विविध मागण्यांसाठी जिल्हाभरात एकदिवसीय आंदोलन
टीम मटा
विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील ग्रामसेवक व तलाठी संघटनांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. शासनाने आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सिन्नरमध्ये इशारा
सातबारा संगणकीकरण व ई फेरफारमधील सॉफ्टवेअर, सर्व्हर, नेट कनेक्टीव्हिटीमध्ये सुधारणा कराव्या यांसह आदी मागण्यांसाठी सिन्नर तालुका तलाठी संघाच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने मागण्या मान्य न केल्यास १६ नोव्हेंबरपासून राज्यातील तलाठी मंडल अधिकारी व तलाठी सेवावर्गातील अव्वल कारकून हे बेमुदत सामूहिक रजेवर जातील, असा इशारा देण्यात्र आला आहे.
सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला तलाठी संघाचे जिल्हा खजिनदार संजय गाडे, तालुकाध्यक्ष जितेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मनोज खैरनार यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की सिन्नर तालुका २२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन करण्यात आला. मात्र त्यामध्ये अनेक त्रूटी असल्याने तलाठ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. त्यामुळे सातबारा संगणीकरण व ई फेरफारमधील सॉफ्टवेअर, सर्व्हर, नेट कनेक्टीव्हिटी इत्यादींमध्ये सुधारणा कराव्यात. शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाइन वेळेत मिळावा, नागरिकांच्या फेरफार नोंदी मुदतीत होण्यासाठी सॉफ्टवेअरमधील त्रूटी दूर कराव्यात, ऑनलाइनसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या चकरा कमी करण्यासाठी तांत्रिक सुधारणा कराव्यात यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न केल्यास १६ नोव्हेंबरपासून राज्यातील तलाठी मंडल अधिकारी व तलाठी सेवावर्गातील अव्वल कारकून हे बेमुदत सामूहिक रजेवर जातील, असा इशारा देण्यात्र आला आहे.
यावेळी विष्णू गोसावी, आर. टी. पाटील, एस. पी. सोनवणे, के. डी. गांगुर्डे, शीतल पाटील, एस. जी. गाडे, राहुल देशमुख, स्वरूप गोराणे, आकाश हांडे, पांडुरंग गोळेसर, माणिक गाडे, लक्ष्मण हरणे यांच्यासह अन्य तलाठी, मंडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वरमध्ये धरणे
त्र्यंबकेश्वरमध्ये सोमवारचा दिवस हा आंदोलनाचा दिवस ठरला. पंचायत समिती प्रांगणात ग्रामसेवकांनी, तर तहसील कार्यालयात तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले.
ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोहर सागर यांनी हे राज्यव्यापी आंदोलन असून, ही सुरुवात असल्याचे सांगितले. जिल्हा आणि विभागीय आंदोलनानंतर दि. १७ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे सेवाकाळ तत्काळ नियमित करणे, सोलापूर जिल्ह्यात २३९ ग्रामसेवकांवर झालेली चुकीची कारवाई रद्द करणे, दरमहा ३००० रुपये प्रवासभत्ता मंजूर करणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्मित करणे, या सोबतच आणखी १५ मागण्या ग्रामसेवकांच्या आहेत.तलाठ्यांनीदेखील संगणीकृत सातबारा फेरफार नोंदीबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करणे, अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठीवर्गास वगळणे आदींसह आणखी सात मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत मंडलाधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी माहिती दिली.
कळवणलाही आंदोलन
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित व न्यायप्रश्नांची सोडवणूक न झाल्याने ग्रामसेवक संघटनेतर्फे कळवण पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ग्रामसेवक युनियन शाखा कळवण तालुका सहभागी होत असल्याची माहिती ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष पांडुरंग खिल्लारी, सचिव विजय देवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली. यावेळी गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सहायक गटविकास अधिकारी शिवाजी जाधव, विस्तार अधिकारी बाबा सूर्यवंशी, आर. बी. आहिरे, ग्रामसेवक मीना जगताप, जे. बी. जाधव, के. पी. सूर्यवंशी, रुपाली सोनवणे, आसिफ शेख, भास्कर बागूल, एम. बी. पवार, रवी ठाकरे, आशा गोराणे आदींसह ग्रामसेवक उपस्थित होते.
निफाडमध्ये निवेदन
विविध मागण्यांसाठी निफाड तालुका तलाठी संघाने निफाड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तालुक्यातील सर्व तलाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शांताराम पवार यांना देण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष दौलत नागरे, उपाध्यक्ष बाळासाहेब निफाडे, सरचिटणीस महेश हिरे, सहचिटणीस चंद्रकांत पंडित, एस. एस. गंगोडे, महेश गायकवाड, के. एम. पवार, पी. पी. देशमुख, मंडळ अधिकारी नगरकर सहभागी झाले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट