म. टा. वृत्तसेवा, धुळे
केंद्र सरकारने लादलेल्या एक्साईज ड्युटी हटावसाठी १७ मार्चला दिल्लीत रामलीला मैदानावर मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी धुळे जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे गुरूवारी शहरातून मुक मोर्चा काढण्यात आला.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सराफांच्या बंदला अजूनही सरकारने काही प्रतिसाद दिलेला नाही. जिल्ह्यातील सराफा दुकाने गेली १७ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्यासोबत व्यावसायिकांवरही पडलेला आहे. त्यात सुवर्णकारांना रोजगार मिळत नाही आहे. तसेच ऐन लग्नाच्या मोसमात बंद आल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने सोन्यावर लादलेला जाचक ठरणारा एक्साइज ड्युटी कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सराफ, सुवर्णकारांचा गेल्या सतरा दिवसांपासून बंद सुरू आहे. हा कायदा सरकार परत घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे वेळावेळी सराफा असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी धुळे जिल्हा सराफ असोसिएशनतर्फे गुरूवारी हा मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्च्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चा सराफ बाजारातून निघत महात्मा गांधी पुतळामार्गे, पारोळारोड, मनपामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी अध्यक्ष विक्रम राठोड, जितेंद्र चौवटीया, अजय नाशिककर, दिलीप कुचरिया यांच्यासह शहर व जिल्ह्यातील सराफ, सुवर्णकार, कारागीर सहभागी झाले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट