म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
समाजातील मूल्ये, नीतिमत्ता, परंपरा टिकवून पुढे जाणे हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
नागरिक शिक्षक गौरव समिती, नाशिक आयोजित शिक्षक गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर बोलत होते. पुरस्काराचे हे ४७ वे वर्ष होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. काकोडकर पुढे म्हणाले की, समाजाची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार होतो ही मोठी बाब आहे. ज्या संस्थात्मक प्रणालीत काम केले जाते तेथे हेरारकी सांभाळून नैपुण्याचा सत्कार केला जाणे म्हणजे कौतुक करणे होय. त्यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार आहे. कामात उत्कृष्टता साधायची असल्यास कौतूक करणे महत्त्वाचे असते असेही डॉ. काकोडकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात दरी वाढत चालली आहे. ती लवकरच सांधली जाणे गरजेचे आहे.
यावेळी व्यासपीठावर सर्व पुरस्कारमूर्ती शिक्षक व प्राध्यापक, सावानाचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार, उपाध्यक्ष नरेश महाजन, प्रा. विनया केळकर तसेच नागरिक शिक्षक गौरव समितीचे प्राचार्य रा. शां. गोऱ्हे यांची उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे डॉ. अनिल काकोडकर व सुयशा काकोडकर यांचा सन्मान नरेश महाजन व विनया केळकर यांनी केला. सूत्रसंचालन सुरेश गायधनी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अॅड. अभय सदावर्ते यांनी करून दिला. पुरस्कारमूर्तींचा परिचय सुजाता नागपुरे यांनी करून दिला.
...या पुरस्कारमूर्तींचा होता समावेश
नमिता जानोरकर, संगिता गजभिये, शोभा गायकवाड, वर्षा मोराणे, अरूण महाजन, सुषमा कुलकर्णी, रामदास कुशारे, मंजुश्री खाडीलकर, कामिनी पवार, सुभाष दसककर, जाहीद शेख, डी.एफ. निकुंभ, संजय खैरनार, अनिता गोगटे, एकनाथ कुलकर्णी, नीला देशपांडे, हिरा मोरे, उषा कन्सारा, डॉ. तुकाराम दळवी, शोभा बिल्हाडे, व्ही.व्ही. सूर्यवंशी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट