चालू वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीला बऱ्यापैकी यश आल्याने पुढील तीन वर्षांत जिल्ह्यात तब्बल दीड कोटींहून अधिक वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले. पहिल्या टप्प्यांत २०१७ मध्ये १५ लाख ५३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
पर्यावरण प्रदूषणामुळे होणारा धोका दूर करण्यासाठी वृक्ष लागवड हाच सर्वात्तम पर्याय आहे. म्हणूनच सरकारने वृक्ष लागवडीवर भर दिला आहे. जुलैमध्ये सरकारने राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. तब्बल २९ लाख वृक्ष लागवड करून नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला होता. यापैकी ९३ टक्के रोपे जगल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आता पुन्हा सरकारने पुढील तीन वर्षांसाठी जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी याबाबतची बैठक घेतली. राज्य सरकारच्या ३३ विभागांच्या १०० कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापैकी बहुतांश विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. मोकळे सरकारी भुखंड, गायरान यांसारख्या जमिनी वृक्ष लागवडीसाठी या विभागांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला वृक्ष लागवडीची आणि संवर्धनाबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, प्रत्येकाला जबाबदारी निश्चित करून देण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्णन यांनी दिली. त्या त्या तालुक्यांमध्ये प्रांत आणि तहसीलदारांवर वृक्ष लागवड नियोजनाची आणि संवर्धनाची जबाबदारी असणार आहे. लागवडीसाठी कोणत्या विभागाला कोणत्या प्रकारची किती रोपे लागतील याची माहिती या महिनाअखेरपर्यंत सादर करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
चालू वर्षात जुलैमध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेत नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला. पुढील तीन वर्षात एक कोटी ५३ लाख ११ रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्टे आहे. दरवर्षी १५ जून ते जुलै या कालावधीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी निश्चित करून दिली जाणार आहे.-
-राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट