म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भगवान बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली सत्याचे ज्ञान झाले, त्याचा स्पर्श व्हावा म्हणून गेलो असता त्या अश्वत्थ वृक्षाची सळसळ ऐकून ही आपण पूर्वी कोठेतरी ऐकल्याचे स्मरले आणि लख्ख प्रकाश पडला, की ही सळसळ म्हणजेच कुसुमाग्रज. त्यांनी नाशिकला ज्ञानवंत बनवले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने शनिवारी पुरस्कार वितरण करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहाणे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, की तात्यासाहेबांचा पिंड विश्वात्मक होता. त्यांनी लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. नाशिकचा भावनिक कायापालट केला. सांस्कृतिक, सामाजिक बदल घडण्यास ते कारण ठरले. तात्यासाहेबांची विश्वात्मकता पुढे सरकली. त्यांनी मराठी नाटकांना संजीवनी दिली. अनेक नाट्यरत्नांना त्यातून घडवले. प्रतिष्ठान सुरू केले, तात्यासाहेबांनी या नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास केला, असेही शहाणे म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नगरसेवक गुलजार कोकणी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले.
स्व. दत्ता भट स्मृती पुरस्कार (अभिनय पुरुष)- नरेंद्र दाते, स्व. शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय स्त्री)- मीनल सौदागर, स्व. प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन)- गिरीश सहदेव, स्व. बापूसाहेब काळसेकर स्मृती पुरस्कार (रंगभूषा)- माणिक कानडे, स्व. गिरिधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाशयोजना)- रवींद्र रहाणे, स्व. कुमुदताई अभ्यंकर स्मृती पुरस्कार (संगीत)- कैलास पाटील, स्व. वा.श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार (बाल रंगभूमी)- प्रबोधिनी विद्यामंदिर, स्व. जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता)- नरेश महाजन यांना प्रदान करण्यात आला, तर विशेष योगदान पुरस्कार पाडवा पहाट व ग्रंथयात्रा– शाहू खैरे, सांस्कृतिक क्षेत्र– जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक क्षेत्र– राजेंद्र जाधव आणि ग्रंथसेवेबद्दल विनायक रानडे यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमात दिवंगत नाट्यकर्मींना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यांच्या नावाने दीप उजळविण्यात आला. तसेच, पुरस्कारमूर्तींच्या हस्ते दिवंगतांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चारुदत्त दीक्षित संचालित बागेश्री वाद्यवृंदांच्या सहभागाने नांदी सादर करण्यात आली. गणेशस्तवन व नटराजवंदना कलानंद नृत्य संस्थेच्या वतीने सादर करण्यात आली. नृत्य संयोजन गुरू संजीवनी कुलकर्णी यांनी केले. क. का. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसतर्फे थिएटरच्या कविता सादर करण्यात आल्या. कविता कुसुमाग्रज आणि सौमित्र यांच्या होत्या. राहुल गायकवाड, एकता आढाव यांनी कविता सादर केल्या. दिग्दर्शन विनोद राठोड, नेपथ्य अथर्व पाटील, प्रकाशयोजना रोहित चौधरी यांची होती. प्रास्ताविक सुनील ढगे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी पटवर्धन यांनी केले. यावेळी नाट्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार चंद्रकांत घुगे यांनी मानले.
--
चेकअप कॅम्प
कलावंतांचे जीवन नेहमी अस्थिर असते. खाण्याची वेळ ठरलेली नसते. त्यामुळे अनेक व्याधींना त्यांना सामोरे जावे लागते. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आजीव सभासदांसाठी हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चेकअप करण्यात आले. यावेळी १५० जणांनी त्याचा लाभ घेतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट