ashwini.kawale @timesgroup.com
नाशिक : हलके दप्तर, तंत्रज्ञानाशी नाळ जोडण्याची गरज, शाळांचा विकास या सर्वांसाठी सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा 'ई-लर्निंग'ला प्राधान्य देत आहेत. मनपाच्या शाळांनीही तंत्रज्ञानाच्या या वाटेवर प्रवास सुरू केला खरा, मात्र तो पूर्ण होण्यापूर्वीच संपला. शाळांमधील तंत्रज्ञानाचा हाच प्रवास मजबूत करण्यासाठी आता थेट मनपा शाळांचे शिक्षक विडा उचलणार आहेत. तंत्रज्ञानाची कास धरुन ते स्वतः विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंगचे सॉफ्टवेअर तयार करणार आहेत.
शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरल्यास विद्यार्थ्यांना आपोआपच त्याचे ज्ञान मिळेल, तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज, अभ्यासक्रम यांची माहिती असल्याने शिक्षकांचा सहभाग सॉफ्टवेअर निर्मितीत अग्रगण्य ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेने ई-लर्निंगसाठी खास सॉफ्टवेअर लाखो रुपये खर्च करुन विकत घेतले होते. मात्र हे सॉफ्टवेअर शिक्षणक्षेत्राची जाण नसलेल्यांनी तयार केली असल्याची तक्रार केली गेली. त्यातच इयत्ता तिसरी व चौथीचा अभ्यासक्रमही बदलल्याने हा खर्चही वाया गेला आणि हे सॉफ्टवेअर केवळ नावापुरते उरले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याप्रकारची परिस्थिती समोर आली होती. परिणामी, विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित ठरले.
यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व शिक्षा अभियानातील समावेशित शिक्षक या कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स)चे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. यासाठी अद्याप राज्यातील २० हजार ४८७ शिक्षकांनी नोंदणी केली आहे. विद्या परिषदेकडून निवडलेले तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद व महारपालिकेतील शिक्षकांना या सॉफ्टवेअरसाठी दोन दिवसांचे रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. मार्चअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत.
संशोधनातून होणार निर्मिती
ई-लर्निंग सॉफ्टवेअर निर्मिती करुन घेण्यासाठी 'संशोधन' ही जमेची बाजू असणार आहे. इंटरनेटवरील सॉफ्टवेअर्सचा अभ्यास, ज्या शाळांमध्ये ई-लर्निंग उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे, अशा शाळांना भेटी, कॉम्प्युटर तज्ज्ञांशी विचारविनिमय अशा अनेक बाबींच्या संशोधनातून या सॉफ्टवेअरची निर्मिती शिक्षक करणार आहेत.
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख शालेय वयापासूनच व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शिक्षकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट