म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरात सार्वजनिक स्वच्छता चांगली आहे. मात्र, नागरिकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या आढळतात, असे सांगत डेंग्यूला नागरिकच जबाबदार असल्याचा दावा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. आयुक्तांच्या या अजब तर्कटाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नागरिकांच्या घरात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्यास ५०० रुपये दंड करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी आपल्या विशेषाधिकारात डेंग्यूचा फैलाव करण्यास जबाबदार असणाऱ्यांना २०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीत सदस्यांनी बिघडलेल्या आरोग्याला आरोग्य व वैद्यकीय विभागालाच जबाबदार धरले असताना आता आयुक्तांच्या या निर्णयाने अधिकाराचे नवे वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शहरात सध्या डेंग्यू, स्वाइन फ्लू, व्हायरल फीवरसह साथीच्या आजारांनी अक्षरश: थैमान घातले आहे. सप्टेंबर महिन्यातच 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा जाणवला असला, तरी या महिन्यात शहर परिसरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने कहर केला असून, शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि साथींच्या आजारांनी हायअॅलर्टसदृश स्थिती उद्भवली आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे १६५, तर स्वाइन फ्लूचे १३६ बाधित रुग्ण आढळून आले असून, संशयितांचा आकडा हा ५२० वर पोहोचला होता. ऑक्टोबर महिन्यातही साथीच्या आजारांचा प्रकोप सुरूच आहे. विशेष म्हणजे सरकारी आणि खासगी रुग्णालये स्वाइन फ्लू व डेंग्यूसह व्हायरल फीवरच्या रुग्णांनी फुल्ल असून, असंख्य रुग्ण वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. स्वाइन फ्लूने महिनाभरात शहरात सात जणांचा बळी गेला आहे, तर दुसरीकडे महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांकडून काळजी घेण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत.
महापौर रंजना भानसी यांनी शहराच्या बिघडलेल्या आरोग्याला प्रशासनालाच जबाबदार धरले असताना प्रशासनाकडून आता हे खापर नागरिकांवरच फोडले जात आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील ७० हजार घरांना भेटी दिल्या असून, त्यात १८०० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचा दावा करीत आयुक्त मुंढेंनी डेंग्यूच्या प्रकोपाला नागरिकांनाच जबाबदार धरले आहे. विशेष म्हणजे डेंग्यूच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी आता दंडाची मात्रा अवलंबली जाणार असून, नागरिकांच्या घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या, तर त्यांना २०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक स्वच्छता चांगलीच
तपोवनात शनिवारी झालेल्या 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त मुंढेंनी याबाबतचे आदेश आपण आपल्याच अधिकारात काढल्याचे सांगत सार्वजनिक स्वच्छता चांगली असल्याचा दावा केला. स्वच्छतेची जबाबदारी ही नागरिकांचीदेखील आहे. नागरिकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या आढळतात. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव करण्यास नागरिकही जबाबदार असल्याने त्यांनाही दंड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून तपासणीत नागरिकांच्या घरात, शासकीय कार्यालये, मोकळे भूखंड, चालू बांधकामे या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास संबंधितांना आता २०० रुपये दंड भरावा लागणार आहे.
--
स्थायीच्या अधिकारांवर गदा
आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी यांच्या पत्राचा आधार घेत वैद्यकीय विभागाने स्थायी समितीवर यापूर्वीच नागरिकांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास ५०० रुपये दंड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, स्थायी समितीत भाजप सदस्यांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. विशेष म्हणजे डेंग्यूसह स्वाइन फ्लू आणि साथींच्या आजाराला आरोग्य व वैद्यकीय विभागाच जबाबदार असून, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करीत हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे दंडाचा विषय बारगळला, अशी चर्चा असतानाच आता आयुक्त मुंढेंनी स्थायीचा निर्णय बदलवत आपल्या विशेषाधिकारात २०० रुपये दंड लागू केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये असताना लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा नको, अशा कानपिचक्या दिल्या असतानाही आयुक्त मुंढेंनी घेतलेल्या या निर्णयावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महासभेपाठोपाठ आता स्थायीच्या अधिकारांवरही गदा येत असल्याचे भांडवल भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे.
----------------
रस्ताकामे सोडून बोला!
--
'वॉक विथ कमिशनर'मध्ये आयुक्तांची स्पष्टोक्ती
--
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
नाशिकच्या नागरिकांना पाणी, पथदीप, ड्रेनेज, उद्यान यांच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत पुरेसा पैसा नसल्याने रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. नगरसेवक काही अधिकारी नाहीत, तुमची कामे प्रशासन करते, तुमच्या तक्रारी आणि समस्या ऑनलाइन टाका, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
तपोवनात शनिवारी झालेल्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी वरील स्पष्टोक्ती केली. तपोवन परिसरात फिरण्यासाठी मोकळ्या मैदानाची मागणी केली असता आयुक्त मुंढे यांनी येथे फिरण्यासाठी फूटपाथ आहे, मोकळी जागा मुबलक पडली आहे. मग मैदानाची काय आवश्यकता आहे, असा उलटप्रश्न केला. आडगाव नाका परिसरातील बाप्पा सीताराम मार्गाची आठवड्यातून एकदाच साफसफाई होत असल्याच्या तक्रारीवरून आरोग्य अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले.
अपघात घडणाऱ्या मार्गांवर गतिरोधक बसविण्याची मागणी होताच आयुक्त मुंढे यांनी, रस्ता चांगला नसल्यावर आणि वाहनचाक नियम पालन करीत नसल्यावर अपघात घडू शकतात. गतिरोधक बसविल्यावर अपघात थांबत नाहीत असे सांगून 'आरटीओ'ची परवानगी असेल तेथेच गतिरोधक टाकले जातील, असे अधोरेखित केले. रस्त्यावरील भाजीबाजारामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्यामुळे रस्त्यावरील भाजीबाजार, तसेच अनधिकृत मांसविक्री करणारे दुकाने हटविण्याचे आदेशही देण्यात आले.
कुत्र्यांप्रश्नी परखड सल्ला
मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याच्या प्रश्नावर आयुक्त मुंढे यांनी नागरिकांना तुम्हीच कुत्र्यांना खायला घालता, खायला मिळते म्हणूनच त्यांची संख्या वाढली आहे. महापालिका त्यांचे निर्बीजीकरण करू शकते. त्यांना खायला देणे बंद करा, आपोआप त्यांची संख्या कमी होईल, असा परखड सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला. परिसरातील बंद पाणपोई त्वरित पाडण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
थेट कामकाजावरच आक्षेप
नागरिकांनी ड्रेनेज, पथदीप, अतिक्रमण, भटकी कुत्री, पाणी व स्वच्छता याबाबतच्या समस्या मोठ्या प्रमाणात मांडल्याने आयुक्त मुंढे यांनी थेट पंचवटी विभागाच्या कामकाजावरच आक्षेप घेतला. पंचवटी विभागाने आगामी काळात आपले काम सुधारावे आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे सांगितले.
--
तुम्ही मंदिरात बघा, मी बाहेरचे बघतो!
पंचवटीतील श्री काळाराम मंदिराच्या परिसर हॉकर्स झोन नको, तेथे फेरीवाले बसतात, अशी तक्रार घेऊन येणाऱ्या एका विश्वस्तालाच आयुक्त मुंढे यांनी, मंदिरात फेरीवाले कुणी बसविले, काळाराम मंदिरातील अतिक्रमण आधी हटवा, तुम्ही मंदिराच्या आतले बघा, मी बाहेरचे बघतो, असे सुनावले आणि तेथील हॉकर्स झोन बदलणार नसल्याचे स्पष्ट केले.