निफाड आणि चांदवड तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे लोन आता अन्य तालुक्यांमध्ये सरकू लागले आहे. चांदवड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याच्या घटना उघडकीस आली आहे. यामुळे वडनेर भैरव आणि हिरापूर या दोन गावांवर शोककळा पसरली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३४ झाली आहे.
चांदवड तालुक्यात कोंडाजी रामभाऊ वक्ते (वय ३६ रा. वडनेर भैरव, ता .चांदवड) व देवीदास भाऊसाहेब चव्हाण (वय ४२, रा.हिरापूर ता.चांदवड ) या शेतकऱ्यांनी विष प्रशान करून आत्महत्या केली. वक्ते हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मंगळवारी (दि.१७) रात्री नऊच्या सुमारास कुटुंबीयांसह जेवण करून घरासमोर झोपण्यासाठी चालले होते. त्यावेळी त्यांनी औषधाची बाटली सोबत घेतली होती. खोलीतून मुलाने काय घेतले म्हणून त्यांची आई गीताबाई यांना संशय आला. त्यांनी घराबाहेर जाऊन पाहिले असता कोंडाजी हे औषध पिऊन उलट्या करीत होते. त्यांना तत्काळ पिंपळगाव बसवंत येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांच्या नावे सोसायटीचे आठ लाख रुपये, तसेच गावातील वेगवेगळ्या तीन पतसंस्थांचे तीन लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती पुढे आली आहे. कोंडाजी यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी वृद्ध आई वडील भाऊ असा परिवार आहे.
दुसरी घटना हिरापूर येथे घडली. देवीदास भाऊसाहेब चव्हाण (वय ३८) यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिरापूर येथे त्यांची शेती असून, शेतीवर त्यांनी कर्ज काढल्याची प्राथमिक माहिती आहे.
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे लोणे पसरू लागले आहे. निफाडमध्ये सर्वाधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ही चिंताजनक बाब आहे. गेल्या वर्षी ८५ शेतक-यांनी आत्महत्यांनी केली होती. यावर्षी चारच महिन्यात हा आकडा ३४ वर पोहोचला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट