Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाचशेच्या नोटांची छपाई नाशिकमध्येच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन थांबवले जाणार असल्याची केवळ अफवाच आहे. या प्रेसमध्ये पाचशेची नवी नोट छापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे स्पष्टीकरण प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिले आहे.

नाशिकरोड आणि देवास (मध्य प्रदेश) येथील पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन थांबविण्यात आले असल्याचे तसेच रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर प्रेसमध्ये पाचशेच्या नोटांची छपाई केली जाणार असल्याचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रेस कामगारांमध्ये खळबळ उडाली. मात्र, पाचशेच्या नोटा छापण्याचे काम नाशिक प्रेसमध्येच सुरूच राहणार असल्याचे सरकारी सूत्रांनी तसेच गोडसे यांनी स्पष्ट केले. सरकारने पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर नोटांची तीव्र टंचाई जाणवत आहेत. दोन हजारांच्या नोटांमुळे टंचाई दूर होण्याएवजी सुट्याची समस्या वाढली आहे. देशात सध्या पाचशेच्या नोटांची टंचाई आहे. नाशिकमध्ये या नोटा छापूनही त्या मुंबई, पुणे व देशाच्या अन्य भागात प्रथम वितरित करण्यात आल्या. पाचशेच्या नोटांची टंचाई दूर करण्यासाठी सरकारने म्हैसूरच्या प्रेसमध्ये देखील हे काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या प्रेसमध्येच दोन हजाराची नोट छापली जात आहे.

क्षमता कमी, जिद्द मोठी
नाशिकरोड आणि देवास या प्रेस महामंडळाच्या मालकीच्या आहेत. नाशिकरोड प्रेसची स्थापना १९२५ साली ब्रिटिशांनी केली. येथील मशिन्स १९८५ साली उभारण्यात आल्या. त्यांचे सर्व्हिसिंग व आधुनिकीकरणही झालेले नाही. त्यामुळे छपाईचा वेग कमी आहे. या उलट रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोणी प्रेस आधुनिक आहेत. मशिन्सची संख्याही जास्त आहे. नाशिक व देवासच्या प्रेसमध्ये पाचशेच्या पाच दशलक्ष नोटा दर दिवसाला छापल्या जातात. जिद्दी कामगार सुटी न घेता तीन शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे हे उत्पादन वाढले आहे. १३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान नाशिकच्या प्रेसने विविध प्रकारच्या तीनशे दशलक्ष नोटा छापून देशभरात पाठवल्या आहेत. अशाच वेगाने काम सुरू राहिल्यास देशातील पाचशेच्या नोटांची टंचाई सात महिन्यात दूर होईल.

म्हैसूरला समस्या
नाशिकरोड प्रेसकडून पाचशेच्या नोटा छपाईचे काम काढून म्हैसूरला दिल्यास त्यात अधिक वेळ जाईल आणि पाचशेच्या नोटटंचाईत भरच पडेल. तेथे छापल्या जात असलेल्या दोन हजारांच्या नोटांची छपाई थांबवून पाचशेची छपाई करायची झाल्यास तंत्रज्ञान, संगणक, मशिन्स यामध्ये आवश्यक बदल करावे लागतील. त्यासाठी सुमारे महिना लागेल. त्याऐवजी नाशिकरोड व देवास प्रेसमध्ये पाचशेच्या नोटा छापण्याचे काम सुरूच ठेवल्यास नोटाटंचाई लवकर कमी होण्यास मदत मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पाचशे’चे दर्शन बँकांनाही झाले दुर्लभ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून छापून बाहेर पडलेल्या पाचशेच्या नवीन नोटांचे दर्शन सामान्य नाशिककरच काय तर बँकांनाही दुर्लभ झाले आहे. शहरात या नोटांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र बँक, अॅक्सिस बँकसह काही मोजक्याच बँकांमध्ये या नव्या नोटा पोहचू शकलेल्या आहेत.

गेल्या काही दिवसापासून दोन हजारच्या नोटांमुळे अनेकांना सुट्टे नोटांचा त्रास सहन करावा लागत आहे. पाचशेच्या नवीन नोटा व्यवहारात आल्या. पण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. पाचशेच्या नोटा ज्या बँकेत आल्या नाही त्यांना मात्र बुधवारी अनेक ग्राहकांनी पाचशेच्या नोटा तुमच्याकडे कशा नाही? असा जाब विचारला. एटीएममध्येही अनेकांनी पाचशेच्या नोटा मिळाव्या म्हणून गर्दी केली. पण त्यांची निराशा झाली. एटीएममधून केवळ दोन हजारांच्याच नोटा मिळत होत्या. शंभराच्या नोटांचा अगोदरच तुटवडा असल्यामुळे बहुतांश बँकांने दोन हजारांच्या नोटांचे बँका तसेच एटीएममधून वाटप केले. पण त्यानंतर बाजारात सुट्यां नोटांचा प्रश्न तयार झाल्याने अनेकांनी बँकांकडे त्याबाबत तक्रारी केल्या. मात्र, बँकांमध्येही पैशाचा तुटवडा असल्यामुळे तेही हतबल झाले. एकीकडे चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यानंतर पैशाची टंचाई जाणवत असतांना दुसरीकडे नव्या आलेल्या दोन हजाराच्या नोटानेही प्रश्न न सुटल्यामुळे तिहेरी संकट ग्राहकांसमोर आहे. त्यातच पाचशेच्या नोटांसाठी मागणी असूनही या नोटा रिझर्व्ह बँकेने कमी प्रमाणात दिल्यामुळे त्याचाही संताप ग्राहक बँकांवर काढत आहे.

एसबीआयची २५० कोटींची मागणी
भारतीय स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेकडे पाचशेच्या नोटांची मागणी केली आहे. त्यासंदर्भात पाठविलेल्या पत्रात २५० कोटींची मागणी नोंदविली आहे. या नोटा बँकेत आल्यातर त्यांच्या जिल्हाभरातील ७० शाख व सुमारे १०० एटीएममधून वितरित केल्या जाणार आहेत. परंतु, मागणी नोंदवून चार दिवस उलटल्यानंतरही नोटा मिळल्या नसल्याचे एसबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

एसबीआयने २५० कोटी रुपयाच्या पाचशेच्या नव्या नोटांची मागणी केली आहे. या नोटा मिळाल्यास सुट्यांचा भार कमी होणार आहे. पण अद्याप नोटा मिळालेल्या नाही‌त. नोटा मिळताच त्या जिल्हाभरात वितरित केल्या जाणार आहेत.
- सुनील खैरनार, विभागीय प्रबंधक, एसबीआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगार होऊनही चणचण कायम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रोज बदलणारे नियम, कॅश शॉर्टेज यामुळे अगोदरच संतापलेल्या वेतनदारांना आता नव्या पगाराची रक्कम आपल्या हातात मिळेल की नाही या शंकेने ग्रासले आहे. दुसरीकडे, बँकाही छोट्या चलनाच्या नोटांची उपलब्धता कमी असल्याचे कारण देत हतबल झाल्या आहे.

रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा कॅशचा पुरवठाच होत नसल्यामुळे केवळ छोट्या चलनी नोटांवरच बँकांचे व्यवहार सुरू आहेत. त्यात पाचशेच्या नोटांचाही तुटवडा असून शंभराच्या नोटाही कमी झाल्या आहे. त्यामुळे बँकेसमोर पगारदारांचे आव्हान असणार असून पहिले दहा दिवस पैसे काढण्याचे प्रमाण जास्त असणार असल्याने बँकांसमोर दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालवायचे कसे असा प्रश्न बँक कर्मचाऱ्यांना पडला आहे.

आठवड्यातून २४ हजार रुपये काढण्याचा मर्यादा बँकेने ठेवली असली तरी ही रक्कम सुध्दा बँक देईल का? दिली तर त्या नोटा दोन हजारांच्या तर असणार नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्न वेतनदारांना पडले आहे. तसेच रोज बदलणाऱ्या नियमांमुळेही संभ्रम वाढला आहे. कामगारांना आपल्याच हक्काच्या पैशासाठी आता बँकांवर विसंबून रहावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने कमीत कमी कॅशचा वापर व्हावा, यासाठी सुरुवातीपासून कॅशचा पुरवठा हातचे राखून आहे. बँका मागणी करून रिझर्व्ह बँकेकडून पैसे दिले जात नसल्याच्याही बँकांचे म्हणणे आहे.

बहुतांश बँकांमध्ये नोकरदारांचे वेतन ३० नोव्हेंबरला जमा झाले. तर १ डिसेंबर रोजी उर्वरित कामगारांचे वेतन जमा होणार आहे. कॉर्पोरेट व खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना बँकांमधून थेट वेतन दिले जात आहे. असंघटीत कामगारांनाही बँकांमधून वेतन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये गर्दी वाढणार आहे.

पेन्शनर्ससमोरही अडचणी
नोटा रद्द झाल्याने पेन्शनर्सच्याही अडचणीत वाढ झाली आहे. अनेक संस्थांमधील पेन्शनर्सचेही पेन्शन बँकेतून दिले जाते. त्यामुळे त्यांच्या या तुटपुंज्या पेन्शनची पूर्ण रक्कम मिळावी यासाठी त्यांची चिंता वाढली आहे.

एटीएमची सेवा बेभरवशाची
पाचशे हजारांच्या नोटा बाद झाल्यानंतर जिल्हाभरातील ९०३ एटीएम मशिन पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेले नाहीत. कॅश नसल्यामुळे अनेक बँकांनी आपले एटीएम सुरूच केलेले नाहीत. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम सुरू असले तरी तेथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आाहे. त्यामुळे कॅश काही तासातच संपत असल्याने एटीएमचा हा चालू बंदचा खेळही डोकेदुखी ठरला आहे. एटीएमचा पगारदारांना आधार असला तरी त्यांची चिंता कमी झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीवर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी करण्याबबात सुरू असलेला संभ्रम काँग्रेसचे निरीक्षक व आमदार भाई जगताप यांनी दूर केला आहे. बहुतांश नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा कौल दिल्यानंतर जगताप यांनी आघाडीवर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी, रिपाइंचा कवाडे गट व माकप या समविचारी पक्षांशी आघाडी करण्यात येणार असून, त्यासाठी पक्षाच्यावतीने समिती स्थापन केली आहे. ही समिती आगामी आघाडीबाबत चर्चा करणार, असे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

शहर काँग्रेसच्या बैठकीनंतर आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत जगताप यांनी काँग्रेस आघाडी करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. आमदार जगताप म्हणाले की, बैठकीत २६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मत मांडली. यातील चार पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली. तर २२ पदाधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक आघाडी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार काँग्रेसने समविचारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, रिपाई कवाडे गट व माकप यांच्यासमवेत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेसने ही आघाडी करण्याबाबत कळविले आहे. आघाडी ही सन्मानाने व्हावी, पक्षाची फरफट होऊ नये अशी पक्षाची भूमिका असल्याचेही जगताप म्हणाले. आघाडीची चर्चा करण्यासाठी पक्षातंर्गत समितीची स्थापना केली असून, ही समिती या पक्षांसमवेत चर्चा करून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहे. समितीने डिसेंबरअखेर अहवाल पाठवावा, त्यानंतर उमेदवारी निश्चिती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, उद्धव निमसे, शैलेश कुटे, लक्ष्मण जायभावे, समिना मेमन, राहुल दिवे, शिवाजी गांगुर्डे, वत्सला खैरे, हानिफ बशीर आदी उपस्थित होते.

मनसेसोबतचा प्रयोग फसला

सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना समवेत केलेला आघाडीचा काँग्रेसचा प्रयोग फसल्याचे आमदार जगताप यांनी कबूल केले. महापालिकेत महाआघाडी करतांना मनसेने दाखविलेला विकासाचे रोल मॉडेल प्रत्यक्षात काम करतांना आले नाही. मनसेने शहराच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांना काँग्रेसने वेळोवेळी विरोध केला आहे. परंतु,मनसेने शहराला मागे नेऊन ठेवले असून, यापुढे मनसेससोबत आघाडी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांवर टीकास्त्र

जगताप यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिकास्त्र सोडले. जिल्ह्याचे पालकत्व होण्याची जबाबदारी स्वीकारल्याने त्यांनी जिल्ह्याचे प्रश्न सोडविले पाहिजे. परंतु ते जिल्ह्याकडे फिरकत देखील नाही हे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले. महाजन केवळ पाण्यासाठीच नाशिकमध्ये येत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडी व्हावी पण सन्मानाने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करावयाची झाल्यास ती सन्मानाने करावी. अन्यथा पक्षाने स्वबळावर लढावे, असा सूर शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निघाला. दरम्यान, समविचारी पक्षांशी आघाडी करताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असे जिल्हा निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी सांगितले.

शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गुरुवारी आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्रदेश सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव, चिटणीस डॉ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, वत्सलाताई खैरे, योगिता आहेर, उद्धव निमसे, राहुल दिवे, समीना मेमन, विमल पाटील, केशव अण्णा पाटील, वसंत ठाकूर, उद्धव पवार उपस्थित होते.

शहराध्यक्ष आहेर म्हणाले, मनपा निवडणुकांसाठी आघाडीबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. इतर पक्ष कामाला लागले आहेत. यावर पक्षाची भूमिका लवकर स्पष्ट व्हावी. यासाठी कार्यकर्त्यांनी आघाडीबाबत भूमिका मांडावी. यानंतर आमदार जगताप यांनी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रभाग अध्यक्षांना आपली मते मांडण्यास सांगितले.

पदाधिकाऱ्यांची दांडी

शहर काँग्रेस अंतर्गत गटबाजी या बैठकीतही दिसून आली. या बैठकीपासून छाजेड गटाच्या काही समर्थकांनी दांडी मारली. तर पक्षाचे तीन ते चार नगरसेवकांनी बैठकीपासून अंतर राखले. पक्षातील विरोधी गटासह कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित होते.

आघाडीवर कोण काय म्हणाले…

g डॉ. सुचेता बच्छाव - पक्षाने राष्ट्रवादीशी सन्मानाने आघाडी केली पाहिजे. गरज आहे म्हणून नको.

g संतोष लोळगे - आघाडी केल्यास मित्रपक्षाने पाडापाडीचे राजकारण करू नये.

g पांडुरंग बोडके - पक्षातील सक्षम कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, पक्षाने त्यांच्या मागे उभे रहावे. तसेच आघाडी करताना पक्षातील निष्ठावानांसह सर्व सेलच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा.

g स्मीता ठाकरे - दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये, यासाठी आघाडी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता घंटागाड्यांचाही ‘स्मार्ट’ अलार्म

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात नव्याने धावणाऱ्या घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग लावण्यात येत असल्याने त्याचा फायदा नागरिकांनाही होणार आहे. महापालिका जीपीएस ट्रॅकिंग हे पालिकेच्या स्मार्ट नाशिक अॅपला कनेक्ट करणार आहे. त्यामुळे अॅप डाऊनलोड केलेल्या ग्राहकांना त्यांच्या भागातील घंटागाडीचा शंभर मिटरवरील अंतरावर अलार्म मिळणार आहे.

महापालिकेने घंटागाडीचा नवा ठेका देताना घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावणे बंधनकारक केले आहे. यामुळे घंटागाडीचा शहरातील प्रवास हा पालिकेला कळणार आहे. तसेच घंटागाडी ठेकेदाराकडून केला जाणार बनावही टिपला जाणार आहे. पालिकेने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. घंटागाड्यांना असलेली जीपीएस ट्रॅंकिग यंत्रणा ही पालिकेच्या स्मार्ट नाशिक अॅपला जोडली जाणार आहे. शहरातील जवळपास १५ हजाराच्या वर नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. त्यामुळे घंटागाड्यांचे लोकेशन हे नागरिकांनाही कळणार आहे. आपल्या प्रभागात घंटागाडी कधी येणार याचा तपशीलच समजणार आहे. स्मार्ट नाशिक अॅपमुळे शंभर मिटर अंतरावर घंटागाडी आल्यानंतर त्याचा अलार्मच नागरिकांना कळणार आहे. त्यामुळे त्यांना कचरा घेवून नागरिकांना घर व सोसायट्या बाहेर येता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पगारासाठी बँकांमध्ये गर्दी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर झालेला पहिल्या पगाराचे पैसे काढण्यासाठी बँकेत, एटीएमबाहेर वेतनदारांनी मोठी गर्दी केली होती. अनेक बँकांमध्ये तासाभरातच कॅश संपली तर काही बँकांनी पाच ते दहा हजारावर सर्वांची बोळवण केली. आपल्या हक्काचे पैसे आपल्याला मिळत नसल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.

पगार व पेंशनर्सचे पैसे टप्याटप्याने बँकेत जमा होत असल्यामुळे दहा दिवस बँकेत गर्दी कायम राहणार आहे. नोटा रद्द झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॅश जिल्ह्याला मिळाला नाही. शहरातील अनके एटीएम गुरुवारी बंद होते. आठवड्यातून २४ हजाराची मर्यादा असल्यामुळे अनेकांनी एकाच वेळेस ही रक्कम काढण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे काही बँकांनी पाच ते दहा हजार रुपयेच मिळतील, असे सांगितले. काही बँकानी मात्र २४ हजार रुपये देत ग्राहकांचे समाधान केले. त्यात स्टेट बँक अग्रेसर होती. बुधवारपर्यंत स्टेट बँकेकडे ६०० कोटीच्या आसपास रक्कम होते.

पाचशेच्या नोटा नाहीच!

काही बँका सोडल्यास नवीन पाचशेच्या नोटांचा तुटवडा आहे. स्टेट बँकेने २५० कोटीच्या पाचशे नोटांची मागणी केल्यानंतरही गुरुवारपर्यंत पैसे मिळाले नव्हते. शंभराच्या नोटाही कमी असल्यामुळे एटीएमध्येही त्यांनी दोन हजाराच्या नोटाच टाकल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७ कोटीच्या नोटांचा शोध सुरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचशे व हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये ८ नोव्हेंबर रोजी खेळते भांडवल म्हणून शिल्लक असलेले ४७ कोटी रुपये प्राप्तिकरासह लाचलुचपतच्या रडारवर आले आहेत. बँकेच्या पाच ते सहा संचालकांनी दंडेलशाही दाखवत नाशिक शहरासह ग्रामीण शाखांमध्ये नोटा बदलल्याच्या तक्रारीची गंभीर दखल आरबीआयने घेतली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर या संचालकानी पाचशे व हजाराच्या नोटा जमा करून शंभर व पन्नासच्या नोटा नेल्या असून, तीन दिवसांतील नोटांचा तपशीलही गायब केल्याची चर्चा आहे. त्यामुळे ४७ कोटींमधील बहुतांश रक्कम ही ब्लॅकची व्हाइट करण्यासाठी वापरल्याचा तपास यंत्रणाना संशय असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा कारभारच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

केंद्र सरकारने काळ्या पैसेवाल्यांसाठी एका रात्रीत पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे काळा पैसेवाल्यांची तारांबळ उडाली. त्यांनी मिळेल त्या मार्गाने पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः सहकार क्षेत्रातील राजकारणी जिल्हा बँकेचा वापर त्यासाठी करतील म्हणून आरबीआयने या बँकांवर निर्बंध लावले होते. मात्र, नाशिक जिल्हा बँकेतील काही महाशयांनी यातूनही मार्ग काढत, रातोरात खेळत्या भागभांडवलातून नोटा बदलल्याचा प्रताप केला आहे. आठ नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेच्या २१३ शाखांमध्ये खेळते भांडवल म्हणून ४७ कोटी रुपये ठेवण्यात आले होते. त्याचा फायदा घेत, काही संचालकानी हुकूमशाही पद्धतीने कर्मचाऱ्यांवर दबाव आणत, पाचशे व हजाराच्या नोटा जमा करत शंभर व पन्नासच्या नोटा नेल्याची चर्चा आहे. या संदर्भात एक संचालक व काही कर्मचाऱ्यांनी आरबीआयकडे पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत. त्याचीच गंभीर दखल घेत आरबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व प्राप्तिकर विभागाला गुप्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या दोन्ही तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली असून, त्यात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आठ नोव्हेंबर रोजी झालेल्या काही शाखांमधील नोटांचे तपशीलच गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या नोटा बदलणाऱ्या बहाद्दरांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर संचालक मंडळाची बैठक झाली असून, त्यातही वादळी चर्चा झाली आहे. संचालकांमध्येच वाद निर्माण होऊन अध्यक्षांनी हात झटकले आहेत, तर पाच ते सहा संचालकांच्या नावाने बोटे मोडण्यात आली आहेत.

२७३ ठेवी कोणाच्या?

जिल्हा बँकेत ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान तब्बल २७३ कोटींच्या ठेवी प्राप्त झाल्या आहेत. या ठेवी या काही निवडक संचालक व त्यांच्या नातेवाइकांच्या खात्यावर जमा झाल्या आहेत. त्यामुळे ही संशयास्पद खात्यांचीच चौकशी सुरू आहे. जवळपास ४० ते ४५ खाती ही संशयास्पद असून, त्याचा तपशील गोळा केला जात आहे. सर्वसाधारण शेतकऱ्यांकडे एवढे पैसे असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे बँकेतीलच दादा व भाईंच्या या ठेवी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीसीटीव्ही तपासा

जिल्हा बँकेतील २२३ शाखांपैकी मुख्यालयासह बहुतांश शाखांमध्ये सीसीटीव्ही आहेत. सीबीएसवरील जुन्या मुख्यालयातही सीसीटीव्ही आहे. त्यामुळे रात्रीच्या काळात संचालकांनी केलेल्या करामती या सीसीटीव्हीत आल्या असतील. तपास यंत्रणांनी सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. सीसीटीव्ही बंद आढळल्यास नोटाबदली केल्याचा संशय बळावणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक मागणार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद

$
0
0

नाशिक ः प्रत्येक महिन्याच्या अखेरीला सुमारे ७० कोटींच्या आसपास रक्कमेची उलाढाल जिल्हा बँकेच्या तिजोरीत घडविणाऱ्या शिक्षकांनीही खाती आता राष्ट्रीयकृत बँकेत हलवावीत, असे आर्जव सुरू केले आहे. चलनबदलामुळे दीड दशकापूर्वीच्या या मागणीने आता नव्याने डोके वर काढले आहे. ही मागणी घेऊन शिक्षकांचे एक शिष्टमंडळ आज (२ डिसेंबर) जिल्हाधिकाचीही भेट घेणार आहे. चलन बदलाच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेवरही निर्बंध घातले आहे. या बँकांवर राजकारण्यांचे वर्चस्व आहे. यामुळे येथे राजकारण्यांचा काळा पैसा पांढरा बनू नये, असा यामागे सरकारचा उद्देश सांगितला जात असला तरीही शिक्षकांसारख्या निरूपद्रवी घटकाला या प्रक्रीयेत वेठीस धरून काय हासील होणार? असाही सवाल उपस्थित होत आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे १६ हजार शिक्षक-शिक्षकेतरांच्या पगाराची खाते जिल्हा बँकेत आहेत. यात महिन्याकाठी सुमारे ७० कोटी रूपयांचे व्यवहार होतात. मात्र, चलन बदलाच्या घोषणेनंतर हे सर्व व्यवहार टांगणीला लागले आहेत. शिक्षकांची बँक खाती ही राष्ट्रीयकृत बँकेतच असावीत, ही मागणीही जुनीच आहे. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या आव्हानामुळे संघटनांनीही जोर धरला आहे.

१३ हजार शिक्षक अन् ७० कोटींचे व्यवहार !

प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतरांची संख्या जिल्ह्यात २ हजार ६० आहे. तर माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतरांची संख्या सुमारी १३ हजार आहे. प्राथमिक शिक्षकांच्या पगारापोटी महिन्यास सुमारे ८ कोटी रुपये तर माध्यमिक शिक्षकांच्या पगारासाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा व्यवहार होतो. हा एकूण व्यवहार सुमारे ७० कोटींच्या घरात जातो. या व्यवहारावर वर्षाकाठी शिक्षक कोटींचा कर सरकारला भरतात. यातील हजारो शिक्षकांचे केवळ जिल्हा बँकेतच खाते आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ स्थळांना तात्पुरता दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई संदर्भात नागरिकांचा विरोध वाढल्यानंतर पालिकेने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. गुगल मॅपच्या आधारे सन २००९ नंतरच्या यादीत असलेल्या १३३ पैकी ५९ अनधिकृत धार्मिक स्थळांना तात्पुरता दिलासा दिला आहे. या स्थळांसाठी गुगल मॅपचा पुरावा ग्राह्य धरत ही धार्मिक स्थळे सन २००९ पूर्वीच्या यादीत टाकण्यात आली आहेत. तर खासगी जागेत असलेल्या १७ अनधिकृत धार्मिक स्थळांनाही कारवाईपासून वगळले जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात केवळ ५७ धार्मिक स्थळांवर हातोडा चालणार आहे.

अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई संदर्भात गुरुवारी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत अनधिकृत धार्मिक स्थळांच्या फेरतपासणी संदर्भात अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी केलेला अहवाल सादर करण्यात आला. बोर्डे व उपायुक्त रोहिदास बहीरम यांनी तयार केलेल्या अहवालात सन २००९ नंतरच्या काही अनधिकृत धार्मिक स्थळांना तात्पुरता दिलासा दिला आहे. अतिरिक्त आयुक्तांनी दुसऱ्या टप्प्यांत काढण्यात येणाऱ्या १३३ अनधिकृत धार्मिक स्थळांचा सर्व्हे केला. त्यासाठी गुगल मॅपचाही आधार घेतला. धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी दिलेले पुरावे व गुगलमॅपच्या नकाशांची पडताळणी केली असता, १३३ पैकी जवळपास ५९ धार्मिक स्थळे ही २००९ पूर्वीची असल्याचे आढळून आले. त्यामुळे या धार्मिक स्थळांना २००९च्या आधीच्या यादीत टाकण्याची चर्चा झाली. परंतु त्यांसदर्भात निर्णय मात्र झालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचा पुन्हा हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील करंजी येथे गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात एक शेतकरी किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या सहा महिन्यात निफाड तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, यामुळे मळ्यात राहणारे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

तालुक्यातील करंजी येथे तामसवाडी ते करंजी रस्त्यावर रामनाथ मुरलीधर तांबेकर हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्याकडे १५ ते २० शेळ्या असून बुधवारी रात्री तांबेकर हे घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांजवळ झोपलेले होते. गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक झोपेत असलेल्या तांबेकर यांच्यावर हल्ला केल्याने ते प्रचंड घाबरले. बचावासाठी त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली. त्याचा आवाज ऐकून आसपासच्या वस्तीवरील शेतकरी, तांबेकर यांची मुल, शेतावर मुक्कामी असलेले ऊसतोड कामगार तातडीने मदतीला धावून आले. माणसांचा जमाव पाहताच बिबट्याने तांबेकर यांच्यावर नाकावर पंजा मारून धूम ठोकली. तांबेकर यांच्या नाकावर जखम झाली असून, त्यांना निफाड येथील उप जिल्हारुग्णालयात हलव‌िण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येवला वनविभागाचे वनपाल ए. पी. काळे, वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक विजय लोंढे, दिलीप अहिरे, भैय्या शेख आदींचे पथक करंजी येथे दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. ‌बिबट्याने केलेल्या हल्यामुळे तांबेकर कुटूंबिय चांगलेच धास्तावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खोमध्ये महिलांसाठी प्रथमच सुरक्षा गणवेश!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT

नाशिक ः खो-खो खे‍ळताना मुलींनी सूर मारला तर त्यांना ओटीपोटाला मार लागून दुखापत होण्याचा संभव असतो, तसेच आयुष्यभरासाठी वंध्यत्व येण्याचीही भीती असते. असे असतानाही खो-खोमध्ये महिला खेळाडूंसाठी सुरक्षा साधने नाहीत. त्यावर नाशिकच्या खेळाडूंनी संशोधन करून एक वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षा गणवेश तयार केला आहे, जो महिला खेळाडूंसाठी वरदान ठरणार आहे. नाशिकमध्ये शुक्रवारपासून होणाऱ्या निमंत्रिताच्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला खेळाडू या गणवेशासह खेळणार आहेत. खो-खोच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग असून, सुरक्षित खो-खोच्या दिशेने टाकलेले हे आदर्श पाऊल ठरणार आहे.

गेल्या वर्षी मंथन; यंदा अंमलबजावणी

नाशिकमध्ये गेल्या वर्षी २०१५ मध्ये संभाजी स्टेडियमवर भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धा झाली होती. या स्पर्धेच्या वेळी अनेक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची विविध विषयावरची व्याख्याने, चर्चासत्रे घेण्यात आली होती. महिला खेळाडूंनीही या चर्चेत भाग घेत ओटीपोटाला मार लागत असल्याचे सांगितले होते. क्रिकेटप्रमाणे हा खेळदेखील सुरक्षित कसा खेळता येईल, यावर नाशिकमध्ये झडलेली ही पहिलीच चर्चा. याच चर्चेतून संशोधन सुरू झाले आणि राज्य खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांनी त्यावर मार्ग काढण्याचा निश्चय केला. हा गणवेश तयार करण्यासाठी तज्ज्ञांची निवड केली. त्यात विविध खेळांचे गणवेश तयार करणारे अनंता जोशी, महिला प्रशिक्षक गीता सावळे व पुरुष खेळाडू कैलास ठाकरे यांची निवड करण्यात आली. या तिघांनी त्यावर काही उपाय सुचवले. हा गणवेश परिधान केल्यानंतर तो जड होऊ नये, त्याचा खेळावर परिणाम होऊ नये याची काळजी घेण्यात आली.

दोन महिन्यांपूर्वी ट्रायल

ड्रेस हलका जरी असला तरीही तो सुरक्षित असावा हे आवर्जून पाहण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी हा गणवेश तयार झाला. त्यानंतर खेळाडूंना तो वापरण्यास देण्यात आला. हा गणवेश परिधान केल्यानंतर धावण्यातली सहजता तसुभरही कमी झाली नसल्याचे खेळाडूंनी सांगितले. त्यानंतर हा गणवेश आता शुक्रवारी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत वापरला जाणार आहे. या गणवेशाला भारतीय खो-खो महासंघाची परवानगी मिळाल्यास महिला खेळाडूंसाठी ते अनोखे वरदान असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैर लाकडाची तस्करी उघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील उंबरदे पळसन गावातील घरट्यांचा माळ परिसरात वनविभागाने सुमारे दीड लाखाचे खैर लाकूड हस्तगत केले आहे. या कारवाईबाबत आधी खूप टाळाटाळ करण्यात आल्यामुळे वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

पळसण परिसरात ऊंबरदे गेल्या कित्येक वर्षांपासून सागवन तस्कराची टोळी कार्यरत आहे. यापूर्वी ऊंबरदे येथून एका संशयित इसमाच्या घरातून सागवन लाकूड वनविभागाने हस्तगत केले होते. तरिही बेवारस करून पंचनामा करण्यात आला होता. त्यामुळे संशयितांचे चांगलेच फावले होते. आता सागवन लाकूड संपुष्टात आले आहे. त्यामुळे या सागवन तस्करांनी आता जंगलातील खैर लाकडाचे झाडाची कत्तल करणाकडे आपला मोर्चा वळविला आहे.

लाकूड तस्कर स्थानिक परिसरातील वजनदार व्यक्ती हाताशी धरून जंगलतोड करतात. त्यांना स्थानिकांकडून मजुरी दिली जाते. अशाच प्रकारे खैराच्या झाडे तोडून ती पानविडामधील काथ तयार करण्यासाठी गुजरातला पाठविले जातात. गुजरात पासिंग असलेली अज्ञात आयसर टेम्पो सुमारे ८ ते १० दिवसापासून एका शेतकऱ्यांच्या पोल्टी फार्मजवळ उभी करून ठेवण्यात आली आहे, अशी गोपनीय माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली होती. मात्र त्या संशयित सुत्रधारावर कारवाई करण्यात वनविभागाचे कर्मचारी टाळाटाळ करीत होते. वरिष्ठ पातळीवरून विचारणा झाल्याने धावपळ करून त्याने खैराची लाकडे हस्तगत केली. या तस्करांना मदत करणाऱ्या स्थानिकांचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. अशी माहिती स्थानिक वृक्षप्रेमीनी केली आहे. या पूर्वी किती वृक्षांची कत्तल झाली याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता खोदल्यानेे वाहतुकीचा खोळंबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिक आधीच हैराण झाले आहेत. अशातच संगमेश्वर भागातील मोतीबाग नाका ते नवा अल्लमा एक्बाल पूल दरम्यान पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केल्याने आधीच खड्डेमय झालेल्या या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील सर्वच प्रमुख रस्ते खड्डेमय झालेले असताना येथील मनपाचा सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. आधीच उघडलेले रस्ते वारंवार कोणत्या न कोणत्या कारणासाठी खोदण्यात येत असल्याने रस्त्यांची अधिक वाट लागत आहे. संगमेश्वर भागातील मोतीबाग नाका ते नवीन पूल दरम्यान असलेला रस्तादेखील मनपाच्या पाणीपुरवठा विभागने खोदला आहे. कलेक्टर पट्टा भागात असलेल्या नवी वस्तीमधील नवीन जलकुंभात पाणीपुरवठा करण्यासाठी रविवार वार्ड जळकुंभ ते नवी वस्ती जलकुंभ अशी जलवाहिनी टाकली जाते आहे. मात्र यासाठी या रस्त्यालगत बुलडोजरच्या सहाय्याने खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच प्रचंड रहदारी असलेला हा रस्ता खोदकाम केल्याने अरुंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

नाशिककडून शहरात येणाऱ्या वाहतुकीस शहरात प्रवेश करण्यासाठी हाच सोयीचा रस्ता असून, टिळकनगर, कलिका नगर, देवरे प्लॉट तसेच कलेक्टर पट्टा भागातील नागरिकांनादेखील याच रस्त्याने ये-जा करावी लागते. शहाराअंतर्गत होणारी अवजड वाहनेदेखील याच रस्त्याने जातात. वर्धमान, काकाणी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पायी तसेच स्कूलबससाठी या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. पावसाळ्यात या रस्त्याला नेहमीच खड्डे पडतात. त्यात आता जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदकाम केल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सकाळी शालेय विद्यार्थी, पालकांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे नवा अल्लमा एकबाल पूल ते रामसेतू दरम्यान शिंपी मंगलकार्यालय परिसरात खोदकाम करण्यात आले आहे. किमान महिनाभर तरी हे काम सुरू राहणार असल्याने नागरिकांना पुढचा महिनावर अशाच रस्त्यावरून वाट काढावी लागेल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमच्या भागातून जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदकाम केले असले तरी तो व्यवस्थित बुजण्यात आलेला नाही. आधीच हा रस्ता खराब होता. आता तो अरुंदही झाला आहे.

- सागर अह‌िरे, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचा सुमेध वाव्हळ ठरला ‘आयर्न मॅन’

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अशक्यप्राय अशा स्पर्धेतदेखील यश संपादन करता येते हे येथील २० वर्षीय खेळाडू सुमेध वाव्हळ याने दाखवून दिले आहे. थायलंड येथील फुकेट शहरात नुकत्याच पार पाडलेल्या आंतराष्ट्रीय आयर्न मॅन ट्रायथलॉन (धावणे, पोहणे आणि सायकलिंग) स्पर्धेत त्याने सलग साडेसहा तासांची झुंज देत यश संपादन केले आहे.

सुमेध हा शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शशिकांत वाव्हळ व डॉ. हेमांगी वाव्हळ यांचा मुलगा आहे. सध्या तो मुंबई येथील जी. एस. मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. सुमेधचे वडील डॉ. वाव्हळ यांनी गेल्या १० वर्षात शहरातील धावपटू म्हणून आपला नावलौकिक मिळवला असून, त्यांची हीच धावण्याची आवड सुमेधमध्येदेखील निर्माण झाली. गेल्या वर्षी सुमेधने मुंबई अंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किमी अंतर ४ तास ३० मिनिटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केले. या स्पर्धेतील यशानंतर सुमेधने मागे वळून पहिलेच नाही. त्यानंतर त्याने आयर्न मॅन स्पर्धेसाठी पात्र होणे व ते विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे स्वप्न त्याने पहिले. दररोज पहाटे उठून सलग तीन तास यासाठी त्याने सराव केला. पोहणे, सायकली, धावणे या सगळ्या प्रकारात प्रचंड शारीरिक मेहनत होती. कोच प्रशांत बेंद्रे, नाशिक येथील अंतराष्ट्रीय सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन, कोच नीतेश ठक्कर यांच्या मार्गदर्शनात त्याने धडे गिरवेल. या अथक परिश्रम आणि मेहनतीने त्याचे प्रदर्शन दिवसेंदिवस उत्तम होत गेले. स्पर्धेतील ही थकवणारी तयारी सुरू असतानाच सुमेधची वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षादेखील सुरू होत्या.

२७ नोव्हेंबर रोजी आशिया खंडासाठी थायलंडमधील फुकेट येथे आयर्न मॅन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातून ६० देशातील १३०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

असा गाठला ठप्पा
पोहणे- दोन किलोमिटरचे अंतर ४४ मिन‌िट•सायकलिंग- ९० किलोमिटर अंतर ३ तास १ मिन‌िट•धावणे स्पर्धा- दोन किलोमिटर अंतर २ तास ३३ मिनिट•वयोगट - १८ ते २५, यात जगभरातून ३६६ स्पर्धक•या वयोगटात सुमेध देशातून एकटाच•सुमेध २० वर्षीय वयोगटात प्रथम आल्याने त्याला आयर्न मॅन पुरस्कार.


आयर्न मॅन ट्रायथलॉन

या स्पर्धेचा जन्म १९७८ मध्ये हवाई बेटांवर झाला. यात पोहणे १.९ किमी, सायकलिंग ९० किमी, शेवटी रनिंग २१ किमी याचा समावेश असतो. या तिन्ही प्रकारात न थांबता साडेआठ तासात संपवायचे असते. जो स्पर्धक २ किमी पोहण्याचे अंतर ७० मिनिटामध्ये संपवू शकतो त्यालाच या स्पर्धेत सहभाग घेता येतो. सुमेधने केवळ त्यात सहभाग घेतला नाही तर विक्रमी यश संपादन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नकोशा आयुष्याला मिळाला अर्थ

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

सुखी- समाधानी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतानाच त्यांच्या आयुष्यात एचआयव्ही पॉझिटिव्हचे वादळ आले आणि देखण्या आयुष्याला दृष्ट लागली. समाजात तोंड लपवत जगताना आयुष्य नकोनकोसे झाले. नैराश्याने ग्रासलेले असताना आत्महत्या करून या आयुष्याचा शेवट करावा, असेही त्यांना वाटले; पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका खाकी वर्दीतील माणुसकीच्या शिलेदाराने त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांच्या जगण्याला अर्थ दिला.

मनमाड शहरात जागतिक एडस दिनाचे औचित्य साधून एड्सग्रस्त असणाऱ्या दोन तरुण व दोन तरुणींचा संपन्न झालेला आगळा विवाह सोहळा याचि देही याचि डोळा पाहताना उपस्थितांचे डोळे भरून आले. अवघ्या वऱ्हाडी मंडळाला गहिवरून व गलबलून टाकणारी ही एका लग्नाची गोष्ट वर आणि वधूच्या वेदनामय आयुष्यात जगण्याची आस पेरणारी ठरली. मनमाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुंडलिक सपकाळे या लग्नसोहळ्याचे खरे शिल्पकार ठरले. करुणा केअर सेंटर व मिलिंद सामाजिक संस्था यांनी संयोजन केले. सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे व सिस्टर तेरेसा यांनी सहकार्य केले.

असे ठरले लगीन

पुणे येथील लिव्हिंग विथ एचआयव्ही या देशभर एड्सग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी संबंधित असणारे पोलिस निरीक्षक सपकाळे यांनी संपर्क साधत एड्सग्रस्त तरुण- तरुणींचे लग्न लावण्याचा विचार मांडला. या संस्थेचे पदाधिकारी विनय भेंडे, संगीता भेंडे या एड्सग्रस्त जोडीचा विवाह सपकाळे यांनी काही वर्षांपूर्वी लावला होता. मग भेंडे दाम्पत्याने एचआयव्ही तरुण- तरुणींची माहिती सपकाळे यांना दिली आणि एक डिसेंबरचे औचित्य साधून मग या माणुसकीच्या देवदूताने मनमाड येथे सुरगाणा व चंद्रपूर येथील दोन तरुणांच्या लग्नाचा बार नाशिक आणि गडचिरोली येथील तरुणींशी लावून दिला. या सोहळ्यास नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, विविध धर्मीय गुरू, रेल्वे पोलिस निरीक्षक के. डी. मोरे यांच्यासह भेंडे दाम्पत्य वऱ्हाडी म्हणून उपस्थित होते. फादर सॅबी कोरिया यांनी प्रार्थना म्हणताच वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालत नव्या आयुष्याचा श्रीगणेशा केला. या वेळी निरीक्षक पुंडलिक सपकाळे व बेवारस लोकांसाठी आपले आयुष्य पणाला लावणारे विलास कटारे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना लागले निरोप समारंभाचे वेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांना अजून तीन महिने अवकाश असला तरी, सत्ताधाऱ्यांसह विद्यमान नगरसेवकांना आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्यामुळे येत्या ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत पांरपरिक पोशाखात येण्याचे फर्मान नगरसचिव कार्यालयाने नगरसेवकांना सोडले आहे. या महासभेनंतर १२७ नगरसेवकांचे सामूहिक फोटोसेशन केले जाणार आहे. त्यामुळे या सभेला सर्वांची उपस्थिती राहण्याची शक्यता असून, ही महासभा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह महापौरांच्या गुनगान सोहळ्याने गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान संसदेच्या धर्तीवर पालिकेत या पचंवार्षिकपासून नगरसेवकांचा सामूहिक फोटो लावण्याची प्रथा सुरू केली जाणार आहे. मात्र हा महासभेत लावायचा की पालिकेत यावर मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. यापूर्वी केवळ महापौरांचेच फोटो कार्यालयात लावण्यात येत होते. परंतु या पंचवार्षिक पासून नवीन प्रथा लागू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी वसत‌िगृहांत वायफाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहात ‘फ्री वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार नाशिक विभागातील सर्व सरकारी वसतिगृहांत वाय-फाय कनेक्शन तत्काळ सुरू करावे, असे निर्देश समाजकल्याण विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत.

सरकारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी देय असलेला निर्वाह भत्ता प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक करण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. मागासवर्गीय समाज घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या खर्चाचा व कामगिरीचा आढावा सिंह यांनी शुक्रवारी घेतला. क्षेत्रिय अधिकारी व सरकारी वसतिगृहांच्या गृहपाल यांच्या विभागस्तरीय बैठकीत सिंह यांनी हा आढावा घेतला. नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहमदनगर या पाचही जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी व विभागांतील ५३ सरकारी वसतिगृहांचे गृहप्रमुख, गृहपाल तसेच नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त काशिनाथ गवळे आदी उपस्थित होते.

सरकारी वसतिगृहांत स्पर्धा परीक्षांचे पुस्तक संच उपलब्ध करुन देण्यात यावेत, असेही सिंग यांनी सांगितले. याबरोबरच प्रत्येक सरकारी वसतिगृहात संगणक कक्ष सुरू करण्यात यावा, विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण व व्यक्त‌िमत्व विकासाचे धडे देण्यात यावेत, सरकारी वसतिगृहांच्या डागडुजीचे काम तत्काळ हाती घेण्यात यावे, सरकारी वसतिगृहांसाठी असलेल्या विविध सोयी-सुविधा, ‘ई-शिष्यवृत्ती’, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९, दादासाहेब सबलीकरण व स्वाभिमान योजना, तांडा वस्ती सुधार योजना, शासनाने नव्याने मंजूर केलेल्या वसतिगृह सुरू करण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही, प्राप्त जागा आदी विषयांवर त्यांनी चर्चा केली.

ई-शिष्यवृत्तीचा निपटारा

गेल्या काही दिवसांपासून ‘ई-शिष्यवृत्ती’ची प्रक्रिया अधिक सुटसुटीत व सोपी करण्यात आली आहे. ‘ई-शिष्यवृत्ती’मधील महाविद्यालय स्तरावर प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यात यावा, शासन मान्यता प्राप्त संस्था व कॉलेजांनाच स्कॉलरशिप मंजूर होईल, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘फ्री-श‌िप’ साठी सहा लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा करण्यात आली आहे. ‘फ्री-श‌िप’च्या प्रकरणांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ प्रकरणांचा निपटारा होईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी समाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सदानंद पाटील यांनी शासनाकडे ‘ई-शिष्यवृत्ती’ च्या अर्जांचा निपटारा करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी आहे, यामुळे ‘शिष्यवृत्ती’ च्या प्रलंबित अर्जांचा तत्काळ निपटारा करण्यात यावा, ‘ ई- शिष्यवृत्ती’साठी लागणाऱ्या आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, अशा सूचना उपस्थितांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचा सावध पवित्रा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदा प्रदूषणावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंगापूर धरणाजवळ एक नवीन धरण बांधणार असल्याची घोषणा केली. त्यावर पालकमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिक बोलणे टाळले. कदम यांचा गुरुवारी फोन आला होता, त्यावेळी ते धरणाबाबत बोलले. खरं तर त्यांचा मुद्दा गोदावरी प्रदूषणाबाबतचा आहे. नवे धरण बांधले तर वाहते पाणी गोदावरीला मिळेल अशी त्यांची सूचना होती. नवीन धरण बांधता येत असेल तर ते करू, असे सूचक वक्तव्य महाजन यांनी केले.

गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीनिमित्त कदम नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी गोदा प्रदूषण रोखण्यासाठी नवीन धरण बांधण्याची अजब घोषणा केल्यानंतर शहरात दिवसभर या विषयावर चर्चा होती. त्यामुळे जलसंपदा मंत्री या विषयावर नवीन धरण कसे बांधता येईल, यावर सविस्तर बोलण्याची अपेक्षा होती. पण त्यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले. ‘तसे करता येत असेल तर ते करू’ असे सांगत या विषयाला फारसे महत्त्व देण्याचे पालकमंत्र्यांनी टाळले. शहराची अधिक पाण्याची गरज लक्षात घेऊन अगोदर किकवी धरणाचा विषय प्रस्तावित आहे. त्याच्या निविदाचा विषय अजून संपलेली नाही. त्यामुळे असे असतांना आणखी नवीन धरण कोणते असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण व भविष्यातील गरज लक्षात घेता गंगापूर धरणाच्या वरील बाजूस किकवी नदीवर धरण बांधण्याला सन २००९ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. २८३ कोटी ५४ लाखांच्या प्रकल्प अहवालाला एप्रिल २०१५ मध्ये मान्यताही मिळाली. त्यानंतर सर्वेक्षण व मोजणीनंतर वन जमीन, खासगी जमीन भूसंपादन प्रक्रिया करण्यात आली. पण या धरणाचे काम अजून सुरू झाले नाही. हे धरण नाशिकच्या पाण्यासाठी आहे. त्यामुळे याबाबत आढावा बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांनी कदम यांना ही माहिती देणेही आवश्यक होते. पण तसे झाले नाही व अपुरी माहितीद्वारे हे वक्तव्य त्यांनी केले. अगोदर मराठवाड्याला पाणी मिळावे हा विषय अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे हा नवीन धरणाचा विषय कसा आला, याबद्दलही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेकेदारांना २० डिसेंबरचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका ठेकेदारांनी नव्या घंटागाड्यांसाठी एक डिसेंबरची डेडलाइन पाळली नसल्याने आरोग्य विभागाने आता पाच डिसेंबरपासून आरटीओ पासिंगच्या गाड्या रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २० डिसेंबरपर्यंत सर्व गाड्या रस्त्यावर आणण्याचा अल्ट‌िमेटम दिला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच नवीन घंटागाड्या धावण्याची शक्यता आहे.

महापालिकेने १७६ कोटींचा घंटागाडी ठेका दिला असून, संबंधित ठेकेदारांना १ डिसेंबरपर्यंत घंटागाड्या सुरू करण्याचे आदेश दिले होते. गेल्या महिन्यात १३ तारखेला थाटात नवीन घंटागाड्यांचे उद‌्घाटनही करण्यात आले. परंतु ठेकेदारांच्या गाड्या तयार नसल्याने १ डिसेंबरचा मुहर्त हूकला आहे. त्यामुळे आयुक्तांनी चारही घंटागाडी ठेकेदारासह आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यामुळे ठेकेदारांनी आता नमते घेत, ५ डिसेबरपर्यंत आरटीओ पासिंग झालेल्या आणि २० डिसेंबरपर्यंत उर्वरित सर्व घंटागाड्या रस्त्यावर उतरवणार असल्याचे आश्वासन ठेकेदारांनी दिले आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शहरात नवीन घंटागाड्या धावण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images