सावाना नागरिक शिक्षक गौरव समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण क्षेत्रातील रमेश देशमुख यांची निवड बेकायदेशीर असल्याच्या सावानाचे माजी कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांच्या प्रतिक्रियेला प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी उत्तर पाठवले असून, ही निवड कायदेशीरच असल्याचे पत्रात म्हटले आहे.
पत्रात नमूद केले आहे की, सावाना नागरिक शिक्षक गौरव समितीच्या बैठकीमध्ये विषय क्रमांक ६ अन्वये समितीची नियमावली मंजूर करण्यात आली आहे. या नियमावलीत समितीच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती करावयाची याचा निर्णय सावाना कार्यकारी मंडळाने घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे. २०१२ पासून ही नियमावली लागू होती. या नियमावलीनुसार आपण काम केलेले नाही. पाच वर्षांच्या कार्यकालात या नियमावलीची अंमलबजावणी केल्याचे आढळून येत नाही. नागरी समिती कामासंदर्भात सदस्य कोण आहेत, बैठकीसाठी कुणाला बोलवायचे यासंदर्भात भोंगळ कारभार असल्याने माझ्या कार्यकालात कामकाजाची निश्चित दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार आपण काम केलेले नाही. किंवा नियमावली रद्दही केलेली नाही. मी केलेल्या नियमावलीनुसार रमेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर निवडीचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. रमेश देशमुख यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हणत असताना प्रा. रा. शं. गोऱ्हे यांची २०१५ च्या सावाना नागरिक शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे इतिवृत्तात कोठेही पहायला मिळत नाही. या संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक झाल्याचेही इतिवृत्तात नाही. त्यामुळे त्यांची निवड कशी झाली याचा खुलासा आपण करावा. इतकेच नाही तर ३ सप्टेंबर २०१५ च्या समितीच्या बैठकीत मागील वर्षांचे हिशेब मंजूर केल्याचेदेखील आढळून येत नाही.
सावानाचे विद्यमान कार्यकारी मंडळ पूर्वी झालेल्या चुका विचारात घेऊन काळजीपूर्वक काम करून घटनेतील नियमांचे, शासकीय नियमांचे कोणतेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेऊन कामकाज करीत आहे. त्यामुळे आपण संस्थेच्या कामात कितीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, तरी त्यावर मात करून संस्थेचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडविण्याचा कार्यकारी मंडळाचा निर्धार आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गायधनी यांनाही उत्तर
न्यायालयाने बेणी यांना समन्स बजावल्याचे कारण सांगत श्रीकांत बेणी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुरेश गायधनी यांनी सावाना अध्यक्षांकडे केली होती. त्याला बेणी यांनी पत्राने उत्तर दिले आहे. माझ्यापर्यंत समन्स पोहचलेच नसल्याने त्याविषयी वृथा गवगवा करण्याचे कारण काय, असे पत्रात विचारण्यात आले आहे. मंडळाचा सभासद घटनेतील एखाद्या नियमाचे उल्लंघन करू लागल्याचे निदर्शनास आल्यास कार्यकारी मंडळाचे अगर त्या सभासदाचे काम थांबवून ठेवण्याचा अधिकार संस्थेच्या अध्यक्षांना आहे. तेव्हा मी कोणत्या नियमाचे पालन केले नाही हे पाहून अध्यक्षांना कळवावे, असेही पत्रात म्हटले आहे. अधिकार नसताना आपण नाट्यगृह सचिव या नात्याने प्रशांत जुन्नरे यांच्याकडून रोख रक्कम स्वीकारली व त्याच्या पावत्या जुन्नरे यांना दिल्या नाही, याची तक्रार सावानात दाखल झाली होती. प. सा. नाट्ययज्ञ उपक्रमातील हिशेबाचा गोंधळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे आपण इतर विषयावर बोलू नये असेही पत्रात नमूद केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट