December 13, 2016, 2:42 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
नोटाबंदीच्या काळात सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारपासून बँका सुरू झाल्यामुळे ग्राहकांनी एकच गर्दी केल्याने बँक प्रशासनाची धांदल उडाली. शहरातील सर्वच बँकासमोर रोख रक्कमेसाठी मोठे संकट उभे ठाकल्याने ग्राहकांना ताटकळत बसावे लागले.
पाचशे व एकहजार रुपयांचा नोटा बंद केल्यानंतर सर्वत्र आर्थिक व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. किरकोळ दुकानदारांपासून तर थेट मोठमोठ्या मॉल्सपर्यंत ही आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हातात पैसा नसल्याने व्यापारातील मंदी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील स्टेट बँक, देना बँक, महाराष्ट्र बँक, कार्पोरेशन बँक, पंजाब नॅशनल, आयडीबीआय, बॅक ऑप इंडिया या राष्ट्रीयकृत बँक सह एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, सटाणा मर्चटस्, नाशिक मर्चटस्, हस्ती कॉ. ऑप बँक या व्यापारी बँकामध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ग्राहकांना दोन ते पाच हजार रुपयांपर्यत रोख रक्कम देण्यात येत होती. मात्र आता तीही मंदावली असल्यामुळे आर्थिक उलाढालींवर आता निर्बंध आले आहेत.
गत तीन ते चार दिवसांपासून घरात किराणा व जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने हाल होत आहेत. सकाळी ९ वाजेपासून इतर कामधंदा सोडून पैसे काढण्यासाठी रांगेत उभा आहे. दुपारचे तीन वाजेपर्यंत नंबर आलेला नव्हता.
- नाना वानखेडे, ग्राहक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 13, 2016, 2:44 pm
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
शिर्डी साईबाबा देवस्थानप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिरातही टोकन पद्धतीने दर्शन सुरू करावे, अशी नागरिकांची अपेक्षा असून, याबाबत सोशल मीडियातून चर्चा घडत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे दररोज दहा हजारांच्या दरम्यान भाविक येत असतात. या भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. दर्शनासाठी कधी कधी तर चार तास रांगेत उभे राहावे लागते. त्यामळे त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्गाच आनंद घेण्यासाठी पर्यटक, भाविकांना वेळ अपूर्ण पडलो. वाहनतळावर वाहन उभे केल्यानंतर तसेच, बस स्थानकापासून थेट मंदिराकडे हे भाविक धाव घेतात. मात्र दर्शनबारीतच त्यांचा बराच वेळ जातो. वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वर येथे अती प्रचीन मंदिर, कुंड तलाव आहेत. येथे ८०० वर्षांचा वारसा सांगणारी संस्कृती पर्यटक भाविकांनी सतत खुणावत असते. यामध्ये वारकरी संप्रदायाचे आद्य संस्थापक संत निवृत्तीनाथ महाराज यांचे संजिवन समाधी मंदिर आहे. गोदावरीचे उमगस्थळ, कुशावर्त हे देखील भाविकांसाठी आकर्षणा मुद्दा आहे. त्याचलगत गंगा गोदावरीचे मंदिर आहे. हजार पाचशे किलोमीटर प्रवास करून आलेल्या भाविकांना मात्र या निसर्गाचा, येथील वास्तूंचा आनंद घेण्यासाठी वेळच शिल्लक राहत नाही.
व्यवसायास चालना मिळेल
भाविकांनी वाहनातून उतरून थेट दर्शनरांगेत धाव घेतल्याने जसे भाविकांसाठी समस्या निर्माण होतात तसे येथील व्यवसायिकांच्याबाबतही आहे. दररोज हजारो भाविक येतात. मात्र वाहतळ ते मंदिर याच एकमेव मार्गावरील व्यवसायिकांना फायदा होत असतो. शहरात इतरत्र शुकशुकाट असतो. परीणामी वाहनतळ ते मंदिर रस्त्यावर व्यवसायिक जागांचे भाडेही गगणाला भिडले आहे. त्याच्याच परिणामामुळे या रस्त्यावर अतिक्रमणही वाढले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 13, 2016, 2:45 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
नगरपरिषद निवडणुकीनंतर आता तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांच्या निवडणुकीने जोर धरला आहे. तालुक्यातील सात जि. प. गट व पंचायत समितीचे चौदा गण ताब्यात घेण्यासाठी पक्षीय पातळीवर आतापासूनच रणनीती निश्चित होऊ लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची निर्मितीची शक्यता बळावली असताना युतीचे पुन्हा एकदा काडीमोड होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
नाशिक जिल्ह्यात क्रमांक दोनच्या जिल्हा परिषदेच्या सात गटांचा समावेश बागलाण तालुक्यात होतो. गट व गणांच्या सर्वाधिक जागा या ठिकाणी असल्याने जिल्हा परिषदेतील सत्तेची बहुतांश मदार या तालुक्यावर अवलंबून असते. नाशिक जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एकदा बहुमान या तालुक्याला मिळाला आहे. आगामी काळातील नवीन आरक्षण हे महिला सर्वसाधारण गटातील असल्याने नवीन गट-गण रचनेत दोन गट महिला सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने राजकीय लढाई रंगणार आहे.
बागलाण तालुक्यात पठावे दिगर, जायखेडा, ताहाराबाद, नामपूर, वीरगाव, ठेंगोडा व ब्राह्मणगाव या सात जिल्हा परिषद गटांचा समावेश होतो. सद्यस्थितीत पठावे दिगर, जायखेडा, ठेंगोडा हे तीन गट राष्ट्रवादीकडे, ताहाराबाद व वीरगाव गट काँग्रेस, नामपूर भाजप व ब्राह्मणगाव गट शिवसेनेकडे आहे. यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या जि. प. निवडणुकीत या सातही गट आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपच्या एकला चलो रे या भूमिकेतून पक्षीय कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी युतीची काडीमोड घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तालुक्यातील सातही गटांचे नव्याने आरक्षण बदलेले आहे. पठावे दिगर हा गट यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. यामुळे या गटातून महिला व पुरूष उमेदवारी करू इच्छित असल्याने राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्या सिंधुताई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक सचिन सावंत, कळवणचे सदस्य रवींद्र पगार यांची नावे चर्चेत आहेत.
ताहाराबाद गट अनुसूचित जमाती गटासाठी राखीव झाला आहे. काँग्रेसचे जि. प. सदस्य प्रशांत सोनवणे यांची या ठिकाणी पंचाईत झाली आहे. या ठिकाणी आदिवासी समाजाला प्राधान्य मिळणार आहे.
जायखेडा गट सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. विद्यमान राष्ट्रवादीचे सदस्य यतीन पगार यांना या ठिकाणी पक्षातूनच आव्हान मिळणार आहे. तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, विनोद ठाकरे, दिनेश सावळा, इच्छुक आहेत. भाजपच्या वतीने तालुकाध्यक्ष संजय भामरे, नवलसिंग खैरणार, भाऊसाहेब भामरे यांच्यात लढत रंगणार आहे. नामपूर गट हा अनुसूचित जमातीकरिता राखीव झाला आहे. यामुळे विद्यमान भाजप सदस्या सुनीता पाटील यांनादेखील उमेदवारी थांबवावी लागणार आहे.
वीरगाव गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. यामुळे काँग्रेसचे विद्यमान सदस्य प्रा. अनिल पाटील यांना उमेदवारी करण्यासाठी आपला गट बदलण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी आदिवासी महिला आरक्षण झाल्याने आदिवासी समाजाला प्राधान्य मिळणार आहे.
ठेंगोडा सर्वसाधारण गट हा सर्वसाधारण स्त्री गटासाठी राखीव झाला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य शैलेश सूर्यवंशी यांची पंचाईत झाली आहे. त्यांनी आपल्या पत्नी हेमलता सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू केला आहे. काँग्रेसच्या वतीने माजी जि. प. सभापती यशवंत पाटील यांनी आपल्या पत्नी माजी सभापती संगीता पाटील, विद्यमान जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी आपल्या पत्नीला, तर राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरणार व शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी आपल्या पत्नी अर्चना सोनवणे यांच्यासाठी या गटात चाचपणी सुरू केली आहे.
ब्राह्मणगाव गट सर्वसाधारण महिला गटासाठी खुला झाला आहे. यामुळे शिवसेनेचे विद्यमान सदस्य प्रशांत बच्छाव यांनी आपली पत्नी वैशाली बच्छाव यांना पुढे केले आहे. मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव यांनी आपला हा पूर्वाश्रमीचा गट असल्याने माजी जि. प. सभापती लता बच्छाव यांनी उमेदवारी निश्चित केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 13, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
रिओ ऑलिम्पिकवेळी माझ्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचा गंभीर आरोप झाला. माझ्याविरोधात कोणी तरी आखलेला हा डाव होता, माझ्याशी झालेला हा धोका होता. मी ऑलिम्पिकमध्ये खेळलो असतो, तर देशाला नक्कीच पदक मिळवून दिले असते, असे प्रतिपादन पहिलवान नरसिंग यादव यांनी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले. ते नमो नमो कुस्ती स्पर्धेनिमित्त आले होते.
नरसिंग यादव म्हणाला की, माझ्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचे आरोप झाल्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. तसेच माझ्यावर झालेले आरोप मी लागलीच फेटाळूनदेखील लावले आहेत. सध्या या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान देण्यात आलेल्या भोजनात उत्तेजक द्रव्यांचा वापर करण्यात आला असावा, असा संशय नरसिंग यादव यांनी बोलताना व्यक्त केला. कुस्ती क्षेत्रात राज्यातील ग्रामीण भागात एकापेक्षा एक सरस कुस्तीगीर नावारूपाला येत असल्याचा उल्लेख करून नरसिंग यादव म्हणाला की, धुळे हे कुस्तीप्रेमींचे शहर आहे. मीदेखील धुळ्यात अनेक कुस्ती स्पर्धा जिंकल्या आहेत. शहरात कुस्ती स्पर्धा नेहमीच होत राहिल्या, तर अनेक कुस्तीगीर तयार होऊन धुळे शहराचे नाव देशभरात पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र, त्यासाठी कुस्तीची नवनवीन प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली पाहिजेत, अशी अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, विजय पाश्चापूरकर, कुस्तीगीर संजय गिरी, गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 14, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळाप्रकरणी धुळे विशेष न्यायालयात साक्षीपुरावे नोंदवून घेण्याचे काम सोमवारी पूर्ण झाले. यामुळे या खटल्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याचे मानले जात असून, पुढील कामकाज २१ नोव्हेंबरला होणार आहे.
धुळे जिल्हा विशेष न्यायालयात घरकुलचा खटला वर्ग झाल्यानंतर पावणेदोन वर्षात या खटल्याशी संबंधित ५० जणांची साक्ष सरकार पक्षाकडून नोंदविण्यात आली. काही महत्त्वाची कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करण्यात आली. या साक्षी व कागदपत्रांद्वारे संशयित आरोपींबाबत प्रश्न काढून पुढील कामकाज केले जाणार आहे.
या खटल्यात ५७ संशयित आरोपी आहेत. त्यापैकी पाच मृत झाले आहेत. इतर ५१ आरोपींविरूध्द खटला चालविण्यात येत आहे. फिर्यादी डॉ. प्रवीण गेडाम, तपासी अधिकारी अपर पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्यासह शासकीय अधिकारी, नगरपालिका व जळगांव जिल्हा मध्यवती बँकेचे अधिकारी आदी ५० जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी सात साक्षीदारांची फेरसाक्ष सरकार पक्षाच्या विनंतीनुसार नोंदविण्यात आली आहे. या खटल्यातील साक्षीपुरावा नोंदविण्याचे कामकाज सोमवारी पूर्ण झाले. आता पुढील कामकाज २१ नोव्हेंबरपासून होईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 16, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
धुळे शहरातील एका बालरोगतज्ज्ञाने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा नाकारून डेंग्यूबाधित एका रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला. हातात सुटे पैसेच नसल्याने वैतागलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी अखेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर रुग्णाला अन्य दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले.
जुने धुळे परिसरातील निकिता खैरनार (वय १०) या बालिकेला गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने तिला तिचे वडील विश्वनाथ पंडित खैरनार यांनी उपचारासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील रुग्णालयात नेले होते. या रुग्णालयातील डॉक्टरांनी सोमवार १४ रोजी, निकिताला उपाचारासाठी दाखल करून घेतले आणि सातशे रूपये भरण्यास सांगितले. मात्र, तिच्या नातेवाईकांकडे पाचशे व हजाराच्याच नोटा असल्याने डॉक्टरांनी या नोटा घेतल्या नाहीत. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निकिताच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील उपचारासाठी आवश्यक खर्चाची रक्कम डॉक्टरांनी पाचशे व हजाराच्या नोटामध्ये न स्वीकारता मुलीच्या नातेवाईकांना रुग्णालयातून हाकलून दिल्याचे सांगण्यात आले. अखेर मुलीच्या वडिलांनी डॉक्टरांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रुग्ण मुलीला अन्य खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. दरम्यान, तक्रार अर्जावर चौकशी चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 17, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
धुळे आणि नाशिक ही औद्योगिक दृष्टीने महत्त्वाची शहरे रेल्वेमार्गाद्वारा एकमेकांना जोडण्यावर केंद्रीय मंत्र्यांच्या पातळीवर विचार सुरू झाला आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग साकारताना धुळे ते नाशिक हा रेल्वेमार्ग देखील मार्गी लागू शकतो, अशी आशा आहे.
मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे सहा महिन्यांत भूमिपूजन करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत दिले होते. त्याबद्दल गडकरींचे आभार मानण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली. यावेळी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. भामरे यांनी धुळे आणि नाशिक ही शहरे रेल्वेने जोडण्याकडे लक्ष वेधले. त्यावर गडकरी यांनी धुळे जिल्ह्याच्या विकासाला आणखी एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात असल्याचे सांगत धुळे-नाशिक यांनाही रेल्वेने जोडण्याचा मानस व्यक्त केला.जेएनपीटी बंदराच्या विकासाबरोबरच तेथून होणार असलेल्या वाहतुकीला सहायभूत ठरेल, असे ड्रायपोर्ट नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्याजवळ तयार केले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले. या ड्रायपोर्टवरील वाहतुकीला उपयुक्त ठरेल या दृष्टीने धुळे-नाशिक ही दोन शहरे रेल्वेद्वारे जोडण्याची नवीन संकल्पना नितीन गडकरी यांनी मांडली आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 20, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याबाबत दर दिवशी होत असलेल्या वेगवेगळ्या सरकारी निर्णयांचा फटका धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेला बसला आहे. या गोंधळात डिसेंबरअखेर बँकेला अपेक्षित सीआर रेट साधता न आल्यास बँकिंग परवाना धोक्यात येऊ शकतो अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाद नोटा स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार १४ नोव्हेंबरपासून या नोटा बँकेत स्वीकारणे बंद करण्यात आले. तीन दिवस पाचशे आणि हजाराच्या नोटा बँकेत स्वीकारण्यात आल्या, त्यावेळी बँकेत ३७ कोटी रूपयांचे व्यवहार झाले. त्यात चार कोटी २९ लाख रुपये गेल्या तीन वर्षांपासूनची कर्जवसुली होती. वीबिल भरण्यापोटी दोन कोटी २० लाख रुपये, ३१ कोटी २५ लाखांचा खातेदारांनी पाचशे व हजाराच्या नोटांचा भरणा केला. या व्यवहारांमुळे बँक सुस्थितीत येणार होती. परंतु बँकेने जुन्या नोटा स्वीकारू नयेत, असे आदेश झाल्याने जिल्हा बँक अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे बँक प्रशासनाचे म्हणणे आहे.
पाचशे व हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला केलेले मनाई आदेश अद्यापही कायम असल्याने गेल्या पाच दिवसांपासून बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे डिसेंबर २०१७ अखेर बँकेचा सीआर नऊ टक्के गाठता आला नाही, तर बँकेची परवानगी रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ राज्यातील सर्व जिल्हा बँकांमधून जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश पारित करावेत, असेही चेअरमन कदमबांडे यांनी मटाशी बोलताना सांगितले. चालू वर्षात जिल्हा बँकेने एक लाख २५ हजार सभासदांना २१५ कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आणि गेल्या तीन वर्षापासून कर्जदाराकडे थकीत असलेली रक्कम ३१२ कोटी रुपये आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
देशात पाचशे, हजाराच्या नोटा बदलाच्या निर्णयामुळे जवळपास ६० लोकांनी जीव गमावला. त्या सर्वांना सरकार शहीद घोषित करणार का, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विचारला. ते शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.
सध्या संपूर्ण राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजीमंत्री आमदार वर्षा गायकवाड यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी खासदार चव्हाण यांनी शहादा नगरपालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता कायम ठेवा, असे आवाहन केले. नोटबंदीच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
काँग्रेसच्या कार्यकाळात सरकार निर्णय घ्यायचे, पण जनतेला त्रास झाला, तर निर्णय मागेही घेत असे. पण सध्याचे सरकार मुस्कटदाबी करून चालविले जात आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. धुळे आणि नंदुरबार काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून येथे विरोधकांची डाळ शिजणार नाही, असा टोलाही चव्हाण यांनी मारला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 24, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
महापालिकेत विविध करांसाठी हजार व पाचशे रुपयांचे जुने चलन स्वीकारण्याची गुरूवारी (दि. २४) शेवटची मुदत होती. त्यामुळे मनपात करदात्यांची गर्दी फारशी दिसून आली नाही. कारण १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्याने पहिल्याच दिवपासून कर भरण्यासठी मनपामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.
शेवटच्या दिवशी शहरातील वृद्ध, अपंग, आजारी असलेल्या करदात्यांसाठी ‘महापालिका आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेत विविध कर भरण्यासाठी मनपाने काही दिवसांपासून थकीत कर दात्यांकडे धडक वसुली मोहीमही सुरू केली आहे. याद्वारे मनपाच्या तिजोरीत आतापर्यंत १२ कोटी ८५ लाख रुपये जमा झाले आहेत. नागरिकांनी कर भरण्यासाठी मोठे सहकार्य मनपाला केल्याने मनपातर्फे आयुक्त धायगुडे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत. तर ज्या नागरिकांचे कर भरणा बाकी असले त्यांनीदेखील तत्काळ भरणा करावा, असे आवाहन केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 24, 2016, 2:30 pm
अॅट्रॉसिटी महामोर्चाची तयारी जाेरात
म. टा. वृत्तसेवा, धुळे
धुळे शहरात शनिवार (दि. २६) रोजी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दलित-आदिवासी अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीने केले आहे. दरम्यान मोर्चाला अनेक संघटनांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
दलित-आदिवासी-मुस्लिम-भटक्या विमुक्त जमाती-ओबीसी यांच्यातर्फे अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे कोणीही नेतृत्व करणार नसून समावेशक मोर्चा असणार आहे. तसेच मोर्चाचे निवेदन महिला, मुली हे उपस्थित जनसमुदायास मंचावरून संबोधित करणार आहेत. या मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला असून बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक मार्गे पोलिस कवायत मैदान, मनोहर चित्रमंदिर, आग्रारोड, कराचीखुंट, मनपा, झाशी राणी पुतळा या मार्गाने जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर त्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 25, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीच्यावतीने आज शनिवारी (दि. २६) रोजी शहरात अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होणार आहे. त्यासाठी मोर्चाची संपूर्ण तयारी झाली असून सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.
या मोर्चासाठी गेल्या तीन महिन्यांपासून नियोजन व तयारीचे काम सुरू होते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, शहरातील विविध भागातून मोटारसायकल रॅली काढून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे समाजबांधवामध्ये मोठा उत्साह संचारला असून तर मोर्चामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. तर मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पाडावा, असे आवाहनही संघर्ष मोर्चा समितीतर्फे करण्यात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 26, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
गावाबाहेर राहत असलेले दलित आदिवासी, भटके विमुक्त हे जसे जाती व्यवस्थेचे बळी आहेत. त्याचप्रमाणे गावामधील माळी, साळी, कोळी, लोहार ओबीसी जातीदेखील व्यवस्थेचे बळी ठरले आहेत. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वंचित असलेल्यांसाठी घटनात्मक तरतूद करून ठेवली आहे. त्यानुसारच मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र गेल्या चाळीस वर्षांत मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी होऊ शकली नाही. म्हणूनच आज दलित आदिवासींवर अन्याय व अत्याचार होत आहेत, अशा प्रतिक्रिया मोर्चात व्यक्त करण्यात आल्या.
आता परिवर्तनाची आणि प्रबोधनाची लढाई करावी लागणार आहे. तसेच रस्त्यावर उतल्याशिवाय व संघर्ष करून मागण्या मागाव्या लागत आहेत. जर अॅट्रॉसिटी कायदा प्रभावीपणे राबविला गेला तर दलित आदिवासींनाच नाही तर इतरांनादेखील न्याय मिळणार आहे. धुळ्यात शनिवारी (दि. २६) दलित अॅट्रॉसिटी संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने भाषणातून या प्रतिक्रिया समोर आल्या. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चातील पाच युवतींनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले. शहरातील निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे दोन लाख मोर्चेकरी सहभागी झाले होते.
अॅट्रॉसिटी कायदा संरक्षण समितीतर्फे शनिवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून महामोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी २६/११ हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अत्यंत शिस्तीने मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चाचे रूपांतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहसमोर दुपारी एक वाजता सभेत झाले. मोर्चात दलित आदिवासींसह समाजातील लोकांसह स्थानिक राजकीय नेते, वकील, डॉक्टर, प्राध्यापक यांची सहभाग होता. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून नऊशे पोलिस अधिकारी व कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले होते. तर शहरातील पंधरा शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 27, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
अमळनेरमधील आर. के. नगरात आमदार शिरीष चौधरी यांनी केलेल्या मारहाणीत जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातील आस्था या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी पाटील हे बेशुद्ध अवस्थेत होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थरि असल्याचे सांगण्यात आले.
वाहनांची तोडफोड
जमावाने एम.एच. ३९ अर्थात नंदुरबार जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या गाड्या अडवून त्या फोडण्यास सुरुवात केली. जमावाने १५ ते २० गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. शहरात इतर ठिकाणाही तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव एकूण घेण्याच्या परिस्थित नव्हती. आर. के. नगर विश्रामगृह, सुखांजनी दवाखाना या भागात पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 28, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेत दिवंगत पी. के. आण्णा पाटील यांच्या हयातीत सतत विरोधात राहूनही कधी विजय न मिळविलेल्या मोतीलाल पाटीलांना मात्र यावेळी जनतेने न्याय दिला. परिणामी शहादा पालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते निवडून आले आहेत. नगरपालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले असले तरी नगराध्यक्षपदी भाजपचे मोतीलाल पाटील असणार आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच एमआयएमने आपले खाते उघडले आहे.
शहादा नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी दहा उमेदवार रिंगणात असले तरी मोतीलाल पाटील यांची खरी लढत दिली ती अपक्षाने. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, लोकभारती या कुठल्याही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला भाजपचे पाटील यांना जवळपासही फिरकता आले नाही. या निवडणुकीत भाजपचे मोतीलाल पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेख जहीर शेख मुसीर यांना ७३० मतांनी पराभव करीत विजय मिळविला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 28, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, धुळे
जिल्ह्यातील दोंडाईचा व शिरपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल अखेर अपेक्षितच लागला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे पर्यटनविकास मंत्री यांनी या निवडणुकीत पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. गेल्या दहा वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या ताब्यात होती ती त्यांनी खेचून आणली आहे.
मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल या प्रचंड मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपने एकूण २४ पैकी २० जागा जिंकल्या असून माजीमंत्री डॉ. हेमंत देखमुख यांना जोरदार धक्का देत काँग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.
तर शिरपूर नगरपालिकेत अमरिश पटेल यांची सत्ता अबाधित राहिली आहे. काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या तर काँग्रेसने तीसपैकी एकवीस जागा मिळविल्या आहेत. जिल्ह्यातील शिरपूर आणि दोंडाईचा निवडणुकीत प्रस्थापितांनी आपापले गड शाबूत राखल्याचे या निकालावरून दिसून आले.
दोंडाईचा नगरपालिकेत भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांमधील अटीतटीच्या लढतीत परिवर्तन घडले. यात भाजपला सत्ता काबीज करण्यात यश मिळाले आहे. नगरपालिकेच्या २४ पैकी भाजपला २०, मनसेला १, तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयनकुंवर रावल या १७ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांची दोंडाईचा पालिकेवरील सत्ता रावल गटाने काबीज केली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण ३० जागांपैकी २१ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर उर्वरित नऊ जागांमध्ये भाजपला ५, भाजप पुरस्कृत ४ आणि २ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी १९ हजार मतांनी विजय मिळविला आहे. शिरपुरला परंपरेप्रमाणे काँग्रेसने नगरपालिकेवर पकड कायम ठेवली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 14, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक शहरातील सर्वच अंतर्गत रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली असताना सातपूरच्या मळे विभागातील रस्त्यांचा मात्र विसर पडला आहे. अनेक वर्षांपासून डांबरीकरण झालेले नसल्याने सातपूर मळे भागातील रस्त्यांचे नाल्यात रुपांतर झालेले दिसून येत आहे.
एकीकडे सातपूर औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर अठराशे एकर शेतजमिन शेतकऱ्यांनी दिली असताना दुसरीकडे महापालिका नागरी सुविधाच उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सातपूरला औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर शेकडो शेतकऱ्यांनी तब्बल अठराशे एकर शेतजमीन कारखान्यांसाठी दिली होती. शेतकऱ्यांच्या योगदानामुळेच सातपूरला कारखान्यांचे मोठे जाळे पसरले होते. यात बॉश (मायको), महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एबीबी, इप्कॉस टीडीके, सिएट व इतर कारखान्यांमुळे मोठा रोजगारही उपलब्ध झाला. परंतु, ज्या सातपूरकरांनी एमआयडीसीला कारखान्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली, त्यांच्याकडेच महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कर रुपातून सर्वाधिक निधी कारखान्यांकडून महापालिकेला उपलब्ध होत असतो. सातपूरकरांनी कारखान्यांसाठी दिलेल्या योगदानाचा पाहिजे त्याप्रमाणात लाभ मळे विभागातील रहिवाशांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या रस्त्यांची अवस्था नाल्यांसारखीच झाली आहे. या रस्त्यांवरील पथदीपही बंद आहेत. त्यातच नळाद्वारे पिण्याचे पाणीही येत नसल्याने अद्याप मळे भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेने मळे विभागातील सहा अंतर्गत रस्त्यांची कामे कधी हाती घेणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. मनसेने १९२ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याची घोषणा केली. परंतु मळे विभागातील रस्ते मनसे करणार का, असाही सवाल शेतकरी वर्गांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
December 14, 2016, 1:34 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
करारनाम्यात ९०८ चौरस फूट बिल्टअप एरिया दाखवून प्रत्यक्षात १०९.२२ चौरस फूट बांधकाम कमी दिल्यामुळे ग्राहक न्यायमंचाने बिल्डरला दणका देत कमी क्षेत्राचे २ लाख ३१ हजार ५४६ रुपये फ्लॅटधारकाला देण्याचे आदेश दिले. तसेच फ्लॅटचे अंतिम हस्तांतरण एका महिन्याच्या आत करून देणे याशिवाय पार्किंगमधील पेव्हरब्लॉकचे लेव्हलिंग व मुख्य प्रवेशद्वाराजवळ काँक्रिटीकरण करून देणे, वनटाइम मेन्टेनन्ससाठी बँकेत खाते उघडून ३५ हजार रुपये जमा करण्याचे आदेश देत बिल्डरला २५ हजार रुपये दंड ठोठावला.
मालेगाव स्टॅण्ड येथे राहणाऱ्या तुळशीराम बैरागी व प्रेरणा बैरागी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात केलेल्या तक्रारीनंतर हा निकाल देण्यात आला. या तक्रारीत बैरागी यांनी म्हटले, की आम्ही बिल्डर पूनम वर्धमान गांधी यांच्याकडून कमल कांती अपार्टमेंटमध्ये १९ लाख २५ हजाराला फ्लॅट विकत घेतला. वनटाईम मेन्टेन्सपोटी ३५ हजार रुपये दिले. त्यानंतर फ्लॅटचा कब्जा मिळाल्यानंतर ९०८ चौरसफूटचा फ्लॅट ७९८.७८ असल्याचे मोजमाप केल्यानंतर लक्षात आले. त्यामुळे १०९.२२ चौरस फूट इतके क्षेत्र कमी दिल्यामुळे त्याच्या प्रति चौरसफूट २१२० दराप्रमाणे २ लाख ३१ हजार ५४६ रुपये मिळावे. डीड ऑफ डिक्लेरेशन, कम्प्लिशन सर्टिफिकेट इ. मिळाले नाही. पेव्हरब्लॉक निकृष्ट दर्जाचे बसवले व मुख्य प्रवेशद्वाराजवळ क्राँक्रिटीकरण केले नाही. इतरही काही काम बाकी आहे.
या तक्रारीवर युक्तिवाद करताना बिल्डर गांधी यांनी फ्लॅटधारक बैरागी यांनी सदनिकेच्या मूळ किमतीतील ८५ हजार रुपये वीजमीटर, डीपीचार्जेस ही रक्कम दिली नाही. त्यामुळे अंतिम हस्तांतरण करून दिले नाही. सदनिका ताब्यात देताना तिचे मोजमाप करून देण्यात आले आहे. बैरागी यांनी २५ टक्के अधिक बिल्टअप क्षेत्र अशी मोजणी केलेली आहे. ती चुकीची आहे. वास्तविक सदरची मोजणी ३५ टक्के अधिक बिल्टअप क्षेत्र करणे आवश्यक आहे. असे असताना केवळ आपल्याकडे असलेली रक्कम द्यावी लागू नये म्हणून ही खोटी तक्रार केल्याची बाजू मांडली.
सेवा देण्यात कुचराई
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने आपल्या निकालात सेवा देण्यास कुचराई केल्याचे कारण देत लोडिंग पर्सेंटेज नमूद न करता करारनाम्यात मोघम बिल्टअप व कार्पेट एरिया नमूद करण्यात येतात. अशा प्रकारे प्रतिचौरस फुटाप्रमाणे फ्लॅटची किंमत आकारणे ही अनिष्ठ व्यापारी प्रथा आहे. त्यामुळे दोन्ही बाजू व पुरावे बघितल्यानंतर बिल्डरने कमी क्षेत्र दिल्यापोटी २ लाख ३१ हजार ५४६ रुपये द्यावे, तसेच एक महिन्याच्या आत हस्तांतरण दस्त व पार्किंगमधील पेव्हरब्लॉक लेव्हलिंग व मुख्य प्रवेशद्वाराजवळ काँक्रिटीकरण करून द्यावे. तसेच ३५ हजार रुपये वनटाइम मेन्टेनन्सचे खाते उघडून जमा करावेत. तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रासापोटी १५ हजार व अर्जाचा खर्च १० हजार रुपये द्यावा. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी व कारभारी जाधव यांनी दिला. बैरागी यांच्याकडून अॅड. के. बी. चांदवडकर यांनी बाजू मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 14, 2016, 1:38 pm
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
श्री एकमुखी दत्त मंदिरातर्फे आयोजित श्रीदत्त जयंती सोहळ्याच्या सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दत्तयाग शुक्रवारपासून (दि. १६) सुरू होणार आहे. दरम्यान, दत्तवाडी, रविवार कारंजा येथील श्री एकमुखी दत्त मंदिरातर्फे आयोजित श्रीदत्त जयंती सोहळ्यात मंगळवारी सायंकाळी दत्त जन्मोत्सव उत्साहात करण्यात आला. मुख्य पूजारी मयूर बर्वे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगणावरील श्री समर्थ सद्गुरू ढगे महाराज समाधी मंदिरात ढगे महाराज पुण्यतिथी आणि श्री दत्त जयंती उत्सव घेण्यात आला. येथे पादुका पूजन, दत्त मूर्ती पूजन, मंगलस्नान, रुद्राभिषेक, पालखी मिरवणूक, ज्ञानेश्वरीताई यांचे काल्याचे कीर्तन, महाआरती, महिला भजनी मंडळाचे भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले. श्री समर्थ सद्गुरू ढगे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीपत देशमुख, अनंता ढगे, श्रीकांत ढगे, शरदराव धोंगडे आदींनी परिश्रम घेतले.
अमृतधाम परिसरातील शिवगोरक्ष योगपीठात विविध उपक्रम घेण्यात आले. भगवान महाराज ठाकरे व शिवानंद महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात विडीकामगार नगर, तुलसी कॉलनी आदी भागातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. जगन पगार, संदीप नाठे, विनोद बनकर आदींनी परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
December 14, 2016, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
तीन महिने अधीपासून राज्य निवडणूक आयोगाने स्वेच्छानिधी संदर्भात लागू केलेल्या आचारसंहितेचा सर्वाधिक फटका नगरसेवकांकडून होणाऱ्या विकासकामांना बसला आहे. या आदर्श आचार संहितेमुळे ६३ कोटींपैकी ३० कोटींच्या विकासकामांनाच ब्रेक लागला आहे. यातील सर्वाधिक कामे ही बांधकाम, विद्युत व गार्डन विभागाशी संबंधित आहेत. २६ नगरसेवकांनी तर विकासनिधीच्या कामांचे पत्रच दिले नसल्याने १३ कोटी रुपयांच्या फाइलींना मुहूर्तच मिळालेला नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन येईपर्यंत ही कामे जैसे थे राहणार आहेत.
महापालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून नगरसेवक निधीच्या कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या स्वेच्छानिधीचे कामे थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत काही नगरसेवकांनी दोन वर्ष भांडून मिळवलेला ५० लाखांचा निधी पाण्यात गेला आहे. बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतर महापालिकेने जवळपास ६३ कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी जवळपास शंभरच्या आसपास नगरसेवकांनी ५० लाखांच्या विकासकामांच्या फाइल्स टाकल्यात. त्यामुळे बजेटमधून ६३ पैकी ५० लाख वजावट झाली असून, बांधकाम, पाणीपुरवठा, उद्यान, विद्युत अशा विविध विभागांकडे या फाइल्स पाठविण्यात आल्या आहेत.मंजूर ५० कोटींपैकी जवळपास २० कोटींच्या कामांच्या फाइल्स अजूनही पाइपलाइन मध्ये आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वाधिक दहा कोटींच्या फाइल्स पाइपलाइनमध्ये आहेत. त्यापाठोपाठ गार्डन, विद्युत व पाणीपुरवठा विभागाच्या फाइल्स आहेत. या फाइलींना नगरसेवकांचे पत्र लागल्याने स्वेच्छा निधीच्या कात्रीत ती सापडली आहेत. तर १३ कोटीसाठी नगरसेवकांनी कामेच सुचवलेली नाहीत. त्यामुळे जवळपास ३० ते ३२ कोटींची कामे ही स्वेच्छा निधीच्या कचाट्यात सापडली आहेत. या कामासदर्भात आयुक्तांनी मार्गदर्शन मागविले असून, त्यांच्या निर्णयानंतरच ही कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे शहर विकासावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
नगरसेवकांना निधीच नाही
मनपा प्रांतिक अधिनियमात नगरसेवकांना केवळ दोन लाख नगरसेवक निधी देण्याची तरतूद आहे. परंतु पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास वार्ड विकासच्या नावाखाली नगरसेवक निधी दिला जातो. त्यामुळे सध्या पालिकेने दिलेला निधी हा नगरसेवक निधी नसल्याचा दावा काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. या संदर्भात महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
..पण कामे करा
महापालिकेत नगरसेवक निधी नसला तरी, वार्ड विकास निधी दिला जातो. त्या कामांसाठी नगरसेवकांकडून पत्र घेतले जाते. त्यामुळे स्वेच्छा निधी अंतर्गत हा निधी येत असल्याचा दावा प्रशासन करत आहे. कामे अडकण्याच्या भीतीने काही नगरसेवकांनी आता आपले पत्रच काढून घेण्याची विनंती केली आहे. पत्र काढून टाका पण आमचे कामे अडवू नका, असे आर्जव नगरसेवकांकडून केले जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧