म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कविवर्य कुसुमाग्रजांच्या अजरामर कविता...वर्षानुवर्षे साधना केल्याने तावून सुलाखून निघालेला तीन कलावंतांचा स्वर...प्रत्येक कवितेला रसिकांची भरभरून दाद...टाळ्या...निश्वास...उसासे असा माहोल निर्माण झाला होता, 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' या कार्यक्रमात. महाकवी कालिदास कलामंदिराचे वातावरण या भावविभ्रमांनी अगदी भारून गेले होते.
महाराष्ट्र टाइम्स आणि दातार जेनेटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती अर्थातच मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' हा काव्यवाचन व नाट्य प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. या कार्यक्रमात किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र, प्रसाद ओक व स्पृहा जोशी या कसलेल्या कलावंतांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. प्रसाद ओकचा गुलाबी आवाज, स्पृहा जोशीचा मधाळ आवाज तर किशोर कदम यांचा खर्जातला आवाज अशा तीन आवाजांचे मिश्रण झाल्याने 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' कार्यक्रमात वेगवेगळे रंग भरले गेले.
सुरूवातीला किशोर कदम यांनी धीरगंभीर आवाजात 'नटसम्राट' नाटकातील एका उताऱ्याचे वाचन केले. त्यांनतर स्पृहा यांनी 'जाग' ही कविता सादर केली. 'सूर्यास्ताचे...हे चार किरण मी खुडून आणले आहेत, आजच्या असह्य...भयाण...तुफानलेल्या रात्रीसाठी. ते देणार नाहीत प्रकाश...पेटवणार नाहीत दिवे, ते फक्त जागृत ठेवतील...उद्याचा सूर्योदय, तुझ्या आणि माझ्या मनातला.' या कवितेनंतर प्रसाद ओक यांनी, 'तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता...तेव्हा माझ्याशी बोलू नका कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा...बहुधा' ही कविता सादर केली. 'माझ्या मराठी मातीचा... लावा ललाटास टिळा' ही कविता लयबध्द रितीने सादर करीत स्पृहाने त्यात रंगत आणली तर प्रसादने, 'माझं मराठीपण शोधलं मी सह्याद्रीच्या डोंगरात', ही कविता सादर केली. कविता व नाट्यप्रवेशांच्या सादरीकरणादरम्यान कुसुमाग्रजांच्या गीतांचे काही तुकडे पेरण्यात आले होते. 'माझ्या मातीचे गायन...तुझ्या आकाशश्रृतींनी...जरा कानोसा देऊन...कधी ऐकशील का रे?' हे गीत ऐकताना प्रेक्षक भावविवश झाले होते. 'रात्र म्हणजे नक्की काय, प्रकाशावर धरलेली साय, रात्री अपरात्री काही सुचणारा क्षण म्हणजे देव असावा, मी एका रात्री त्या नक्षत्रांना पुसले, परमेश्वर नाही मम मन घोकीत बसले, दिवेलागणीच्या ओल्या अंधारावर लोंबत असलेले रानकाजवे', परमेश्वराचा व नास्तिकाचा संवाद असलेला एक संवादतुकडा प्रसाद व किशोर कदम यांनी सादर केला. प्रसाद ओकच्या स्वरातील 'दर्शनाला आलात? या.. पण या देवालयात, सध्या देव नाही...गाभारा आहे, चांदीचे मखर आहे. सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.' ही मुक्तछंदातील कविता रसिकांची दाद मिळवून गेली. दिवाणखाणा, मधुराणी, कवीचे दु:ख, 'काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, साद घालशील तेव्हाच येईल, पुरे झाले चंद्रसूर्य...पुरे झाला वारा, शिणलेल्या झाडापाशी, ओळखलंत का सर मला, मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले, सरणार कधी रण, मी एका बऱ्यापैकी घरात राहतो, नवलाख तळपती दीप विजेचे येथ' या कवितांनतर 'कौंतेय' नाटकाचा एक संवादतुकडा या तिन्ही कलावंतांनी सादर केला. 'सर्वात्मका शिवसुंदरा' या प्रार्थनेने 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी किशोर कदम, प्रसाद ओक, स्पृहा जोशी तसेच दातार जेनेटिक्सच्या शोभना दातार व अश्विनी घैसास यांचा सत्कार 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे आणि 'टाइम्स ग्रुप'च्या रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख यांनी केला. कार्यक्रमाची संकल्पना नाट्यलेखक दत्ता पाटील यांची होती. दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस उपायुक्त विजय पाटील, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, महापालिका उपायुक्त जीवन सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, सभागृह नेते सलिम शेख, गटनेते अनिल मटाले, भाजपाचे लक्ष्मण सावजी, अजय बोरस्ते या मान्यवरांच्या उपस्थितीत 'मटा'चा काव्य व नाट्य अभिवाचन सोहळा रंगला. आपल्या कुटुंबीयांसोबत आलेल्या या मान्यवरांचा शुक्रवार रमणीय झाला.
कार्यक्रम हाऊसफुल्ल 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' हा काव्यवाचनाचा कार्यक्रम २६ फेब्रुवारी रोजी होता परंतु, २५ फेब्रुवारी रोजीच नाशिककरांनी सर्व तिकिटे राखीव केल्याने हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागला. कुसुमाग्रजांच्या कवितांवरील प्रेमच यातून व्यक्त झाले. कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती होती. मुख्य नाट्यगृह भरून ओसंडून वहात होते. त्यामुळे प्रेक्षकांची सोय बाल्कनीत करण्यात आली. काही वेळाने बाल्कनीतही बसायला जागा नसल्याने कालिदासच्या मधल्या पॅसेजमध्ये उभे राहून या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घेतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट