निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील असमतोलपणा व त्यातच कमी प्रमाणात झालेल्या पर्जन्यमान यामुळे यंदा खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामाला सुध्दा 'बुरे दिन 'आले आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. तर ज्वारीसह, कांदा व इतर नगदी पिके पाण्याअभावी धोक्यात सापडली आहेत. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आल्याने शेतकरी वर्गास यंदाचे आर्थिक वर्ष तोटा देणारे ठरत आहे कमी पर्जन्यमानामुळे रब्बीला मोठा फटका बसल्यामुळे जिल्हाभरात गव्हाच्या व हरभऱ्याच्या पिकासह इतर नगदी पिकांच्या उत्पन्नात निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कृषी नकाशावर रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणुन नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. मात्र, अलीकडच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील खरीप व रब्बी पिकाला फटका बसत आहे. त्यातच अवेळी आलेला पाऊस, अवकाळी, गारपीट व कमी झालेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते.
इगतपुरी तालुक्यात रब्बी हंगामासाठी यंदा ४ हजार ८०२ हेक्टर सरासरी लागवडीसाठी गृहीत धरण्यात आले होते. मात्र, पाण्याअभावी अवघ्या २ हजार ४८० हेक्टरवर रब्बीच्या पिकांची लागवड झाली आहे. त्यातच तालुक्यात रब्बीत १,४५१ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड होत असते. यंदा फक्त ९८५ हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने अवकृपा केल्याने रब्बी हंगामावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यात गव्हाची स्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यात सरासरी ७६ हजार ८०० हेक्टर गव्हाचे क्षेत्र असतांना केवळ ३७ हजार ८७२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झालेली आहे. त्याचबरोबर याच हंगामातील हरभऱ्याच्या बाबतीतही तीच गत आहे. ४१ हजार १०० हेक्टर क्षेत्र हरभऱ्यासाठी असूनही केवळ २६ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रावर हरभरा लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा गव्हाबरोबर आता हरभऱ्याचेही उत्पन्न घटणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ज्वारी व कांदा अव्वल यंदाच्या रब्बी हंगामात फक्त कांदा व ज्वारीने आघाडी घेतली असून, जिल्ह्यात यंदा १ लाख ३९ हजार ३९० हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे, तर १ लाख १९ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र, असे असूनही सर्वाधिक वाईट स्थिती ऊस पिकाची झाली आहे. यंदा फक्त ६ हजार २१२ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. इगतपुरी तालुक्यात फक्त ३३९ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची, तर अवघ्या ११८ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट