Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकच्या महिलेने केली लघुपटाची निर्मिती

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

समाजसेवा करीत असताना आलेल्या अनुभवांचे लेखन करणे, ते लेखन कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा छंद असलेल्या पूनम चौधरी-पाटील यांनी उपेक्षित घटकही कशा प्रकारची स्वप्न बघत असतात, त्यांच्या कल्पना आणि वास्तव यांच्यात किती मोठी दरी असते, हे दाखविण्याचा प्रयत्न 'सपान' या लघुपटाची निर्मिती करून केला आहे. नाशिकच्या एका महिलेने लघुपटनिर्मितीचे धाडस केले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

पूनम चौधरी-पाटील या कृपा शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्था नाशिक या सेवाभावी संस्थेत उपाध्यक्ष असून, गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा आणि समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत. हे काम करीत असताना त्यांनी सोनेरी कल्पनांना काटेरी वास्तवाची जेव्हा जोड येते, तेव्हा प्रत्येकाला परिस्थितीशी दोन हात करून आला तो दिवस ढकलावा लागतो, हे बघितले. नेमका हाच धागा पकडून त्यांनी मागील वर्षीच्या राज्य बालनाट्य स्पर्धेत 'सपान' या बालनाट्याचे लेखन करून सादर केले. हे बालनाट्य प्रेक्षकांसह परीक्षकांच्याही पसंतीस उतरले होते. बालनाट्याच्या यशानंतर या कथेला रंगमंचाच्या चौकटीत न ठेवता त्याच कथेवर लघुपट करायचे त्यांनी ठरविले.

मूळ कथा पूनम चौधरी-पाटील यांची असून, पटकथा आणि दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केले. विशाल पाटील यांनी छायाचित्रण केले आहे. गणेश सोनवणे यांची कला असून, ललित कुलकर्णी यांनी रंगभूषा केली आहे. प्रशांत चौधरी यांनी निर्मिती सूत्र सांभाळले आहे. छाया चौधरी यांनी वेशभूषा, वेदांत सौदकर यांनी संपादन आणि सुमंत वैद्य डबिंग केले आहे.

कार्तिकेय पाटील, रिया हिंगणे, प्रतीक गुंजाळ, पूनम चौधरी-पाटील, साक्षी कुलकर्णी, रामेश्वर धापसे, अविनाश पॉल, मनोज नागपुरे, भगवान पाचोरे, स्मिता प्रभू, दुर्वाक्षी पाटील, प्रथमेश जाधव, नकुल चौधरी, शिवा देशमुख, तेजस पवार, सुमित सावंत, कार्तिक झोपे, ओम शेवाळे, धनंजय जाधव, नीलेश वाणी यांनी भूमिका साकारल्या आहेत.

---

झोपडपट्टीतल्या मुलांना स्वप्न बघण्याचा अधिकार असतो. पण, ज्यावेळी ही स्वप्न वास्तवात उतरण्याची वेळ येते, तेव्हा कल्पना आणि परिस्थिती यामध्ये प्रचंड मोठे अंतर असते. तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीला सांभाळून स्वप्नांचा पाठलाग करणे, हाच सकारात्मक विचार 'सपान'मधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

- पूनम चौधरी-पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुमारी माता प्रकरणी शासनाची दिरंगाई उघड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यवतमाळ जिल्हा व आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमा भागात राहणाऱ्या आदिवासी जमातीतील कुमारी मातांच्या प्रश्नावर शासनाने कोणतीही ठोस भूमिका या प्रश्नावर घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सरकारने दिलेल्या शपथपत्राने ही दिरंगाई उघड झाली आहे. न्यायमूर्ती भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅच्युरल रिसोर्सेस कन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन व आदिवासी समाज कृती समिती यांच्यावतीने हायकोर्टात रवींद्र तळपे यांनी ही याचिका दाखल केली आहे. सीमा भागातील आदिवासी जमातीतील अविवाहित मुलींचे अवैधपणे लैंगिक शोषण केले जात आहे. या कृत्यामध्ये सीमा भागात काम करणारे कंत्राटदार, शासकीय कर्मचारी व इतर सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

यावर शासनाने आपले म्हणणे सादर करताना यवतमाळ जिल्हा व परिसरात १७२ कुमारी माता असल्याची कबुली दिली आहे. मात्र त्यापैकी अवघ्या ५८ जणींनी पुनर्विवाह केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच १४ जणी याबाबत माहिती देण्यास तयार नसून ३ जणींचे मृत्यू झाला आहे. उर्वरित ९७ जणी शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र असून त्याचे लाभ घेत आहेत. तसेच याबाबत शासन आढावा घेत असल्याचे कबूल केले आहे.

तसेच महिला व बालविकास अधिकारी, यवतमाळ यांनी यवतमाळ मधील पीड‌ितांच्या आधारासाठी ५ एकर जमीन ताब्यात घेतली असून यावर मुलांचे व महिलांचे संगोपान व पुनर्वसन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी जून २०१६ मध्ये शासनास सादर करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार कार्यवाही सुरू असून ही सामाजिक समस्या निवारण करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी काही सूचना केल्यास त्या अनुषंगाने सहकार्य करण्याची तयारी शासनाच्या वतीने दाखविण्यात आली आहे. पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोघा भावांचा सर्पदंशाने मृत्यू

0
0


म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील निरपन येथील दोन आदिवासी तरुणांचा झोपेत असताना रविवारी पहाटे सर्पदंशाने आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील निरपन येथील गणेश गोविंद भले (वय २८ ) व रामदास गोविंद भले (वय २४ ) हे दोघे बंधु आपल्या राहत्या घरात झोपेत असताना पहाटेच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, युवकांची आई सोनाबाई गोविंद भले या नेहमीप्रमाणे आपल्या मुलांना सकाळी झोपेतुन उठविण्यास गेल्या असता हे तरुण उठण्यास प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच ही घटना समोर आली. ग्रामस्थांनी दोघांना तत्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घोटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुका २०१७ मध्ये होणार असून, विद्यार्थ्यांनी निवडणूक छायाचित्र मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी विद्यार्थ्यांना केले.

मुंबई नाका येथील चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कला नुकत्याच दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधली. मराठा विद्याप्रसारक समाज संचलित इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना महापालिका सार्वत्रिक निवडणुका २०१७ विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, की १५ सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून, १४ ऑक्टोबरपर्यंत निवडणूक छायाचित्र मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. मोहिमेत शहरातील सर्व कॉलेजांमधील १८ वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी व २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले. नाशिक फर्स्ट, महिंद्रा आणि नाशिक महानगरपालिकेव्दारे तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत होत असलेल्या प्रबोधनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, मनपाचे कार्यकारी अभियंता महेश तिवारी व मनपा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यांना मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर नैवेद्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. गणेशोत्सवात दोन-तीन दिवस झालेल्या पावसाने शेतमालाची विशेषत: भाजीपाल्याची मोठी नासाडी झाली. त्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटल्याने भाव वधारले आहेत.

कोथिंबिरीची जुडी ८० रुपये, कांद्याची पात तसेच पालक, शेपूही महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या आहारातून भाजीपालाही हद्दपार होण्याची शक्यता आहे. पितृपक्षात नैवेद्यासाठी अनेक पदार्थ करण्याची प्रथा आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून एक स्वतंत्र भाजी बनविण्यात येते. पितृपक्षाला प्रारंभ झाल्यापासून बाजारपेठ गजबजली असून डांगर, कारले, भेंडी, मेथी, गवार आदी भाज्यांना मागणी वाढली आहे. नैवेद्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या काही मोजक्या भाज्या एकत्र करून ८० ते ९० रुपये किलो दराने त्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले

भाज्यांचे भाव वाढले असले तरीही नाइलाजास्तव ग्राहकांकडून भाज्यांची खरेदी होताना दिसत आहे. गृहिणींना ऐन पितृपक्षात भाज्या खरेदी करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पाच दिवसांपूर्वी ज्या भाज्या ४० रुपये किलोने मिळत होत्या त्या आता ६० ते ७० रुपये किलो दराने मिळत आहेत. पितृपक्षामुळे फुलांची मागणी कमी झाली आहे. श्राद्धासाठी लागणारी विड्याची पाने, सुपारी, केळीची पाने, पत्रावळी, द्रोण, गुलाल, कापूर, कुंकू, हळद, माळा, तांदूळ यांसारख्या अनेक वस्तूंना मागणी वाढली आहे. वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट मात्र कोलमडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कर भरतीप्रकरणी आणखी चौघे ताब्यात

0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आर्टिलरी सेंटरमधील भरतीप्रकरणात चौकशी करणाऱ्या उपनगर पोलिसांनी रविवारी आणखी चौघा जणांना बेड्या ठोकल्या. यात काही लष्करी कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, यामुळे लष्करातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. संशयितांना सोमवारी नाशिकला आणले जाणार आहे. या प्रकरणात यापूर्वीच एका निवृत्त कर्नलसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

उपनगर पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये मनबीरसिंग (२८), प्रबासकुमार, हरीओम शर्मा आणि पवन कुमार यांचा समावेश आहे. मनबीर सिंग लष्करात शिपाई होता. तोही या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार आहे. त्याला नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली. प्रबास कुमार हा लष्करात हवालदार क्लर्क आहे. लष्कर भरतीची खोटी कागदपत्रे आणि दिल्लीतील विविध संस्थांमधून भरतीसाठी खोटे उमेदवार पाठविण्याचे काम तो करीत असे. लष्करात कोठे व किती जागा रिक्त आहेत, याची त्याला पूर्ण कल्पना होती. दिल्लीत राहणारा हरिओम शर्मा हा नागरिक असून, तो भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करुन देत असे.

याप्रकरणी निवृत्त कर्नल सुखप्रितसिंग अर्जुनसिंग रंधवा (५९, बी-६१, सेक्टर ४०, नोएडा, उत्तप्रदेश) याला काही दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. संशयितांनी बनावट कागदपत्रे सादर करुन प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक करुन त्यांची रवानगी नाशिकरोड कारागृहात केली आहे. बलवीर गुजर (२२, राजस्थान), सचिन किशन सिंह (१९, राजस्थान), तेजपाल चोपडा (१९, राजस्थान), सुरेश महंतो (२१) आणि गिरीराज घनशाम चव्हाण (राजस्थान रायफल) यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. लष्करी प्रशासनाला भरतीची कागदपत्रे खरे असल्याचे भासवून या चौघांनी आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण सुरु केले होते. चौहानच्या सहाय्याने चौघांनी आर्टिलरी केंद्रात प्रवेश करुन प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली होती. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता लष्करी प्रशासनाला ते बनावट असल्याचे आढळल्याने हे प्रकरण उजेडात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा अनुदानासाठी प्रस्ताव द्या

0
0

बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांना आवाहन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कांदा बाजार भावातील घसरणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने राज्य सरकारने जुलै व ऑगस्ट महिन्यादरम्यान कांदा खरेदी विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी प्रती क्विंटल शंभर रुपयांप्रमाणे २०० क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार येथील बाजार समितीच्या झोडगे व मुंगसे येथील कांदा खरेदी विक्री केंद्राच्या आवारात विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी तत्काळ प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मालेगाव बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांनी केले आहे.

यासाठीचे मागणी अर्ज झोडगे व मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्राच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. तरी शेतकरी बांधवांनी अनुदान मागणी अर्जासोबत कागदपत्रांची पूर्तता करून मुदतीत सादर करावेत, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

लासलगाव, निफाडला अर्ज उपलब्ध

निफाड : लासलगाव बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी तत्काळ बाजार समितीकडे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केले. त्यानुसार बाजार समितीच्या लासलगाव मुख्य व निफाड उपबाजार येथे आवश्यक कागदपत्रांसह आणि निर्धारित वेळेत सादर करावेत. अर्ज बाजार समितीच्या लासलगांव मुख्य व निफाड उपकार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम लुटणाऱ्या त्रिकुटाला वर्षभरानंतर बेड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड शहरातील अॅक्सिस बँक एटीएममधून १८ लाख रुपये लंपास करणाऱ्या तीन संशयितांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. तब्बल वर्षभर गुंगारा देणाऱ्या आरोपींनी चोरीच्या पैशांतून वाहने खरेदी केली तसेच देवदर्शनही घेतले.

निफाड शहरातील शनी चौक परिसरातील अॅक्सीस बँक एटीएममध्ये अज्ञात आरोपींनी ऑगस्ट २०१५ मध्ये रात्रीच्या सुमारास प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून एटीएम मशीनमधून १७ लाख ९८ हजार ६०० रुपये लंपास केले होते. याबाबत निफाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्याचे धागेदोरे उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यातून चोरटे ओझर, ओणे, सायखेडा, शिंगवे भागातील असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायखेडा येथे मार्केट यार्ड परिसरातून शिंगवे येथील योगेश सुकदेव दिवे (वय २७) याला मोटारसायकलसह ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास केला असता त्याने त्याचे साथीदार राजेंद्र सोमनाथ चौधरी आणि भाऊसाहेब पंडित हाळदे यांच्याविषयी माहिती दिली. या तिघांनी मिळूनच एटीएम फोडल्याचे स्पष्ट झाले. यातील हाळदे येथील संशयित आरोपी भाऊसाहेब हाळदे हा रायटर सेफ गार्ड कॅश लोडिंग कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याच्याकडे एटीएमची एक चावी होती. त्याने हे काम सोडले. मात्र, चावी त्याच्याकडेच राहिली. याच दरम्यान, अॅक्सिस बँकेचे एटीएम बंद पडल्याने हाळदेला पाचारण करण्यात आले होते. त्याच वेळी त्याने या एटीएमचा पासवर्ड मिळवला. चावी व पासवर्डच्या मदतीने त्यांनी हा गुन्हा केला.

चोरीच्या पैशातून बोलेरो!

चोरीच्या पैशातून आरोपी योगेश दिवे याने बोलेरो जीप, प्लेजर मोटारसायकल खरेदी केली. तसेच दोन लाख रुपये अजमेर दर्ग्याच्या दानपेटीत टाकले. याशिवाय त्यांनी खर्च केलेल्या पैशांचा तपशील पोलिसांना मिळाला. पोलिसांनी वाहने जप्त केली असून, तब्बल वर्षभरानंतर जेरबंद झालेल्या संशयितांना निफाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काव्यनिर्मिती कार्यशाळेत रमले बालकवी

0
0

येवल्यात समता प्रतिष्ठानकडून आयोजन

म. टा. वृत्तसेवा, येवला

येथील समता प्रतिष्ठान या संस्थेने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकवी धोंडीराम राजपूत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या बाल काव्यनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

येवल्यातील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात समता प्रतिष्ठान आणि नाशिक येथील ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ या दोन संस्थांच्यावतीने येत्या २० सप्टेंबरला तालुका पातळीवरील बालकाव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ५ वी ते १० वीच्या बालकवींसाठी या अभिनव बालकाव्य कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत ९३ बालकवी सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत हलक्या फुलक्या कवितांनंतर राजपूत सर यांनी नदी, डोंगर, पशू, पक्षी, सूर्य, चंद्र, चांदण्या, आकाश आदींचे मानवी जीवनातल्या स्थानांवर मार्गदर्शन केले. आईचे महत्त्व अधोरेखित करित त्यांवरही कविता करत त्यांनी मुलांना आपलेसे केले. छत्रपती शिवाजी महाराज, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता कशी सुचते यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यशाळेत क्रांतीवीर महात्मा फुले विद्यालय, कुसुर, आदर्श माध्यमिक विद्यालय, चिचोंडी, समता माध्यमिक विद्यालय, सुरेगाव रस्ता, राजा शिवाजी माध्यमिक विद्यालय, ठाणगाव आणि नवरचना प्राथमिक विद्यालय, साने गुरुजी नगर येवला अशा पाच शाळांचे हे बालकवी होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे, रमेश पवार, गणेश जाधव, दिनकर दाणे आदी मान्यवर उपस्थित होते. करुणा आहिरे, गायत्री गायकवाड, कोमल देटखे, संध्या पाटील, प्रविण लोखंडे, सागर घुसळे, वैभव शेळके आदी बालकवींनी कविता वाचून रंगत आणली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या आव्हानांसाठी संघटित व्हा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या शैक्षणिक धोरणासह येऊ घातलेल्या नव्या विद्यापीठ कायद्याचा परिणामी उच्च शिक्षणासमोर नवी आव्हाने उभी ठाकणार आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी प्राध्यापकांनी ज्ञान अद्ययावत ठेवण्यासोबतच संघटितही व्हायला हवे, असे आवाहन एम. फुक्टो या संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. एस. पी. लवांडे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेची (फुक्टो) एकदिवसीय विशेष मार्गदर्शन कार्यशाळा रविवारी नाशिकमध्ये झाली. त्या वेळी ते बोलत होते.
उच्च शिक्षणाच्या सद्यःस्थितीचा आढावा डॉ. लवांडे यांनी घेतला. या वेळी प्राध्यापकांच्या विविध समस्या, सद्यःस्थितीत असणारे धोरण व कायदे आणि भविष्यातील धोरण व कायद्यांचा प्राध्यापकांवर होणारा संभाव्य परिणाम या विषयावर त्यांनी भाष्य केले.

या वेळी संघटनेचे ज्येष्ठ नेते सी. आर. सदाशिवन यांनीही प्राध्यापकांशी संवाद साधला. ते म्हणाले, बदलत्या शैक्षणिक धोरणांपासून प्राध्यापकांनी अलिप्त राहू नये. नव्या धोरणांना गुणवत्तेच्या उभारणीसाठी अपेक्षित असणाऱ्या बदलांना सहकार्य करायला हवे. या टप्प्यावर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात प्राध्यापकांनी प्रयोगशीलतेला प्राधान्य द्यायला हवे.

शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. विजय नारखेडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद््घाटन झाले. या वेळी डॉ. नारखेडे म्हणाले, की शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या वतीने प्राध्यापकांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. प्राध्यापकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच होईल या नियोजनावरही लक्ष केंद्रित आहे. या प्रकारच्या कार्यशाळांमधून सेवाशर्तींसह विविध तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन प्राध्यापकांना मिळेल, असा आशावादही नारखेडे यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेत शिक्षण सहसंचालक कार्यालयाचे लेखाधिकारी दीपक काकडे यांनी 'नवीन पेन्शन योजना', प्रा. डॉ. एस. पी. लवांडे यांनी 'यूजीसी रेग्युलेशन संघटनेपुढील आव्हाने', प्रा. डॉ. सदाशिवन यांनी 'नवीन शैक्षणिक धोरण' , डॉ. के. एल. गिरमकर यांनी 'प्राध्यापकांच्या नेमणुका ते निवृत्तीविषयक सेवाशर्ती', डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी 'प्रस्तावित विद्यापीठ कायदा' या विषयावर मार्गदर्शन केले.

संघटनेचे प्रा. डॉ. धीरज झाल्टे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सतीष ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस प्रा. शरद देवरे यांनी आभार मानले. जिल्हाभरातून ११० प्राध्यापकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही पद्धतीने निवड जाहीर करा

0
0

नाशिक मर्चंटस् बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‌सभासदांचा बोलण्यावरून गदारोळ

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

द‌ि नाशिक मर्चंटस् को-आॅपरेटिव्ह बँक लि. नाशिकची शनिवारी (दि. १७) झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा विविध विषयांनी गाजली. यावेळी निवडक माजी संचालकांसह सभासदांनी लोकशाही पद्धतीने निवड जाहीर करण्याची मागणी बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांच्याकडे केली. त्यांनी निवडणुकीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. यानंतर सभेच्या पुढील विषयांना सुरुवात करण्यात आली.

'नामको'च्या या सभेत अनेक विषयांवर प्रशासक, माजी संचालक व सभासदांमध्ये अनेकदा गदारोळ उडाला. परंतु प्रशासन भोरिया यांनी सर्वांचे म्हणणे समजावून घेतले. या वेळी ज्येष्ठ सभासद शिवदास डागा यांनी प्रशासक केवळ ६ किंवा ९ महिनेच राहत असतात. तर भोरिया यांना २ वर्ष ९ महिने इतका कार्यकाळ का देण्यात आला, सवाल उपस्थित केला. तर कौशल्या काशिनाथ भगत यांनी संचालकांनी बँकेत चांगले कामकाज केले असते, तर प्रशासक नेमण्याची गरजच पडली नसती, असा उलट टोला लगावला. यावेळी उपस्थितांनी भगत यांच्या वक्तव्याला साथ देत टाळ्याही बाजविल्या.

दरम्यान, शनिवारी प्रशासक भोरिया यांच्या अध्यक्षतेखाली नामकोची ५७ वी वार्षिक सभा अनेक विषयांनी गाजली. यात काही संचालक व सभासदांनी बँकेचा कारभार सुरळीत झाल्याने निवडणूक प्रक्रिया जाहिर करावी, अशी एकमुखी मागणी केली. यात भोरिया यांनीदेखील सर्वानुमते विषय मंजूर केला असल्याचे सांगत इतिवृत्तात नमूदही केले.

पगारवाढीमुळे कर्मचारी आंनदात

अनाधिकृत कर्ज वाटपावरून नामकोवर आरबीआयने प्रशासकाची नेमणूक गेल्या दोन वर्षांहून अधिक दिवसांपासून केली आहे. या वेळी आरबीआयमध्ये अनुभवाने काम केलेले निवृत्त अधिकारी जे. बी. भोरिया यांची नामको प्रशासकपदी नियुक्त करण्यात आली होती. त्यांनी अनेक मोठी कर्जवसुली करत कर्मचाऱ्यांमध्येदेखील शिस्त लावत बँकेला उर्जित अवस्थेत आणले आहे. कर्मचाऱ्यांनाही भरघोस पगारवाढ दिल्याने बँकेत आनंदाचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डम्पर दुरुस्तीची रक्कम देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघातग्रस्त डम्पर ट्रकच्या दुरुस्तीची पूर्ण रक्कम अदा करावी, असे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने बजाज अॅलायंज इन्शुरन्स कंपनीला देत दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. डम्पर दुरुस्तीचा क्लेम ५ लाख ३० हजार ८८८ रुपयांचा असताना कंपनीने २ लाख ४५ हजार ८७३ रुपये मंजूर केले होते. त्यामुळे उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी नाशिक रोड येथील गीता ताजनपुरे यांनी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीत ताजनपुरे यांनी म्हटले, की दहाचाकी डम्परचा विमा केला होता. त्यानंतर पांढुर्ली घाटात वाहनाचा अपघात झाला. त्यात वाहनाचे बरेच नुकसान झाले. त्यानंतर हा ट्रक दुरुस्तीसाठी एएमके ऑटो इंडस्ट्री येथे दिला. येथे दुरुस्तीचा खर्च ५ लाख ३० हजार ८८८ रुपये झाला. त्यानंतर बजाज इन्शुरन्स कंपनीने एक लाख आगाऊ दिले. त्यानंतर सर्व्हेअरची नेमणूक करून परस्पर वाहनाचा सर्व्हे केला. त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर बँकेत १ लाख ४५ हजार ८७३ जमा केले. मात्र, क्लेमची पूर्ण रक्कम दिली नाही. त्यामुळे वर्षभर ट्रक दुरुस्त होऊनही तो घेऊन जाता आला नाही.

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायमंचाने निकाल देताना सांगितले, की दुरुस्तीची रक्कम विवादित केलेली नाही. त्यामुळे उर्वरित रक्कम २ लाख ८५ हजार १५ रुपये इन्शुरन्स कंपनीने अदा करावी, त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून ७ हजार व अर्जाच्या खर्चाची रक्कम ३ हजार रुपये द्यावे. हा निकाल नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे- कुलकर्णी, कारभारी जाधव यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणापेक्षा विमासेवेला हवी गती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विमा कंपनीचे खासगीकरण करण्यापेक्षा विमासेवा आणखी कशी वेगवान करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचा सूर ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉइज असोसिएशनच्या (एआयआयईए) चर्चासत्रात उमटला. संघटनेच्या पश्चिम प्रदेश विमा कर्मचारी संघटनेच्या २१ व्या त्रैमासिक महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी महाकवी कालिदास कालमंदिरात विविध विषयांवर चर्चा झाली.

शनिवारी उद््घाटन झाल्यानंतर रविवारी या अधिवेशनाचा पहिला दिवस होता. यात एआयआयईएचे राष्ट्रीय अध्यक्ष अमानुल्ला खान यांनी 'भविष्यातील आव्हाने' या विषयावर भाषण केले, तर हितेंद्र भट यांनी आढावा घेतला.

या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस व्ही. रमेश, अजित अभ्यंकर, वसंत नलावडे आदी उपस्थित होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या चर्चासत्रात अमानुल्ला खान यांनी 'भविष्यातील आव्हाने' या विषयावर बोलताना त्यांनी, विमासेवेला गती देण्याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांचे कसे नुकसान होईल, हे सांगत त्यांनी त्यासाठी सरकारविरोधात संघर्ष करावा लागणार असल्याचेही सांगितले. या वेळी हितेंद्र भट यांनी आढावा घेताना राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय, विमा उद्योग, कामगार चळवळ यांचा वेध घेतला.

अधिवेशनाचे यजमानपद नाशिक विमा कर्मचारी संघटना भूषवत आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या व्यवस्था व नियोजनाबद्दलही कौतुक करण्यात आले. या सर्व अधिवेशनाचे संयोजन अध्यक्ष डॉ. डी. एल कराड, कांतीलाल तातेड, मोहन देशपांडे यांच्यासह नाशिक विमा कर्मचारी संघटनेने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चाबाबत सरकार मार्ग काढेल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकार कोणतेही असले तरी ते जनतेसाठी आहे. त्याची दखल घ्यावीच लागते. सरकार यावर मार्ग काढतील, असे सांगत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मराठा समाजाच्या राज्यभर निघणाऱ्या मोर्चांवर सावध प्रतिक्रिया दिली. हा मूक मोर्चा म्हणजे काही वर्षांच्या असंतोषाचे प्रतिबिंब आहे. कोपर्डी घटनेने वाट मोकळी करून दिली. खरे तर आर्थिक मागासलेपणावर चर्चा व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर शासकीय विश्रमागृहात ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यमंत्री भुसे म्हणाले, की कोणताही नेता नसताना सगळीकडे मूक मोर्चा उत्स्फूर्त निघत आहे. मालेगावमधून तर सायकलीवरून या मोर्चाला येण्याची तयारी काहींनी सुरू केली. काही जणांनी गाड्या उपलब्ध करून दिल्या, तर काही जणांनी खाण्याची व्यवस्था केली. या मोर्चात तरुणांचा सहभाग मोठा आहे. शाळा, कॉलेजांमधील प्रवेश असो की नोकरीचा प्रश्न, येथे आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही वेगळे आहे. या मोर्चानिमित्त काही जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, की जुन्या काळी लग्न व्हायचे तेव्हा अहेर गाजवायचा प्रकार होत, तसा आताही आहे. फक्त या मोर्चात जनता पुढे व नेते मागे असणार आहे. हा मोर्चा नेत्याविना आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शिवसेनेचा भगवा फडकेल

आगामी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेची काय तयारी आहे, या प्रश्नावर मंत्री भुसे म्हणाले, की शिवसेना पक्ष हा निवडणुकीपुरता नाही. तो जनतेसाठी सतत काम करीत असतो. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल.

महिलांसाठी ग्रामसभा

चौदाव्या वित्त आयोगात १५,५०० कोटी रुपये थेट ग्रामपंचायतीला मिळणार आहेत. त्यामुळे 'आमचा गाव आमचा विकास' कार्यक्रमांतर्गत गावाचा विकास करणे सोपे जाणार आहे. गावाच्या विकासात महिलांचा सहभाग असावा, यासाठी महिलांच्या ग्रामसभा १ व २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यातून महिलांचे प्रश्न व त्यांच्या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

खूप काम करणार

सहकार राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर काम कमी होते; पण आता ग्रामविकास राज्यमंत्रिपद मिळाल्यावर काम वाढले का, या प्रश्नावर बोलताना भुसे म्हणाले, की खूप काम करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकला सडेतोड उत्तर देण्याची वेळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा पाकपुरस्कृत आहे. आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. जगभर दहशतवाद्यांचे हल्ले होत आहेत. त्यावर सर्वच देशांनी एक बैठक घेणे गरजेचे आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याची झळ भारत व अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणात बसते. आता त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे सांगत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या बैठकीसाठी ते नाशिक येथे शासकीय विश्रामगृहात आले होते. मात्र, उरी येथे हल्ला झाल्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीसाठी ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर भाजपनेही ही बैठक रद्द केली. दरम्यान, डॉ. भामरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाशिकच्या विमानसेवेबाबत ऑक्टोबरमध्ये बैठक

नाशिकच्या विविध प्रश्नांवर बोलताना डॉ. भामरे म्हणाले, की नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये बैठक घेणार आहे. बैठकीत कार्गो सेवा व देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विषयावरही चर्चा करून प्रश्न सोडवण्यात येईल. मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. या कामाबरोबरच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते मनमाड या रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे यांच्यासह सुरेश पाटील, बाळासाहेब आहेर, प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्रिपदानंतर प्रथमच नाशिकमध्ये

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री झाल्यानंतर डॉ. भामरे प्रथमच नाशिकला आले होते. त्यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक होती. त्यासाठी ११ ते ४ ही वेळ देण्यात आली होती. मात्र, उरी येथील हल्ल्यामुळे डॉ. भामरे दिल्लीला रवाना झाले व बैठकही रद्द करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्राह्मण युनिटीचा क्रांती मोर्चाला पाठिंबा

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात २८ रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला ब्राह्मण युनिटी या संघटनेने पाठिंबा दिला आहे.

अॅट्रॉसिटीचा सर्वत्र दुरुपयोग होत असून, गुन्हेगार त्याचा बचावासाठी उपयोग करू लागल्याचा आरोप करीत ब्राह्मण संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. याबाबत धुळ्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीला ब्राह्मण समाजातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यज्ञोपवित बहुद्देशीय सामाजिक संस्था, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, गोवर्धन ब्राह्मण महासंघ, परशुराम युवा मंच, ब्रह्मर्षी सेना, चित्पावन ब्राह्मण महासंघ या संघटनांनी मराठा क्रांती मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात परीट समाजबांधवांचा मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातून मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात संत गाडगे महाराज यांची वेशभूषा केलेला समाजबांधव सहभागी झाला होता.

महाराष्ट्र राज्य परिट सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष विजय देसाई, अ. भा. धोबी महासंघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे, युवा अध्यक्ष संजय वाल्हे, अनिल शिंदे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर जयश्री अहिरराव, कमलेश देवरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परीट समाजाला डॉ. भांडे समितीच्या शिफारशी लागू करून शासनाने न्याय द्यावा, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी लावावी आदी मागण्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

राज्यात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे शांततेने निघत असल्याने त्याचे सर्वत्रच कौतूक होत असताना धुळ्यात मात्र शेतकऱ्यांनी पाण्यासाठी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.

हक्काचे पाणी मिळावे यासाठी धुळ्यात आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पाण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला तसेच जिल्हाधिकाऱ्याची गाडी अडवली. शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या लाठीहल्ल्यात काही महिला जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने तसेच महिला जखमी झाल्याने संतापलेल्या आंदोलक शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले असून यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुला विनियार्डसला तीन पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डेलवाईन एक्सलन्स अवॉर्डसतर्फे सुला विनियार्डसला प्रतिष्ठेचे तीन पुरस्कार मिळाले आहेत. नवी दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात सुलाचे सीईओ राजीव सामंत व उपाध्यक्षा (मार्केटिंग) सिसिलीया ओल्डन यांनी पुरस्कार स्वीकारले.

सुला विनियार्डसला 'इंडियन वाईन प्रोड्युसर ऑफ द इयर' तसेच 'वाईन टुरीझम वाईनरी ऑफ द इयर' हे पुरस्कार मिळाले असून उत्कृष्ट वाईन निर्मितीबद्दल सुलाचे चीफ वाईनमेकर अजॉय शॉ यांना 'इंडियन वाईनमेकर ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे.

इंडियन वाईन अकॅडमीचे अध्यक्ष सुभाष अरोरा व इंडियन रेस्टॉरंट स्पायचे फूड जर्नलिस्ट व ब्लॉगर सौरीश भट्टाचार्य यांनी डेलवाईन एक्सलन्स अवॉर्डस् या सोहळ्याचे आयोजन केले. वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासोबतच उत्पादनांचा दर्जा वाढावा असा हेतू पुरस्कार देण्यामागील होता. पहिल्याच आवृत्तीत सुलाचे तीन गटामध्ये नामांकन करण्यात आले आणि सुलाने पुरस्कारही पटकावला. वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम घेत असलेल्या व्यक्ती, संस्थांचा सत्कार करून त्यांच्या मेहनतीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सुला टिमच्या परिश्रमांना हे तीन पुरस्कार समर्पित असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतरा शिक्षकांच्या सेवा वर्गवरून वादंग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खासगी व सरकारी शाळांमधील शिक्षकांची सेवा महापालिकेच्या शिक्षण समितीकडे वर्ग करण्यास महासभेचा विरोध असतानाही प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी १७ शिक्षकांची सेवा समितीकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रिक्त पदांच्या नावाखाली या शिक्षकांचे समायोजन करण्याचे प्रयत्न केले जात असून, यात आर्थिक गैरव्यवहाराचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे शिक्षण समितीचा कारभार पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

सोमवारच्या महासभेत शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी जिल्हा परिषद, खासगी शिक्षण संस्था, नगरपालिकेत कार्यरत असेलेल्या १७ शिक्षकांची सेवा महापालिकेडे वर्ग करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. महासभेने आधीच अशा सेवा वर्ग करण्यास विरोध केला असून, समितीनेच शिक्षकांची भरती करावी अशी मागणी केली आहे. यापू्र्वीही अशा समायोजनेवरून तत्कालीन प्रशासन अधिकारी कुंवर यांच्या विरोधात नगरसेवकांनी आवाज उठवत त्यांचा प्रस्ताव हाणून पाडला होता. तरीही नुकताच प्रशासन अधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या उपासनी यांनी शिक्षकांचे कामकाज सुरळीत करण्याऐवजी व शाळांच्या दर्जा सुधारणेकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षकांच्या सेवा वर्ग करण्याला प्राधान्य दिले आहे. तसा प्रस्तावच महासभेवर ठेवण्यात आला. परंतु या प्रस्तावावरून वाद होण्याची शक्यता गृहीत धरत, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्तावच चर्चेला आणला नाही. त्यामुळे या प्रस्तावावरून सांशकता आहे. या सतरा शिक्षकांच्या सेवा वर्ग करण्यामागे आर्थिक कारणही दडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

तिजोरीवर बोजा

महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. विकासकामांसाठीही पैसे मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत या शिक्षकांची सेवा वर्ग केल्यानंतर त्यांचा ५०टक्के पगार हा महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या पालिकेवर हा नवा आर्थिक बोजा पडणार आहे. पालिकेचे प्रशासन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असताना समितीची ही उधळपट्टी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सेवा वर्गऐवजी स्थानिक बेरोजगार तरुणांची नोकरभरती करा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images