दीर्घकाळापासून चर्चेत असणाऱ्या अयोध्येतील राममंदिर उभारणीकरिता आता अखिल भारतीय स्तरावरही संतांचे मंडळ स्थापन करून सातत्याने हे मंडळ केंद्र सरकारच्या संपर्कात राहील. मंदिर निर्माणाच्या वाटेवरील अडथळे दूर सारण्यासाठी हे मंडळ कार्यरत राहील, असा ठराव विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित संत संमेलनात मंजूर करण्यात आला.
यावेळी सामाजिक समरसता, जनगनणा आणि गोहत्याबंदी या विषयांवरील ठरावही मंजूर करण्यात आले. जनगणनेसंदर्भात मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार देशातील राज्य आणि केंद्र सरकारला आवाहन करण्यात येणार आहे. यानुसार सर्वच समाजांसाठी देशभरात राष्ट्रीय समान जनसंख्या नितीच्या निर्मितीवर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. गो रक्षाविषयक ठरावही यावेळी मंजूर झाला. यानुसार गोवंश मांस निर्यातबंदी, कत्तलखान्यांना मिळणारे शासकीय अनुदान बंद करावे, देशात गो अभयारण्यांची निर्मिती, राज्य व केंद्र स्तरावर गोवंश संरक्षण संवर्धन मंत्रालयांची स्थापना, गोवंश हत्याबंदी कायद्याची निर्मिती या मुद्द्यांची अंमलबजावणी सरकारने करावी. सामाजिक समरसतेविषयीच्या प्रस्तावात सर्व समाजांसाठी मंदिरांची दारे खुले ठेवावीत, गावामध्ये पाणवठा, स्मशान ही ठिकाणी कुणासाठीही प्रतिबंधित नको, सर्व महापुरुषांचे उत्सव साजरे करण्यात यावेत, असे ठराव मंजूर करण्यात आले.
राममंदिरासाठी स्वतंत्र कायदा हवा
भाजप सत्तेत आल्यानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीची अपेक्षा सरकारकडून आहेच. मात्र त्यासाठी स्वतंत्र कायद्याच्या निर्मितीची आवश्यकता वाटते, असेही प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिर निर्माणाच्या रस्त्याप्रमाणे कायदा निर्मितीसाठी केंद्राला प्रस्ताव पाठविण्याचे पुढचे पाऊल असेल, असेही ते म्हणाले.
कृषिक्षेत्रावर भर हवा
विकासाच्या दृष्टीने विचार करता स्वस्त आणि समान शिक्षणाचा पर्याय प्रत्येकासाठी आजमितीला उपलब्ध नाही. या पर्यायापर्यंत पोहचण्यासाठी केवळ त्यावरील तरतूद वाढविणे हे सरकारच्या हाती आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावरील उपाय शोधताना सरकारला शेतीच्या विकसनावर लक्ष केंद्रित
करावे लागेल. या क्षेत्रात अद्याप ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सरकारकडून होणे अपेक्षित आहे. कुंभाच्या नियोजनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
... तो तर औरंगजेबच!
कुंभादरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील काही विकासकामे साकारताना अधिकाऱ्यांनी या शहरांमध्ये काही मंदिरांना धक्का लावला होता. या संदर्भात टिप्पणी करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याला तोगडिया यांनी औरंगजेबाची उपमा दिली. सांस्कृतिकदृष्टया नाशिक व त्र्यंबक सारखी शहरे कळसस्थानी असल्याने मंदिरांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट