कैलास येवला, सटाणा
जैन धर्मियांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील पर्वतावर होणाऱ्या १०८ फुटी श्री भगवान वृषभदेवाच्या प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक पंचकल्याण मंगल सोहळ्यास आज, गुरुवारी शुभारंभ होत आहे. राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे. तब्बल एक आठवडाभर सुरू असणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी श्री क्षेत्र मांगीतुंगी परिसर नटला असून, देश-विदेशातून सुमारे १५ लाख भाविक या ठिकाणी येत असल्याने देवस्थानासह प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
राज्य शासनाने मिनी महाकुंभ म्हणून या सोहळ्याची दखल घेत सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ज्ञानमतीमाता यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मांगीतुंगी शिखराच्या मांगीगिरीवर आशिया खंडात सर्वात उंच ठरणाऱ्या या विशालकाय मूर्तीच्या कामास सन २००२ साली प्रारंभ करण्यात आला होता. चंदनामती माता, हस्तिनापूरचे पीठाधीश रवींद्रकिर्ती स्वामीजी, डॉ. पन्नालाल पापडीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मूर्ती निर्माण समितीची स्थापना करण्यात आली होती. चौदा वर्षांच्या तपश्चर्येनंतर या विशालकाय मूर्तीचे काम पूर्णत्वास गेले आहे.
भगवान वृषभदेवांच्या पंचकल्याण महामस्तकाभिषेक सोहळ्याला आज दि. ११ रोजी ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून मांगीतुंगीकडे पाहिले जात आहे. मूर्तीच्या पंचकल्याण व महामस्ताभिषेक सोहळ्यास शासकीय सोहळा म्हणून गौरविले गेल्याने केंद्र व राज्य शासनाने परिसर विकासासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देऊन परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. जैन धर्मिय आचार्य, मुनी, आर्यिका, माताजीबरोबर भाविकांचे आगमन या ठिकाणी होऊ लागले आहे.
आरोग्य विभाग, पोलिस विभागाने चोख व्यवस्था केली आहे. एसटी महामंडळानेही दीडशे जादा बसेसेची व्यवस्था केली आहे. यासाठी जड वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे. प्रशासनाने या सोहळ्यासाठी कुठलीच कसर ठेवलेली नाही. या सोहळ्याला मिनी कुंभमेळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सर्वतोभद्र महल
मांगीतुंगी पर्वताच्या पायथ्याशी धार्मिक विधीकरिता सुमारे पंचवीस हजारांहून अधिक भाविक एकाच वेळी बसू शकतील यासाठी एक लाख चौरस फुटाचा भव्य सर्वतोभद्र महल उभारण्यात आला आहे. या महलात पंखे, विजेचे दिवे, लखलखू लागले आहेत. प्रवचन व मंत्र घोषासाठी शंभर फूट रूंद व तीस फूट लांब आकाराचे चौकोनी मचाण तयार करण्यात आले. या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या ध्वजारोहणानंतर सर्वतोभद्र महलचे शुद्धीकरण करण्यात येऊन मंगलकलश स्थापना, अखंडदीप प्रजलन, सकलीकरण, यगदीक्षा, मंडप प्रतिष्ठा, याग मंडल विधान प्रारंभ करण्यात येणार आहे.
सहा ठिकाणी भोजन व्यवस्था
जैन भाविकांसह सर्व धर्मिय भक्तगणांसाठी एकत्रित सहा ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यागी, अतिमुख्य अतिथी, आचार्य, मुनी या करिता विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
४० प्रकारची नृत्ये
या सोहळ्याची जागतिक शोभा वाढविण्यासाठी देशभरातून सुमारे ५०० जैन कलाकार विविध धार्मिक नृत्ये, समाजप्रबोधनपर नाटके सादर करणार आहेत. त्यात ४० प्रकारची नृत्ये आणि १७ नाटकांचा समावेश आहे. ढोल ताशा व लेझीमचे पथक दाखल झाले असल्याची माहिती कोरिओग्राफ सौरभ अजमेरा यांनी दिली.
पायथ्याशी यात्रोत्सव
या महोत्सव कालावधीत येणाऱ्या भाविक, यात्रेकरूचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी पायथ्याच्या पाच एकर जागवेर यात्रोत्सव थाटण्यात आला आहे. यामध्ये विविध खेळण्या, दुकाने, मौत का कुंआ, ब्रेक डान्स, मिनी रेल्वे, जहाज दाखल झाले आहेत.
पायऱ्यांचे काम अपूर्णच
मांगीतुंगी या वृषभगिरी पर्वतावर साकारलेल्या १०८ फुटी वृषभ भगवान मूर्तीपर्यंत जाण्यासाठी अद्यापही पायऱ्या नाहीत. डोंगराच्या मध्यभागापर्यंत देवस्थानचीच परवाना असलेली वाहने जात असून, पुढे पायी जाण्यासाठी पक्या पायऱ्यांचे बांधकाम अद्यापही करण्यात आलेले नाही. केवळ एका पाठोपाठ एक व्यक्तीची रांग जाऊ शकेल. प्रस्तावित लिप्टचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते पूर्ण न झाल्यास भाविकांचा भ्रमनिरास होईल. भाविकांनी दर्शनासाठी वरती जाण्याचा अट्टहास केल्यास गोधंळ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भाविकांच्या सुरक्षेवर भर
मांगीतुंगी येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी विविध विभाग सज्ज झाले आहेत. आरोग्य, पोलिस विभागाने जय्यत तयारी केली आहे. सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
आरोग्य सेवाही सज्ज
आरोग्य विभागाच्या वतीने दहा पथक तयार करण्यात आले असून, दोन फिरते पथक तर दोन शीघ्र कृती दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. सहा वैद्यकीय अधिकारी, पाच बेड्सचे अतिदक्षता विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी २० रुग्णवाहिका १०८ क्रमांकाच्या तैनात करण्यात आल्या आहेत. चोवीस तासांची अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिली आहे.
चोवीस तास पाणी
पाणीटंचाईची भीषणता जाणवू नये यासाठी हरणबारी धरणातून विशेष नळपाणीपुरवठा योजना चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आली आहे. राज्य महामार्गावरील मांगीतुंगी फाट्यापासून, तर थेट देवस्थान या नऊ कि.मी अंतरापर्यंत जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्त्याच्या दोन्ही कडेला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
तीन हेलिपॅड
देश विदेशातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची उतरण्याची सोय करण्यासाठी या ठिकाणीती न हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.
सुरक्षा व्यवस्था
अग्निशामक विभागाच्या वतीने नाशिक, धुळे, मालेगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे. दंगा नियत्रंण पथकासह राज्यभरातील सहा बॉम्बशोधक पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने सुमारे एक हजारांहून अधिक पुरूष व महिला पोलिस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. येथील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणांच्या व बॉम्बशोधक पथकाने बारकाईने पहाणी केली आहे. तसेच, राज्य महामार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. या सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी तब्बल ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
वाहतूक मार्गांत बदल
विंचूर शहादा प्रकाशा राज्य महामार्ग क्रमांक सातवर येत असलेल्या मांगीतुंगी येथे या काळात भाविकांची उपस्थिती लक्षात घेता दोन्ही बाजूंनी राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. १० फेब्रुवारीपासून दुपारी १२ वाजेनंतर ही अधिसूचना लागू असणार आहे. ती १८ पर्यंत लागू राहणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट