शहर वाहतूक पोलिसांनी यंदा दंड वसुलीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, गत वर्षाच्या तुलनेत दंडाच्या रक्कमेत तब्बल एक कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. १४ डिसेंबरपर्यंत दंड वसुलीचा आकडा दोन कोटी २३ लाख २० हजार ९०० रुपये इतका झाला असून, आगामी १५ दिवसांत हा आकडा अडीच कोटींपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
शहरात वाहनांची संख्या प्रचंड गतीने वाढत असून, यामुळे वाहतूक नियमांची सर्रास पालमल्ली होताना दिसते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गत काही वर्षांपासून दंडात्मक कारवाईवर जोर दिला आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारने मोटार वाहन नियमातील तरतुदींमध्ये बदल केला असून, यामुळे दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ झाली आहे. जानेवारी ते १४ डिसेंबर या कालावधीत तब्बल एक लाख ९६ हजार ९२६ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई झाली. तेच गत वर्षात हे प्रमाण अवघे एक लाख १५ हजार ८३९ इतके होते. या वर्षात वाहतूक विभागाने एक कोटी २२ लाख २० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा हा आकडा एक कोटी रुपयांनी वाढला आहे. वाहनांच्या तुलनेत कमी पडणारे रस्ते, वाहनचालकांची मानसिकता, वाहनांची वाढती संख्या अशा कारणांमुळे हा आकडा वाढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेल्मेटचा दणका
शहर वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून हेल्मेट सक्तीबाबत जोर लावला आहे. बुधवारी दिवसभरात हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १९४ दुचाकी चालकांकडून तब्बल ९७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाई सुरू झाल्यापासून एक हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर कारवाई झाली असून, नियमांचे पालन करण्यावर भर दिला तर दंडात्मक कारवाईचे कटू प्रसंग टाळता येतील, असे आवाहन वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी केले आहे.
चार दिवसात ई चलन कार्यान्वित
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर स्वाइप मशिन उपलब्ध करून देणाऱ्या शहर पोलिस दलातर्फे पुढील चार दिवसांतच ई-चलन सुरू करण्यात येणार आहे. गेट वे पेमेंटच्या काही तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागल्यामुळे हे काम रखडले होते. आता सर्व बाबी अंतिम टप्प्यात असून, चार दिवसांत पहिले ई-चलन फाडले जाईल, असे पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिसांनी आपला मोर्चा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवला आहे. ‘ई-चलन’ हा त्याचाच भाग असून, यामुळे वाहतूक पोलिसांसह वाहनचालकांनाही सोयीस्कर ठरणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. ई-चलन पध्दतीचा वापर मर्यादीत होणार असून, विशेषतः पार्किंग नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे ई-चलन फाडले जाणार आहे. बेशिस्त पध्दतीने वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस जागेवर दंडात्मक कारवाई करतात किंवा ही वाहने उचलून शरणपूर रोडवरील वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा केली जातात. यामुळे वाहनांचे नुकसान होणे तसेच आर्थिक गैरकारभार होणे याविषयी तक्रारी येतात. विशेषतः चारचाकी वाहनमालकांकडून ही ओरड नेहमीच होते. या पार्श्वभूमीवर ई-चलन ही पध्दत फायदेशीर ठरू शकते. ई-चलन फाडलेल्या वाहनचालकास थेट घरीच नोटीस मिळणार असून, त्यात दंडाची रक्कम व कारवाईची इतर माहिती नमूद असेल. नोटीस मिळाल्यानंतर ठराविक दिवसांत दंडाची रक्कम भरली गेली नाही, तर वाहनचालकास थेट कोर्टात पाठवण्यात येईल.
ई-चलन पुढील दोन-चार दिवसांत सुरू होईल. वाहतुकीला शिस्त लागावी व हे करताना वाहतूक पोलिसांसाठी सोयीस्कर पध्दत असावी, या दृष्टीने उपाययोजना राबवल्या जात आहेत. दंडाचा आकडा प्रचंड वाढलेला दिसत असला तरी यामुळे वाहनचालकांचा बेशिस्तपणा अधोरेखित होतो. पुढील वर्षी हा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो. वाहनचालकांनी शिस्त पाळली तरच दंडाचा आकडा कमी होईल.
-विजय पाटील, पोलिस उपायुक्त
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट