आम्ही तुमच्या फडतूस कायद्याला घाबरत नाही. माझ्यावर १९ केसेस आहेत आणि मी आताच मोक्क्यातून सुटलो आहे. जेल म्हणजे माझं सासर आहे. मी मनात आलं तेव्हा येतो आणि परत जातो, असे धमकावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जया दिवे या सराईत गुन्हेगारामुळे एका महिलेसह पाच ते सहा सामाजिक कार्यकर्त्यांना भूमिगत व्हावे लागले आहे. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू असून, यामुळे पंचवटी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पीडित महिला आणि तक्रारदार कविता पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचे मालेगाव स्टॅण्ड परिसरातील पंजाब हॉटेल शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयातून मानवाधिकार व बालगुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. पवार यांच्या कार्याची परिसरात दखल घेतली जाते. ६ एप्रिल रोजी रात्री पवार आपल्या कार्यालयातून घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत काही सामाजिक कार्यकर्ते देखील होते. कार्यालयातून बाहेर निघाल्यानंतर पवार यांनी शेजारच्या एका दुकानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फ्लेक्स बोर्ड तयार करण्यासाठी दिले. या दुकानातून त्या बाहेर पडल्या असता सराईत गुन्हेगार जया दिवे याने त्यांना हटकले. पवार यांनी त्यास विचारणा केली असता मद्यधुंद अवस्थेतील दिवेने त्यांना शिवीगाळ सुरू केली. दिवेच्या काही साथिदारांनी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केला. कविता पवार यांना देखील मारहाण झाली. पवार व त्यांचे साथिदार लागलीच पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे काही पक्षांचे कार्यकर्ते सुध्दा पोहचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाद नको म्हणून ही तक्रार मागे घेण्यासाठी सर्वांनी गळ घातली. पवार यांनी सुध्दा त्यास होकार दिला. मोक्क्यातीलच आणखी सराईत राकेश कोष्टीने स्वतः पवार यांची समजूत काढत प्रकरणावर पडदा पाडला. मात्र, गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास दिवे, त्याचा साथिदार कुंदन परदेशी, अक्षय इंगळे व चार ते पाच जणांनी पवार यांच्या कार्यालयात धुडगूस घातला. देशी कट्टे दाखवत जीवे मारण्याची धमकी या संशयितांनी दिली. या प्रकरणी पोलिसांकडे दिलेला तक्रार अर्ज मागे घेण्याची धमकी त्यांनी दिली. या घटनेची माहिती पवार यांनी लागलीच पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना दिली. मात्र, त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याचा आरोप पवार यांनी केला. या घटनेतील सर्व आरोपी सराईत असून, मागील दोन दिवसांपासून मला व माझ्या साथिदारांना भूमिगत रहावे लागत आहे.
किती दिवस लपायचे? गुन्हेगार जीव घेतील या भीतीने किती दिवस लपत फिरायचे, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. १८ पेक्षा गंभीर गुन्हे दाखल असलेले संशयित सर्वसामान्यांना जगू देणार नसतील आणि पोलिस उफरटे सल्ले देणार असेल तर कोणाकडे दाद मागायची, असा सवाल पवार यांनी केला. सराईत गुन्हेगारांकडून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराची पंचवटीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पंचवटीच्या विभाजनाने साधले काय? पंचवटीतील गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने या पोलिस स्टेशनचे विभाजन करून म्हसरूळ हे नवीन पोलिस स्टेशन सुरू केले. तीन वाहनांच्या गस्ती ऐवजी आता या भागात सहा वाहने येथे गस्तीवर असतात. पोलिसांचे संख्याबळ दुप्पट झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढली. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. मात्र, यानंतरही पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.
या प्रकरणी अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेने पहिल्या वेळी तक्रार देण्याऐवजी तडजोड केली होती. या गुन्ह्यात मोक्का असलेल्या संशयितांचा समावेश असून, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर महिलेच्या तक्रारीनुसार सर्वांवर कारवाई करण्यात येईल. - प्रकाश सपकाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी
सराईत गुन्हेगारांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येतात. ते मनाला वाटेल त्यावेळी कार्यालयात येऊन कट्टे दाखवतात. पोलिस निरीक्षक मात्र सहकार्य करण्याऐवजी आम्हालाच मागे हटण्याचा सल्ला देतात. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी आदेश देऊनही पीआय सपकाळे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातले. पंचवटी पोलिसांमुळे आम्हाला भूमिगत व्हावे लागले. - कविता पवार, पीडीत तक्रारदार महिला
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट