‘मेक इन महाराष्ट्रा’बरोबरच जगभर ‘मेक इन नाशिक’चे ब्रँडिंग करून आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे उद्योग नाशिकला व्हावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील कार्यक्रमात केली. या वेळी त्यांनी मुंबई, पुणे येथे उद्योगांची गर्दी वाढल्याने तेथे जागा नाही. त्यामुळे नाशिकला मोठी संधी आहे. या उद्योगामध्ये विमानबांधणी व संरक्षण साहित्य, कृषीप्रक्रिया उद्योग, पर्यटन व वेलनेस हे महत्त्वाचे उद्योग असून, त्यात नाशिकला संधी आहे. उद्योजकांनी या उद्योगांवर फोकस करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
जगभरातील मोठ्या उद्योगांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करावी, यासाठी मुंबई येथील नेहरू सेंटर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, की जोपर्यंत आपल्या ब्रँडचे आपण मार्केटिंग करीत नाही, तोपर्यंत तो किती चांगला असला तरी तो विकत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही गोष्ट ओळखून जगभरातील गुंतवणूक भारतात वाढवली. देशभर झालेल्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र अग्रेसर असून, ६८ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. त्यानंतर दिल्ली, कर्नाटक, गुजरातसह इतर राज्ये आहेत. महाराष्ट्रातही सर्वाधिक गुंतवणूक पुण्यात झाल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मुंबईसारखीच स्थिती पुण्याची झाली आहे. जागेचा प्रश्नही आता येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे नाशिकला मोठी संधी असल्याचेही ते म्हणाले.
‘मेक इन नाशिक’चा दोन दिवसांचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यावर बैठक घेऊ व त्यावर चर्चा करून आगामी दोन वर्षांचा प्लॅन तयार करू, असे सांगत नाशिकला मोठ्या प्रमाणात उद्योग आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली. हा विषय केवळ चर्चेपुरता असणार नाही तर तो प्रत्यक्षात उतरेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, ‘आयमा’चे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमजार राहुल आहेर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांच्यासह निमा व क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
एचएएलमार्फत कॉन्फरन्स
विमानबांधणी व संरक्षण साहित्य उद्योगाबाबत नाशिकमध्ये एचएएलमार्फत कॉन्फरन्स घेऊन या उद्योगांना कशी चालना मिळेल, यासाठी राज्य सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत. या उद्योगांमुळे वेंडरलाही फायदा होईल. हा उद्योग सध्या भरारीवर असून, यात मोठी गुंतवणूक होत आहे.
अॅग्रो प्रोसेसिंग डेव्हलप करा
कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग नाशिकमध्ये व्हावेत, यासाठी राज्य सरकार पुढील काळात फोकस करणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर आज चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यात नाशिकमध्ये काही कृषी उद्योगांकडे जास्त लक्ष दिले जाते; पण येत्या काळात फ्रूट अँड व्हेजिटेबल बास्केटसाठी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
टुरिझम अँड वेलनेस
नाशिकमध्ये पर्यटन व आरोग्य क्षेत्राला महत्त्व आहे. ते वाढविण्यासाठी सरकार आराखडा तयार करून इन्फ्रा स्ट्रक्चर उभे करेल. या सर्व्हिस सेक्टरमध्ये चांगला पैसा आहे. या शहरात अंतर्भूत क्षमता आहे. हे क्षेत्र महत्त्वाचे स्थान असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट