जेलरोडच्या इंगळेनगर चौकातील मटन, मच्छी आणि अन्य व्यावसायिकांच्या टपऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवल्या. या कारवाईनंतर तातडीने रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. व्यावसायिकांनी सहकार्य केल्याने तणाव निर्माण झाला नाही.
महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय उपअभियंता नीलेश साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पार पाडली. टपरीधारकांनीही सहकार्य केले. यावेळी पोलिस बंदोबस्त नव्हता. गेल्या आठवड्यात चव्हाण मळ्यातील झोपड्या हटविण्यासाठी कडक बंदोबस्त होता.
जेलरोडच्या या चौकात पन्नास वर्षापासून मच्छीबाजार भरत आहे. कालांतराने येथे मटन व चिकन विक्रेत्यानींही टपऱ्या टाकल्या. त्यापाठोपाठ सलून, हार व अन्य व्यावसायिकही आले. त्यामुळे पवारवाडीकडे जाणारा रस्ता अरुंद झाला होता. महापालिकेने पूर्वसूचना देऊन येथील सुमारे ४५ टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने हटविल्या. व्यावसायिकांनीही सामंजस्याची भूमिका घेतली.
रस्त्याचे काम सुरू
या मार्गावरील झोपडपट्टी तसेच टपरीधारकांचे अतिक्रमण तातडीने हटविण्यात आले आहे. टपरीधारकांबरोबरच येथे भाजी, हार, फळविक्रेतेही आहेत. त्यांचाही वाहतुकीला अडथळा होत होता. आता सर्व अतिक्रमण हटविल्याने चौक मोकळा झाला आहे. त्यामुळे पवारवाडीपर्यंत रस्ता रुंदीकरणही करण्यात आले. या रस्त्यावर खड्डे पडले होते.
पर्यायी जागा नाही
येथील व्यावसायिकांचे हातावर पोट आहे. टपऱ्या हटविल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना देण्यासाठी पर्यायी जागाच शिल्लक नाही. समाजकल्याणचा भूखंड जवळ असून अनेक वर्षांपासून तो पडून आहे. येथे मच्छीविक्रेत्यांना दहा दहा बाय आणि भाजी विक्रेत्यांना सात बाय सात जागा द्यावी, अशी मागणी शांताराम पाडळे, योगेश आहेर, रफीक शेख, इस्माईल खान, दिलावर शेख, संगीता मोरे, सुमन बेंडकुळे आदी व्यावसायिकांनी केली आहे. नव्या जागेतील स्वच्छता आम्हीच करू, फक्त लाईट व पाणी द्या, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट