देशभरातील सायकलिस्ट पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘टूर दी सह्याद्री’ ही संकल्पना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राबवणार असून, त्यात पहिल्या टप्यात ४०० किलोमीटरचा प्रवास असणार आहे. सायकलपटू किरण चव्हाण यांच्या संकल्पनेतून आलेल्या या प्रस्तावाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शिफारस केल्यानंतर त्याला पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी संमती दिली आहे. येत्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये ही टूर सायकलिंगला निघणार असून, त्याच्या नियोजनाचे काम सुरू झाले आहे. या टूरमध्ये टेंटची व्यवस्था व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे या टूरमध्ये ट्रेकिंगसुद्धा केले जाणार आहे.
जगभर अशा टूर आयोजित केल्या जातात, त्या धर्तीवर ही टूर आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्रात निसर्गसौंदर्य, गडकिल्ले व अनेक ऐतिहासिक स्थळे असून, त्याची माहिती देशभर व्हावी हा यामागील उद्देश आहे. यात देशभरातील सायकलिस्ट ग्रुपना आमंत्रित केले जाण्याचेही नियोजन आहे. राज्यात अशी पहिली सायकल टूर नाशिकमधून सुरू होणार असून, त्यातून पर्यटनाला चालना मिळणार आहे. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगराची रांग आहे. ही रांग तापी नदीच्या दक्षिणेकडून महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेशेजारी सुरू होते आणि अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग आहे. त्यामुळे टप्याटप्याने यात वाढ केली जाणार आहे. पहिल्या वर्षी या टूरमध्ये फक्त ४०० किलोमीटरचा प्रवास असणार आहे.
असा असेल मार्ग
इगतपुरी, कळसूबाई शिखर, भंडारदरा, भीमाशंकर अशा ठिकाणी ही टूर जाणार असून, या मार्गावरील महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. या मार्गावरून जाताना काही ठिकाणी ही टूर मुक्काम करणार आहे. या ठिकाणीच जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
पर्यटक वाढतील...
‘टूर दि सह्याद्री’ ही संकल्पना खूपच चांगली असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ती राबवण्यात येणार आहे. राज्यातील निसर्गसौंदर्य व गड, किल्ले व ऐतिहासिक गोष्टी पर्यटकांना कळाव्यात यासाठी याचे आयोजन केले जाणार आहे.
- आशुतोष राठोड, जाइंट एमडी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट