प्रतिक्विंटलमागे १५० रुपयांनी दरात वाढ म. टा. वृत्तसेवा निफाड कांद्याच्या भावात सलग आठव्या दिवशी सुरू असलेली वाढ गुरुवारीही कायम दिसून आली. लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये बुधवारच्या तुलनेत १५० रुपये प्रतिक्विंटल जादा दर मिळाला. भाववाढ होत असल्याने कांद्याची आवकही वाढली आहे. यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा खराब झाला. परिणामी महाराष्ट्रातील कांद्याच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३०० रुपयांच्या आसपास असलेल्या कांद्याने आता हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक गुरुवारी वाढली. जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक म्हणजे ३४ हजार ५३० क्विंटल कांदा आवक पिंपळगाव बाजार समितीत होती. तेथे सरासरी सर्वाधिक एक हजार ३०१ रुपये पुकारला गेला तर जास्तीत जास्त १४६६ रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीमध्ये २६ हजार ६०० क्विंटल आवक होती. जास्तीत जास्त १४८३ तर सरासरी १२५१ रुपये प्रतिक्विंटल दर होता. पिंपळगाव, लासलगाव, विंचूर, निफाड, उमराणा, चांदवड, वनी, दिंडोरी या कांदा मार्केटमध्ये गुरुवारी एकूण एक लाख ९ हजार ७०२ क्विंटल आवक होती. निर्यातीला द्या अनुदान इतर राज्यासह परदेशातही सध्या कांद्याला मागणी वाढली आहे. दुबई, कोलंबो, बांगलादेशासह अजून काही छोट्या देशातही लासलगावच्या कांद्याची निर्यात सुरू आहे. परंतु, ही निर्यात अपेक्षित उद्दिष्टाइतकी नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री सुभाष भामरे यांनी वाणिज्य मंत्रालयाकडे कांदा निर्यातमूल्य शून्य डॉलर असले तरीही निर्यातीला पाच टक्के प्रोत्साहन अनुदान केलेली आहे. लासलगाव बाजार समितीच्या वतीनेही निर्यातीला प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केलेली आहे. टप्प्या-टप्प्याने आणा माल लासलगाव बाजार समितीच्या मुख्य व दुय्यम बाजार आवारांवर दिवसेंदिवस कांदा आवकेत वाढ होत आहे. त्यामुळे कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्या-टप्याने बाजार समितीमध्ये माल विक्रीस आणावा, असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व उपसभापती संदीप दरेकर यांनी केले आहे. मागणीत वाढ राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला असून येत्या १५ ते २० दिवसात तेथील कांदा संपणार आहे. तसेच तामीळनाडूतील कांद्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. रमजानचे उपवास संपल्याने देशांतर्गत व परदेशात कांद्याची मागणी वाढल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या कांदा बाजारभावात तेजी निर्माण झाल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी घाई करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट