इंजनीअरिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या डिप्लोमा व डिग्रीच्या बहुतांश जागा कॅप राऊंड पार पडल्यानंतरही रिक्त आहेत. या रिक्त जागा आणखी काही काळ अशाच प्रलंबित राहील्या तर हजारो विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या रिक्त जागांसाठी विशेष कॅप राऊंड घोषणा शिक्षण विभागाने करावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार देवयानी फरांदे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठविले आहे.
कॅप राऊंडची प्रक्रिया पार पडल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित आहेत. यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही फेरपरीक्षा घेण्यात आली होती. यापरीक्षेच्या आधाराने अनेक विद्यार्थ्यांनी वाया जाणारे वर्ष प्रयत्नपूर्वक वाचविले आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचाही प्रश्न काही प्रमाणात उभा आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कॉलेजेसना शासनाने सूचना दिल्यानंतरही डीटीईची नवी लिंक अपडेट झालेली नाही. परिणामी हे सर्व विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा पूर्ण केला असून डिप्लोमानंतर द्वितीय वर्ष डिग्रीसाठी प्रवेशाला ज्या कॉलेजचा प्राधान्यक्रम दिला. मात्र, त्यांचा नंबर प्रवेशाकरिता लागलेला नाही अशाही विद्यार्थ्यांचे वर्ष धोक्यात आहे. या विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंट कोटाही यंदा बंद करण्यात आला होता. परिणामी त्यांची प्रवेशाची संधी हुकली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करून शासनाने या विद्यार्थ्यांसाठी विशेष कॅप राऊंड घेऊन त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॅप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. दुसरीकडे बारावीची फेरपरीक्षा आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित आहेत. हा विरोधाभास मिटविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी विशेष कॅप राऊंडची घोषणा करण्याची अपेक्षा आहे.
- देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट