fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT
नाशिक : संपूर्ण देशातील बँकिंग व्यवस्थेला हादरवणाऱ्या कार्डक्लोन प्रकरणाबाबत दिल्ली येथे सायबर आर्मीची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या प्रकरणाचे मूळ शोधण्याचे काम समिती करीत आहे. या समितीत देशातील नामवंत हॅकर्स व सायबर सिक्युरिटीतील तज्ज्ञ काम करीत असून, त्यात नाशिकच्या अमर वझरे या युवकाचाही समावेश आहे.
देशातील नामवंत बँकांच्या ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यातून परस्पर काढण्याचे प्रकार होत असून, यात कार्डचे क्लोन करून ग्राहकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणात अनेक बॅँकांचा महत्त्वाचा डाटादेखील करप्ट झाला आहे. यामध्ये अॅक्सिस, एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एस बॅँक आदी बॅँकांचा समावेश आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी दिल्लीत सायबर आर्मीची एक उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली असून, त्यात देशातील नामवंत तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील सर्व एटीएममध्ये आपल्या खात्याचा पीन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ अमर वझरे यांनी केले आहे. यातील मास्टर कार्ड आणि विजा कार्ड यांना सर्वात जास्त धोका असून, या कार्डधारकांचा डेटा मेलवेअर टाकून अॅक्सेस केला आहे. यातील लॉगफाईल चोरीला गेल्या आहेत. ग्राहकांनी आपल्या एटीएमचा पीन तातडीने बदलणे आवश्यक असून, त्यानंतर बॅँकेकडून कार्ड बदलणे गरजेचे आहे. ग्राहकांना कुणाचाही फोन आल्यास बँकेचे डिटेल देऊ नये, त्याचप्रमाणे जे कार्ड ब्लॉक झाले आहेत त्यांचा सीव्हीव्ही नंबर हॅकर्सकडे आहेत, अशा ग्राहकांनी कार्ड बदलणे गरजेचे आहे. यामुळे ग्राहकांना फक्त पीन बदलून चालणार नाही. कॅस्पर स्काय नावाच्या एका कंपनीने भारतातील एका नामांकित कंपनीला तुमचा डेटा चोरी होत आहे, याची कल्पना दिली होती. त्याच कंपनीच्या ग्राहकांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. अनेकजण ऑनलाइन व्यवहार करताना ती साईट सिक्यूअर आहे, की नाही याची खातरजमा करीत नाहीत. ज्या साईट्ची सुरुवात hppps या अद्याक्षरांनी होते त्याच साईट्सवरून व्यवहार करावेत, असे सांगण्यात आले आहे. वायफाय सुरू आहे, अशा ठिकाणाहून ऑनलाइन बॅँकिंगचे व्यवहार करू नये. हा सायबर हल्ला चीनकडून होत असल्याचा संशय असून, जास्तीत जास्त नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
येथे करा तक्रार
बॅँक व्यवहाराबाबत काही संशयास्पद हालचाल वाटत असेल, कुणी अनोळखी व्यक्ती बॅँकेचे डिटेल्स विचारत असतील किंवा बॅँकेतून पैसे गहाळ झाले असतील, तर याबाबत तक्रार करायची असल्यास ९७६२१००१०० या क्रमांकावर तक्रार करावी. नाशिक पोलिसांचा हा व्हॉट्सअॅप क्रमांक असून, त्याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
ही घ्या काळजी
एटीएमचा पीन तातडीने बदलणे आवश्यक, कुणाचाही फोन आल्यास बँकेचे डिटेल देऊ नये, वायफाय सुरू आहे तेथे ऑनलाइन बॅँकिंगचे व्यवहार करू नये, बॅँकेकडून कार्ड बदलणे गरजेचे
ऐन सणासुदीच्या काळात बॅँक ग्राहकांचे कार्ड बंद झाल्याने मोठा अनर्थ ओढावला आहे. ग्राहकांनी व्यवहाराबाबत सावधानता बाळगावी. तातडीने एटीएमचा पीन बदलावा. त्यानंतर बंद झालेले कार्ड बदलून घ्यावे.
- अमर वझरे, संचालक, सायबर आयटी सिक्युरिटी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट