महापालिकेतील महाआघाडीने शेवटच्या क्षणी एकीचे दर्शन घडवत, युतीच्या आरपीआय कार्डला धूळ चारली आहे. शेख यांच्या निवडीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने पंचवार्षिकच्या शेवटच्या वर्षी सभापतीपद आपल्याकडे राहण्यासाठी सत्ताधारी मनसेने सर्व शक्ती पणाला लावली होती. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष व काँग्रेसची एकत्रित मोट बांधत सभापतीपदावर दावा ठोकला होता. विजयासाठी अपेक्षित नऊचा आकडा मनसेने आधीच पूर्ण केल्याने बुधवारी या पक्षाच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. पावणे अकरा वाजता मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष असे ११ सदस्य सभागृहात दाखल झाले. सभापतीपदासाठी मनसेतर्फे सलिम शेख यांच्या रुपाने तगडा उमेदवार मैदानात असल्याने भाजप-सेनेने आरपीआयकार्ड खेळत पराभवाची औपचारिकता पूर्ण केली. अर्ज माघारी घेण्याच्या दहा मिनिटे अगोदर शिवसेना व भाजपच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने सलिम शेख आणि प्रकाश लोंढे यांच्यात सरळ सामना झाला. मनसेतर्फे शेख यांच्यासह अशोक सातभाई, मेघा साळवे, यशवंत निकुळे, सुरेखा भोसले, 'राष्ट्रवादी'चे संजय साबळे, समाधान जाधव, रंजना पवार, काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, विमलताई पाटील, अपक्ष रशिदा शेख असे ११ सदस्यांनी मतदान केले. तर लोंढे यांच्या बाजूने लोंढेसह मनीषा हेकरे, मंगला आढाव, दिनकर पाटील, फुलाबाई बोडके यांनी मतदान केले. त्यामुळे शेख यांना ११, तर लोंढे यांना ५ मते मिळाल्याने पीठासन अधिकारी रावसाहेब बागडे यांनी शेख यांच्या निवडीची घोषणा केला.
बंदोबस्ताअभावी निवडणूक
स्थायी समिती निवडणुकीत राडा होत असल्याने दरवर्षी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावला जातो. परंतु, यावेळेस सलिम शेख यांनी एकतर्फी विजयाचे गणित जुळवून लावले असल्याने पोलिसांनी बंदोबस्ताकडेच पाठ फिरवली. त्यामुळे प्रथमच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनीच पूर्ण सुरक्षा सांभाळत निवडणूक प्रक्रिया पार पाडली. शेवटच्या क्षणी गोंधळ होताच पोलिस दाखल झाले. त्यामुळे राडा होणारच नाही, अशी पूर्वकल्पना पोलिसांना होती की काय अशी चर्चा होती.
आरपीआय पदाधिकाऱ्यांची दादागिरी स्थायी समितीतील पराभव आरपीआयचे पदाधिकारी पचवू शकले नाहीत. सभापती निवडीनंतर रामायणजवळ मनसेचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करतांना, आरपीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी जल्लोषाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. ढोल ताशे बंद करीत, काही जणांना मारहाण करण्यापर्यंत या पदाधिकाऱ्यांची मजल गेली होती. त्यामुळे मनसे-आरपीआय कार्यकर्ते एकमेकांना भिडले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद सोडवला.
युतीची खेळी अपयशी मनसेला नामोहरण करण्यासाठी शिवसेना-भाजपतर्फे ऐनवेळी आरपीआयकार्ड खेळण्यात आले. महाआघाडीत दलित मते आपल्या पारड्यात पडतील, या हिशेबाने प्रकाश लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु, महाआघाडीतील सदस्यांची एकजूट कायम राहिल्याने युतीची खेळी अपयशी ठरली. चालू पंचवार्षिकमध्ये मनसेला तिसऱ्यांदा सभापतीपदाचा मान मिळाला आहे. आर. डी. धोंगडे, राहुल ढिकले यांच्यापाठोपाठ आता सलिम शेख यांच्या रुपाने हाती तिसऱ्यांदा स्थायीच्या चाव्या आल्याने शेवटच्या वर्षी मनसेला नवनिर्माण करून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मनसेने दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची सुंदर व स्वच्छ नाशिकची संकल्पना पूर्ण करू. सर्वपक्षीय सदस्यांना सोबत घेऊन नाशिकचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ. - सलिम शेख, नवनियुक्त सभापती, स्थायी समिती
आरपीआयला पाठिंबा देवून शिवसेना-भाजपने शब्द पाळला आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार केवळ बोलण्यापुरताच असल्याचे काँग्रेस राष्ट्रवादीने कृतीतून दाखवून दिले आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला आहे. - प्रकाश लोंढे, आरपीआय, उमेदवार
महापालिकेतील अपक्ष महाआघाडीचा हा निर्णायक विजय आहे. सर्वपक्षीयांना सोबत घेवून आम्ही नाशिकचा विकास करीत आहोत. जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. - अशोक मुर्तडक, महापौर, नाशिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट