पंकज काकुळीद, धुळे
देशात एचआयव्ही एड्स संसर्गित लोक साधारणपणे २५ लाखांपेक्षा अधिक आहे. त्यात सर्वात जास्त प्रमाण स्त्रियांचे आहे. देशात दर शंभर एचआयव्ही संसर्गित लोकांमध्ये ६१ पुरूष आणि ३९ महिला असतात. या आकड्यानुसार पुरूषांमध्ये संसर्गाची संख्या जास्त आहे. याच अनुषंगाने धुळे जिल्हा एचआयव्हीच्या जंजाळातून सावरतोय असे गेल्या दहा वर्षांच्या एचआयव्ही रूग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एचआयव्हीच्या रूग्णसंख्येत आशादायक घट झाली आहे. धुळे जिल्ह्यात सन २००२ ते ऑक्टोंबर २०१५ अखेर एचआयव्हीची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत घट होत आहे, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक अधिकारी शीतल पाटील यांनी 'मटा'शी बोलतांना दिली.
सध्या जिल्हा नियंत्रण कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात ११ एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र आहेत. या केंद्रामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर २०१५ अखेर ४७ हजार ८२५ गरोदर स्त्रियांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली आहे. त्यात १८ महिलांना याची लागण झाली आहे. तर सर्वसाधारण रूग्णांमध्ये ४२ हजार ४१२ रूग्णांच्या तपासणीत ४४१ जण एचआयव्ही बाधित झाल्याचे वैद्यकिय अहवालानुसार माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यात सर्वोपचार रूग्णालयातंर्गत ठिकठिकाणी अकरा एचआयव्ही नियंत्रण तपासणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यात १५ समुपदेशक एचआयव्ही तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांना याबाबत सविस्तर माहिती देतात. त्याचबरोबर याविषयी कोणत्या उपाय व दक्षता घ्याव्यात याचेही मार्गदर्शन करतात. यामुळेच गेल्या दहावर्षांपूर्वीपेक्षा आता लोकांमध्ये एचआयव्हीविषयी जागरूकता झाल्याने रूग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे. ही केंद्रे जिल्ह्यासह मालेगाव, जळगाव, नंदुरबार, नाशिक व इतर ठिकाणाहून रूग्ण उपचारासाठी दाखल होतात.
या केंद्रात आता ६१५ बाधित रूग्णांवर औषधोपचार नियमित सुरू आहेत. तर जिल्हा एड्स नियंत्रक केंद्र कार्यालयामार्फत जिल्हाभरातील ११ केंद्रावर ४४१ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रक कार्यालयाने दिली आहे. एचआयव्ही बाधिताला अगोदर दूर ठेवले जाई मात्र आता यावर औषधे येऊ लागल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारनेही एचआयव्हीवर आता प्राथमिक उपाय म्हणून औषधे बाजारात आणली आहेत. मात्र या रोगावरील औषधींनी रूग्ण कायमस्वरूपी बरा होत नाही तर त्याचे आयुष्य वाढते. यासोबतच यासाठी शासनाने जनजागृती व पथनाट्याद्वारे या आजाराची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यत पोहोचविली आहे.
प्रतिबंधात्मक उपाय
> रूग्णाने नियमित वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार व खबरदारी घ्यावी > प्रत्येकाने एकाच साथीदाराशी एकनिष्ठ राहावे > सुरक्षिततेसाठी कंडोमचा नियमित वापर करावा > गदोदर स्त्रियांनी एड्सची तपासणी करावी > एकदाच वापरात येणाऱ्या सुईचा वापर करावा > सरकारी रक्तपेढीतीलच रक्त वापरावे
एचआयव्ही म्हणजे काय?
हा आजार म्हणजे एचआयव्ही हा एक विषाणू आहे. जेव्हा हा मानवी शरीरात आढळतो तेव्हा त्यावेळी एचआयव्ही रोगाची बाधा झाल्याचे स्पष्ट होते. हा विषाणू आपल्या शरीरातील सीडी-४ पेशींना दुर्बल बनवितो. त्याचे प्रमाण कमी करतो. तेव्हा शरीराची आजाराविरूध्द लढण्याची क्षमता कमी होत जाते व त्यामुळे शरीर कमकूवत बनते. त्यालाच एड्स असे म्हणतात.
एड्सविषयी गेल्या काही वर्षांपूर्वी माहिती नव्हती. मात्र आता ठिकठिकाणी एचआयव्ही नियंत्रक केंद्र झाल्याने रूग्णांना एड्सविषयी माहिती देऊन त्यांच्या मनातून भीती काढता येते. - बाबाजी पाटील, एचआयव्ही, समुपदेशक, धुळे
एड्स रूग्णांसाठी जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी नियंत्रक केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर औषधी, तसेच अडचणी समजून घेवून त्या सोडविण्यात येतात. यामुळेच रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आता नागरिक सुज्ञ झाल्यानेच ही घट होत आहे. - शितल पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, धुळे
जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या ठिकाणाहून एड्स रूग्ण उपचारासाठी येतात. त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन व उपचार केले जातात. गेल्या काही वर्षांपेक्षा आता बाधितांची संख्याही कमी होत आहे. - अभिषेक पाटील, एचआयव्ही वैद्यकीय अधिकारी, धुळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट