वृन्दा भार्गवे
पंचवीस वर्षाचे माझे वय. घरात अगदी खापर पणजीपासून आईपर्यंत सगळेजण आहेत. आमच्या नात्यात ताणतणाव नाही. जे प्रश्न तुम्ही उभे करता ते देखील नाहीत. पण आजूबाजूला माझ्या मैत्रिणींच्या घरात तसे काही प्रश्न आहेत. जगण्याची शैली थोड्या फार फरकाने सारखी असली तरी हा तणाव का?
ही मुलगी ट्रॅव्हल एजन्सीत काम करणारी. एकत्र कुटुंब असून देखील तिला हवे तसे कपडे बाहेर घालता येत होते. तिला आवडतो म्हणून तिने खांद्यावर टॅटू काढून घेतला होता. केसांची स्टाइल सहजपणे ती बदलत होती. पंचवीस वर्षे वय झाले तरी अजून लग्न का करत नाही म्हणून वडिलधारे तिला धारेवर धरत नव्हते. या घरात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले तिचे आजोबा आणि सरकारी नोकर असलेले वडील, शिक्षिका असलेली आई होती. काका व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरत होता. बाहेरच्या जगातले क्षणोक्षणी बदलणारे वातावरण घरातल्यांसह तो शेअर करत होता. केबल ते डिश आणि डेस्कटॉप ते स्मार्ट फोनपर्यंतचा प्रवास या घरात सर्वांनी अनुभवला होता. युद्ध सत्याग्रह आणि एका भूभागासाठी प्राणाची आहुती अशा स्वतंत्र भारताच्या लढ्याबद्दल बोलणारी एक पिढी तिरंग्याच्या नितांत अभिमानात बुडालेली असायची. भाऊ डिजिटल स्वातंत्र्यापर्यंत आपण कसे पोहोचलो याचे श्रेय व्हिजन असणाऱ्या अगोदरच्या पिढीला मोकळेपणाने देऊन टाकायचा. देशापासून स्वत:च्या स्पेसपर्यंत झालेला प्रत्येक टप्पा त्याला अद्भुत वाटायचा. लोकशाहीचा पुरस्कर्ता असा हा देश, आणीबाणीने अस्वस्थ झाला त्या काळाचे साक्षीदार असणारे वडिलांचे मित्र गप्पा मारण्यासाठी अधेमध्ये यायचे. १९९० नंतरची आर्थिक क्रांती आणि जागतिकीकरणाच्या लाटेचा तडाखा घरादारात शिरताना याच घराने पाहिला होता.
ही तरुणी या वातावरणात वावरत होती तर तिचीच एखाद दुसरी मैत्रीण पाळणाघरात खेळत मोठी झालेली. भोवती वेगळीच खेळणी. बार्बी आणि टेडी बेअर तिच्या उशाशी. वडील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरीला आणि नंतर काही वर्षांसाठी तिथे जाऊन आल्याने नकळत्या वयात मैत्रिणीच्या पासपोर्टवर अनेकदा शिक्के उमटलेले. त्यानंतर इथेच स्थायिक झालेले ते कुटुंब. टाईमपास म्हणून अनेक गोष्टी त्या घरात घडणाऱ्या. गरज असो वा नसो, बाहेर देशी, बाहेर शहरी गेले की खरेदी. जास्तीत जास्त पैसा कपड्यांवर आणि फिरण्यावर.
तिच्या काही मैत्रिणींची कुटुंबे आपली मूळ घरे सोडून दुसरीकडे राहायला गेलेली. गेल्या दहा बारा वर्षात घरे वाडे चाळी जमीनदोस्त करून त्याजागी बांधलेल्या टोलेजंग इमारतींमध्ये त्यांचे झालेले वास्तव्य. चाळीवजा घरे सोडल्यामुळे त्यांनी आपणहून केलेले काही बदल. इंटेरीअर बदलले पण मुला मुलींना विचारण्यात येणारे प्रश्न मात्र तेच, जुने आणि टिपिकल तसेच. घरी मुलांचे उशिरा येणे. रात्री दहा-अकरापर्यंत ही तरुण मुले नेमकी काय करत असतात हा कुतूहलापेक्षा संतापाचा प्रश्न विचारत राहणारे हे पालक काय करतात दिवसभर, यातला संशय. दिवसभर वेळ घालवण्यातील मुलांचा अव्यवहारीपणा किंवा त्यांनी घराचे केलेले हॉस्टेल, त्यांचा उडाणटप्पूपणा.
या घरांनी मुलींना काय दिले तर निव्वळ सल्ले. जगण्याला दिशा द्या, वेळ घालवू नका, शिक्षणावर लक्ष केंद्रित करा किंवा बाकी काही नाही तर लग्न करून टाका. दिशा म्हणजे काय तर उत्तम पगार असलेली नोकरी. ती मिळवायची म्हणजे डिग्री हवी, डिग्रीसाठी मान तोडून अभ्यास हवा. त्यासाठी बैठक हवी. पाठ उत्तरे, तीन तास लिहून काढलेला पेपर. त्याकरता खोलीत बंद करून घेणे. कोणत्याही आमिषाला बळी न पडणे. एवढे केले की मुलगी घरादारासाठी प्रामाणिक. क्षमता असणारी, अभ्यासू, कार्यमग्न. हे सर्व ठरवणारी पिढी १९६० पूर्वी जन्माला आलेली. प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या त्यांच्या व्याख्या निराळ्या. आपले घर कोणाचे हे तू कशी विसरतेस? या तऱ्हेची वाक्य बोलणारे बहुतांशी पालक. काही तर कायम जातीशी घट्ट नाते जोडणारे.
त्यानंतरची पिढी थोडे समजावून घेणारी, बऱ्याच घटनांचा वेग अनुभवलेली. लवचिक. सोशल व्हायला हवे याचे भान असलेली. अगोदरच्यांकडून मूल्य आदर्श यांचे पाठ गिरवलेली १९८५ नंतर जन्माला आलेल्या, जागतिकीकरणाच्या लाटेवर सवार झालेल्या बदलासाठी कायम उत्सुक असलेल्या पिढीशी जुळवून घेणारी. एकीकडे भूतकाळाची उदाहरणे आणि मूल्यांचा आग्रह धरणारी वडिलमंडळी दुसरीकडे वर्तमानाला बाजूला सारत भविष्याला कवेत घेण्याचे स्वप्न बाळगणारी मुले या दोन प्रवाहात सापडलेले अनेक मुलींचे पालक.
प्रश्न विचारणारी तरुणी ही या सहस्त्रकाची साक्षीदारच होती. प्रतिगामी आणि पुरोगामी विचारांची माणसे तिच्या घरात असूनही तिचे उशिरापर्यंत येणे कोणाला खटकत नव्हते, तिला विवाहासंदर्भात सतत छेडले जात नव्हते. याची कारणे तशी म्हटली तर खूप साधी होती. काळाचे ओझे तिच्यावर न टाकणारी ही माणसे होती. लहानपणापासून माणसांच्या बरोबरीने ती तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार न्याहाळत होती. तिचे २४ तास आणि ७ दिवस बाहेरच्या लोकांशी प्रत्यक्ष वा आभासी पद्धतीने जोडले जाणार याचा स्वीकार आपल्याला केला पाहिजे हे समजून घेणारे घर तिला मिळाले. जो कोर्स तिने केला त्याची गरज लोकांशी संपर्क आहे हे घरातल्यांनी चटकन समजावून घेतले. बाकीच्या ठिकाणी राहणीमानाचा बाऊ केला जात असताना या घराने पेहराव, दिसणे, वावर या गोष्टी गौण मानल्या.
आजवर घरातल्या कोणीही न हाताळलेले क्षेत्र, विषय, निर्णय ती घेत होती. तिचे अंदाज, तिचा अभ्यास, तिचा वकूब सगळ्याची रोज परीक्षा होत होती. अशावेळेस तिच्यावर अत्यंत विश्वास ठेवणे त्यांनी आपले कर्तव्य मानले. ती घरी लवकर येत होती किंवा अहोरात्र घरात एका खोलीत स्वत:ला बंद करत होती म्हणून नव्हे तर ती त्यांच्याशी खरे बोलत होती. आपल्याला काय करावयाचे आहे, आपल्या मर्यादा कोणत्या आहेत, लग्नाविषयी अजून दोन वर्षे विचार करायला वेळ हवा आहे. हे समजावून देण्यात तिची शक्ती वाया जात नव्हती. तिच्या निर्णयात बाधा आणून तिला संभ्रमित करून टाकायचे किंवा तिच्या कार्यक्षमतेला दुय्यम समजायचे असे वातावरण या घराने न जोपासल्याने तिचे जगणे सोपे झाले. ते घर तिच्यासोबत नांदत होते आणि ती त्यांच्यासोबत. नांदणे हा शब्द कृतीत आणायला विसरल्याने या तरुणीच्या मैत्रिणींच्या घरात तणाव होता. हे त्या प्रश्नाचे उत्तर.
(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट