व्यापाऱ्यांची अखेर नरमाईची भूमिका; कांदा उत्पादकांना दिलासा
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत महिन्यापासून बंद असलेला कांदा लिलाव अखेर गुरुवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पुढाकारातून प्रचलित (खुल्या)पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय सचांलक व व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी दिली.
गेल्या तीस दिवसांपासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद असल्याकारणाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस आंदोलनाचे हत्यार उपसले होते. शेतकरी रस्त्यावर उतरल्याने व्यापारी व शासनाचे धाबे दणालले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी दुपारी बाजारसमिती सभागृहात संचालक मंडळाची बैठक घेऊन कांदा लिलावासंदर्भात चर्चा केली.
देवरे म्हणाले की, कांदा लिलाव होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला असून त्यांच्या चाळीतील कांदा सडतोय. आधीच दुष्काळाने होरवळलेला शेतकरी कसाबसा उभा राहतोय. त्यात कांदा मार्केट बंद असल्याने त्याची चोहीकडून कोंडी झाली आहे. व्यापारी आणि नियमांच्या कचाट्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असे सांगून त्यांनी व्यापाऱ्यांना भावनीक आवाहन केले.
चर्चेदरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यापाऱ्यांशी दूरध्वनीवर संभाषण केले. डॉ. सुभाष भामरे यांनी कांदा व्यापाऱ्यांना विश्वासात घेत शासन निश्चितच व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार आहे. तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांचा अंत न बघता आपण बाजार समितीचे व्यापार सुरू करावेत असे, आवाहनही त्यांनी केले.
या आवाहानास कांदा व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे उद्या गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीनुसार व्यापाऱ्यांकडून आडत घेवून बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवरे यांनी दिली.
उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहनही देवरे यांनी केले आहे. या बैठकीस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक निकम, श्रीधर कोठावदे, वर्धमान लुंकड महेश देवरे, दीपक सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, पप्पू सोनवणे आदी व्यापारींसह उपसभापती विशाल सोनवणे व संचालक मंडळ उपस्थित होते. बाजार समितीच्या या निर्णयाचे स्वागत शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, अरविंद सोनवणे, काका रौंदळ, जिभाऊ खंडू सोनवणे, संजय वाघ शिरसमणीकर, जनार्दन सोनवणे, राजेंद्र जगताप, भिका सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे आदींनी केले आहे.
उशिराचा निर्णय
गेल्या दोन वर्षांपासून नाशिक जिल्हा दुष्काळाला सामोरा जात आहे. त्यातच कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांनी इतर पिकांचे पाणी तोडून कांदा जगविला. मात्र कांदा घरात नियमनाच्या मुद्द्यांवरून सगळे फिसकटले. मुसळधार पावसामुळे साठवणीतला कांदा अक्षरशः सडला. त्यामुळे खरेदी सुरू होणार असली तरी कांद्याची प्रत ढासळल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते, हे महत्त्वाचे आहे.
शेतकरी हितासाठी निर्णय
पिंपळगाव बसवंत : आपल्या मागण्यांबाबत विचार करण्याचे दिलेले आश्वासन तसेच शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून गुरुवारपासून नियमनमुक्तीच्या धोरणानुसार अडतमुक्त कांदा लिलाव जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत सुरू करणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी आसोशिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी केली. बुधवारी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची पिंपळगाव येथे बैठक झाली. भंडारी म्हणाले की, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यापाऱ्यांनी पॅकिंग खर्च मिळावा, गोणीत कांदा विक्रीसाठी यावा किंवा दोन टक्के आडत मिळावी, या मागण्यांबाबत विचार करण्याची ग्वाही दिल्यामुळे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लासलगावमध्ये धूसफूस
निफाड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीने कांदा विक्रीसाठी आणला होता. पण कालच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा धूसफूस पहायला मिळाली.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीने कांदा विक्रीसाठी आणला होता. तर काही शेतकऱ्यांनी गोणीत कांदा आणला. व्यापाऱ्यांनी गोणी लिलाव सुरू केले, पण आम्ही खुला कांदा आणला आहे. त्याचा लिलाव करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांनी ते ऐकले नाही. फक्त गोणीतील कांद्याचा लिलाव सुरू केला. त्यावर शेतकऱ्यांनी गोणी लिलाव बंद पाडले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खुला पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरू केले. मात्र, आदल्या दिवशी आठशे रुपये क्विंटल असलेल्या या कांद्याला अवघा पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत रास्तारोको आंदोलन केले. नंतर खुला कांदा आणलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या संचालकांनी गोणी देऊन पुन्हा लिलाव सुरू केले.
नाफेडही कांदा घेणार
नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या वादामुळे व्यापारी वर्ग कांदा खरेदीस आडमुठेपणाच्या धोरणामुळे लिलाव सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊ लागला आहे. दिल्लीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बोलवलेल्या बैठकीत हमीभावाने नाफेडला कांदा खरेदी करण्याचा आदेश दिला. हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.
-नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड
सबसिडीचा विचार व्हावा
देशाची गरज भागविल्यानंतर ४० ते ५० लाख टन कांदा यंदा शिल्लक राहणार असल्याने देशाबाहेर पाठविण्यासाठी निर्यातीवर पंधराशे रुपये टन सबशिडीची देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली होती. बाजार समितीतील लिलाव बंदमुळे ५ ते ६ लाख टन कांदा थांबला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर भर देऊन निर्यातीला सबसीडी देण्याबाबत विचार करावा.
-चांगदेवराव होळकर, माजी अध्यक्ष,नाफेड
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट