Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

२४ जागांसाठी तब्बल १०३ उमेदवार रिंगणात

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी चित्र स्पष्ट झाले. पडद्यामागच्या जोरदार राजकीय हालचाली, गुफ्तगू अशा अनेक बाबींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतानाच महत्त्वपूर्ण नगराध्यक्षपदाच्या लढतीसह विविध प्रभागातील नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठीच्या रिंगणातून नेमकी कुणाकुणाची माघार होणार अन् नेमके कोण-कोण आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीला सामोरं जाणार ही येवला शहरवासीयांना गेल्या काही दिवासांपासून लागलेली मोठी उत्कंठा उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी संपली.

येवला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात राहिल्याने ही लढत ‘षटरंगी’ होणार आहे. पालिकेच्या १२ प्रभागातील २४ जागांसाठी तब्बल १०३ उमेदवार आपलं नशीब अजमावणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या अंतिम दिवसातील प्रत्येक घडामोडींकडे शहरवासीयांच्या नजरा लागल्या होत्या.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

उमेदवारी अर्ज माघारीच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवसानंतर येवला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची थेट जनतेतून होणारी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र समोर आले आहे. नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मनोहर जावळे, प्रमोद सस्कर, आनंद शिंदे व राजेश भंडारी या चौघांनी आपले अर्ज माघार घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषाताई माणिकराव शिंदे, भाजपचे बंडू अंबादास क्षीरसागर, काँग्रेस (आय)चे शेख एजाज शेख रियाज यांच्यासह अजहर अली अलताफ अली सैय्यद (अपक्ष), शेख अ. वहाब फकीर मोहमंद (अपक्ष) व भारिप बहुजन महासंघाचे दीपक शशिकांत लाठे या सहा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी ‘षटरंगी’ लढत दिसत असली तरी, भाजपचे बंडू क्षीरसागर, राष्ट्रवादीच्या उषाताई शिंदे अन् काँग्रेसचे एजाज शेख यांच्यातच खरा ‘मुकाबला’ होणार असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नगरपालिकांसाठी बहुरंगी लढती

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, सटाणा व भगूर या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी कुठे तिरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी, षटरंगी लढती रंगणार आहेत. आज (दि.१२) उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. यामुळे आजपासून उमेदवारांच्या प्रचाराचा श्रीगणेशा होऊन रणधुमाळी सुरू होणार आहे. काही उमेदवार व पक्षांनी माघारीपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे आजपासून मतदारांच्या गाठीभेटी वाढणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत असल्याने चुरस वाढली आहे.

भगूरमध्ये रंगणार तिरंगी लढत

भगूर नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत एकूण १९ उमेदवारांनी माघार घेतली. रिंगणात नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत.

शुक्रवारी माघारीनंतर खऱ्या अर्थाने आता प्रचाराची रणधुमाळी उडणार असून, आज (दि.१२) उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. ​या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अनिता करंजकर, भाजपकडून शोभा भागवत, तर काँगेस-राष्ट्रवादी आघाडीकडून प्रेरणा बलकवडे या रिंगणात आहेत. नगरसेवकपदासाठी शिवसेनेने १७ जागांवर, भाजपने १६ व आघाडीकडून १५ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. प्राजक्ता बागडे, दत्त कुंवर, चेतन बागडे, विलास पिंगळ असे चार अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

अनिता करंजकर (शिवसेना), शोभा भागवत (भाजप), प्रेरणा बलकवडे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)

माघार घेतलेले उमेदवार

अश्विनी मोरे, सुमीत चव्हाण, सचिन दुर्गुडे, मदन गायकवाड, युसूफ खान, संदीप गोरे, विनोद लोट, विनायक काळे, वर्षा पंडोरे, चेतक बलकवडे, मोहिनी वालझाडे, श्रीकांत सोनवणे, फरीद शेख आदी.

नांदगावमध्ये रंगणार पंचरंगी लढत

नांदगाव नगरपरिषदेत थेट नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून, शुक्रवारी चार जणांनी माघार घेतली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

अरुण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश कवडे (शिवसेना), संजय सानप (भारतीय जनता पक्ष), शिवाजी पाटील (अपक्ष), कल्पना वाघ (अपक्ष). चार पुरुष उमेदवारांविरोधात एकमेव महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे, ही बाब लक्षवेधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानपेट्यांमध्ये अडकले भाविकांचे दान!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com
Tweet : bidvepravinMT

नाशिक : काही देवस्थानांमधील ट्रस्टींचे वाद कोर्टापर्यंत गेल्याने तेथील दानपेट्या उघडण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांकडे केंद्रित झाले आहेत. अशा दानपेटीत अडकलेली रक्कम व्यवहारात यावी, यासाठी काही देवस्थानांनी दानपेट्या उघडण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना साकडे घालण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पेट्यांमध्ये अडकून पडलेल्या नोटाही लवकरच मोकळा श्वास घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक सर्जिकल स्ट्राइकनुसार पाचशे आणि हजाराच्या नोटा केवळ ११ नोव्हेंबरपर्यंत पेट्रोलपंप, हॉस्पिटल्स, मेडिकल्स अशा ठिकाणी चलनात वापरता येणार आहेत. त्यानंतर त्या बाजारपेठेत रद्दी ठरणार असून, बँकांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंतच त्या स्वीकारण्यात येणार आहेत. या नोटा शनिवारपासून चलनातून कायमस्वरूपी बाद होणार आहेत. म्हणूनच अशा नोटांचा भरणा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी उसळली आहे.

मंदिरांचे शहर म्हणून लौकिक असलेल्या नाशिकमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिरांमधील दानपेट्यांत मोठ्या प्रमाणावर दानही जमा होते. एकीकडे १०० रुपये आणि त्याखालील नोटांचा बाजारपेठेत प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना शहरातील काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, नवश्या गणपती मंदिर व तत्सम देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये लाखो रुपये असण्याची शक्यता आहे. याखेरीज पाचशे आणि हजाराच्या नोटा बाजारात वटत नसल्याने काहींकडून अशा नोटा मंदिरांमधील दानपेटीत टाकण्याचे दातृत्व दाखविले जाऊ लागले आहे.

परस्परविरोधी ट्रस्टींमध्ये दिलजमाई

दानपेटीमध्ये जमा झालेल्या १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनात याव्यात म्हणून आता देवस्थानांकडूनही पुढाकार घेतला जात आहे. कोर्टात वाद असलेल्या देवस्थानांनी लवकर दानपेट्या उघडता याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दानपेट्यांच्या चाव्या धर्मादाय आयुक्तांकडे असल्याने दानपेट्या उघडण्यात याव्यात अशा आशयाचे पत्र धर्मादाय आयुक्तांना देण्याची तयारी देवस्थानांनी सुरू केली आहे. दानपेट्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकांमध्ये जमा करणे आवश्यक आहे. या सर्व प्रकारामुळे एकमेकांमध्ये तात्त्विक वाद असलेल्या ट्रस्टींमध्ये दिलजमाईची शक्यता निर्माण झाली आहे.

अध्यक्षांची वाढणार जबाबदारी

देवस्थानांमधील दानपेट्यांमध्ये जमा होणारी रक्कम सुट्या पैशांच्या स्वरूपात अधिक असते. अगदी पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतच्या नोटांचा भरणा असतो. येत्या काही दिवसांत पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा व्यवहारात दाखल होतील. मात्र, सुट्या पैशांची चणचण भासणारच आहे. दानपेट्यांमधील अशा शंभर रुपयांपर्यंतच्या नोटा घेऊन त्या बदल्यात पाचशे आणि हजारांच्या नोटा बँकेत जमा केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टवरील अध्यक्ष आणि तत्सम अन्य पदांवरील सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. दानपेट्यांमधील प्राप्त रक्कम आहे तशी बँक अधिकाऱ्यांकडे सोपविले जाण्यापर्यंत या अधिकाऱ्यांना‍ पाठपुरावा करावा लागणार आहे.

गंगापूर रोडवरील नवश्या गणपती मंदिरातील दानपेट्यांच्या चाव्या धर्मादाय आयुक्तालयाकडे आहेत. या दानपेट्या उघडाव्यात, असे विनंतीपत्र धर्मादाय आयुक्तांना लवकरच देणार आहोत. ‘धर्मादाय’मधील अधिकारी आणि ट्रस्टचे खाते असलेल्या बँक ऑफ बडोदामधील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच या दानपेट्या उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- राजेश जाधव, ट्रस्टी, नवश्या गणपती देवस्थान ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता खर्चायची चिंता

$
0
0

टीम मटा, जळगाव/धुळे

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयानंतर शनिवारी चौथ्या दिवशीही बँकांमध्ये या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात भरण्यासाठी सकाळपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शंभर, पन्नासच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नागरिकांनी आता खर्चात हात आखडता घेतल्याने बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत.

राष्ट्रीयीकृत बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुटी असते, मात्र आजच्या शनिवारी या बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. नागरिकांनी सकाळी साडेसात-आठ वाजेपासूनच बँकांसमोर रांगा लावलेल्या होत्या. नियमांची पूर्ण माहिती नसणे, तसेच काही बँकांची मनमानी यामुळेही बँक अधिकारी व रांगेतील नागरिक यांच्यात वाद झाले. काही बँकांमध्ये रांग संपत नसल्याने दुपारी तीन वाजेनंतर एक्स्चेंज फॉर्म देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे नागरीक व बँक अधिकारी यांच्यात तू तू मैं मैं झाली.

एक्स्चेंज आठवड्यातून एकदाच

बँकांमधील दर्शनी भागात लावलेल्या सुचनेनुसार, एकावेळेस चार हजार रुपये एक्स्चेंज केल्यानंतर त्या पुढील आठवड्यात नोटा एक्स्चेंज करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे, तरीही अनेकांनी या सूचनेकडे काणाडोळा करत एक्स्चेंजसाठी रांगेत नंबर लावलेला होता.

युनियन बँकेत पोलिस बंदोबस्त

नवी पेठेतील युनियन बँकेच्या शाखेत नागरिकांना आवर घालण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची वेळ आली. या बँकेत एक्स्चेंज व विड्रॉलसाठी एकच रांगा असल्याने खातेदारांचा गोंधळ उडत होता. त्यातून रांगेतील क्रमांकावरून खातेधारकांमध्ये वादाच्या घटना घडल्या.

दैनंदिन व्यव्हार विस्कळीत

चलनातून बाद नोटा बँकेत स्वीकारून दोन हजार रुपयांची नवीन नोट नागरिकांना देण्यात येत असली, तरी व्यवहारात शंभर, पन्नास व त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांची उपलब्धता कमी असल्याने साधा भाजीपाला खरेदी करणेही नागरिकांसाठी अडचणीचे झाले आहे. आज आठवडे बाजारातही गर्दी नव्हती.


ग्राहक भांडारात घेणार जुन्या नोटा

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशातील शासकीय ग्राहक भांडारांमध्ये चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार धुळे शहरातील ग्राहक भांडारात पाचशे व हजारच्या जुन्या नोटा देऊन खरेदी करता येईल, असे ग्राहक भांडारचे अध्यक्ष अनिल मुंदडा यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ग्राहक भांडारमध्ये १४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.

आयुक्त उशिरापर्यंत थांबून

धुळे महापालिकेत दोन दिवसांत चार कोटींचा करभरणा झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. करापोटी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत मनपा आयुक्त संगीता धायगुडे, अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी मनपात थांबून होते. शनिवारी दुपारपर्यंत तीन कोटी २३ लाखांपर्यंत मालमत्ता कराचा भरणा झाला असून, रात्रीतून ही रक्कम चार कोटींवर पोहोचेल, असा अंदाज मनपा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा आयुक्तांची रात्रीपर्यंत ड्युटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेत दोन दिवसांत चार कोटींचा करभरणा झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. करापोटी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यत मनपा आयुक्त संगीता धायगुडे, अधिकारी यांच्यासह पोलिस कर्मचारी मनपात थांबून होते. शनिवारी दुपारपर्यंत तीन कोटी २३ लाखांपर्यंत मालमत्ता कराचा भरणा झाला असून, रात्रीतून ही रक्कम चार कोटींवर पोहोचेल, असा अंदाज मनपा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

ग्राहक भांडारात घेणार जुन्या नोटा

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार देशातील शासकीय ग्राहक भांडारांमध्ये चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानुसार धुळे शहरातील ग्राहक भांडारात पाचशे व हजारच्या जुन्या नोटा देऊन खरेदी करता येईल, असे ग्राहक भांडारचे अध्यक्ष अनिल मुंदडा यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ग्राहक भांडारमध्ये १४ नोव्हेंबरपर्यंत पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या माजी मंत्र्याविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळा गाजत असतानाच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेत घरकुल घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह त्यांचे भाऊ आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात राज्याचे रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल आणि काँग्रेस नेते माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यात वैर आहे. दोंडाईचा पालिकेची निवडणूक या दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची असल्याने त्यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. अशात दोंडाईचा घरकुल योजनेमध्ये शासनाची फसवणूक, स्वत:च्या फायद्यासाठी योजनेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, तत्कालिन नगराध्यक्ष रवींद्र भास्कर देशमुख, विक्रम बळीराम पाटील, गुलाबसिंग सुरतसिंग सोनवणे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल बाबाजी वाघ, राजेंद्र व्ही. शिंदे, अमोल प्रभाकर बागूल या ७ व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत.
दरम्यान, हा गुन्हा राजकीय सूडभावनेने दाखल करण्यात आरोप या घोटाळ्यातील संशयित आरोपी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी केला आहे. या प्रकरणी आपण अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले, तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रोजगार हमीमंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीठटंचाईने रात्र खराब!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

उत्तर भारतात आणि मुंबईत मिठाची टंचाई निर्माण झाल्याची अफवा शुक्रवारी रात्री धुळ्यात येऊन धडकली अन् रात्रीतून मीठ खरेदी करण्यासाठी होलसेल बाजार भागातील ऊस गल्लीत नागरिकांची गर्दी उसळली.

देशाच्या काही भागात मीठ टंचाईच्या धास्तीमुळे त्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असल्याचे वृत्त खासगी वृत्तवाहिन्यांवर दिसू लागताच आधीच नोटटंचाईने त्रासलेल्या धुळेकरांची एकच धावपळ सुरू झाली. होलसेल बाजारातील ऊस गल्लीत मीठ खरेदीसाठी गर्दी झाली. त्यातून वाद सुरू झाल्याने या भागात तणाव निर्माण झाला. या गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने बाजारात दाखल झाले. मीठ टंचाईची केवळ अफवा असल्याचे ते नागरिकांना सांगू लागले. पण त्यांचे काही एक न ऐकता नागरिकांनी मीठ खरेदीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर लाठीचार्ज करून शांतता निर्माण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट खरेदीत फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान ओढा परिसरातील जमिनीचा भाव वधारेल, असे आमिष दाखवत एकाकडून १८ लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्ह्यातील संशयित आरोपीविरोधात यापूर्वीदेखील आर्थिक फसवणूकप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

विजय नंदू वानखेडे (स्मिता अपार्ट. पाटील लेन १, कॉलेजरोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वानखेडेने जेलरोड परिसरातील आरंभ कॉलेजजवळील हरिवंदन अर्पाटमेंटमध्ये रहणाऱ्या मुकुंद रामदास रकटे यांची फसवणूक केली. एलआयसी एंजट म्हणून काम पाहणाऱ्या रकटे यांची २०१२ पासून वानखेडे याच्याशी ओळख आहे. वानखेडे एस.डी.एस. नावाची कंपनी चालवतो.

सन २०१४ मध्येच रकटे यांना वानखेडेने ओढा शिवारातील गट क्रमांक १५ मधील फ्लॅट क्रमांक १२ क्षेत्र तीन हजार चौरस मीटर हे विक्रीस असल्याबाबत सांगितले. सन २०१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या जमिनीला सोन्याचा भाव येईल, असा विश्वास संशयित आरोपीने रकटेंना दिला.

या जमिनीबाबत जेलरोड येथील उषा पाटील, किरण पाटील व उत्कर्षा पाटील यांनी जनरल मुख्यत्यारपत्र लिहून दिल्याचे वानखेडेने दाखवले. यामुळे विश्वास बसलेल्या रकटे यांनी २२ लाख ५० हजार रुपयांना व्यवहार ठरवला. त्यातील १८ लाख रुपये २७ मे २०१५ रोजी संशयित आरोपी वानखेडेला देण्यात आले. यावेळी नोटरी करण्यात आली. प्रत्यक्षात पैसे घेऊनही वानखेडेने उपरोक्त जमीन रकटे यांच्या नावावर केलीच नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर मिळकतीचे जनरल मुखत्यारपत्र वानखेडेने रद्द केले. वानखेडेला फसवणूक करायची होती, असे स्पष्ट झाल्यानंतर रकटे यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

दामदुप्पटमध्येही गुंतवली रक्कम

कंपनीमार्फत वानखेडेने गोट फार्मिंगमध्ये दामदुप्पट पैसे गुंतवणाऱ्यास दामदुप्पट पैसे देण्याची स्किम सुरू केली होती. या योजनेत रकटे यांनी एकदा सात लाख आणि पुन्हा चार लाख अशी रक्कम गुंतवली. सन २०१४ मध्ये या योजनेची मुदत संपली, तर अद्याप रकटे यांना पैसे मिळालेले नाही. या प्रकरणी वानखेडे विरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लढवय्या राणेखानाचे देवपूर

$
0
0

लढवय्या राणेखानाचे देवपूर

नाशिकच्या नसानसांत ऐश्वर्य अन्‌ शौर्य दडलेलं आहे. त्याच्या पाऊलखुणा गावागावांमध्ये आजही अनुभवयाला मिळतात. मात्र, या पराक्रमी आणि इतिहास घडविणाऱ्या रणधुरंधरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासात खितपत पडलेला दिसतो. त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर्यसंपन्न इतिहासाला पुनर्वैभव मिळवून देण्याची अन्‌ ते जपण्याची गरज आहे, असे सिन्नर तालुक्यातील देवपूर हे गाव पाह‌िलं की वाटायला लागतं. राणेखाणाचे शौर्य, भागवतबाबांची महती अन् शाहिरांची गुरूभूमी या इतिहासाने देवपूर सजले आहे. मात्र देवपूरचा हा प्रवास अस्वस्थ तर करतोच पण, नाशिकचा वारशाची स्थिती पाहून ह्दय पिळवटून टाकतो.

रमेश पडवळ

देवपूर अन् राणेखानाच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्यामुळे हा इतिहासही जाणून घेणे रोमांचक ठरते. १४ जानेवारी १७६१ ला अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचं तिसरं युद्घ झालं. या युद्धात नानासाहेब पेशव्यांबरोबर १२-१३ वर्षांचे अगदीच नवखे महादजी शिंदे सहभागी झाले होते. मात्र मराठ्यांचे पानिपत होऊ लागलं. ‘पानपतांत शेवटच्या दिवशीं जेव्हां उरलेले लोक पळाले, तेव्हां महादजीही परत फिरला. वाटेत एका पठाणानें त्याला डाव्या पायावर सांग मारून जन्माचा लंगडा केला असतां, राणाखान (राणेखान) नांवाच्या एका मराठे लष्करांतील माणसानें त्याला शेवटपर्यंत निभाऊन आणलें. त्याबद्दल खानास महादजीनें भाऊ मानून व पुष्कळ इनामें देऊन योग्यतेस चढविलें.’ असा उल्लेख इतिहासाच्या पानात मिळतो. राणेखान एक पखाली (पाणी वाहणारा) होता. जखमी अवस्थेतेतील महादजींना त्या धामधूमीतून राणेखानाने पुन्हा आपल्या मुलखात आणलं. राणेखानाच्या निष्ठेवर खूश होत त्याला इनाम म्हणून सिन्नर तालुक्यातल्या देवपूर, पिंपळवाडी, निमगांव, पास्ते गावची जहागिरीही दिली. राणेखानास देवनदीचा सहवास आवडल्याने त्याने वास्तवासाठी देवपूरची निवड केली. आतापर्यंत एवढाच राणेखानाचा इतिहास सांगितला जातो. मात्र राणेखानाच्या पराक्रमांची अनेक उदाहरणे इतिहासात नोंदविलेली आहेत.

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर १२ किलोमीटरवर देवपूर फाटा लागतो. या फाट्यापासून डावीकडे वळायचे अन्‌ पाच किलोमीटवर देवपूर गाव लागते. गावाजवळ येताच इंग्रजांनी बांधलेला दगडी बंधाऱ्यातून डोकावणारी देवनदी दर्शन देते. रस्त्यालगत दिसणारी मरीआई व खंडोबांचे मंदिर दर्शन देतात. अजून थोड पुढे जाऊन डावीकडे वळाल्यावर आपण गावाबाहेरच्या वेशीसमोर असलेल्या पारावर पोहोचतो. पारामागे लहानमोठी दोन-चार मंदिरे पहायला मिळतात. पखाल्याचा सरदार झालेला राणेखानाने देवपुराभवती कोट बांधत कोटात भव्य वाडावजा हवेली बांधली. कोटाला दोन दरवाजे आहेत. दोन्हींची अवस्था दयनीय आहे. त्यातल्या त्यात पारासमोरचा उत्तरदरवाजा अर्थात सध्याचा महात्मा गांधी प्रवेशद्वाराची स्थिती बरी आहे. तर बडाबागेकडे तोंड करून असलेला पश्च‌िम दरवाजा आता कोसळण्याच्या स्थितीत आहे. याची व हवेलीची सुंदर बांधणी मात्र खिळवून ठेवते. राणेखानाने हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही, असे मनोहर गडाख व भागवत गडाख सांगतात. याच धर्मसमभावाचे दर्शन घडवीत राणेखानाने गावात मशिद व त्याच्याच शेजारी हनुमान मंदिरही बांधले ते आजही पहायला मिळते. ते पुढे असेही सांगतात की, राणेखान हा प्रामाणिक अन्‌ निष्ठावान होता. आपल्याला मिळालेल्या सत्तेचा त्याने कधीही गैरवापर केला नाही. गावात प्रवेश करताना राणेखान वेशीबाहेरच घोड्यावरून उतरत अन्‌ हवेलीपर्यंत पायी चालत जात. यातून त्यांची प्रजेबद्दलची आपुलकी त्याने अनेक माध्यमातून दाखवून दिली होती. म्हणूनच त्याच्याबद्दलच्या अनेक चांगल्या अख्यायिका गायिल्या जातात. मशिदीसमोर अन्‌ देवनदीच्या काठावर उभी असलेल्या राणेखानाच्या चार मजली हवेलीने आता देह ठेवला आहे. मात्र हवेलीचे अवशेष आजही राणेखानाचा इतिहास जागा करतात. पानिपतच्या पराभवानंतर त्याचा बदला चुकवायला अकरा वर्षे लागली अन् तो बदला दिल्लीवर नियंत्रण मिळवित महादजी शिंदेंनी चुकता केला. यात त्यांना राणेखानाची मोलाची साथ मिळाली. अनेक लढाया अन्‌ कुरघोड्या मोडून काढण्यात राणेखान वस्ताद होते. १७८७ मध्ये जयपूरचा राजा प्रतापसिंग व महादजी शिंदे यांच्या लढाईत सरदार राणेखान सहभागी होता. महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानांत प्रबल झाला तेव्हा गुलाम काद‌‌िरच्या छळापासून बादशहाची मुक्तता करण्याकरिता इ. स. १७८८ साली राणेखानास दिल्लीस पाठविले होते. गुलाम का‌‌द‌िर व इस्मायलबेग यांनी दिलेला आग्र्याचा वेढा उठवून दोन्ही सैन्यांत २४ एप्रिल १७८८ रोजी भरतपूरजवळ झालेल्या लढाईत त्यांचा पराभव करण्यात १७८८ मध्ये सरदार राणेखानाचा पराक्रम मोठा होता. अनुपगीर गोसावी म्हणजे हिंमतबहादूर गोसावी. दिल्लीच्या शहाअलमने त्याला राजा हिंमतबहाद्दर ही पदवी दिली होती. कुरापतींसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुपगीरने गोसाव्यांचें एक छोटेसे सैन्य तयार केले होते. गोसाव्यांचा सरदार म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आपल्या कुरापतींमुळे अयोध्येचा नबाब, होळकर, बुंदेलखंडचा अलीबहाद्दर, नाना फडणिस, दत्ताजी शिंदे, जयपूरकर, जोधपूरकरकरांना देखील हैराण केले होते. अनुपगीरला शरण आणण्याची कामगिरी राणेखानाकडे सोपविण्यात आली. १७८९ मध्ये राणेखानाने त्याचा बंदोबस्त करीत पाटीलबाबास शरण आणले. तसेच बादशाहीला हैराण करणाऱ्या गुलाम कादिरच्या बंदोबस्तामुळे मराठ्यांची गेलेली पत व प्रतिष्ठा परत मिळून उत्तरेत त्यांचा वचक पूर्ववत बसला, हे श्रेय महादजी अर्थातच राणेखानाचेच. अलीगडचे पूर्वीचे नाव रामगड असून, नजीबखान रोहिल्याने ते बदलले असा उल्लेख गोविंदराव पुरूषोत्तम यांच्या १७८३ च्या पत्रात आढळतो. पत्रात ते म्हणतात, ‘नजीबखानानें ज्या रामगडचे अलीकडे अलिगड म्हणोन नांव ठेविले आहे, तेथें जाऊन किल्ला खालीं करून पादशाही (हिंदूशाही) अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे. (राजवाडे खंड. १२. ५०, ३६).’ असा उल्लेख मिळतो. हिंदू व मुस्लिम सत्तेत रण पेटले असताना राणेखान पादशाहीसाठी महादजी शिंदे बरोबर रणांगणात लढत होता. यावरून राणेखानाची महादजींबद्दलची निष्ठा समोर येते. राणेखानाच्या अशाच अनेक कामगिरींचा लेखाजोखा मात्र पडद्याआड राहिल्याचेही देवपूर पाहताना लक्षात येते. कारण तेथे हा पराक्रम सांगणारी माहिती मिळत नाही.

राणेखान २२ डिसेंबर १७९१ ला कायमचा देवपूरच्या मातीत एकरूप झाला. राणेखानाचा मृत्यू हा देखील अज्ञात इतिहास आहे. देवनदी काठावरील राणेखानाच्या महालाच्या प्रवेशद्वारासमोरच नदीपलीकडे राणेखानाने आपले आई-वडील अन्‌ नर्तकी यांच्या कबरीसाठी बडाबाग नावाची शाही कब्रस्तान तयार केली होती. या बडाबागेतच नंतर राणेखानाची दगडी बांधणीची व नक्ष‌ीकाम केलेली सर्वात मोठी व सुंदर कबर आज पहायला मिळते. बडाबागेला किल्ल्यासारखा पूर्व दरवाजा आहे. या दरवाज्यात उभे राहिले की, राणेखानाची हवेली दिसते. मात्र, बडाबागेभवतीचा भक्कम कोट पडला आहे. अनेक कबरींची नासधूस झालेली दिसते. राणेखानाची कबर एक मराठा-मुस्लिम वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. सुंदर कबरीची इमारत, कोरीव काम केलेले दरवाज्यांच्या कमानी, खिडक्या व नक्षीदार घुमट, त्यावरील नक्षीकाम, मनोरे, इमारतींना जोडणारी दगडी पायवाट अन्‌ दुर्लक्षित कारंजे पाहून मन हेलावते. या परिसराची सुंदरता म्हणजे प्रत्यक्ष अनुभवणेच योग्य. शांत परिसर अन् नदीकिनारी असलेली ही सुंदर समाधी राणेखानाचे व्यक्त‌िमत्त्वही उलगडते.

देवपूर बाबा भागवतांची संजीवनी समाधी गाववेशीतून आत गेल्यावर उजव्या हाताला आहे. समाधीवास्तू एखाद्या वाड्यासारखी दुमजली आहे. इमारतीच्या मध्यभागी बाबांचे समाधीस्थान आहे. बाबांचे सहाव्या पिढीतील वंशज दिगंबर महाराज व त्यांचे नातू प्रसाद भागवत मंदिराची व्यवस्था पाहतात. भागवत बाबा मूळचे नगरसूलचे. त्यांचे वडील महादेवबुवा व आई उमाबाई हे कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जात असताना गर्भवती असलेल्या उमाबाईंना देवपुरात पुत्र झाला. हाच पुत्र पुढे बाबा भागवत म्हणून प्रसिद्ध झाले. भागवत बाबांनी ग्रामस्थांच्या हितासाठी खूप कामे केली. त्यांची ख्याती ऐकून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्र्यंबकराव डेंगळ्यांच्या हस्ते बाबांसाठी त्या काळात दोन हजार रुपये व वस्त्रं पाठविली. मात्र बाबांनी ती नाकारत ते धन ग्रामस्थांसाठी उपयोगात आणले. फर्दापूर हे गाव भागवत बाबांना इनाम म्हणून मिळाले होते. वावी गावातून कीर्तन शिकण्यासाठी भागवत बाबांकडे आलेल्या परशरामाला बाबांनी तू शाहीर असल्याची जाणीव करून देत मार्गदर्शन केले. पुढे तोच शाहीर परशराम म्हणून प्रसिद्ध झाला. या शाहिरांनी देखील आपले गुरू म्हणून बाबा भागवतांचा उल्लेख केला आहे. म्हणूनच शाहीर अमर शेख यांनी गावात १९५५ ला शाहीर संमेलन घेतले होते. या संमेलनात दोनशे शाहीर सहभागी झाले होत अन् हे संमेलन दोन महिने सुरू होते. ही नोंद देखील देवपूरच्या इतिहासातील एक अनोखे पान आहे. गावात १९६० पासून बोहाड्यांची परंपराही बंद झाली आहे. गावात अनेक मंदिरे आहेत. पण पारावर भेटलेले निवृत्त नौदल कर्मचारी प्रभू कांबळेंच्या विक्रांतवरील सेवेचे अनुभव ऐकताना नतमस्तक व्हायला होतं.

देवपूर गावाला राजकीय दृष्ट्याही महत्त्व आहे. नंतरच्या काळात देवपूरवर कम्युनिस्टांचा प्रभाव दिसतो. कम्युनिस्टांचे व नाना गडाखांचे देवपूर म्हणून गावाला ओळख आहे. मात्र हा वारसाही पुसट होत आहे. ऐतिहासिक, धार्मिक अन् राजकीय वारसा अंगभूत असलेल्या देवपूरचा देव्हारा मात्र आता रिकामा वाटतो. देवपूरकडे कोणीच लक्ष देत नाहीत, असे म्हणण्यापेक्षा आमचे देवपूर आम्हीच जपू, अशी इच्छाशक्तीही निर्माण होणे गरजेचे आहे. राणेखानाचे ऐश्वर्य, भागवतबाबांची महती अन्‌ शाहिरांची भूमी विस्कटलेली पाहून डोळे भरून येतात. देवपूरचा इतिहास मातीमोल होणार आहे का? हा प्रश्न मन पिळवटून टाकतो.

Ramesh.padwal@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रांगा वाढल्या, पैसे घटले

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध बँकांमध्ये शनिवारी शासकीय, तसेच आैद्योगिक साप्ताहिक सुटीमुळे नोटा बदलण्यासाठी व डिपाॅझिट करण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून आली. सकाळपासूनच बँकांसमोर मोठ्या रांगा लागल्यामुळे तिसऱ्या दिवशी बँकांवर प्रचंड ताण आला. ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर दोन दिवस झालेल्या गर्दीपेक्षा तिसऱ्या दिवशीची गर्दी प्रचंड होती. रांगा वाढल्या, पैसे घटले अशी स्थिती शहरभर दिसून आली. आज, रविवारी (दि. १३)सुद्धा गर्दीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे बँकांकडून शनिवारीच त्यासंदर्भातील नियोजन करण्यात येत होते.

शनिवारी सकाळपासून सुरू झालेली गर्दी कमी होत नसल्यामुळे अखेर अनेक बँकांनी टोकन सिस्टिम सुरू करून ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी यावे, असा अाग्रह धरला. त्यासाठी स्वतंत्र काउंटर उघडण्याची तयारीसुद्धा दाखवली. पण, काही ठिकाणी ग्राहकांनी बँकांचे म्हणणे एेकले, तर काही ठिकाणी ग्राहकांनी लगेचच पैसे देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे बँकेपुढेही पेच निर्माण झाला.

कॅश शाॅर्टेजचा प्रश्न

ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे शनिवारी ठिकठिकाणी बँकांमध्ये कॅश शाॅर्टेजचा प्रश्न निर्माण झाला. पण, काही बँकांनी सायंकाळी उशिरापर्यंत पैसेवाटप करून डिपाॅझिटही केेले. त्यामुळे ग्राहकांची नाराजी दूर होण्यास मदत झाली.

काउंटिंग मशिन हिट

सतत कॅश काउंटिंग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या मशिन हिट झाल्याचा प्रश्नही काही बँकांत उपस्थित झाला. त्यामुळे बँकांनी त्यावर उपाय शोधत काही काळ कॅश हाताने मोजल्याचे प्रकारही घडले. पण, हा प्रश्न सर्वच बँकांना डोकेदुखी ठरू लागला असून, त्याबाबतच्या तक्रारी मुख्यालयात येऊ लागल्या आहेत.

बँक कर्मचारी त्रस्त

गेल्या तीन दिवसांपासून बँकांत वाढत असलेली गर्दी व वाढवलेल्या वेळामुळे बँक कर्मचारी त्रस्त झाले आहे. ग्राहकांशी वादावादी, माहितीसाठी वारंवार विचारले जाणारे तेच तेच प्रश्न यामुळे त्यात भर पडली आहे. सुटीच्या दिवशी बँक सुरू ठेवणे व त्यात रात्री उशिरापर्यंत बँकेत हिशेबाचा ताळमेळ घालणे हे काम अंगावर आल्यामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. सोमवारी सुटी जाहीर झाली असली, तरी ती रद्द झाल्यास त्यांच्यावर पुन्हा ताण पडणार आहे.

स्पेशल काउंटर वाढवणार

स्टेट बँकेने कॅश एक्स्चेंजसाठी स्पेशल काउंटरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे डिपाॅझिट व नोटा बदलण्यासाठी स्वतंत्र लाइन करण्यावरही बँक विचार करीत आहे. त्यामुळे गर्दीत कमी होण्यासही ताणही कमी होईल, असे बँकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

स्पेशल व्हेईकल रवाना

कॅश आणण्यासाठी बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेकडे स्पेशल व्हेईकल रवाना झाल्या असून, त्यातून पुरेशी कॅश येणार आहे. त्यामुळे बँकेचा ताण काहीअंशी कमी होणार आहे. दोन हजार व शंभराच्या नोटांबरोबरच आता ५०, २० व १० च्या नोटाही देण्यात येणार आहेत. त्यामुळे चलन फिरण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापनाकडे तक्रारींचा ओघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने समस्यांच्या विळख्यात अडकलेले नागरिक अजूनही बाहेर पडू शकलेले नाहीत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तक्रारींचा ओघ कायम असून, आमच्या समस्या सोडवा, असे साकडेच या विभागाला घातले जाऊ लागले आहे. शनिवारी दिवसभर या विभागाचा दूरध्वनी तक्रारींमुळे खणखणत होता.

पाचशे आणि हजाराच्या नोटा पेट्रोलपंप, हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स यांसारख्या ठिकाणी वटविण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही बँका, टपाल कार्यालये येथील गर्दी कमी होण्याची ‌चिन्हे नाहीत. शनिवारी सरकारी सुटीच्या दिवशीही बॅँका तसेच टपाल कार्यालयांमधील व्यवहार सुरू होते. शनिवारी औद्योगिक वसाहतीला सुटी असल्याने बँकेत पाचशे आणि हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी, तसेच नोटा बदलून घेण्यासाठी कामगारवर्गाने मोठी गर्दी केली. मात्र आजही बॅँका, तसेच टपाल कार्यालयांत उपलब्ध नोटा संपल्याने त्या ‍मिळू न शकल्याचा अनुभव नागरिकांना आला. याबाबतचे गाऱ्हाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अनेकांनी मांडले.

सातपूर आयटीआय पुलाजवळील हॉस्पिटलमध्ये पाचशेच्या नोटा स्वीकारत नसल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकाने केली. सातपूर, मुंबई नाका परिसरात एटीएम सेंटर्स बंद असल्याच्या तक्रारी या विभागाला प्राप्त झाल्या. पंचवटीत मेडिकल स्टोअर्समध्ये पाचशे आणि हजाराच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत. काही खासगी बँकांनीदेखील खातेदार नसलेल्या नागरिकांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली. सेंट्रल बँकेच्या नाशिकरोड शाखेबाहेर नागरिकांना धक्काबुक्की करण्यात आल्याची एका नागरिकाने तक्रार केली. काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने तशी माहिती या विभागाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. संबंधित ठिकाणी पोहोचून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दिवसागणिक नागरिक आपत्ती व्यपस्थापनाकडे तक्रारींचा ओघ वाढत आहे. यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेला दोन दिवसांत बारा कोटींची लॉटरी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्या असल्या, तरी कर भरण्यासाठी या जुन्या नोटांचा पर्याय राज्य सरकारने उपलब्ध करून दिल्याचा नागरिकांनी चांगलाच लाभ घेतला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांपोटी दोन दिवसांत पालिकेच्या तिजोरीत तब्बल बारा कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. शुक्रवारी नऊ कोटी ५० लाख, तर शनिवारी दीड कोटीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत पडल्याने पालिका दोन दिवसांत मालामाल झाली आहे. कर भरण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ केली असली, तरी शनिवारी वसुलीला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र होते.

महापालिकेने विविध करांचा भरणा पाचशे व हजारांच्या नोटांद्वारे स्वीकारण्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारी व शनिवारी महापालिकेवर हजार व पाचशेच्या नोटांचा अक्षरशः पाऊस पडला. शुक्रवारी एका दिवसात पालिकेच्या तिजोरीत घरपट्टी व पाणीपट्टीपोटी नऊ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. सरकारने कर भरण्यासाठी जुन्या नोटांची मुदत आणखी तीन दिवस वाढवल्याने महापालिकेने शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस कर स्वीकारण्याची व्यवस्था केली. परंतु, शनिवारी मात्र या वसुलीला थंड प्रतिसाद मिळाला. शुक्रवारच्या मानाने शनिवारी मात्र नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली असली, तरी करदात्यांची संख्या रोडावली होती. रविवार व सोमवार असे दोन दिवस त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

शनिवारी दिवसभरात घरपट्टीतून पालिकेला एक कोटी चार लाख रुपये मिळाले, तर पाणीपट्टीतून ३२ लाख रुपये मिळाले आहेत. एमटीएस विभागाला दिवसभरात १९ लाख रुपये मिळाले. पहिल्या दिवशी महापालिकेला ६५ लाख, दुसऱ्या दिवशी साडेनऊ कोटी, तर तिसऱ्या दिवशी दीड कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अडीच दिवसांत महापालिकेची तब्बल बारा कोटींची कमाई झाली आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस अजून वसुली सुरू ठेवण्यात आली असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारपासून जप्तीची कारवाई

घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध करांपोटी दोन दिवसांत पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडल्याने महापालिका मालामाल झाली आहे. कर भरण्यासाठी राज्य सरकारने मुदतवाढ दिल्याने दोन दिवसांत अाणखी मोठ्या प्रमाणात करभरणा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवार (दि. १५)पासून महापालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. घरपट्टी थकविणाऱ्यांवर मालमत्ता जप्तीची, तर पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर पाण्याचे कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.


विभागनिहाय स्थिती अशी

विभाग घरपट्टी (रुपये) पाणीपट्टी (रुपये)

सातपूर ७ लाख ६४ हजार ३ लाख ६० हजार

नाशिक पश्चिम १६ लाख ८६ हजार ३ लाख ४३ हजार

नाशिक पूर्व २० लाख १९ हजार ३ लाख ३६ हजार

पंचवटी २२ लाख ६ हजार ७ लाख ४३ हजार

नवीन नाशिक १७ लाख ४१ हजार ९ लाख ८ हजार

नाशिकरोड १७ लाख ३६ हजार ४ लाख ३६ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराच्या रणधुमाळीस प्रारंभ

$
0
0

मनमाडमध्ये भाजप, तर सटाण्यात राष्ट्रवादीची प्रचार रॅली

टीम मटा

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी निवडणूक चिन्हांचे वाटप झाले असून, प्रचाराला सुरुवातही झाली आहे. मनमाडमध्ये भाजपने, तर सटाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचार रॅली काढून मतदारांना आपल्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. सिन्नर, येवला, नांदगाव व भगूरमध्येही उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे.

नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनमाड शहरात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कुसूम अरविंद दराडे यांच्यासह प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री निलमणी गणेश मंदिरात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी आमदार संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, ज्येष्ठ नेते उमाकांत राय, माजी उपनगराध्यक्ष नारायण फुलवाणी, कांतीलाल लुणावत, निळकंठ त्रिभूवन, जिल्हा संघटन सरचिटणीस बापूसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, जिल्हा चिटणीस नारायण पवार, मनमाड शहर भाजप अध्यक्ष जय फुलवाणी, माजी नगरसेवक सचिन दराडे आदी उपस्थित होते. यानंतर मुख्य रस्त्यावरून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतिवीर वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे आदी मान्यवरांच्या पुतळ्यास खासदारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रचार रॅलीनंतर प्रभाग सहा व दहामधील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

माजी आमदार संजय पवार यांनीदेखील भाजप जनतेचा विश्वास नक्की मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपने थेट नगराध्यक्षासह जनतेची सेवा करणारे स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे भाजप जनतेने दाखविलेल्या विश्वासात खरा उतरेल, असा विश्‍वास जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्यांच्या अभावामुळे नागरिक हतबल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकाळपासूनच बँकांसमोर लागलेल्या रांगा, तासन् तास उभे राहून थकलेले चेहरे, नोटा बदलून घेण्याची, पैसे डिपॉझिट करण्याची घाई अन् नवीन नोटा हातात मिळाल्याचा आनंद, असे चित्र सध्या सर्वत्रच दिसून येत आहे. चलनातील नवीन प्रकारच्या नोटा मिळाल्याने अनेकांच्या आनंदाला पारावार न उरल्याचे चित्रही यानिमित्ताने दिसून आले. परंतु, व्यवहारासाठी सुट्या पैशांचाच अभाव असल्याने या आनंदावर पाणी पडले असून, अनेक जण हतबल झाले आहेत.

काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असून, दैनंदिन व्यवहारावर त्याचा मोठा प्रमाणात झाला आहे. काही दिवसांपूर्वी या नोटेला असणारे महत्त्व नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयाने क्षणात घसरले. नोटांचे मूल्य जरी तेच असले तरी व्यवहारासाठी या नोटा पूर्णतः नाकारल्या जात असल्याच्या सत्याला आता सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अगदी किरकोळ वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकांचे हात बांधले गेले आहेत.

अनेकांनी तत्परता दाखवत बँक उघडण्यापूर्वी रांगा लावून नवीन नोटा मिळवल्या. परंतु, बाजारात या नोटा स्वीकारून त्या बदल्यात देण्यासाठी सुटे पैसेच नसल्याने ग्राहक व विक्रेते दोघांमध्ये प्रचंड हतबलता निर्माण झाली आहे. पाचशे किंवा दोन हजार रुपयांच्या नोटेपेक्षा दहा, वीस, पन्नास, शंभर रुपयांच्या नोटाच त्यामुळे मोलाच्या ठरत असून, या नोटांचे मूल्यच सध्या वाढले आहे.

पैशांचा अभाव असला, तरी जीवनावश्यक गरजा भागविणे प्रत्येकासाठीच आवश्यक असते. घरातील कर्त्या व्यक्तीपुढे या गरजा भागविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. किराणा, दूध, औषधे यांचे बिल भरण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने उधारीतील व्यवहार वाढत आहेत. आवश्यक वस्तू घेऊन जा, पैसे नंतर द्या, अशी भूमिका परिचयातील दुकानदारांनी घेतली असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, अशा उधारीतील व्यवहार यातून वाढतो आहे.

---

देशाच्या व प्रामाणिक देशवासीयांच्या चांगल्या भविष्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिस्थितीत संयम बाळगून काम करणे आवश्यक आहे. सरकारने पुरेसा वेळ आपल्याला दिला आहे, त्यामुळे घाई न करता, घाबरून न जाता या परिस्थितीला सामोरे जावे. हा निर्णय घेणे काळाची गरज असल्याने त्याला सहकार्य करणे गरजेचे आहे.

-डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ

--

नोटांमध्ये बदल हा चांगलाच निर्णय आहे. या निर्णयाला पाठिंबा देत सहकार्य करणे आवश्यक आहे. पूर्वसूचना नसल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. जी समस्या सध्या जाणवते आहे ती तात्पुरती आहे. हा निर्णय चांगल्या परिणामांसाठीच असल्याने प्रत्येकानी मानसिकदृष्ट्या तयार राहून या परिस्थितीला समोर जावे.

-अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर

--

या परिस्थितीला प्रत्येक नागरिकाने शांततेने सामोरे जाण्याची गरज आहे. आज जरी या निर्णयाची समस्या जाणवत असली, तरी यातून उज्जवल भविष्य उजाडणार आहे. लवकरच ही परिस्थिती सुधारेल. राजकीय नेत्यांनी या परिस्थितीत तारतम्य बाळगावे. हा विषय राजकारणात ओढून नागरिकांची दिशाभूल करू नये.

-दिलीप फडके, ग्राहक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांसाठी झाली पक्षांची दमछाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने रंगतदार सामना शहरवासीयांना बघावयास मिळणार आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी सामना होत असून, प्रभागातील २१ जागांसाठी सुमारे ९२ उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील सर्वच प्रभागात उमेदवार देत असताना राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांची दमछाक झाली. भाजप वगळता कुठल्याच पक्षाला सर्व प्रभागात उमेदवार देता आले नाहीत.

सटाणा नगरपरिषदेच्या यंदाच्या या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदामुळे नगरसेवकांचे मूल्य कमी झाल्याचा परिणाम की पालिका राजकारणात आपले काम नाही या भावनेतून अनेक सामाजिक व राजकीय पटलांवर कामे करित असलेल्या धुरिणांनी लांब राहाणे पसंत केल्याने सर्वच पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ येऊन ठेपली होती. थेट नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी सामना होत असून, काँग्रेसने तब्बल महिनाभर अगोदरच अ‍ॅड. विजय पंडितराव पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रवादीने विद्ममान गटनेते बाळासाहेब रौंदळ, भाजपने राष्ट्रवादीतून दाखल झालेले माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांना, तर शिवसेनेने युतीचा काडीमोड घेत ऐनवेळी अरविंद सोनवणे यांना रिंगणात उतरविले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील मोरे यांनी सटाणा शहर विकास आघाडी निर्मिती केल्याने पंचरंगी सामना या ठिकाणी रंगणार आहे.

थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असताना पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपचे डॉ. विलास बच्छाव, रमेश देवरे यांनी माघार घेतली, तर राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे यांनादेखील माघार घ्यावी लागली. विद्यमान पाच नगरसेवक या निवडणूक रिंगणात असून, यात राष्ट्रवादीकडून विद्यमान नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण, सुशीला रौंदळ, सुमनबाई सोनवणे, भारत काटके, भाजपकडून गटनेते साहेबराव सोनवणे यांचा समावेश आहे. तर आठ माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरले असून, यात कांतीलाल चव्हाण, किशोर कदम, दत्तू सोनवणे, रामदास सोनवणे, पांडुरंग सोनवणे, अनिल सोनवणे, कुसुम सोनवणे, विश्वास जोशी यांचा समावेश आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीवरही नामुष्की

शहरातील दहा प्रभागांतील २१ उमेदवार देत असताना भाजप वगळता सर्वच पक्षांना मोठ्या प्रमाणात उमेदवारांची शोधमोहीम राबवावी लागली. काँग्रेसला दहा प्रभागांतून २१ उमेदवार देत असताना अवघे १२ उमेदवार उभे करण्यात यश आले आहे. यामुळे त्यांनादेखील बहुतांश प्रभागात उमेदवार मिळाले नाहीत. राष्ट्रवादीलादेखील २१ पैकी १९ उमेदवार अधिकृत देताना प्रभाग सातमध्ये दोघाही उमेदवारांना पुरस्कृत करावे लागण्याची नामुष्की ओढावली आहे.

शिवसेनेचे ११ उमेदवार रिंगणात
भाजप शिवसेना युतीचा काडीमोड झाल्याने शिवसेनेलादेखील ऐनवेळीस सर्वच जागांवर उमेदवार देताना शोधाशोध करावी लागली. यामुळे शिवसेनेने २१ पैकी अवघे ११ उमेदवार रिंगणात उतरविले असून, एका उमेदवाराला पुरस्कृत करण्यात आले आहे. मात्र भाजपने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

शहर विकास आघाडीही अपयशी

सटाणा शहर विकास आघाडीचा मोठा गाजावाजा केला जात असताना आघाडीचे निमंत्रक सुनील मोरे यांनादेखील सर्वच प्रभागात उमेदवार देण्यास अपयश आले. शहर विकास आघाडीने सात प्रभागातून १४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मतदार राष्ट्रवादीच्याच पाठीशी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपालिकेच्या माध्यमातून सटाणा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तब्बल दहा वर्षे पालिकेत स्वच्छ व पारदर्शी कारभार केल्यामुळे सटाणा शहरवासीय सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी व्यक्त केला.

सटाणा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात वाढविण्यात आला. त्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पगार बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपिका चव्हाण होत्या. अ‍ॅड. पगार पुढे म्हणाले की, सटाणा शहरातील रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा अत्यंत सुयोग्य पद्धतीने पालिका प्रशासनाने सोडविल्या आहेत. हे सर्वसामान्य जनतेला जाणीव आहे. यामुळे काका रौंदळ यांच्यासह सर्व उमेदवारांना शहरवासीय विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार दीपिका चव्हाण यांनी सटाणा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करीत गत दोन वर्षांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये विकास निधी पालिका प्रशासनाला मिळवून देत विकासकामांना चालना दिल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी आमदार संजय चव्हाण, नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब रौंदळ, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शेतकरी नेते जिभाऊ सोनवणे यांची भाषणे झाली. डॉ. व्ही. के. येवलकर, पईम शेख, जनार्दन सोनवणे, मोहन सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, सुलोचना चव्हाण, शिवाजी रौंदळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संपूर्ण शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचार रॅली काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये सेनेचा स्वबळाचा नारा

$
0
0

निफाड तालुुका सेनेच्या बैठकीतील सूर

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भाजप हा धोकेबाज पक्ष असून, आपली ताकद दाखवून देण्याची आता संधी आली आहे. ग्रामीण भागातील जनताही शिवसेनेला मतदान करण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती करू नये, असा सूर निफाड येथे आयोजित शिवसेनेच्या बैठकीत दिसून आला. विशेष म्हणजे संपर्कप्रमुख सुहास सावंत यांनीही राज्यात काहीही होवो, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांच्या भावना कळवून नाशिक जिल्ह्यात स्वबळावर लढण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे सांगितले.

आमदार अनिल कदम यांनी निफाड तालुक्यात होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुका शिवसेनेची तातडीची बैठक मार्केट कमिटी सभागृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख उत्तम गडाख आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात काँग्रेसचे भास्कर बनकर, शेतकरी नेते राजेंद्र डोखळे, बाळासाहेब क्षीरसागर, संदीप टर्ले यांची उपस्थिती चर्चेचा विषय होती.

गेल्या निवडणुकीत सर्वात जास्त सेनेच्या जागा पाच जागा निफाड तालुक्यात निवडून आल्या. पंचायत समितीची सत्ता थोड्या फरकाने गमवावी लागली. त्याची सल अजून असून, या निवडणुकीत पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी आतापासून तयारी करायची आहे. येत्या काळात होणाऱ्या विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी गटनिहाय मेळावे होणार आहेत. या मेळाव्यात सविस्तर चर्चा होतील, असे आमदार अनिल कदम यांनी सांगितले. संपर्कप्रमुख सुहास सावंत यांनी, तिकीट देताना पक्षनिष्ठा हा निकष राहणार असून, निवडून येण्याची क्षमताही पाहिली जाणार असल्याचे सांगत पक्षात प्रवेश करणाऱ्यांचाही तिकिटासाठी विचार होईल, असे सूतोवाच केले.

मित्रासाठी आलो!

या मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी मनोगतातून तिकीट देताना पक्षनिष्ठा आणि काम याचा विचार व्हावा, असे सांगितले. यावेळी राजेंद्र डोखळे व भास्कर बनकर यांनी शिवसेनेच्या तिकिटासाठी आम्ही या व्यासपीठावर आलो नाही, असे स्पष्ट करीत गेल्या दोन निवडणुकांत आम्ही पक्ष बाजूला ठेऊन केवळ मित्र म्हणून आमदार अनिल कदम यांच्यासाठी काम केल्याची कबुली दिली. आमच्या या त्यागाचीही कार्यकर्त्यांनी दखल घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधार’ने पेटविल्या ‘त्यांच्या’ चुली...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर एकीकडे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची बँकांत गर्दीत होत आहे. दुसरीकडे मात्र काही काळाबाजारींनी झोपडपट्ट्यांतील आधारकार्ड असलेल्या महिला व युवकांना बँकांतून नोटा बदलून आणून देण्याच्या बदल्यात हजारी शंभर ते दोनशे रुपये देण्याचे अामिष दाखवत काही प्रमाणात आपला ब्लॅक मनी सुलभरीत्या बँकेतून बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. या प्रकारामुळे केवळ आधारकार्ड असल्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांच्या चुली पेटल्याचे दिसून आले.

चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रुपयांचा नोटा घेत काही काळाबाजारींनी झोपडपट्ट्यांत जाऊन नोटा बँकांतून नोटा बदलून आणून देण्याच्या बदल्यात हजारी शंभर ते दोनशेची रुपयांची ऑफर देत काळ्याचे पांढरे करवून घेतले. केवळ आधारकार्ड व पॅन कार्ड बघून येथे जुन्या नोटा सुलभतेने बदलून दिल्या जात होत्या त्या स्टेट बँक, पोस्ट ऑफीस आदी ठिकाणी अशा काळाबाजारींनी झोपडट्ट्यांतील गोरगरीब महिला-युवकांना नेऊन बदलून आणलेल्या नवीन नोटांच्या बदल्यात त्यांना हजारी शंभर ते दोनशे रुपये दिल्याचे आढळून आले.

नोटा बदलामुळे दोन दिवसांपासून रोजगार बुडून चुलीदेखील पेटल्या नाहीत, अशा काही गरीब महिला व युवक काळाबाजारींच्या अामिषाला बळी पडल्याचे दिसून आले. बेरोजगार युवक आधारकार्डचा वापर जुन्या नोटा बदलून आणून देण्यासाठी तयार झाल्याचे एका युवकाने सांगितले. टॅक्स फ्री असलेली दोन लाखांची रक्कम बँक खात्यात जमा करून हा काळा पैसा व्हाइट करून देण्याचीही ऑफर मिळत आहे, तर बँक खात्यात अथवा बिगर खात्यात आधारकार्डच्या मदतीने नोटा बदलून घेण्याच्या प्रकारांना सुरुवात झाल्याची चर्चा उघडपणे रंगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आल्या ५०० च्या ५० लाख नव्या नोटा

$
0
0

तुषार पवार, नाशिक

चलनाच्या अभावाने नागरिक त्रस्त असताना नाशिकमधील प्रतिभूती मुद्रणालयाने दिलासा देणारी बातमी दिली आहे. नाशिकमधील या प्रेसने रिझर्व्ह बँकेला ५०० च्या ५० लाख नव्या नोटांची पहिली खेप पाठवली आहे. ५० लाख नोटांची दुसरी खेप बुधवारी पाठवण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याऱ्या नऊ प्रेसपैकी नाशिकची एक प्रेस आहे. या प्रेसमध्ये २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या जातात.

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा बाद केल्यानंतर २००० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आल्या. पण ५०० रुपयाच्या नव्या नोटा चलनात यायच्या होत्या. यामुळे व्यवहारात आणि नोटा बदलवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. आता ५०० रुपयाच्या नव्या नोटा प्रेसमध्ये छापून पाठवण्यात आल्याने त्या चलनात येणार आहेत. यामुळे चलनाची कमतरता दूर होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने आधीच आपल्या म्हैसूर आणि पश्चिम बंगाल येथील सलबोनीच्या प्रेसमधून ५०० च्या नव्या नोटा छापल्या आहेत. याशिवास नाशिक आणि मध्य प्रदेशातील देवासमधल्या प्रेसमधूनही ५०० च्या नव्या नोटांची छपाई सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ५०० रुपयाच्या ४० कोटी नोटा छापण्याचे टार्गेट या प्रेसना रिझर्व्ह बँकेने दिले आहे. दोन आठवड्याआधीपासून या नोटांची छपाई सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आल्या ५०० च्या ५० लाख नव्या नोटा

$
0
0

तुषार पवार, नाशिक

चलनाच्या अभावाने नागरिक त्रस्त असताना नाशिकमधील प्रतिभूती मुद्रणालयाने दिलासा देणारी बातमी दिली आहे. नाशिकमधील या प्रेसने रिझर्व्ह बँकेला ५०० च्या ५० लाख नव्या नोटांची पहिली खेप पाठवली आहे. ५० लाख नोटांची दुसरी खेप बुधवारी पाठवण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

रिझर्व्ह बँकेच्या नोटा छापण्याऱ्या नऊ प्रेसपैकी नाशिकची एक प्रेस आहे. या प्रेसमध्ये २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापल्या जातात.

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा बाद केल्यानंतर २००० रुपयाच्या नव्या नोटा चलनात आल्या. पण ५०० रुपयाच्या नव्या नोटा चलनात यायच्या होत्या. यामुळे व्यवहारात आणि नोटा बदलवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. आता ५०० रुपयाच्या नव्या नोटा प्रेसमध्ये छापून पाठवण्यात आल्याने त्या चलनात येणार आहेत. यामुळे चलनाची कमतरता दूर होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने आधीच आपल्या म्हैसूर आणि पश्चिम बंगाल येथील सलबोनीच्या प्रेसमधून ५०० च्या नव्या नोटा छापल्या आहेत. याशिवास नाशिक आणि मध्य प्रदेशातील देवासमधल्या प्रेसमधूनही ५०० च्या नव्या नोटांची छपाई सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ५०० रुपयाच्या ४० कोटी नोटा छापण्याचे टार्गेट या प्रेसना रिझर्व्ह बँकेने दिले आहे. दोन आठवड्याआधीपासून या नोटांची छपाई सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images