Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘मनविसे’ची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने विद्यार्थी सेनेची शहर व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे. विद्यार्थी सेनेचे प्रमुख आदित्य शिरोडकर यांनी जाहीर केलेल्या शहर कार्यकारणीत ७७ तर जिल्हा कार्यकारिणीत २८ जणांना स्थान देण्यात आले आहे. संदीप भवर, खंडेराव मेंढे यांची विद्यार्थी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. तर नाशिक लोकसभेचे संघटक म्हणून अतूल धोंगडे, दीपक चव्हाण यांची जिल्हासंघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नूतन कार्यकारिणी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक वाटप केले. यावेळी मनसे नेते अविनाश अभ्यंकर, डॉ. प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, प्रमोद पाटील, मनोज रामराजे, सागर देवरे, प्रकाश कोरडे, सभागृह नेते सलीम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शहर कार्यकारिणीत यांचा समावेश

शहर कार्यकारिणीत विधानसभानिहाय संघटकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक मध्य व पश्चिम - ललित ओहोळ, नाशिकपूर्व व देवळाली - शाम गोहाड, नाशिक पूर्व - स्वप्निल ओढाणे, नाशिक पश्चिम गणेश जायभावे, नाशिक मध्य - किरण बेलेकर अशा तब्बल ७७ जणांची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात १३ शहर उपाअध्यक्ष, १३ सचिव, १४ सरचिटणीस यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ऑटो कॉप’चे कामगार संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड एमआयडीसीतील ऑटो कॉप कंपनीतील कामगार ४ दिवसांपासून संपावर गेले आहेत. कंपनी व्यवस्थापनाने वेतनवाढ करार करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने मागणी अमान्य केल्याने कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

कामगारांनी ३,७०० रुपयांची वेतनवाढ मागितली आहे. व्यवस्थापन ३ हजारांची वाढ देण्यास तयार आहे. त्यामुळे तोडगा निघू न शकल्याने कामगारांनी संप पुकारला आहे. कंपनी प्रवेशद्वारवर आंदोलन सुरू आहे. ऑटो कॉप कंपनीत कायमस्वरूपी १४१ कामगार आहेत. १४ महिन्यांपासून त्रैवार्षिक करार संपुष्टात आला आहे. या कालावधीत कंपनी व्यवस्थापन व कामगारांची सीटू युनियन यांच्या सुमारे डझनभर बैठका झाल्या. मात्र, तोडगा निघू शकलेला नाही. वेतनवाढ करार १४ महिन्यांपूर्वी संपुष्टात आला आहे. चार महिन्यांपासून कामगारांनी उत्पादनात वाढ केली आहे. मात्र, वेतनवाढ करार रखडल्याचे युनियन प्रतिनिधी गणेश वाबळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भयाळे शोकसागरात बुडाले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड सैनिकांचे देशभक्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील भयाळे या गावचा जवान शंकर चंद्रभान शिंदे (३५) जम्मू काश्मीर येथे कुपवाडात अतिरेक्यांशी लढताना शनिवारी शहीद झाला. भयाळे गावचा लाडका सुपुत्र शहीद झाल्याने गाव शोकसागरात बुडाले आहे.
शहीद शंकरचा अभिमान अतिरिक्यांशी दोन हात करताना भयाळे गावचा भूमिपुत्र शंकर शिंदेचे शहीद होणे गावाला धक्कादायक असले तरी देशासाठी शहीद झाल्याचा अभिमानही गावकऱ्यांनीशहीद जवान शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. शंकर शिंदे यांच्या मागे वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी सविता, मुलगी वैष्णवी (९) आणि मुलगा ओम (७) यांचा समावेश आहे.

सुस्वभावी आणि नम्र शंकर हा अतिशय सुस्वभावी आणि नम्र होता. घरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करीत तो सैन्यात सामील झाला. १२ ते १५ वर्षांपासून तो सैन्यात देशसेवा करीत होता. देशासाठी काही करण्याचे त्याचे स्वप्न होते. नम्रबोलक्या स्वभावाने तो गावात सुपरिचित असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. आपल्या कुटुंबासाठी शंकर नेहमी झटे तर घरातील मुलांना उच्च शिक्षण देण्याचे त्याचे स्वप्न होते.

गावात पेटली नाही चूल शंकरच्या शहीद होण्याच्या वृत्ताने गावात अस्वस्थता पसरली. वृत्तानंतर ग्रामस्थ शंकरच्या घरासमोर जमा झाले. प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेल्या बातमीच्या पडताळणीसाठी गावातील तरुण धावले. शंकरच्या वृत्ताच्या धक्क्याने भयाळे गावची चूल पेटली नाही, अशी माहिती चांदवड बाजार समितीचे नितिन आहेरसरपंच पुरकर यांनी दिली.

आज संध्याकाळी अंत्यसंस्कार शहीद जवान शंकर शिंदे यांचे पार्थिव रविवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास मुंबई येथे विमानाने आणले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेद्रसिंह कुशवाह यांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास चांदवड तालुक्यातील भयाळे या गावी शिंदे यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती पोलिस उपअधिक्षक डॉ. राहुल खाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिक आधारावर देश टिकून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा
भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाबरोबरच देशातील अध्यात्मिक उंची वाढविणे ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे. सोबतच देशातील सांस्कृतिक वारसाही जपला जाईल, असा आशावाद भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. श्री मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फूट उंच मूर्तीच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्ताकाभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित महासभेत त्यांनी मार्गदर्शन केले.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगी पीठाधीश स्वतीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी होते. व्यासपिठावर परमपूज्य गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, आर्यिका श्री चंदनामती माताजी, जैन धर्मिय ९ आचार्य, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हरिश्चंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
शहा म्हणाले, की जैन धर्मियांच्या पवित्र भूमीत आपण बोलण्यासाठी नव्हे तर माताजी व आचार्यजींचे बोलणे ऐकण्यासाठी व दर्शनासाठी आलो आहोत. या येण्यामागील आपले उद्देश सफल झाल्याचे स्पष्ट करीत भारत देश हा अत्यंत वेगळ्या प्रकारचा देश आहे. भारताची निर्मिती ही मुळात भू-सांस्कृतिक देशाच्या रूपात झाली आहे. राजनैतिक स्वरूपाची नाही. यामुळे जगात एकमेव भारत देश सांस्कृतिक धारेवर आजही टिकून आहे. या देशाला अनादी काळापासून संस्कृतीची जडण घडण आहे. जगा आणि जगू द्या आधारावरील संस्कृती या देशात आहे. यामुळे या देशाच्या संस्कृतीने सा-या जगाला मार्गदर्शन केले आहे. या देशावर अनेक आक्रमणे झाली असली तरीही हा देश संस्कृतीच्या मुलधर्म कायम टिकवून असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.
अनेक योद्धे, विजेते, सम्राटांच्या स्वा-या देशावर होऊनही भारत नतमस्तक झाला नाही. मात्र त्यागी व विद्वानांच्या पुढे देशाने नेहमीच विनम्रता जोपासली आहे. आपल्या संस्कृतीधारांनी जगाला मोहीत केले असून, आज अन्य देश या संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. या संस्कृतीने नेहमीच समाजाच्या कल्याणाचा विचार व शिकवण दिली. या ठिकाणी १०८ फूट उंच मूर्ती अखंड पाषणात निर्माण होणे ही आश्चर्याची बाब असल्याचेही शहा यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांना प्रतीक्षा नियुक्तीची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी विकास महामंडळातर्फे विविध पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रियेत निवड झालेल्या निम्म्या उमेदवारांना वर्ष झाले तरी नियुक्त्या देण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे. निवड होऊनही नियुक्ती पत्र मिळाले नसल्याने उमेदवारांमध्ये चलबिचल झाली आहे. दुसरीकडे याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

आदिवासी विभागातर्फे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लेखापाल, वरिष्ठ सहाय्यक असे एकूण ५८४ पदांसाठी २८ डिसेंबर २०१४ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी २०१५ ला कागदपत्र पडताळणीही करण्यात आली. त्यानंतर पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांनाच मार्च, एप्रिल, मे २०१५ मध्ये नियुक्तीचे आदेश देण्यात आले. मात्र उर्वरित उमेदवारांना अद्याप नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. लेखापाल पदासाठी ११ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. मात्र यापैकी केवळ सहा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. उरलेल्या पाच उमेदवारांना अद्याप कुठल्याही प्रकारचे नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाही. उमेदवारांनी शबरी आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथील कार्यालयात वेळोवेळी विचारणा केली असता, लवकरच नियुक्तीचे पत्र मिळतील असे तोंडी आश्वासन देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा घोळ पुन्हा उघड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एनबीटी लॉ कॉलेजच्या बीएसएल या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा फॉर्ममध्येच चुका आढळून आल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा घोळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

एनबीटी लॉ कॉलेजमध्ये बीएसएलच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षास शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या एप्रिलमध्ये परीक्षा आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र फॉर्ममधील एक्झामिनेशन डिटेल यामध्ये एनबीटी लॉ कॉलेजऐवजी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येत असून, याच कॉलेजचा कोड आपोआप दाखल होत आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून ही अडचण विद्यार्थ्यांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांचेकडे धाव घेतली. मात्र त्या कॉलेजमध्ये नसल्याने कॉलेज प्रशासनातील व विद्यापीठाच्या नाशिक विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने ही तक्रार दूर करण्याचे काम सुरू आहे.

प्राचार्यच अनभिज्ञ

एनबीटी लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांचेशी याबाबत संपर्क साधला असता त्यांना याबाबत काहीही माहित नसल्याचे समोर आले. प्राचार्य वैद्य विद्यार्थ्यांशी थेट संवाद न साधता त्यांना इतर कर्मचाऱ्यांकडून अडचणी सोडवण्यास सांगतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांमधून कचऱ्याचा उपसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेकडून स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. शनिवारी या मोहिमेअंतर्गत शहरातील नद्यांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. गोदावरी,

वाघाडी व नंदिनी या तीन नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था दोन हजार जण सहभागी झाले होते. दिवसभरात या तीन नद्यांमधून जवळपास २६ टन केरकचरा काढण्यात आल्याने नद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

केंद्र सरकारच्या मोहिमेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील नद्या, खेळांची मैदाने, सांस्कृतिक ठिकाणांची स्वच्छता केली जात आहे. महापालिकेने या मोहिमेला जनसहभागाचे स्वरुप दिले. शहरातील नागरिक मंडळे, संस्था, विविध संघटनांची मदत घेतली आहे. गेल्या शनिवारी शहरातील शाळांचे मैदाने व उद्यानांची स्वच्छता करण्यात आली होती. आज शहरातील गोदावरी, वाघाडी व नंदिनी या नद्यांची स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत पंचवटीतून या मोहिमेचा शुभारंभ झाला. शहरातील नाशिकरोड, नाशिक पूर्व, सिडको, पंचवटी, नाशिक पश्चिम, सातपूर या सहा विभागात ही मोहीम राबविण्यात आली. नऊ जेसीबी, २१ घंटागाड्या, ३ पोकलॅन्ड, १४ ट्रॅक्टर, ३ डंपर, २ रोबोट मशीनचा वापर करण्यात आला. नद्यांवरील प्रमुख घाटांची साफसफाई या मोहिमेत करण्यात आली. शहरातील काही स्वयंसेवी संस्थाही या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. नासर्डी नदीवर नगरसेविका अर्चना थोरात यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. दिवसभर सुरू असलेल्या या मोहिमेत दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून, तब्बल २६ टन कचरा उचलण्यात आला. जेसीबी व पोकलँडद्वारे नद्यांमधील खराब गाळही काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख घाट, नद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

विभागवार काढलेला कचरा

नाशिकरोड - ३

नाशिक पूर्व - ३

सिडको - ५

सातपूर - ९

नाशिक पश्चिम- ३

पंचवटी - ३

(आकडेवारी टनांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओ कार्यालयासमोर आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील आरटीओ कार्यालयासमोरील एका झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. साहेबराव मारूती पचारे (३३) असे युवकाचे नाव आहे.

त्याच्या खिशात एक ब्लेड पोलिसांना सापडले असून, त्याने आत्महत्या का केली याचा अधिक तपास पंचवटी पोलिस करीत आहे. मयत पचारेच्या ​खिशात एक ​चिट्टी सापडली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटली नसून पंचवटी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केला आहे.

बॅटरी चोरी

डिसुझा कॉलनी परिसरातील सोसायटीतून ४० हजार रुपये किंमतीच्या इन्व्हर्टरसाठी उपयोगी पडणाऱ्या बॅटऱ्या चोरीस गेल्या. या परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून, वरिष्ठ मात्र या घटनांची गंभीरतेने दखल घेत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी चोरी गेलेल्या शेकडो बॅटऱ्यांचा कोणताही तपास लागलेला नाही. ऋषिराज प्रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या राजेश विजय धारस्कर (४५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातील लोखंडी गजाच्या पिंजऱ्यातील इन्व्हर्टरच्या सहा बॅटऱ्या चोरून नेल्या.

वाहनांची चोरी

शहर परिसरातून तव्हेरा आणि इनोव्हा ही वाहने चोरट्यांनी हातोहात लंपास केली. पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्रिमूर्ती चौक येथील सुरेश सखाराम सोनवणे (४२) यांची इनोव्हा कार (एमएच ४१ सी ७७७०) गेल्या गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर परिसरातील वसंत मार्केट येथील गोल्ड जीम येथून चोरीला गेली. सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अन्य एका घटनेत नाशिकरोड परिसरातील नेहरूनगर येथील ग्रीनी शिडी सोसायटीतील शरद जगन्नाथ गिते यांची ९ लाख रुपये किंमतीची तवेरा (एमएच १५ इएक्‍स ८७२४) दुपारी साडेबाराच्या सुमारास पंचवटीतील बि-बियाण्यांच्या दुकानासोमरून चोरीला गेली. या प्रकरणी गिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

रिक्षातून रकमेची चोरी

गडकरी सिग्नल येथून पाथर्डी फाट्याकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील ८९ हजार रूपये चोरट्याने काढून घेतले. पाथर्डी शिवारातील शिवधारा रो हाऊस येथे राहणारे नंदकिशोर दिलीप पाटील यांनी याबाबत मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पाटील आपल्या बहिणीसमवेत गडकरी सिग्नल येथून पाथर्डी फाट्याकडे जाण्यासाठी रिक्षात बसले असता, त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या पर्समधून एका सहप्रवासी चोरट्याने ८९ हजार रुपये काढून घेतले.

दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुत्रे आडवे गेल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात रामदास विठ्ठल कोरे (४५) यांचा मृत्यू झाला. सदरची घटना गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास सीएट कंपनीसमोर घडली होती. सातपूर परिसरातील कार्बन नाका येथील ओम साईकृपा सोसायटीत राहणारे कोरे दुचाकीवरून (एमएच १५ एवाय ६१९७) जात असताना कुत्रे आडवे गेले. यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांडपाणी चोरीने महापा‌लिका हैराण

$
0
0

सांडपाणी चोरीने महापा‌लिका हैराण

नासार्डीतील ड्रेनेजच्या चेंबरमध्ये दगडांचा खच

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महिरावणी येथून उगम पावलेल्या व पिंपळगाव बहुला, सातपूर गावातून जात असलेल्या नासर्डी नदीतील ड्रेनेजमध्ये नेहमीच दिसून येतो. शेतऱ्यांकडूनच या ड्रेनेज चेंबरमध्ये दगड टाकून सांडपाण्याची चोरी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी दगडांनी अडवून ठेवलेले सांडपाणी पुन्हा चेंबरच्यावर येत नदीत मिसळत आहे.

एकेकाळी सातपूरची नंदिनी म्हणून ओळख असलेल्या नासर्डी नदीची अवस्था दयनीय झाली आहे. नासर्डी नदीत सांडपाणी मिसळत असल्याने महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करुन गोरक्षनाथ पुलापर्यंत सांडपाणी वाहून नेणारी नवीन ड्रेनेज लाईन नुकतीच टाकली आहे. नदीत मिसळणारे सांडपाणी कायमचे बंद व्हावे व डासांचा त्रास कमी व्हावा हा यामागचा उद्देश होता. परंतु शेतकऱ्यांकडून या ड्रेनेज चेंबरमध्येच दगडांचा खच टाकण्यात येतो व हे पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुन देखील नासार्डीत सांडपाणी वाहत असून डासांची समस्याही कायम आहे. शेतकऱ्यांनी सांडपाणी वापरावे, परंतु ते चेंबरमधून मोटारीने घेतल्यास नदीत सांडपाणी मिसळणार नसल्याचे अधिकारी सांगतात.

हे सांडपाणी शेतकऱ्यांनी मोटारीव्दारे घेतल्यास महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करुन टाकलेल्या या पाईपचे नुकसान देखील टळणार असल्याचे महापालीका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु ड्रेनेज लाईनीमध्ये सातत्याने टाकण्यात येत असलेल्या दगडांमुळे लाईन चोकअप होते व दुरुस्तीचा अतिरिक्त बोजा महापालिकेवर येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दगड काढण्यासाठी कसरत या प्रकाराबाबत महापालिकेच्या भुयारी गटार विभागाकडे रहिवाशी तक्रार करतात. यानंतर चेंबरमधिल टाकण्यात आलेले दगड काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. खड्डा करुन नव्याने बांधलेले चेंबर तोडून सांडपाणी वाहते केल्यानंतरच हे दगड काढण्याचे काम करावे लागते.

सांडपाणी होते गायब अंबड लिंकरोडवरील जाधव टाऊनशिप व म्हाडा संकुलचे सांडपाणी सातपूरला येण्याअगोदरच गायब होत असल्याचे अधिकारी सांगतात. सातपूर व पिंपळगाव बहुला शिवारातील चार ते पाच शेतकरी हे सांडपाण्याच्या ड्रेनेजमधील पाणी अडवून शेतीसाठी वापरतात. रसायनमिश्रित सांडपाणी वापरू नये असे वारंवार सांगूनही शेतकरी या सांडपाण्याचाच शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सक्षम‌ीकरणातूनच महिलांचा विकास

$
0
0

सक्षम‌ीकरणातूनच महिलांचा विकास

प्रेरणा बलकवडे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प 'बचत गटात सहभागी होत महिलांनी सक्षम बनावे. या सक्षमीकरणातूनच महिलांचा विकास होईल', असे आवाहन नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी केले. भगूर येथील महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभ त्या बोलत होत्या. या समारंभात महिलांना बचत गट व महिलांना त्या अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांचे नवीन बचत गट स्थापन करण्यात येऊन महिलांना यात सहभागी करून घेत बचत व कर्ज असे दोन्ही फायदे देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमानिमित्त महिला एकत्रित येऊन स्नेह मेळावाही साजरा करतात. यावेळी भगूरच्या माजी नगराध्यक्षा भारती साळवे, कोमल साळवे, पूनम बर्वे, रेखा इंगळे तसेच जवळपास पाचशेहून अधिक महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या मोबाइल वापराचा मेंदूवर परिणाम

$
0
0

वाढत्या मोबाइल वापराचा मेंदूवर परिणाम लेखक उन्मेष जोशी यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प 'मोबाइल व तत्सम गॅझेट्सचा अतिरेकी वापर मनुष्याच्या मेंदूवर थेट परिणाम करत आहे. यामुळे पुढील काही वर्षात मेंदूचे अनेक भाग कार्य करणे बंद करतील', असा धोक्याचा इशारा 'रिस्पॉन्सिबल नेटीजम'चे संचालक उन्मेष जोशी यांनी दिला. येथील तेजुकाया कॉलेजमध्ये आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. वाढत्या मोबाइलच्या वापरामुळे मनुष्य परावलंबी होत असून आपसातील प्रत्यक्ष संवाद हरवत जाऊन, मनुष्य मोबाइल नावाच्या व्यसनात हरवत चालला आहे, असे ते म्हणाले. संगणकाद्वारे वापरल्या इंटरनेटचा प्राथमिक वापर ज्ञान हा असून आजकाल त्याचाही अधिक व गैरवापर होत असल्याने कमनुष्य मानसिकदृष्ट्या आजारी होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुनीता अडके, डॉ. उर्मिला गीते, डॉ.मंगला निकुंभ, प्रा. एस. एल. भोज उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एन. बी. पगार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यशाळेत प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव नाक्यावरील सिग्नल बंदच

$
0
0

आडगाव नाक्यावरील सिग्नल बंदच म. टा. प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील जुन्या आडगाव नाक्यावरील काट्या मारुती पोलीस चौकीजवळ सिग्नल अजून बंद असल्याने या परिसरात सारखी वाहतूक कोंडी होत आहे. या भागात कुंभमेळ्याआधीच सिग्नल उभा करण्यात आला आहे. परंतु अजूनही तो कार्यान्वीत करण्यात आलेला नाही. नागरिकांच्या सोयीसाठी उभा करण्यात आलेला हा सिग्नल अद्यापही बंद असल्याने दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी निमाणीकडून हिरावाडी, आडगाव नाका आणि पंचवटी कॉलेजकडे जाणाऱ्या व ओझर आणि औरंगाबादकडून येणाऱ्या वाहनांची सारखी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या परिसरात विविध शाळा, कॉलेजेस व मंदिरे असल्याने नागरिक व शाळकरी मुले यांचीही खूप गर्दी असते. पादचारी व दुचाकी वाहन चालक आणि नागरिक यांची या वाहतुक कोंडीमुळे तारांबळ होत आहे. सिग्नल सुरू केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणार असून परिणामी अपघात होण्याची शक्यताही कमी होईल असे नागरिकांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचारातला समतोल

$
0
0

वृन्दा भार्गवे
पंचवीस वर्षाचे माझे वय. घरात अगदी खापर पणजीपासून आईपर्यंत सगळेजण आहेत. आमच्या नात्यात ताणतणाव नाही. जे प्रश्न तुम्ही उभे करता ते देखील नाहीत. पण आजूबाजूला माझ्या मैत्रिणींच्या घरात तसे काही प्रश्न आहेत. जगण्याची शैली थोड्या फार फरकाने सारखी असली तरी हा तणाव का?

ही मुलगी ट्रॅव्हल एजन्सीत काम करणारी. एकत्र कुटुंब असून देखील तिला हवे तसे कपडे बाहेर घालता येत होते. तिला आवडतो म्हणून तिने खांद्यावर टॅटू काढून घेतला होता. केसांची स्टाइल सहजपणे ती बदलत होती. पंचवीस वर्षे वय झाले तरी अजून लग्न का करत नाही म्हणून वडिलधारे तिला धारेवर धरत नव्हते. या घरात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले तिचे आजोबा आणि सरकारी नोकर असलेले वडील, शिक्षिका असलेली आई होती. काका व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर फिरत होता. बाहेरच्या जगातले क्षणोक्षणी बदलणारे वातावरण घरातल्यांसह तो शेअर करत होता. केबल ते डिश आणि डेस्कटॉप ते स्मार्ट फोनपर्यंतचा प्रवास या घरात सर्वांनी अनुभवला होता. युद्ध सत्याग्रह आणि एका भूभागासाठी प्राणाची आहुती अशा स्वतंत्र भारताच्या लढ्याबद्दल बोलणारी एक पिढी तिरंग्याच्या नितांत अभिमानात बुडालेली असायची. भाऊ डिजिटल स्वातंत्र्यापर्यंत आपण कसे पोहोचलो याचे श्रेय व्हिजन असणाऱ्या अगोदरच्या पिढीला मोकळेपणाने देऊन टाकायचा. देशापासून स्वत:च्या स्पेसपर्यंत झालेला प्रत्येक टप्पा त्याला अद्भुत वाटायचा. लोकशाहीचा पुरस्कर्ता असा हा देश, आणीबाणीने अस्वस्थ झाला त्या काळाचे साक्षीदार असणारे वडिलांचे मित्र गप्पा मारण्यासाठी अधेमध्ये यायचे. १९९० नंतरची आर्थिक क्रांती आणि जागतिकीकरणाच्या लाटेचा तडाखा घरादारात शिरताना याच घराने पाहिला होता.

ही तरुणी या वातावरणात वावरत होती तर तिचीच एखाद दुसरी मैत्रीण पाळणाघरात खेळत मोठी झालेली. भोवती वेगळीच खेळणी. बार्बी आणि टेडी बेअर तिच्या उशाशी. वडील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरीला आणि नंतर काही वर्षांसाठी तिथे जाऊन आल्याने नकळत्या वयात मैत्रिणीच्या पासपोर्टवर अनेकदा शिक्के उमटलेले. त्यानंतर इथेच स्थायिक झालेले ते कुटुंब. टाईमपास म्हणून अनेक गोष्टी त्या घरात घडणाऱ्या. गरज असो वा नसो, बाहेर देशी, बाहेर शहरी गेले की खरेदी. जास्तीत जास्त पैसा कपड्यांवर आणि फिरण्यावर.

तिच्या काही मैत्रिणींची कुटुंबे आपली मूळ घरे सोडून दुसरीकडे राहायला गेलेली. गेल्या दहा बारा वर्षात घरे वाडे चाळी जमीनदोस्त करून त्याजागी बांधलेल्या टोलेजंग इमारतींमध्ये त्यांचे झालेले वास्तव्य. चाळीवजा घरे सोडल्यामुळे त्यांनी आपणहून केलेले काही बदल. इंटेरीअर बदलले पण मुला मुलींना विचारण्यात येणारे प्रश्न मात्र तेच, जुने आणि टिपिकल तसेच. घरी मुलांचे उशिरा येणे. रात्री दहा-अकरापर्यंत ही तरुण मुले नेमकी काय करत असतात हा कुतूहलापेक्षा संतापाचा प्रश्न विचारत राहणारे हे पालक काय करतात दिवसभर, यातला संशय. दिवसभर वेळ घालवण्यातील मुलांचा अव्यवहारीपणा किंवा त्यांनी घराचे केलेले हॉस्टेल, त्यांचा उडाणटप्पूपणा.

या घरांनी मुलींना काय दिले तर निव्वळ सल्ले. जगण्याला दिशा द्या, वेळ घालवू नका, शिक्षणावर लक्ष केंद्रित करा किंवा बाकी काही नाही तर लग्न करून टाका. दिशा म्हणजे काय तर उत्तम पगार असलेली नोकरी. ती मिळवायची म्हणजे डिग्री हवी, डिग्रीसाठी मान तोडून अभ्यास हवा. त्यासाठी बैठक हवी. पाठ उत्तरे, तीन तास लिहून काढलेला पेपर. त्याकरता खोलीत बंद करून घेणे. कोणत्याही आमिषाला बळी न पडणे. एवढे केले की मुलगी घरादारासाठी प्रामाणिक. क्षमता असणारी, अभ्यासू, कार्यमग्न. हे सर्व ठरवणारी पिढी १९६० पूर्वी जन्माला आलेली. प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या त्यांच्या व्याख्या निराळ्या. आपले घर कोणाचे हे तू कशी विसरतेस? या तऱ्हेची वाक्य बोलणारे बहुतांशी पालक. काही तर कायम जातीशी घट्ट नाते जोडणारे.

त्यानंतरची पिढी थोडे समजावून घेणारी, बऱ्याच घटनांचा वेग अनुभवलेली. लवचिक. सोशल व्हायला हवे याचे भान असलेली. अगोदरच्यांकडून मूल्य आदर्श यांचे पाठ गिरवलेली १९८५ नंतर जन्माला आलेल्या, जागतिकीकरणाच्या लाटेवर सवार झालेल्या बदलासाठी कायम उत्सुक असलेल्या पिढीशी जुळवून घेणारी. एकीकडे भूतकाळाची उदाहरणे आणि मूल्यांचा आग्रह धरणारी वडिलमंडळी दुसरीकडे वर्तमानाला बाजूला सारत भविष्याला कवेत घेण्याचे स्वप्न बाळगणारी मुले या दोन प्रवाहात सापडलेले अनेक मुलींचे पालक.

प्रश्न विचारणारी तरुणी ही या सहस्त्रकाची साक्षीदारच होती. प्रतिगामी आणि पुरोगामी विचारांची माणसे तिच्या घरात असूनही तिचे उशिरापर्यंत येणे कोणाला खटकत नव्हते, तिला विवाहासंदर्भात सतत छेडले जात नव्हते. याची कारणे तशी म्हटली तर खूप साधी होती. काळाचे ओझे तिच्यावर न टाकणारी ही माणसे होती. लहानपणापासून माणसांच्या बरोबरीने ती तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार न्याहाळत होती. तिचे २४ तास आणि ७ दिवस बाहेरच्या लोकांशी प्रत्यक्ष वा आभासी पद्धतीने जोडले जाणार याचा स्वीकार आपल्याला केला पाहिजे हे समजून घेणारे घर तिला मिळाले. जो कोर्स तिने केला त्याची गरज लोकांशी संपर्क आहे हे घरातल्यांनी चटकन समजावून घेतले. बाकीच्या ठिकाणी राहणीमानाचा बाऊ केला जात असताना या घराने पेहराव, दिसणे, वावर या गोष्टी गौण मानल्या.

आजवर घरातल्या कोणीही न हाताळलेले क्षेत्र, विषय, निर्णय ती घेत होती. तिचे अंदाज, तिचा अभ्यास, तिचा वकूब सगळ्याची रोज परीक्षा होत होती. अशावेळेस तिच्यावर अत्यंत विश्वास ठेवणे त्यांनी आपले कर्तव्य मानले. ती घरी लवकर येत होती किंवा अहोरात्र घरात एका खोलीत स्वत:ला बंद करत होती म्हणून नव्हे तर ती त्यांच्याशी खरे बोलत होती. आपल्याला काय करावयाचे आहे, आपल्या मर्यादा कोणत्या आहेत, लग्नाविषयी अजून दोन वर्षे विचार करायला वेळ हवा आहे. हे समजावून देण्यात तिची शक्ती वाया जात नव्हती. तिच्या निर्णयात बाधा आणून तिला संभ्रमित करून टाकायचे किंवा तिच्या कार्यक्षमतेला दुय्यम समजायचे असे वातावरण या घराने न जोपासल्याने तिचे जगणे सोपे झाले. ते घर तिच्यासोबत नांदत होते आणि ती त्यांच्यासोबत. नांदणे हा शब्द कृतीत आणायला विसरल्याने या तरुणीच्या मैत्रिणींच्या घरात तणाव होता. हे त्या प्रश्नाचे उत्तर.

(लेखिका साहित्यिक तसेच तरुणांच्या भावविश्वाच्या अभ्यासक आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाल्यांना मिळाला दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेतर्फे शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मात्र, या मोहिमेचा फटका शहरातील फेरीवाल्यांना देखील बसला आहे. याबाबत मालेगाव मनपा प्रशासनाकडून फेरीवाला धोरण राबविण्यात यावे, अशी मागणी देखील येथील साई एकता हॉकर्सच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेण्यात आली. त्यानुसार फेरीवाला धोरण लागू होईपर्यंत फेरीवाले रस्त्याच्या कडेला रहदारीस अडथळा न आणता व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.

साई एकता हॉकर्सचे दिनेश ठाकरे, देवा पाटील, सुधाकर जोशी आदींसह पदाधिकारी आणि आयुक्त किशोर बोर्डे यांची नुकतीच मनपात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मालेगाव शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार चारही प्रभाग मिळून एकूण १४५६ फेरीवाले आहेत. शहरातील अतिक्रमण हटवण्याचा मोहीम मनपाने हाती घेतली असली तरी त्यामुळे रस्त्यांवर असलेल्या फेरीवाल्यांचा व्यवसाय बुडत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला फेरीवाला धोरण राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे तत्काळ फेरीवाला धोरण राबवावे, अशी मागणी या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत आयुक्त किशोर बोर्डे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची फेरीवाला धोरण लागू करण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच, दि १७ फेब्रुवारीपर्यंत फेरीवाले रस्त्यालगत रहदारीस अडथळा निर्माण न करता व्यवसाय करू शकतात, असे सांगितले. यामुळे फेरीवाल्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, येत्या १७ फेब्रुवारीला तरी याबाबत योग्य तो निर्णय होऊन शहरात फेरीवाला धोरण राबवण्याबाबत काय कारवाई होते याकडे फेरीवाला समितीचे लक्ष लागून आहे. या बैठकीस युनियनचे रामा देवरे, आसिफ तांबोळी, राजेंद्र पाटील, शाम करपे, अशोक सूर्यवंशी, मनोज बोरवाल, योगेश जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. फेरीवाला संख्या

सर्व्हेनुसार फेरीवाले प्रभाग फेरीवाला संख्या

प्रभाग १ - ६७६ प्रभाग २ - ३४१ प्रभाग ३ - २६४ प्रभाग ४ - १७५ एकूण - १४५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

याला काय उत्सव म्हणावे?

$
0
0

आपण एखाद्या गोष्टीला 'सरकारी काम' अशी उपमा देतो ना, तेव्हा रडतराव घोड्यावर बसवले व बळजबरीने लग्नाला उभे केले अर्थातच चालढकल करून कसेतरी केले बुवा! असा सारा आशय सरकारी काम या एका उक्तीमागे दडलेला असतो. या सरकारी कामाचा फटका अनेक कार्यक्रमांना बसतो. कोणताही कार्यक्रम उभा करणे म्हणजे मोठे मुश्किल काम. त्यासाठी जीव ओतूनच काम करावे लागते मात्र जेव्हा एखादा सरकारी कार्यक्रम उभा राहतो तेव्हा तो तकलादू असणार हे गृहितच. ग्रंथोत्सवाचेही तेच झाले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचलनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अशा दिग्गज संस्थांच्या माध्यमातून नाशिकला ग्रंथोत्सव पार पडला. (पार पडला हे शब्दश:) राज्यातील या चार मोठ्या संस्था; मनात आणले तर काहीही करू शकणाऱ्या परंतु त्यांना ग्रंथोत्सव मात्र अजिबात व्यवस्थित साजरा करता आला नाही तर काही व्याख्याने व एक काव्यसंमेलन घेऊन तो केवळ 'साजरा' झाला हेच खरे.

ग्रंथोत्सवाच्या उदघाटनासाठी बोलावले होते पालकमंत्र्यांना; तेथूनच खरी माशी शिंकली. पालकमंत्री आलेच नाहीत. उदघाटनाची वेळ सकाळी १० ची होती. आता जळगावहून यायचे म्हणजे तीन साडे तीन तास तरी लागतातच ना! सातला निघावे लागणार या धाकानेच की काय... पालकमंत्री काही पोहोचले नाही. बरं ते नाही तर नाही राज्यसहकार मंत्रीही आले नाहीत. बरं त्यांचंही जाऊ द्या, त्यांनाही खूप कामे असतात. निमंत्रण पत्रिकेत असलेल्या १८ जणांपैकी फक्त ३ जणांनी या ग्रंथोत्सव उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. एकही खासदार नाही की एकही आमदार नाही. (याला म्हणतात सरकारी काम) तसं पाहिलं तर कार्यक्रम काय आहे यावर राजकीय मंडळींची हजेरी ठरते म्हणा! इथेच एखादा राजकीय कार्यक्रम असता तर वेळेच्या आधी एक तास जागा पकडून सारे बसले असते. परंतु हा पडला साहित्यिक कार्यक्रम. येथे येऊन कुणाला काही फायदा नाही त्यामुळे गेले काय अन् नाही गेले काय... आहे कोण आपल्याला विचारणारे? असो. कार्यक्रमाचे उदघाटन अशा रितीने पार पडले. त्याआधी ग्रंथदिंडीही कशीबशी पार पडली होती. एखाद्या-दोन शाळेची गरीब बापडी मुले सहभागी झाली होती. वाचनाविषयी फलक हातात घेऊन या मुलांनी जगजागृतीही केली. ही जागृती राजकीय लोकांमध्ये असती तर किती बरे झाले असते असे क्षण दोन क्षण आयोजकांना वाटून गेले असेल. ...तर ग्रंथोत्सवाच्या उदघाटनानंतर दुपारी ज्येष्ठ साहित्यिकांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्याला जरा बरी गर्दी होती. दुसऱ्या दिवशीची व्याख्याने म्हणावी अशी रंगली नाहीत. तिसऱ्या दिवशी झालेले कविसंमेलन जरा जोरात झाले. त्यानंतरचा समारोपाचा कार्यक्रमही यथातथाच झाला. राजकारण्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. कार्यक्रम साजरा करण्यासाठी का होईना पण खरी धुरा पेलली ती जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे यांनी. ग्रंथदिंडी ते समारोप यात जेथेही शक्य असेल तेथे त्यांची हजेरी होती. राजकर्त्याची ही एक चांगली बाजू म्हणावी लागेल.

...तर आता विषय असा आहे की हा इतका सारा आटापिटा करून राज्य सरकारने हा ग्रंथोत्सवाचा घाट घातला कशासाठी? महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत ग्रंथोत्सव उपक्रम राज्यभरात आयोजित करण्यात येतो. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचलनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या चार संस्था एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. परंतु नाशिकला झाला त्याला काय उत्सव म्हणावे? प्रशासनाच्या अखत्यारित येणाऱ्या एखाद्या मोठ्या सभागृहात अथवा मैदानावर हा उत्सव भरवावा, काही लाख पुस्तकांची व तितक्याच पैशांची उलाढाल व्हावी, केवळ नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून येथे प्रकाशक यावेत व त्यांनी आपापल्या पुस्तकांची विक्री करावी असा व्यापक हेतू सरकार कधी ठेवणार आहे का? अहो, या सरकारच्या ग्रंथोत्सवापेक्षा आमच्या न‌ाशिकचे ज्योती स्टोअर्सवाले मोठे प्रदर्शन भरवितात, ते ही डोंगरे वसतीगृह मैदानावर. आयोजकांनी घेऊन घेतले तर काय सावानाचे लिमये सभागृह. तेथेही १४ पैकी ७ स्टॉल लागलेले. त्यातही सरकारचा एकच स्टॉल त्यातही फक्त १० ते १२ व्हरायटीची पुस्तके. अरे कसे इतके दुर्देवी सरकार अन् कसा कारभार?
- अशांत किरकिरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिढी घडवणारे आजोबा

$
0
0

fanindra.mandlik@ timesgroup.com

रात्री झोपताना मुलं आपल्या आजोबांना सारखी म्हणत असतात. आजोबा गोष्ट सांगा ना, पण मुलांना रोज कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे सुचत नसल्याने आजोबांची मोठी पंचाईत होते. अशावेळी आवश्यकता असते ती गोष्टी जाणून घेण्याची. आजोबांना गोष्टी माहित व्हाव्यात यासाठी सुरेश दाजी जोशी हे इंदिरानगर परिसरात मोफत वाचनालय चालवत आहे. या वाचनालयात गोष्टींची पुस्तके घेण्यासाठी रोज आजोबांची रिघ लागते.

सुरेश जोशी हे मुळचे जळगाव जिल्ह्यातले. एलआयसीमधून निवृत्त झाल्यानंतर २००१ पासून ते नाशिकमध्ये स्थायिक झाले. तेव्हापासून ते मोफत वाचनालय चालवीत आहेत. आपल्या धडपड्या वृत्तीने त्यांनी आजवर अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. पाटणादेवी येथे सायकल ट्रीप, नाशिक ते आग्रा १००० किमी सायकल सफर, ब्रम्हगिरीची ४० मैल पायी फेरी, नारेश्वर ते गरुडेश्वर ८० किमी दत्तमंदिर सहकार्यासह पायी प्रवास, २०० दिवस नर्मदा परिक्रमा यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

आजच्या शिक्षण पद्धतीत मुलांना शाळेत देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा संस्कार यापैकी काही मिळते का हा मोठा प्रश्न आहे. मागच्या पिढीतील शिक्षकांनी भारतीय संस्कृतीचा खजिना आपल्या गोड वाणीने व पाठांतर करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. परंतु सध्या ते होत नाही. नातवांनी स्पर्धेच्या युगात स्वच्छंदी जगावे असे प्रत्येकाला वाटत असले तरी ते सध्याच्या युगात शक्य होत नाही. रात्री झोपतांना नातू आजोबांजवळ येऊन आग्रह करतो, आजोबा गोष्ट सांगा ना! तेव्हा मात्र आजोबांना प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

या प्रश्नाला उत्तर म्हणून जोशी काकांनी ५ हजार वर्षांपासून असलेली आपली जुनी संस्कृती, तपस्वी, ऋषी मुनी, समाजसुधारक, धर्मप्रवर्तक, धर्म प्रचारक, देशाकरिता प्राण बलिदान देणारे वीर, वीरमाता अशी संस्कृतीच्या प्रवाह बरोबर नेणारी पुस्तके जमा केली आहेत.

आजोबांनी आधी ती चरित्रे वाचावित आणि नंतर ती नातवांना सांगावी ही कल्पना नागपूर येथे असताना सुचली. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवातीला १२७ चरित्रे असलेले संच विकत घेतले व पहिल्यांदा मुले, पुतणे, भाचे, भाच्या यांना ही पुस्तके वाचण्यास दिली. त्यानंतर आपोआप पुस्तके वाढू लागली. याचा उपयोग इतरांना व्हावा यासाठी इंदिरानगरमधील आजी आजोबांना भेटून त्यांना एक एक पुस्तक वाचायला दिले. दररोज १ ते २ आजी आजोबांची भेट घेऊन पुस्तकांची देवाणघेवाण सुरू केली. त्यांचे मित्र बिपिन पुराणिक यांना हा विषय आवडला तेही या उपक्रमासाठी संध्याकाळचा वेळ देऊ लगले. त्यानंतर संकष्टी चतुर्थी संघाचे सर्व सभासद आनंदाने यात सहभागी झाले. आज या वाचनालयाची व्याप्ती वाढून शेकडो सभासद झाले आहे.

जोशी काकांच्या घरी येणारे आजी आजोबा पुस्तकांवर चर्चा करतात व नवीन पुस्तक बदलून घेतात या योजनेसाठी विद्याधर पाध्ये यांनी देखील जोशी काकांना मदत केली आहे. सभासदांची नोंदणी करतांना नाव पत्ता फोन नंबर घेऊन संपर्क ठेवला जातो. यातील विशेष बाब म्हणजे प्रवेश फी अथवा वर्गणी काही नाही, आपल्या नातवांवरील प्रेम हीच फी आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान हिच प्रवेश फी. सुरुवातीला आवड म्हणून केलेल्या उपक्रमाने मोठी व्याप्ती वाढली आहे. इंदिरानगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचे संघ जोशी काकांकडे पुस्तके घेण्यासाठी येत असतात. त्याची नोंद ठेवून प्रत्येकाला पुस्तक दिले जाते. या उपक्रमासाठी कुणाकडूनही पैसे घेतले जात नाही. जोशी काकांना मिळणाऱ्या पेन्शनमधून या वाचनालयाचा खर्च भागवला जातो. या वाचनालयाचा विस्तार वाढतो आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व येणारी पिढी सुसंस्कृत करावी असे आवाहन जोशी काका करीत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषाख अन् रत्नजडीत मुकुटाने सजले ऋषभदेव

$
0
0

कैलास येवला, सटाणा

गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या श्री भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी मूर्तीला राजकुमाराचा पोषाख व रत्नजडीत मुकूट परिधान करून सजविण्यात आले. सुमारे दहा लाख रुपये किमतीचा हा पोषाख व मुकूट मूर्तीवर रात्रभर ठेवण्यात येणार असून, सोमवारी सकाळी भगवान ऋषभदेव यांना दीक्षा देण्यात आल्यानंतर जैन धार्मिक विधीनंतर त्यांचे कायमस्वरूपी रूप दर्शनासाठी खुले होणार आहे.

भगवान ऋृषभदेव यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर त्यांना राजकुमाराप्रमाणे सजविण्यात येणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लोखंडी रॅकच्या आतमध्ये असलेल्या या पाषणातील मूर्तीवर सर्वत्र लोखंडी बॅरिकेड्स काढण्यात येऊन त्यांना सजविण्यात येणार आहे. यानंतर रात्रभर हा पोषाख व मुकूट ठेवून त्यांना सकाळी दीक्षा देण्यात येणार आहे.

असा आहे पोषाख भगवान ऋषभदेव यांच्या मूर्तीवरील पोषाखाची रचना सुरत येथील दिवाण ब्रदर्स टेक्सस्टाईल कंपनीचे संजय दिवाण यांनी केली आहे. या पोषाखासाठी आवश्यक कापड जपानमधील सुप्रसिद्ध यान बेंबरक या निर्मिती झालेल्या कापडाने पोषाख तयार केला आहे. या पोषाखात कुर्ता व धोती असा समावेश आहे. कृर्ताकरिता ४५० मीटर यान बेंबरक हा गुलाबी रंगाचा कापडाचा वापर करण्यात आला आहे. धोतीकरिता २०० मीटर उंच असलेला जरी गोल्डन रंगाचा कापड वापरण्यात आला आहे. यासाठी आवश्यक लेस जरी गोल्डन, ब्ल्यू बेल्ट १०० मीटरचा आहे. अत्यंत चकमकीत असलेला हा पोषाख तयार करण्यासाठी राजस्थानी कारागिरांची मदत घेण्यात आली. पोषाखासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती संजय दिवाण यांनी दिली.

असा आहे मुकूट सुमारे १२० किलो वजनाचा, ८ फूट उंची असलेला व २६ फूट रूंद असलेला रत्नजडीत हा मुकूट दिल्ली येथील संजय कुमावत यांनी ग्लास स्टोनमध्ये तयार केलेला आहे. त्यात नगिना दभंता हे रत्नजडीत खडे वापरलेले आहेत. मुकूट वेलवेटने सजविण्यात आलेला आहे. सुमारे पाच लाख रुपये खर्च करून तयार सुमारे ३५ कारागिरांनी गत दोन महिने कठोर परिश्रम घेतले आहेत. मुकूट या ठिकाणी जोडण्यात आला असून, भगवान ऋषभदेव यांच्या मस्तकावर तो रत्नजडीत टोप ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक कचरा डेपोप्रश्नी उपोषणाचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरातील कचरा डेपोचा प्रश्न अंधातरी लटकला असून, येथील संत निवृत्तीनाथ देवस्थान विश्वस्त जिजाबाई मधुकर लांडे यांनी याबाबत उपोषणाचा इशारा दिला आहे.

त्र्यंबक नगरीत दररोज टनभर कचरा निर्माण होतो. तो संकलीत करून नवीन तहसील कार्यालयाच्या बाजूस टाकण्यात येत आहे. याचा परिणाम येथील रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. दुर्गंधीने येथे जगणे असह्य झाले आहे. कचरा डेपो हटवा अन्यथा बेमुदत उपोषण केले जाईल, असे पत्र माजी जिल्हा परिषद सदस्या व निवृत्तीनाथ मंदिराच्या विश्वस्त जिजाबाई लांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्याचसोबत प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांनाही प्रत पाठवली आहे. त्र्यंबकचा कचरा नाशिक येथे जात होता. तो बंद होऊन सुमारे चार ते पाच महिने झाले आहेत. हजारो टन कचरा दररोज येथे टाकला जातो. ओला कचरा विघटन करण्यासाठी बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आला होता. तथापि, स्फोट होऊन त्याची भिंत पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुरड्याचे दैव बलवत्तर!

$
0
0

अपहरणानंतर पोलिसांनी केला कसोशीने तपास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वय वर्षे अवघे सहा. ओळखीच्याच एका 'काकांनी' बाहेर फिरून येऊन असे सांगत त्याला बरोबर घेतले. विश्वासाने त्या नराधमाचा हात हातात घेणाऱ्या त्या निरागस मुलाला पुढे काय होणार याची कल्पना नव्हती. गुरुवारी दुपारी घराबाहेर पडलेला हा मुलगा भद्रकाली पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सापडला. दैव बलवत्तर म्हणून तो आज आईच्या कुशीत आहे. भद्रकाली पोलिसांनी योग्यवेळी कारवाई केली नसती, तर या मायलेकांची पुन्हा कधी भेट झाली असती, का हा प्रश्न मनात घर करून राहतो. या सुदैवी ठरलेल्या मुलाचे नाव निरास जोग बोहरा असे आहे.

मूळ नेपाळ देशातून आलेले जोग बोहरा आपल्या पत्नी व दोन मुलांसह द्वारका परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतात. याच हॉटेलमध्ये संशयित आरोपी संदीप प्रकाश सोनवणे हा देखील काम करीत होता. घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास निरास आपल्या लहान बहिणीसोबत हॉटेलच्या परिसरात खेळत असताना सोनवणेने निरासला सोबत घेत आपण फिरून येऊ असे सांगितले. पाच मिनिटांसाठी बाहेर पडलेले हे दोघे गुरुवारी रात्री परतलेच नाही. निरासच्या आई-वडिलांच्या मनात पाल चुकचुकल्याने शुक्रवारी सकाळी त्यांनी भद्रकाली पोलिस स्टेशन गाठले. घटनेचे गां​भीय ओळखून सिनीअर पीआय मधुकर कड यांनी लागलीच तपास सुरू केला. एपीआय मृदुला नाईक, पीएसआय हनुमंत वारे व भद्रकाली पोलिस स्टेशनमधली कर्मचाऱ्यांच्या पाच पथकाने निरासचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान हॉटेलमध्ये काम करणारी एक महिला कामावर हजर नसल्याचे पोलिसांना समजले. ही महिला शिंदे गावात राहत असल्याने पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. एका रिक्षाचालकाने सदर मुलाला नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार एपीआय नाईक यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा शोध घेतला असता एका कोपऱ्यात घाबरलेल्या स्थितीत बसलेला निरास सापडून आला. संशयित आरोपी फरार आहे.

हे कुटुंब खूपच गरीब आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर काय करावे, याचीही त्यांना पुरेशी माहिती नव्हती. शुक्रवारी दुपारी तक्रार झाल्यानंतर संध्याकाळी त्याला शोधण्यात आले. आमच्या अधिकारी व कर्मचारी अथक परिश्रम घेतल्याने तो सापडू शकला.

- मधुकर कड, सीनीअर इन्सपेक्टर, भद्रकाली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोभायात्रेने गजबजले मांगीतुंगी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जैन धर्मियांच्या दक्षिण भारतातील प्रमुख समेध शिखर म्हणून ओळख असलेल्या श्री मांगीतुंगी येथील १०८ फुटी भगवान ऋषभदेव मूर्ती पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या मुख्य धार्मिक विधीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

भगवान ऋषभदेव यांच्या जन्मकल्याणक, ऐरावत हाथी शोभायात्रा, जन्माभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याने मूर्तीच्या जलाभिषेक सोहळ्याचा मार्ग सुकर होत असून, दि. १८ रोजी महामस्ताभिषेक सोहळा होत आहे.

रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सर्वतोभद्र महल येथे गणिनिप्रमुख श्री ज्ञानमती माताजी, प्रज्ञाश्रमणी श्री चंदनामती माताजी, कर्मयोगी पीठाधीश स्वतिश्री रवींद्रकिर्ती स्वामिजी, जैन धर्माचे ९ आचार्य अनेकांत सागरजी, देवनंदीजी, गुप्तीनंदजी, देवसेनजी, पद्यनंदजी, धर्मसेनजी, धर्मनंदजी, तीर्थनंदनजी, बालाचार्य देवसेनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान ऋषभदेव यांच्या जन्मजन्मकल्याणक विधी झाला. यामुळे विशाल पाषाणात साकार केलेल्या मूर्तीमध्ये दैवत्व प्राप्त होण्याचा हा धार्मिक विधी खऱ्या अर्थाने मांगीतुंगी क्षेत्रात प्रारंभ झाला.

अत्यंत मंगलमय वातावरणात व मंत्रोच्चाराच्या गजरात विधी पार झाल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास ऐरावतावर विशाल अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेच्या प्रारंभी मंगल कलश घेतलेल्या जैन भगिनी, त्यांच्या मागे मुनीश्री व आचार्य, त्यांच्या पाठोपाठ ऐरावतावर ब्रह्म ब्रम्ह्मोत्तर बसविण्यात आले होते. यानंतर इंद्र-इंद्राणी यांचा जलसा सामील झाला होता. राजस्थान येथील वाद्य पथकाने या मिरवणुकीचे संचलन केले. प्रचंड वाजत गाजत तुताऱ्यांच्या निनादाने व नाचण्याने परिसर दणाणून गेला होता. हा महत्त्वपूर्ण सोहळा रविवार आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक व महिला या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या.

आज दीक्षा कल्याणक ऐरावतावरील शोभायात्रेनंतर जन्माभिषेक शोभायात्रा होऊन मूर्ती अनुषंगाने आज दि. १५ रोजी दीक्षा कल्याणक, देश विदेशातील राजे महाराजे यांचे उपस्थिती भगवान वृषभदेव यांच्यासमोर भव्य दिव्य भेट सादर करणे व अप्सरा नृत्य सादरीकरण होणार असल्याने या तीन दिवसांच्या सोहळ्यासाठी संपूर्ण भारत वर्षातून जैन भाविक व भक्तपरिवारांचा तांडा मांगीतुंगीत दाखल होऊ लागला आहे. दि. १८ रोजी जलाभिषेक असल्याने मोठ्या प्रमाणात जैन भाविक, साधू, महंत, या ठिकाणी दाखल होऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images