क्षयरोगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन संकुचित असून, तो बदलावा यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्या अक्षय लंग फाउंडेशनचे काम विशेष असून, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनशतर्फे (डब्लूएचओ) शक्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन डब्लूएचओचे सल्लागार डॉ. वैभव शहा यांनी दिले.
जागतिक क्षयरोग दिन तसेच, अक्षय लंग फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान डॉ. शहा बोलत होते. या पार्श्वभूमीवर संस्थेने जागर क्षयरोग मुक्तीचा हे अभियान हाती घेतले असून, यात सहभागी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवारी गंगापूररोडवरील आयएमआरटी सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्रचे चिटणीस सुनील ढिकले होते. त्यांनी फाउंडेशनच्या कार्यांचा उल्लेख करीत क्षयरोगाबाबत जनजागृतीसाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केले.
या संस्थेमार्फत फुप्फुस आरोग्य व विकास या विषयावर जनजागृती करण्यात येते. रुग्णांसाठी मोफत शिबिर आयोजित करण्यात येतात. संस्थेमार्फत करूया जागर क्षयरोग मुक्तीचा या अभियानाला १५ जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त यंदा संस्थेने क्षयरोग मुक्त जगासाठी शिलेदार होऊया सारे मिळून नवा इतिहास घडवूया ही संकल्पना हाती घेतली असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष डॉ. गौरी आचार्य-कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान चिन्मय या मुलाने टीबी प्रबोधन गीत सादर केले. अक्षय आणि मनस्वी यांनी टीबीचा बरगुंडा ही नाटीका सादर केली. यावेळी टीबी झालेल्या एका विद्यार्थिनीने आपले अनुभव मांडत टीबीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नये, असे आवाहन केले. वैद्य कौसर तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे सुहास कुलकर्णी, डॉ. सुषमा दुगड, भास्कर आचार्य, मीना आचार्य, संदीप कुलकर्णी यांनी सहकार्य केले. प्रसाद बुडूक यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट