जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून, टँकरच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार दिल्यापासून तालुकावासीयांना दिलासा मिळू लागला आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक पाण्याचे दुर्भिक्ष्य असून, तेथील ११ गावे आणि ९२ वाड्यांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्केच पाणी शिल्ल्क आहे. त्यावर जुलैपर्यंत शहर आणि जिल्हावासीयांची तहान भागविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. विहिरी, बंधारे आटले असून मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा झाल्याने अनेक ठिकाणी हातपंपांनीही मान टाकली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची भिस्त टँकरवरच अवलंबून आहे. आजमितीस जिल्ह्यात १०४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील ११६ गावे आणि २१४ वाड्या अशा ३३० ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागला आहे. त्यासाठी ३५ सरकारी, ६९ खासगी अशा १०४ टँकर्सची मदत घेण्यात येते आहे. येवल्यात सर्वाधिक ४३ गावांमध्ये सध्या टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. सर्वाधिक ९२ वाड्या नांदगावातील आहेत.
सर्वाधिक टँकर येवल्यात येवल्यात २४, नांदगावात १९, सिन्नर आणि बागलाणमध्ये प्रत्येकी १६ तर देवळ्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेठमध्ये तीन तर दिंडोरी, चांदवड, सुरगाणा, निफाड आणि इगतपुरीत प्रत्येकी दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट