म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करा, प्रशासकीय बदल्यांचे अन्यायकारक धोरण रद्द करा, अशा विविध मागण्यासाठी शनिवारपासून राज्यभर बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील १५०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटेतर्फे विविध मागण्यांसाठी वेळोवेळी बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली आहे. पण हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसत कामबंद आंदोलन पुकारले असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यात मुख्यालय स्तरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत लिपीकांनी सहभाग घेतला आहे. राज्य सरकारकडे
१५ मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, त्यातील प्रत्येक मागणीला शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात
आल्याचे राज्य कोषाध्यक्ष बाळासाहेब टिळे, हेमंत सानप, सदाशिव बारगळ, अरुण दोंदे, अंबादास पाटील, राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट