची पत्नी शोभा किश्तवाडमध्ये राहत होते. धुलस्ती येथील राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी राजेश तैनात होता. तेलंगणा येथील रहिवासी इंगलप्पा सुरिंदर हा जवान राजेशचा मित्र होता. सीआयएसएफच्या शालिमार चौकातील कॉलनीमध्ये राहत असलेल्या सुरिंदरने गुरुवारी दुपारी अचानकपणे त्याची पत्नी लावण्य हिच्यावर आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो राजेश यांच्या घरी आला आणि त्याने राजेशसह त्याची पत्नी शोभा यांच्यावरही गोळ्या झाडल्या. यामध्ये राजेश, शोभा आणि सुरिंदरची पत्नी या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत स्थानिक पोलिसांनी सुरिंदरला अटक केली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन्ही कुटुंबीयांच्या चारही मुलांची जबाबदारी सीआयएसएफने घेतली असून, सुरिंदरला तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले. सुरिंदर हा २०१४ मध्ये सीआयएसएफमध्ये रुजू झाला आहे.

राजेश आणि शोभा यांच्या पार्थिवावर चिंचोलीच्या व्ही. एन. नाईक हायस्कूलच्या पटांगणावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. राजेश २००९ मध्ये सीआयएसएफमध्ये दाखल झाले होते. राजेश आणि शोभा यांच्या मागे दीड वर्षाची मुलगी आणि आर्यन हा साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. चिंचोलीत राहणारे राजेश यांच्या आई-वडिलांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेश यांचे बंधू गणेश पठाणकोट येथे भारतीय सैन्यदलात नोकरीला आहेत. सीआयएसएफद्वारे फोनवर माहिती देण्यात आल्यानंतर गणेश किश्तवाड येथे रवाना झाले. केकाणे कुटुंब मूळचे टेंभूरवाडी येथील आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते चिंचोली येथे वास्तव्यास आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमभावनामय तरल अन् सजग ‘सावित्री’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आईविना वाढलेल्या बुद्धिमान तरुणीच्या भावविश्वाचा ठाव घेणारी कलाकृती म्हणजे सावित्री हा एकपात्री नाट्यप्रयोग. आनंदी, खेळकर, स्वतंत्र विचारांची, अत्यंत संवेदनशील, कलासक्त प्रेम या संकल्पनेला व्यापक स्वरुपात पाहणाऱ्या साऊचा एका प्रवासात भेटलेल्या तरुण बुद्धिमान सुहृदाशी स्वत:हून संवाद सुरू होतो. हा संवाद पत्ररुपी असतो. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात हे नाटक सादर झाले.

सावित्री ही पु. शि. रेगे यांची पत्ररूप कादंबरी. या कादंबरीचा नाट्यमय आविष्कार म्हणजे सावित्री हा नाट्यप्रयोग. ही केवळ प्रेमकथा नव्हती. साऊ कुठल्याही चौकटीत बसणारी नाही. बुद्धिमान, स्वतंत्र विचारांच्या, आपल्या स्वातंत्र्याचे मोल जाणणाऱ्या, पण त्यातून येऊ शकणारा बंडखोरपणा, बेबंदपणाचा लवलेशही नसणाऱ्या, अत्यंत संवेदनशील, कलासक्त, काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या, वसुधैव कुटुम्बकम् वृत्तीच्या आणि प्रेम या संकल्पनेला कितीतरी व्यापक रूपात पाहणाऱ्या अशा मुलीच्या जगण्याचा विलक्षण पटच सावित्रीतून मांडण्यात आला. तिच्याच वडिलांच्या शब्दात सांगायचे तर ती आनंदभाविनी आहे. आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचे, आपल्याला जे-जे हवे ते आपणच व्हायचे ही तादात्म्यता तिच्यात आहे, पण असे एकरूप होताना आपले मीपण हरवू न देण्याचे भानही तिच्याकडे आहे. आनंदी, खेळकर, विचारी, तीक्ष्ण विनोदबुद्धी असलेली, विलक्षण, धीट, उत्कट अशी ही तरुण मुलगी एका प्रवासात भेटलेल्या तरुण, बुद्धिमान सुहृदाशी तिचा स्वत:हून संवाद सुरू होतो.
या दोघांचा पत्ररुपी संवाद घडतो साठ-पासष्ठ वर्षांपूर्वी. पत्र हे दूरस्थ संवादाचं प्रमुख माध्यम असतानाच्या काळात हे सर्व घडते. आजच्या क्षणाक्षणाला अवघ्या जगाशी जोडले जाऊ शकणाऱ्या काळातल्यांना संवादाच्या त्या तीव्रतेचा अंदाजही येणार नाही कदाचित; पण मनातले कागदावर उतरवून त्रयस्थामार्फत पलीकडच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे आणि त्याच्याकडून पुन्हा उत्तर येणे ही जितकी वेळ घेणारी प्रक्रिया, तितकीच गुंतवून ठेवणारीही. सावित्री तर प्रत्येक अक्षर न अक्षराला शास्त्र-काट्याची कसोटी लावते. आपले मन उघडे करायला उत्सुक असलेली; पण तरीही त्याला जोखू पाहणारी, त्याच्या सहवासासाठी आतुरलेली पण आपली पायरी जराही न उतरणारी, तरल आणि तितकीच सजग अशी ही सावित्री. तिच्या प्रेमाच्या कल्पनेत तो एकटा नाहीये तर तिच्या सगळ्या अवकाशासह तिला त्याला आपलेसे करून घ्यायचे आणि हा प्रवास फक्त प्रेमातल्या समर्पणाचा नाही तर आत्मशोधाचाही आहे.

रसिकांसाठी अनोखा अनुभव
सुरुवातीला मुग्ध व नंतर परिपक्व होत जाणारा सावित्रीच्या प्रेमाचा प्रवास सांगणारा हा नाट्याविष्कार रसिकांना साहित्याचा अनोखा अनुभव देणारा ठरला. सावित्री ही पु. शि. रेगे यांची १९६२ मध्ये लिहिलेली काव्यमय पत्रात्मक कादंबरी, या कादंबरीची रंगावृत्ती, नेपथ्य आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र लाखे यांनी केले होते तर सावित्रीची भूमिका प्रिया जामकर यांनी साकारली. नव्वद मिनिटांच्या या नाट्याविष्काराची निर्मिती मिती-चार कल्याण व प्रस्तुती अस्तित्व मुंबई यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्युनिक्युलर ट्रॉलीचा घोळ सुरूच

$
0
0

दीपक महाजन, कळवण

सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प कधी पूर्ण होणार व त्याचे कधी लोकार्पण होणार, या प्रश्नांचे उत्तर प्रशासनाकडूनच दोन वेगवेगळ्या प्रकारे मिळू लागले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबतची संभ्रमावस्था वाढली आहे. किमान नवीन वर्षात तरी हा प्रकल्प सुरू व्हावा, अशी अपेक्षा भक्तांसह, पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

प्रकल्पाचे लोकार्पण होईल या धर्तीवर प्रशासन व प्रकल्प संचालक यांच्यामार्फत २०१७ मध्ये देण्यात आलेले गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, १५ ऑगस्ट हे तीनही मुहूर्त टळले आहेत.

सप्तशृंग गडावर दिवसेंदिवस भाविक व पर्यटकांची संख्या वाढत आहे. वर्षातून होणारे दोन यात्रोत्सव, नवसपूर्ती निमित्ताने लाखो भाविक गडावर हजेरी लावतात. अबालवृद्ध, अपंग, गरोदर महिलांना गडाच्या दर्शनासाठी ५०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे भाविकांना माफक दरात सुलभ दर्शन व्हावे, या हेतून ट्रॉली प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

प्रकल्पाची कामे अपूर्ण

सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सुचविलेली सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे संबंधित टीमने प्रकल्प सुरू करावा, असा अहवाल शासनाला दिला असल्याचे, प्रकल्प व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तर या प्रकल्पात लिफ्ट, इलेक्ट्रिशियनचे काम अपूर्ण आहे. टॉयलेटची व हॉल सिलिंग तसेच कलरिंगचे काम अपूर्ण आहे. या ट्रॉलीचा वापर करत असतांनाच लहान मुलांची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रोलिंगचे कामे होणे गरजेचे आहे. याबाबतच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या असून डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत ही सर्व कामे होणे अपेक्षित आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

प्रकल्पाबाबत दावे-प्रतिदावे

या प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा ठेकेदार असलेल्या नागपूर येथील सुयोग गुरुबक्षाणीच्या व्यवस्थापनाने केला आहे. तसा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याचेही ते सांगतात. तर याउलट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकल्पाची महत्त्वाची मेंटेनन्सची कामे बाकी असल्याचे सांगत आहेत. एकाच प्रकल्पाबाबत दोन विभागाकडून वेगवेगळी कारणे पुढे आल्यामुळे लोकार्पण सोहळा होणार तरी कधी, मुहूर्त सापडणार तरी कधी ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुरक्षा रामभरोसे

या प्रकल्पाच्या सर्व पूर्तता झाल्याशिवाय तसेच खऱ्या अर्थाने लोकार्पण झाल्याशिवाय कुणालाही या ट्रॉली मधून ने-आण करू नये, हा नियम आहे. तरी चाचण्यांचे निमित्त पुढे करत स्थानिक पुढाऱ्यांच्या हट्टापायी आमदार, खासदार, मंत्र्यांना ट्रॉलीची सेवा मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत कुठलीही लेखी परवानगी व सूचना केली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा सेवानिवृत्तांबाबत पदाधिकाऱ्यांची अनास्था

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत अनेक वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी या सेवेचा मोबदला म्हणून महापौर, आयुक्त किंवा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार व्हावा अशी सर्वच कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. परंतु, नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला सत्काराचे असे भाग्य आले नाही. कारणही महापौरांसह, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती तसेच विविध समित्यांचे सभापती गुरूवारी गायब होते. प्रशासनाने शोधाशोध करूनही पदाधिकारी सापडले नाही. अखेर नगरसेवकांच्या हातून या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याची वेळ आली.

महापालिकेच्या सेवेतून क्रीडा तथा जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, कनिष्ठ लिपिक नीलिमा जोशी, रोड मुकादम विष्णू गांगुर्डे, पंप ऑपरेटर अशोक थेटे, व्हॉलमन भानुदास सुक्ते, स्टाफ नर्स सरला रुपवते, बिगारी अनाजी रोकडे, सफाई कर्मचारी शकुंतला निरभवणे, छगन पाथरे, लक्ष्मीबाई वाघमारे, निळू जगताप हे नोव्हेंबर महिन्यात निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सत्कार स्थायी समितीत प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आला. महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत या सर्वांचा सत्कार केला जातो. परंतु, शुक्रवारी महापौरांसह महापालिकेतच दिवसभर ठिय्या मांडून असलेले सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, विविध समित्यांचे सभापती या सत्कार कार्यक्रमांकडे फिरकलेच नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी महापौरांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. मात्र, तेथे कोणीही आढळले नाही. अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते सत्कार ठेवण्यात आला. मात्र, ऐनवेळी आलेल्या राजेंद्र महाले, राहुल दिवे, नगरसेविका प्रियंका घाटे यांना सत्कारासाठी उभे करण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबाबत सत्ताधाऱ्यांनी दाखवलेली अनास्था ही गंभीर असून निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांची हेडसांड केली जात असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळी ठरताहेत बळीराजासाठी फायद्याची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. तालुक्यात गेल्या वर्षभरात ९८४ शेतकरी यासाठी पात्र ठरले असून, २६० हून अधिक शेतकऱ्यांचे शेततळे पूर्ण झाले आहे. यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

शेततळे करण्यासाठी रोजगार हमीद्वारे शेततळे, एनएचएम योजनेद्वारे शेततळे व मागेल त्याला शेततळे अशा योजना आहेत. यातील मागेल त्याला शेततळे योजनेचा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ होत आहे. तालुक्यातील १ हजार ४०१ शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आपले सरकार पोर्टलद्वारे शेततळ्यांसाठी नोंदणी केली होती. यानंतर कृषी विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. मागेल त्याला शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासोबत रब्बी व उन्हाळी पिके घेणे देखील शक्य झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.

सातमानेत ३६ शेततळे

मागेल त्याला शेततळे योजनेचा सर्वाधिक लाभ सातमाने गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या गावात एकूण ३६ शेतकऱ्यांना शेततळ्यांचा लाभ झाला असून, यामुळे गावातील शेतकरी समाधानी आहेत. सातमाने गावात झालेल्या ३६ शेततळ्यांमुळे भविष्यात शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठी पाण्याचा प्रश्न यामुळे बऱ्याच प्रमाणात मार्गी लागला आहे. त्यामुळे उत्पन्नातही वाढ झाली आहे.

अनुदान पडतेय कमी

मागेल त्याला शेततळे ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लाभदायक असली, तरी एका शेततळ्यासाठी दोन ते अडीच लाख इतका खर्च येत असताना शासनाकडून केवळ ५० हजार रुपये इतके अनुदान मिळते. त्यामुळे पदराचे काही पैसे यात ओतावे लागतात. प्रसंगी कर्जही काढावे लागते. हे अनुदान वाढून मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शेतीसाठी संरक्षित पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी शेततळे करावे. पावसाची अनिश्च‌ितता दिवसेंदिवस वाढत असल्याने शाश्वत सिंचनाचा पर्याय म्हणून मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा. पाण्याची उपलब्धता झाल्याने रब्बी, उन्हाळी पिकास मदत होईल.

- गोकुळ आहिरे,

तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गिरणा गौरव’तर्फे आज नारी सन्मान

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कळवण

सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या आदर्श महिलांचा गिरणा गौरव प्रतिष्ठानतफै ‘प्रेरणा नारी सन्मान २०१७’ या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. व्याख्यात्त्या व साहित्यिक प्रा. डॉ. प्रतिभा जाधव, नगराध्यक्ष सुनीता पगार, विभागीय आयुक्त दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा कळवण येथे शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. नाशिकच्या महापौर रंजना भानसी, डॉ. उषाताई शिंदे, वैशाली आहेर, छाया बैरागी, सुनीता पगार, प्रतिभा चावडे, सोनाली बोरसे, कलाताई पवार, मिना देवरे, सुनीता लोखंडे, प्रतिभा संगमनेरे, आशाताई पवार यांचा सन्मान केला जाणार आहे.

कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांच्या ‘जखमी पावलांचे ठसे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रसंगी वाचन प्रेरणा दिनही साजरा होणार असल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, अॅड. परशुराम पगार, प्रा. के. के. शिंदे यांनी दिली. तालुक्यासह जिल्ह्यातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थ‌ित रहावे, असे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात एटीएम फोडले

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील मालेगाव रोडवरील बाजार समिती समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल २३ लाख ११ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. तसेच शहरातीलच बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम देखील गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरात प्रथमच बँकेचे एटीएम फोडून रोकड पळविण्याच्या घटनेने घबराट निर्माण झाली आहे.

सटाणा शहरात स्टेट बँकेचे चार एटीएम आहेत. त्यापैकी मालेगाव रोड येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एक एटीएम आहे. आज सकाळी हे एटीएम बंद असल्याची ऑनलाइन माहिती ब्रिंक इंडिया प्रा. लि. च्या मुंबई कार्यालयाला प्राप्त झाल्याने त्यांनी एजन्सीचे ऑपरेटर योगेश वैद्य व एटीएम ऑपरेटर सतीश रौंदळ यांना एटीएमवर भेट देण्याचा आदेश दिला.

सकाळी ७ वाजता या कर्मऱ्यांनी एटीएमला भेट दिली असता एटीएम समोरील व्हॉल्ट दरवाजा गॅस कटरने कापलेले दिसला. या कर्मचाऱ्यांनी सटाणा स्टेट बँकेचे कॅश ऑफिसर लक्ष्मण करावडे यांना याबाबत कळवून सटाणा पोलिसांनाही माहिती दिली. एटीएममधून २३ लाख ११ हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद करावडे यांनी सटाणा पोलिसांत दिली आहे.

स्टेट बँकेचे एटीएम फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमकडे वळविला. हे एटीएम देखील गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान सटाणा पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. भरवस्तीत असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळ्यात राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण


केंद्र व राज्य शासनाच्या अनागोंदी, जनविरोधी कारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देवळा तहसीलदार कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नायब तहसीलदार अनिल चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य शासन सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने अनेक पोकळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, लहान -मोठे व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच स्थरांमध्ये शासनाविषयी असंतोष पसरला आहे. केंद्र शासनाच्या नोटबंदी, जीएसटीच्या आततायी निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. राज्य शासनाच्या फसव्या शेतकरी कर्जमाफीमुळे कुणालाही त्याचा

फायदा झाला नाही, असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, मविप्रचे संचालक डॉ. विश्राम निकम, जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर, जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार, पंचायत समिती सभापती केसरबाई अहिरे, खुंटेवाडीचे सरपंच भाऊसाहेब पगार, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजर होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातशे ‘बीएलओं’ना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७०० हून अधिक केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) तहसीलदारांनी नोटिसा बजावल्या आहे.

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी १५ ते ३० नोव्हेंबर असा कार्यक्रम दिला होता. यात जिल्हा पिछाडीवर पडला. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी दहा तहसीलदारांना कारणे द्या नोटीस बजावली. त्यानंतर तहसीलदारांनी ‘बीएलओं’वर कारवाईचा बडगा उचलला आहे. यानंतरही कामे केल्याचे आढळून न आल्यास ‘बीएलओं’वर गुन्हा दाखल करण्याची तयारी तहसीलदारांनी केली आहे. यापूर्वी जळगाव येथे असे गुन्हे दाखल झाले आहेत. या पडताळणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तब्बल ४२ लाख मतदारांच्या ७ लाख कुटुंबापैकी फक्त ९ हजार २०० कुटुंबांचे ऑनलाइन पुनरिक्षण झाले असून त्यात मालेगाव व नाशिक शहरातील कामे अल्प प्रमाणात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मालेगावचे दोन विधानसभा मतदार संघ व नाशिकचे चार मतदारसंघ याकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमात २२ हजार ऑफलाइन पुनरिक्षण झाले आहे. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी १५ ते ३० नोव्हेंबर असा कार्यक्रम दिला. यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी देण्याच्या सूचना केल्या. आता त्याला पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यात ४ हजार ‘बीएलओं’ची नियुक्ती करण्यात आली असून यात ऑनलाईन काम करण्यासाठी ३९१ ‘बीएलओं’ने सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ऑफलाइन काम सुरू असले तरी त्यांची संख्या अद्याप पुढे आलेली नाही.

दुरुस्त्यांसाठी घाईगर्दी

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ‘बीएलओ’ या भेटीत स्थलांतरित आणि मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळणे, मतदारांचे नाव, वय, लिंग, पत्ता, फोटो यामध्येही आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच मतदारांची, कुटुंबाची माहिती व संपर्कासाठी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी भरण्याचे आदेश देण्यात आल्याने १५ दिवसात हे काम आता पूर्ण करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील ७०० हून अधिक ‘बीएलओं’ला तहसीलदारांनी नोटीसा बजावल्या आहे. मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांला १५ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे त्यात हे काम करणे आवश्यक आहे. नाशिक व मालेगाव शहरात सर्वाधिक कमी काम असून त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
- गणेश राठोड, तहसीलदार, जिल्हा निवडणूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतीमध्ये ८० हजार खटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ९ डिसेंबर रोजी आयोजित महालोकअदालत खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. या लोकअदालतीमध्ये सुमारे ८० हजार खटले सादर होणार असून, त्यापैकी सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक खटल्याचा निपटारा होण्याची शक्यता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केली. दावापूर्व आणि प्रलंबित खटल्यांतील दोघापैकी एका पार्टीने आताही संपर्क साधल्यास त्यांचा खटला सुनावणीसाठी घेणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी, ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकअदालतीमुळे २६ हजार ३७९ प्रकरणांमध्ये तडजोड करून आपसातील वाद मिटविला गेला. यामध्ये दावा दाखलपूर्व २२ हजार ६७८ प्रकरणे तर कोर्टातील तीन हजार ७०१ प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर खटले लोक अदालतीत येणे आणि त्यावर तडजोड होणे, ही बाब राज्यपातळीवरील विक्रम ठरली होती. आता ९ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन होणार असून, याबाबत पत्रकार परिषदेत शिंदे यांनी सांगितले, की यावेळी लोकअदालतीत प्रलंबित आणि दावा पूर्व असे ८० हजार खटले सुनावणीसाठी यावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. वर्षानुवर्षे सुनावणीसाठी कोर्टात चकारा मारणे, यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करणे हे नागरिकांनीच थांबवयला हवे. महापालिका अथवा अन्य एखाद्या संस्थेचा कर कधीही माफ होत नाही. त्यात तडजोडच करावी लागते. हीच बाब मोटार वाहन अपघातात मिळणाऱ्या भरपाईबाबतही लागू पडते. आज मिळणारी भरपाईची रक्कम सात ते आठ वर्षांनी पदरात पाडून घेण्यात कोणताही मतलब नसतो, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या लोकअदालतीचा अनुभव लक्षात घेता, कमकुवत दुव्यांमध्ये सुधारणा केल्या जातील. पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात असणार असून, लोक अदालतीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विभागाच्या बैठका घेण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी सांगितले. जिल्हाभरात यासाठी जनजागृती केली जात आहे.

न्या. शिंदेंची कार्यतत्त्परता!
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मातोश्री सत्यभामा सोपानराव शिंदे यांचे सोमवारी (दि. २७) निधन झाले. मात्र, लोकअदालतीच्या कामांच्या नियोजनासाठी सोलापूर येथे गेलेले शिंदे एका दिवसात लागेच परत आले. आईसाठी जेव्हा गरज होती, त्यावेळी केले. घरात बसून राहणे पटत नव्हते. लोकअदालतीच्या पार्श्वभूमीवर हजारो खटल्यांचा निपटारा होणे महत्त्वाचे असून, यासाठी उपस्थित राहावे असे मन सांगत होते. घरात बसून रडणे हे आईलाही पटले नसते, म्हणून कामाला महत्त्व दिल्याचे भावनिक मत शिंदे यांनी व्यक्त केले.

वर्षांनुवर्षे सुरू राहणाऱ्या न्यायालयीन खटल्यांचा त्या कुटुंबावर परिणाम होतो. आर्थिक, मानसिक तसेच शारिरीकदृष्ट्या कुटुंबातील सदस्य खचून जातात. या केसेस कोणत्याही असो, दीर्घकाळाचा परिणाम होतोच. संबंधितांनी याची दखल घेत लोकअदालतीचा फायदा घ्यावा.
- सूर्यकांत शिंदे,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फांद्या छाटणी अधिकार विभागीय स्तरावर द्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वीज तारा तसेच पथदीपाभोवताली असणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी वृक्ष प्राधिकरणची परवानगी लागते. यामुळे छाटणीला विलंब होतो. हा कालापव्यय टाळण्यासाठी वृक्ष छाटणीचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांनाच देण्याचा ठराव पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच विभागातील खासगी भूखंडावर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरत असल्याने संबंधित जागामालकांना अस्वच्छतेप्रश्‍नी नोटिसा बजावण्यासह स्वच्छताकर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक पश्चिम प्रभाग समितीची बैठक सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झाली. यात नगरसेवकांनी उद्यानांची दुरवस्था, दुभाजकांमधील कचरा, वृक्षछाटणी प्रक्रियेतील विलंब आदी तक्रारींचा पाढा वाचला. वीज तारांना अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांच्या फांद्याची वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे. परंतु, वृक्ष छाटणीच्या प्रस्तावांना वृक्षप्राधिकरण समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र, वृक्षप्राधिकरण समितीची बैठक नियमित होत नसल्याने वृक्ष छाटणीला अडचणी येतात. परिणामी छाटणी अभावामुळे झाडांचे प्रश्न बिकट होतात. तसेच पथदीपांवरही काम करता येत नाही. दुभाजक देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देऊनही दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चर्चेअंती वृक्षछाटणीचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. दररोज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विद्युत विभागाने त्यांच्याकडील हॅट्रोलिक प्लॅटफॉर्म असलेली वाहने वृक्षछाटणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश सभापती डॉ. पाटील यांनी दिले. पावसाळी गटारींना ड्रेनेज जोडल्याने नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने पावसाळी गटार योजनेचा नकाशा उपलब्ध करून पावसाळ्यापूर्वी पावसाळी गटारींची स्वच्छता करण्याचे निर्देश सभापती डॉ. पाटील यांनी दिले.

उद्यान विभाग रामभरोसे
महापालिकेच्या उद्यान विभागासंदर्भातील तक्रारींचा पाढाच नगरसेवकांनी यावेळी वाचला. या विभागाकडेच उद्यान निरीक्षकांची वानवा असल्याचे समोर आले. महापालिकेकडे सहा विभागांसाठी केवळ दोनच उद्यान निरीक्षक उपलब्ध असून उद्यान निरिक्षक पांडे यांच्याकडे सहापैकी पाच विभागाच्या उद्यान निरीक्षकपदाची जबाबदारी असल्याचे समोर आले. पांडे हे देखील सहा महिन्यांच्या रजेवर जात असल्याचे सभेत सांगण्यात आल्याने उद्यान विभाग रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वींरेंद्रसिंहांची त्र्यंबकला भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

मोखाडा तालुक्यातील (जि. पालघर) कुपोषणाबाबत केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री वींरेंद्रसिंह यांनी पालघर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मोखाडा भागात अंगणवाड्यांच्या कामकाजाबाबत माहिती घेतली.

त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी वींरेंद्रसिंह आले होते. येथे येत असताना नाशिक-त्र्यंबक मार्गावरील खंबाळा अंगणवाडीस त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुंढे तसेच महिला व बालकल्याण सभापती खोसकर आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला तेव्हा मोखाडा तालुक्यातील कुपोषणाचे प्रश्न विधीमंडळात उपस्थित होत असतात आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना टार्गेट करण्यात येते. याबाबत संबंधित विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन महिला व बाल विकास प्रकल्प आहेत. तालुक्यातील दोन्ही प्रकल्पांबाबत अचूक माहिती मिळत नसल्याचे याप्रसंगी मंत्र्यांसह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आले आहे. दोन्ही प्रकल्पांचे अंतर्गत कुपोषणग्रस्त बालकांची संख्या अधिक आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या कमी असल्याचे भासविण्यात येते, असा आरोप तालुक्यातील ग्रामस्थ करतात. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनारोग्याला वाढला धोका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात थंडीचा जोर वाढला असला तरी अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा प्रकोप कमी होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर पाठोपाठ नोव्हेंबर महिन्यातही डेंग्यूचा उच्चांक गाठला गेला आहे. नोव्हेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २७६ पर्यंत गेली आहे. तर संशयितांचा आकडा हा ७८० पर्यंत पोहचला आहे. नाशिककरांच्या आरोग्याला धोका वाढला आहे. दरम्यान, ६२ पथकाद्वारे डेंग्यूच्या अळीचे निर्मूलन केले जात असल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे.

महापालिकेच्या वतीने केल्या जात असलेल्या उपाययोजना कागदावर असल्याने डेंग्यूच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पावसाळा संपल्यानतर डेंग्यू कमी होईल असे चित्र होते. परंतु, डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९७ वर गेली. सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली. तर ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली. ऑक्टोबरमध्ये संशयितांचा आकडा पावणेचारशेपर्यंत तर डेंग्यू बाधितांचा आकडा हा १४३ पर्यंत गेला होता. नोव्हेंबरमध्ये सुद्धा डेंग्यूचा कहर सुरूच आहे. ऑक्टेबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये डेंग्यू बाधितांचा आकडा शंभरने वाढला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या आरोग्याला धोका वाढला असून महापालिकेच्या उपाययोजना तोकड्या पळत असल्याचे चित्र आहे.

आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

नाशिकमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण सिडको आणि सातपूर या दोन विभागात सापडले असून आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. दरम्यान, महापालिकेने या डेंग्यूवर उपाययोजनांसाठी अळी निर्मूलनाकरिता ६२ पथकांची स्थापना केली आहे. या पथकाद्वारे घरोघरी जावून जनजागृती करण्यासह डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत.

डेंग्यूचा प्रकोप
- जानेवारीत............४
- फेब्रुवारी............५
- मार्च............४
- एप्रिल............२
- मे............६
- जून............१९
- जुलै............१४
- ऑगस्ट............९७
- सप्टेंबर............१०५
- ऑक्टोबर............२४८
- नोव्हेंबर............२७६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीबाजारावरून सायट्रिकला वाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडच्या सायट्रिक येथील भाजीबाजाराबाहेरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी भाजीविक्रेते आणि शेतकरी यांना महापालिकेच्या शाळा क्रमांक चौदासमोर स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न झाल्याने वाद झाला. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पोलिसांसह दाखल झाले. नगरसेवक शरद मोरे यांनी मध्यस्थी केली.

जेलरोडला सायट्रिक येथे महापालिकेचा हाकर्स झोन आहे. तेथे काही वर्षांपासून भाजीबाजार भरतो. बाजाराबाहेरही अन्य काही भाजीविक्रेते व शेतकरी बसू लागल्याने मंडईतील भाजीविक्रेत्यांचा व्यवसाय कमी झाला. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना बाहेर भाजीविक्री करण्यास विरोध केला. तर शेतकऱ्यांची तक्रार आहे, की काही भाजीविक्रेत्यांनी बाजारात जागा मिळवली असूनही बाहेरही जागा बळकावली आहे. एकाच कुटुंबाचे तीन सदस्य वेगवेगळ्या तीन ठिकाणी भाजी विकतात. आम्हाला हुसकावून लावले जात आहे. आम्ही शाळेसमोरील नव्या बाजारात बसलो; मात्र तेथे ग्राहक फिरकत नाही. त्यामुळे आम्हालाही येथेच जागा द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर आणि नगरसेवक शरद मोरे यांनी सांगितले, की बाजारातबाहेर गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. बाजाराबाहेरील गर्दी कमी करावी व सदर जागा रिकामी करावी अशी त्यांची मागणी केली आहे. त्यामुळे आता या बाजारात कटलरी आणि फळविक्रेते यांना जागा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शेतकरी व भाजीविक्रेत्यांना महापालिका शाळेसमोर जागा दिली आहे. तेथे मार्किंग करून सुविधा देण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाच्या सहा शाळा ‘व्हर्च्युअल’च्या वाटेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी नाशिक महापालिकेच्या सहा शाळा व्हर्च्युअल होण्याच्या मार्गावर आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून महापालिकेच्या सहा शाळा व्हर्च्युअल करण्यात येणार आहेत.

तंत्रज्ञानात्मक शिक्षणाची वाढती गरज पाहता शालेय वयापासून विद्यार्थ्यांना या प्रवाहात सामावून घेणे महत्त्वाचे ठरत आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना या सुविधा चुटकीसरशी उपलब्ध होत असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमधील विद्यार्थी मात्र अद्याप या ज्ञानापासून दूर असल्याचे वास्तव आहे. मात्र, आता या चित्रात बदल होणार आहे. सहा विभागातील प्रत्येक विभागात एक याप्रमाणे शाळेची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर, एचडी वेबकॅम, मायक्रोफोन आदी तांत्रिक साहित्य देण्यात येणार आहे. तर शाळा क्रमांक १६ मध्ये डिजिटल क्लासरुमचा स्टुडियो असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमधील अभ्यासक्रमाबरोबरच विविध विषयांवरील चर्चासत्र, मान्यवरांची व्याख्याने आदी आवश्यक गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या नवीन वर्षात या शाळांची ‘व्हर्च्युअल’ कडे वाटचाल सुरू होणार असल्याचे महापालिकेचे प्रशासनाधिकारी नितीन उपासणी यांनी सांगितले.

या शाळांचा समावेश
- शाळा क्र. ८९ म्हसरुळ, पंचवटी
- शाळा क्र. ३६, पंचक, नाशिकरोड
- शाळा क्र. ४७, टाकळी, पूर्व नाशिक
- शाळा क्र. ७१, आनंदवल्ली, गंगापूर रोड.
- शाळा क्र. २२, विश्वासनगर, सातपूर
- शाळा क्र. ७२, अंबड सिडको
तसेच सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यांमधील चार शाळा अशा दहा शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खासदार निधीतून व्हर्च्युअल स्कूल बनविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रांद्वारे शिक्षण मिळणार असल्याने त्यांचाही उत्साह दुणाणणार आहे.
- नितीन उपासणी,
प्रशासनाधिकारी, मनपा शिक्षण समिती

येत्या महिनाभरात महापालिकेसह तालुक्यातील चार अशा एकूण दहा शाळांमध्ये या अभ्यासक्रमाचा डेमो होईल. तेथे व्हर्च्युअल क्लासरुम बनविण्यात येणार आहे. यातून चांगले परिणाम समोर आल्यास प्रत्येक तालुक्यातील शाळांमध्ये अशा प्रकारचे क्लासरुम बनविण्याचा प्रयत्न आहे. गुणवत्तावाढीसाठी मदत व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांना सर्व तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब ! पोटातून काढली ७२ नाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहान मुलाने चुकून एखादं नाणं गिळल्याच्या चर्चा अनेकदा कानावर पडतात. ते नाणं काढण्यासाठी त्याच्या कुटुंबियांची मोठी धावपळ उडते. परंतु, एखाद्या ५० वर्षांच्या व्यक्तीने अशी नाणी व धातूच्या वस्तू गिळल्याचे समोर आले तर निश्चितच ते सर्वांसाठी धक्कादायक ठरेल. अशीच एक घटना नुकतीच समोर आली असून, एका व्यक्तीने तब्बल ७२ नाणी व धातूच्या विविध वस्तू गिळल्याचे उघड झाले. शुक्रवारी या व्यक्तीवर डॉ. अमित केले यांनी शस्त्रक्रिया करून नाण्यांचा हा खजिना बाहेर काढला.

मूळचा पालघर जिल्ह्यातील असलेल्या मानसिक आजाराने ग्रस्त एका व्यक्तीने गेल्या पंधरा ते वीस वर्षांत विविध नाण्यांसह धातूच्या अनेक वस्तू गिळल्या. काही कॉइन शौचाद्वारे पडली, तर काही जठरामध्ये अडकली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पोट फुगणे, अन्नपचनास अडथळा, काहीही खाल्ल्यानंतर उलटीद्वारे अन्न पडून जाणे यांसारख्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत होते. तीन वर्षांपासून ही व्यक्ती केवळ पाणी व द्रव्यावर जगत होती. अनेकदा तपासणी करुनदेखील रिपोर्ट नॉर्मल आल्याने त्यावर उपचार झाले नाहीत. गुरुवारी कॅनडा कॉर्नरवरील कृष्णा हॉस्पिटल व क्रिट‌िकल केअर सेंटरमधील डॉ. अमित केले यांनी एक्स-रे व दुर्बिणीद्वारे तपासणी केली असता पोटात धातू असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी ही नाणी बाहेर काढण्यात आली. ही व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. भूलतज्ज्ञ डॉ. सपना कासलीवाल, डॉ. शिल्पा सोनवणे व डॉ. विजय सोनवणे डॉ. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

दुर्बिणीद्वारे, एक्सरेद्वारे पाहिल्यानंतर मेटलचा पार्ट अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर पेशंटला भूल देऊन पूर्णतः दुर्बिणीद्वारे ७२ नाणी बाहेर काढण्यात आली. तीन-साडेतीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ही नाणी काढण्यात आली. पेशंट आता पूर्णपणे बरा असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. ही शस्त्रक्रिया करणे संयमाचे तसेच आव्हानात्मक होते.

- डॉ. अमित केले, एण्‍डोस्कोपिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याला मारण्यासाठी सव्वाशे जण वरखेड्यात

$
0
0

नाशिकः चाळीसगाव तालुक्यातील वरखेडा येथे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी वनविभागाने आता मिशन बिबट्या हाती घेतले आहे. या बिबट्याला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी वनविभागाचे तब्बल सव्वाशे अधिकारी, कर्मचारी वरखेड्यात दाखल झाले आहेत. रात्रंदिन पहारा देऊन बिबट्याचा निकाल लावण्याचे वनविभागाने निश्चित केले आहे.

गिरणाकाठ परिसरातील वरखेडा येथे बिबट्या धुमाकूळ घालत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून परिसरातील नागरिक बिबट्याच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. याठिकाणी दुर्देवी दोन घटना घडल्यानंतर वनविभागाने पिंजरा लावला आणि त्यात एक बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण, यास ३८ दिवस उलटत नाही तोच बिबट्याचा धुमाकूळ समोर आला. गेल्या काही दिवसात याठिकाणी चार दुर्घटना घडल्याची वनविभागाकडे नोंद आहे. बागायती शेती, मुबलक पाणी, मेंढ्या आणि मेंढपाळांचा वावर असे पोषक वातावरण असल्या बिबट्या या परिसरात वास्तव्य करून आहे. मात्र, हा बिबट्या नरभक्षक बनल्याने परिसरात अतिशय भीतीचे वातावरण आहे. सातत्याने घडणाऱ्या दुर्घटना आणि मंत्र्यांसह अनेक मान्यवरांची येथे लागणारी हजेरी लक्षात घेता वनविभागाने आता मिशन बिबट्या हाती घेतले आहे.

नाशिकच्या दोन रेस्क्यू टीमसह एकूण १० पथके वनविभागाने बिबट्याला शोधण्यासाठी तैनात केल्या आहेत. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यास त्याला बेशुद्ध करण्यासाठी बंदूकधारी आणि बिबट्या दिसताक्षणी त्यास ठार मारण्यासाठी बंदूकधारी अशा दोन्ही प्रकारच्या बंदूकधारींचा पथकात समावेश आहे. वरखेडा येथील उदयसिंग पवार आश्रमशाळेत वनविभागाने डेरा टाकला आहे. तब्बल सव्वाशे कर्मचारी दिवस-रात्र याठिकाणी पहारा देत आहेत. काही बंदूकधारी कर्मचारी तर पिंजऱ्यात २४ तास तैनात आहेत. पशुवैद्यकीय डॉक्टरांचे एक पथकही याठिकाणी रुजू करण्यात आले आहे. जळगावचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या नेतृत्वामध्ये हे संपूर्ण कर्मचारी कार्यरत आहेत. या पथकाने येथील परिसर पिंजून काढला आहे. आश्रमशाळेच्या ठिकाणी अक्षरशः वॉररूम स्थापन करुनच वनविभागाचे मिशन बिबट्या सुरू आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

स्थानिक ग्रामस्थांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांच्याकडे जी काही माहिती आहे, ती त्यांनी थेट वनविभागाला द्यावी. आश्रमशाळेच्या ठिकाणी आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.


बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. आम्ही कसोशीने बिबट्याच्या शोधात आहोत. बिबट्याला जिवंत किंवा मृत पकडण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले आहेत.

- सुनील वाडेकर, वनकर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images