प्रा. डॉ. विवेक खरे
जागतिक महिला दिन म्हणून ८ मार्च हा दिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात जगभर साजरा झाला. महिलांना केंद्रभागी ठेऊन वेगवेगळ्या सभा-समारंभांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन आपल्याकडे या निमित्ताने करण्यात आले. महिला दिन साजरा करण्यामागे एक मोठा संघर्षमय इतिहास आहे तो या दिनाच्या निमित्ताने आपणाला वर्तमानपत्रे वा इतर माध्यमांद्वारे ठाऊक होतोच. ८ मार्च १९०८ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातोय. भारतात १९४३ सालापासून महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. भारतातील औद्योगिक तसेच आर्थिक क्रांतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत त्याची सुरुवात झाली ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब म्हटली पाहिजे. कारण महाराष्ट्राला महिला मुक्तीच्या चळवळीचा एक इतिहास आहे. १९७५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने (युनोने) महिला वर्ष म्हणून साजरे केले त्या निमित्त जगातील सर्व स्त्रियांच्या तत्कालीन परिस्थितीचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला गेला. महिला किंवा स्त्रिया त्या मग कोणत्याही देशाच्या असोत त्यांचे म्हणून काही प्रश्न जगाच्या समोर या निमित्ताने येण्यास मदतच झाली. स्त्रियांच्या या वेगवेगळ्या प्रश्नांतून, त्या त्या काळातील त्यांच्या अभ्यासातून, त्यातून मार्ग काढण्याच्या संघर्षातून आज आपल्यापुढे एक प्रगत, स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकलेली स्त्री उभी राहते. अर्थात आजही जगभरातील स्त्रियांचे प्रश्न पूर्णपणे संपले आहेत असे म्हणता येण्यासारखी स्थिती मात्र नाही.
भारतीय परिप्रेक्ष्यातून विचार करता येथील स्त्रीला आजही असंख्य समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागते आहे. धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या तिला आजही दुय्यम ठरविले जात असल्याचे चित्र आपणास बघावयास मिळते आहे. याचे अलिकडचे ताजे उदाहरण म्हणजे देवळाच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांचा सुरू असलेला संघर्ष. भूमाता ब्रिगेड या संघटनेने आधी शनिशिंगणापूर आणि आता त्र्यंबकेश्वर येथे अशा प्रकारचा लढा उभा केला. या पार्श्वभूमीवर मुस्लिम स्त्रियांनीसुद्धा आपल्यालाही दर्ग्याच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी लढा उभा केला. ही खरेतर या सर्व स्त्रियांची आत्मसन्मानाची लढाई आहे. भारतीय राज्यघटनेने समस्त स्त्री-पुरुषांना समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. असे असतांनाही पुरुषांना एक न्याय आणि स्त्रियांना दुसरा हे खचितच न पटण्यासारखे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आपल्या जीवनाचे सार्थक मुळीच होणार नाही हे या आंदोलनकर्त्या स्त्रियांना देखील माहित आहे. पण ही त्यांची आत्मसन्मानाची एक प्रतिकात्मक लढाई आहे. या लढाईला प्रखर विरोध करणाऱ्यासुद्धा स्त्रियाच आहेत याचेही आश्चर्य वाटते. समस्त स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणाऱ्या स्त्रियांना स्त्रियाच आडकाठी आणीत आहेत ही गोष्टच विचित्र आहे. मंत्रिपदी विराजमान झालेली पंकजा मुंढे यांच्यासारखी एखादी स्त्री असो वा धर्माच्या कामात महिलांनी लुडबुड करू नये असे म्हणून आंदोलनास विरोध करणाऱ्या इतर अनेक स्त्रिया असो धार्मिक रूढी परंपरांचा किती जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर आहे हेही या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते. या सर्व घडामोडींमधून दिसते ती स्त्रियांची गुलामीची मानसिकता. स्त्री गुलामीची पुरुषी मानसिकता आणि अशा स्त्रियांची मानसिकता या एकाच प्रकारच्या असल्याचे दिसते. गाभारा प्रवेशाच्या आंदोलनातून हे वास्तव अधिक अधोरेखित झाले आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील महिला चळवळीतील अंतर्विरोधाचीही आज चिकित्सा होणे गरजेचे आहे. भारतात महिलांचे शोषण, त्यांची होणारी कुचंबणा, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या व्यथा-वेदना, बलात्कार, लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार, कुपोषण, हुंडा बळी, अपहरण, स्त्रीभ्रूणहत्या, ऑनर किलिंग अशा अनेक विषय आज गंभीर रूप धारण करून समाजासमोर उभे आहेत. आपण नेहमीच या विषयांवर उच्चरवाने बोलतोही. मात्र हे प्रश्न आणि समस्या मुळापासून कमी करण्यासाठी मुलभूत प्रयत्न होतांना दिसत नाहीत. धार्मिक पगडा, अंधश्रद्धा. रूढी परंपरा यांच्या वाहक असणाऱ्या स्त्रिया यामधूनच शोषणाच्या बळी ठरतात हे वास्तव आहे. स्त्रीवाद, स्त्रीवादी चळवळी यांत काम करणाऱ्या स्त्रियाही या प्रथा परंपरांमधून पूर्णपणे बाहेर पडलेल्या दिसत नाहीत. उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक-प्राध्यापक झालेल्या स्त्रिया आजही धार्मिक गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या आहेत. १९ व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शूद्रातिशूद्र म्हणून गणल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या अवनतीचे कारण शोधून त्यांना शिक्षित करण्यासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावले. शिक्षणाने स्त्रियांचा कायमचा जाच संपेल, अशी त्यांची त्यामागील भावना होती.
स्त्रियांशी संबंधित तत्कालीन समाजातील अनिष्ठ अशा सतीप्रथा, बाला जरठ कुमारी विवाह, विधवांचे केशवपन, परितक्त्या, कुमारी मातांचा प्रश्न या सर्वच प्रश्नांवरील त्याचे कार्य दिशादर्शक ठरणारे होते. या पुढील काळात शाहू महाराज यांनी तर स्त्रियांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदाच केला. 'हिंदू कोडबिलाच्या' माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीय स्त्रियांना कायद्याचे कवच देऊ करण्याचा प्रयत्न केला. पण या सर्वच समाजसुधारकांच्या कार्यापासून आजच्या आधुनिक म्हणविणाऱ्या स्त्रीने आपली नाळ तोडून घेतल्याचे चित्र दिसते आहे. आपल्या महिला मुक्तीची मुळे पाश्चात्य विचारांत आणि आंदोलनात शोधणाऱ्या भारतातील सर्वच स्त्रियांनी याचा गंभीरपणे विचार करायला हवा. जाती पातीच्या, धर्म रुढींच्या जाचक बंधनातून जोवर भारतीय स्त्री मुक्त होणार नाही तोवर महिला दिन साजरा करून काहीही हाती लागणार नाही.
स्त्रीवादी चळवळीतून निर्माण झालेले स्त्रीवादी साहित्य आज कोणत्या स्त्रियांचे प्रश्न मांडीत आहे हा देखील विचार या महिला दिनाच्या अनुषंगाने करण्यासारखा आहे. शहरात राहणाऱ्या, सुशिक्षित, आधुनिक म्हणविणाऱ्या तथाकथित स्त्रिया खरेच आपल्या लेखनातून भारतातील एकूण स्त्रियांचे प्रश्न मांडीत आहेत का? त्यांची दु:खे आणि गावखेड्यातील स्त्रियांची दु:खे यात काही समान धागा आहे का? असेल तर तो त्यांच्या लेखनाचा विषय का होत नाही? दलित, आदिवासी, कष्टकरी, श्रमजीवी स्त्रियांचे प्रश्न आजच्या स्त्रीवादी लेखिका हिरीरीने कधी मांडतील का? असे असंख्य प्रश्न स्त्रीवादी चळवळीत कार्य करणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला विचारायला हवेत. महिला दिनाच्या निमित्ताने या प्रश्नांचीही चर्चा होणे गरजेचे आहे. भारतात आजही महिला मुक्तीच्या विषयावर कुत्सितपणे बोलले जाते. तथाकथित पुरुषी मानसिकता कवटाळून व्यवहार करणारे विचारवंत, साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळविणारे लेखक, उच्चवर्गीय राजकारणी हे सर्व घटक महिला मुक्तीच्या विरोधात आहेत. महिला मुक्ती हा त्यांच्यासाठी टिंगलटवाळीचा विषय असतो. म्हणून तर आजही महिला आरक्षण विधेयक संमत होत नाही. शिक्षण, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रात महिलांची आज कुचंबणा होते आहे. भारतातल्या सर्वच महिला एकत्र आल्याशिवाय हे शक्य होण्यासारखे नाही. महिला दिनाच्या दिवशी फक्त एकत्र येऊन, आपले शक्तिप्रदर्शन घडवून हे होणे नाही. महिला मुक्तीसाठी महिलांची संघटीत शक्ती आणि कार्य उभे राहणे महत्त्वाचे आहे. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन यशस्वी होईल असे वाटते..
(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट