Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

बळीराजाच्या वेदनांवर फुंकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या सासऱ्याला पॅरालिसिसचा अॅटॅक आलेला, मुलगीही सतत आजारी, दुष्काळामुळे दोन वर्षापासून जमीन ओस पडलेली, पती जे कमवायचा ते सर्व आजारातच खर्च व्हायचं. त्यामुळे घरात पैशाची नेहमीच चणचण, परिस्थितीला कंटाळून त्यानं आत्महत्या केली. शाळेतल्या इतर पोरी मुलीला विचारतात की तुला पप्पा का नाही, ती मला विचारते, काय उत्तर द्यायचं मी?' मालेगावच्या सुशीला बच्छाव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत त्यांची वेदनादायी कहानी सर्वांसमोर मांडली अन् प्रत्येकाच्याच डोळे अश्रुंनी डबडबले.

'नाम' फाऊंडेशनतर्फे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. गंगापूर रोड येथील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात शुक्रवारी कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील ८८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची अशी एकूण सुमारे १३ लाखांची मदत देण्यात आली. गारपीटीमुळे हातचे पिक वाया गेल्याने कुणी जीवनयात्रा संपविली तर कर्जाचे ओझे वाढल्याने कुणी गळफास जवळ केला. मात्र, त्यांच्या मागे राहिलेल्या या कुटुंबीयांची परिस्थिती किती हलाखीची असू शकते, याची जाणीव या कार्यक्रमातील प्रत्येकाला उमगली.

यावेळी जिल्ह्यातील अनेक लहानमोठ्या संस्थांनी दातृत्त्वाची प्रचिती आणून दिली. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी शैक्षणिक, वैद्यकीय, मुद्रण आदी संस्थांनी 'नाम'ला मदत केली. मविप्र या शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचे तसेच जनशिक्षण संस्थेतर्फे शिवणक्लास उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच व्ही. एन. नाईक संस्थेने शेतकऱ्यांच्या १० मुलांना दत्तक घेण्याची तयारी दाखविली. अनेक शालेय शिक्षकांनीही आपला एक दिवसाचे वेतन या संस्थेला देऊ केला. मदत देण्यासाठी अक्षरशः रिघ लागल्याने नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेही भारावून गेले. लाखोंची मदत यावेळी या संस्थेला नाशिक जिल्ह्यातून देण्यात आली.

सरकारला या कामाचे मॉड्युल सादर करून ही चळवळ सर्व स्तरांवर पोहोचवल्यास परिस्थिती बदलेल, असा विश्वास त्यांनी यावेळी केला. तसेच कर्ज, पाणी, खत, निसर्गाची अवकृपा या गोष्टींमुळे शेतकरीराजा आत्महत्या करीत असला तरी त्याच्यातील हरवलेला आत्मसन्मान हादेखील आत्महत्येस कारण आहे. या शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला लढण्याची ताकद देण्याची गरज आहे. त्याची विवंचना जनसामान्यापर्यंत पोचली तरच आपण त्याची भूमिका समजून घेता येईल. त्याचा हा आत्मसन्मान त्याला परत मिळवून देण्याचा प्रयत्न करा, ही एकच प्रामाणिक इच्छा आहे. या शब्दांत नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांविषयी विचार व्यक्त केला. तसेच खेड्यातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आम्ही करतोय; मग तुम्ही का नाही?

शेतकऱ्यांचे वास्तव दाहक आहे. महागाई झाली तसे अनेकांचे पगारही वाढले. मात्र, शेतकरी या महागाईत भरडला गेला. त्याच्या पिकाला चांगला भावही मिळाला नाही, ना सरकारची त्याला मदत मिळाली. नाम फाऊंडेशनकडे कोणतेही सहाय्य नसताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी ही मदत उभी करू शकतो, तर तुम्ही का नाही, असा सवाल यावेळी सरकारला उद्देशून नाना पाटेकर यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाळिंबबाग आगीत खाक

$
0
0

सटाणा : नामपूर-साक्री रस्त्यावरील बिजोरसे शिवारातील सुशीला पवार यांच्या शेतात विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे आग लागून डाळिंबबाग खाक झाली. परिसरातील वीजवाहिन्या लोंबकळत असल्याने वेळोवेळी तक्रार करून कारवाई होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

सुशीलाबाई पवार यांच्या चार एकर डाळिंबबागेला दुपारी चार वाजेच्या सुमारास शेतातून जाणाऱ्या जीर्ण झालेल्या विद्युतवाहिन्यांत घर्षण होऊन ठिणग्या पडून बागेतील गवताने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण करत बागेतील तब्बल पाचशे तयार असलेली डाळिंबाची झाडे जळून खाक झाली. शिवाय डाळिंबाच्या झाडांसह बागेतील ठिबकचे पाइप व साहित्यही जळून खाक झाले. या आगीत सुमारे दहा लाखांहून अधिकचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नामपूर सजाचे तलाठी काळे यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे खूप येताहेत; आता आपण वाटायचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'नाम'साठी पैशांचा ओघ सुरू झाला आहे, हा पैसा योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे ही खूप मोठी जबाबदारीची बाब आहे. ती नाम फाऊंडेशन पार पाडत आहे. पैसे खूप येताहेत; आता आपण वाटायचे आहेत, असे प्रतिपादन नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी केले.

जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 'नाम फाऊंडेशन'च्या वतीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीचे वितरण करण्यात आले. यानंतर कुसुमाग्रज स्मारकातील 'मुक्तायन' विभागात झालेल्या पत्रकार परिषदेत नाना बोलत होते. ते म्हणाले, की आमचा संचय वाढलेला आहे; हा पैसा 'नाम'साठी नाही तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी दिला जात आहे याची आम्हाला जाणीव आहे. मीडियाने सकारात्मकपणे 'नाम'चा संदेश सर्व महाराष्ट्रभर पोचविला. नाहीतर इंद्राणी मुखर्जींचे प्रकरण मीडियाने किती उचलून धरले होते, त्याची अक्षरश: किळस आली होती. मीडियाने नको त्या गोष्टींना थारा देऊ नये, गरजेची आहे तीच गोष्ट उचलून धरावी, असेही नाना म्हणाले.

नैराश्यामुळे आत्महत्या

शेतकरी आत्महत्या का करीत असावा याविषयी नाना यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, की मेडिकलचा खर्च करणे शेतकऱ्याला परवडत नाही. म्हातारा, म्हातारी आजारी आहेत त्यातच पोरगं काही मागतंय, त्याला ते आपण देऊ शकत नाही याची खंत शेतकऱ्याला वाटते. त्यामुळे त्याला नैराश्य येते आणि तो असा घातकी निर्णय घेतो. नैराश्यातून एखादा शेतकरी दारू पीत असेल तर त्याला दारूडा समजू नये, तो खचल्याने असे करतोय हे लक्षात घ्या, असेही नाना म्हणाले.

तत्काळ मदतीचा हात

दिंडोरी तालुक्यातील एक शेतकरी कमरेच्या त्रासाने त्रस्त आहे. सिव्हिलमध्ये त्याचे ऑपरेशन जीवनदायी योजनेतून होऊ शकत नसल्याचे ऐकून नाना यांनी 'नाम फाऊंडेशन त्याचा खुबा बदलून देईल, त्याचा मेडिकलचा खर्च करेल. त्याला आमच्याकडे घेऊन या' असे सांगितले.

मनातली जात कशी काढणार?

ग्रामीण भागातील जाचक जातपंचायतीविषयी नानांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, की जातपंचायतीची परंपरा फार जुनी आहे. आता मीडियामुळे ते सर्वांना कळते आहे. हे फार पूर्वीपासूनच घडत होते. कोणत्याही अर्जातील जातीचा कॉलम काढा. साधा तो नाही काढू शकत तर माणसाच्या मनातली जात कशी काढणार? असे मत त्यांनी मांडले. यावेळी सूर्यकांत देशमुख, राजाभाऊ शेळके यांची उपस्थिती होती.

'ते' मेसेज खोटे

'नाम' फाऊंडेशनच्या पदांविषयी अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, की 'नाम'ची पदे नाना निश्चित करतात. त्यांच्या नावाने सध्या सोशल मीडियावर जे मेसेज फिरताहेत ते सर्व खोटे आहेत. 'नाम'च्या वतीने कोणीही पैसे मागत असेल तर त्याला ते देऊ नका. कारण त्यासाठी विशिष्ट माणसांची नेमणूक आम्ही केलेली आहे. त्यांची नावे आम्ही जाहीर केलेली आहेत. नाशिकमध्ये क्लस्टर मूव्हमेंट वाढविण्यावर आम्हाला भर द्यायचा आहे. 'नाम'तर्फे पैशांसोबत शिलाई मशिन, सायकल्स वाटल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भररस्त्यात पीआय काळेंची दादागिरी

$
0
0

गंगापूररोड परिसरातील अवैध व्यवसायांबाबत सर्वसामन्यांकडून सातत्याने ओरड होते आहे. 'स्पा' आड चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सविरोधात कारवाई करायची सोडून पीआय शंकर काळे कॉलेज रोडवर सर्वसामन्य जनतेला जेरीस आणण्याचा उद्योग करीत आहेत. काळे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी तर शुक्रवारी बीवायके कॉलेजसमोर 'राँग साईड'ने येणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम स्तुत्य असला तरी त्याआड काळे सर्वसामान्यांना पोलिसी खाक्या दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. एका विद्यार्थिनीला कॉलेजमध्ये सोडण्यासाठी आलेल्या पालकाला दमदाटी करीत पीआय काळे यांनी सर्वांसमोर मानगूट पकडून पोलिसाच्या वाहनात बसवले. या पालकाच्या ​खिशात दंड भरण्यासाठी १०० रुपये नसल्याने काळेंनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे आपण केलेली चूक इतरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 'आपल्याला काही फरक पडत नाही, वरिष्ठ आपल्या विरोधात काही करू शकत नाही', अशी शेखी मिरवली. वास्तविक यापूर्वी सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाई केली जात आला आहे. मात्र, त्यात कायद्याची जरब बसवण्याचा प्रयत्न होता.

'अर्थ'पूर्ण कारवाईचा पोलिसांचा घाट

कॉलेजरोडवर होणाऱ्या स्पीड रायडींग व इतर नियमांच्या पालमल्ली रोखण्यासाठी वाहतूक विभाग सक्षम आहे. त्यांच्याकडून कारवाई सुध्दा केली जाते. मात्र, गंगापूर पोलिसांचे एक पथक वारंवार कॉलेजरोडवर येऊन कारवाईचा घाट घालते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक सेटलमेंट केली जात असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. वाहनचालकांना आवरण्यासाठी पीआय काळे कधी लाठीचार्ज करतात तर कधी मारझोडीवर येतात.

यापूर्वी एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण केल्यानंतर काळेंना भर रस्त्यात माफी मागावी लागली होती. कॉलेजरोडवरील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी पोलिसांनी अन्य मार्गांचा वापर करण्याची मागणी होते आहे.

कायदा नव्हे स्वत:चेच बस्तान! पीआय काळे कायदा नव्हे तर स्वतःचे बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वारंवार समोर आले आहे. खंडणी उकळणाऱ्या अवैध व्यवसायिकांना पाठीशी घालत काळेंनी तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक प्रकरण 'अर्थ'पूर्ण पध्दतीने परस्पर मिटवले होते. तक्रारदाराला धमकी देऊन पीआय काळेंनी तक्रारदाराकडून कोणतीही तक्रार नसल्याचे शपथपत्र लिहून घेतले. त्यामुळे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यासमोर पुरावे सादर होऊन सुध्दा त्यांनी याच शपथपत्राच्या आधारे कारवाई करण्याचे टाळले होते. वरिष्ठ अधिकारीच गप्प बसून तमाशा पाहणार असेल तर सर्वसामन्य नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न पुढे येतो आहे.

महिलांनाही वाईट वागणूक गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या महिलांना तर अतिशय वाईट पध्दतीने वागणूक दिली जाते. नसते प्रश्न विचारून महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात असल्याने चेन स्नॅचिंग, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार आदी तक्रारी करण्यासाठी महिलांना गंगापूर पोलिस स्टेशन सोडून वरिष्ठांकडे धाव घ्यावे लागते. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्यापर्यंत सर्व तक्रारी पोहचून ते कारवाई करीत नसल्याने या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच लक्ष देण्याची मागणी आता महिला नागरिकांकडून केली जात आहे.

पोलिसांची मुजोरी कळवा कायद्याचे रक्षक असलेले पोलिस अनेकदा सर्वसामान्यांना त्रास देणारे ठरतात. वेळोवेळी असे अनुभव येतात. पोलिसांच्या या 'कर्तबगारी'ची माहिती तुम्ही MT Citizen Reporter द्वारे देवू शकतात. तुम्हाला आलेले अनुभव, पोलिसांनी दिलेली अपमानास्पद वागणूक आपण फोटोसह पाठवू शकतात. त्यासाठी MT Citizen Reporter हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा. या अॅपवरून 'मटा'कडे समस्या, प्रश्न, बातम्या, फोटो पाठवा. तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या, तुम्हाला 'दिसणाऱ्या' बातम्या, सार्वजनिक हिताची छायाचित्रे 'महाराष्ट्र टाइम्स'च्या या व्यासपीठावर मांडू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाना पाटेकर, महाजन बंधुंना गोदागौरव पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटकेर व नाशिकचे सायकलपटू महाजन यांच्यासह पाच जणांना यंदाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते १० मार्च रोजी या पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

नृत्य, चित्रपट, क्रीडा, विज्ञान, लोकसेवा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. १९९२ पासून दर वर्षाआड या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा पुरस्कार वितरण सोहळ्याचे १३ वे वर्ष आहे. केरळमधील मोहिनी अट्टम या अभिजात नृत्याचा प्रसार करणाऱ्या कनक रेळे यांना त्यांच्या नृत्यसाधनेबद्दल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दुष्काळी भागातील स्त्रियांना त्यांच्यातील सामर्थ्याची जाणीव करून देणाऱ्या चेतना सिंह यांचाही गौरव केला जाणार आहे. भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित जागतिक किर्तीचे गणिततज्ज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे यांना विज्ञान क्षेत्रातील भरीव कार्यासाठी या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. रेस अक्रॉस अमेरिका ही सायकल स्पर्धा जिंकणाऱ्या डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते व आत्महत्याग्रस्त

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत कार्य करणारे नाना पाटेकरांचाही गौरव केला जाणार आहे. यंदा प्रथमच वास्तुशिल्प कलेसाठी जागतिक ख्यातीचे वास्तुरचनाकार पद्मश्री डॉ. बाळकृष्ण दोशी यांनाही या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कालिदास कलामंदिरात सायंकाळी साडेपाचला मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला विनायक रानडे, संजय पाटील, मकरंद हिंगणे, कवी किशोर पाठक आदी उपस्थित होते. पुरस्काराची रक्कम यंदा ११ हजारांवरून २१ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी योजनांचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात टीव्ही स्क्र‌ीनद्वारे सुरू झालेला सरकारी योजनांचा जागर आता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमधूनही सुरू होणार आहे. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये टीव्ही स्क्रीनद्वारे नागरिकांना सरकारी योजनांची माहिती घेता येणार आहे. राज्य सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. मात्र माहिती अभावी या योजनांपासून नागरिक वंचित राहतात. सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवून आणि सरकारी बाबूंच्या पुढे मागे फिरूनही त्यांना योजनांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे योजना कागदोपत्री राबविल्या जात असल्याचे चित्र निर्माण होते. सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य व्हावे यासाठी या योजनांची माहिती ठळकपणे वाचता येईल, अशी व्यवस्था नववर्षाच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर टीव्ही स्क्रीन बसविण्यात आले असून, अशीच व्यवस्था सर्व तहसील कार्यालयांमध्ये मार्च अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. 'त्या' अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दक्षता समितीच्या बैठकीला खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदार आणि जिल्हाधिकारी स्वत: उपस्थित होते. मात्र अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: बैठकीला येण्याऐवजी कनिष्ठ अभियंत्यांना बैठकीला पाठवून दिले. या अधिकाऱ्यांना व्यवस्थित आणि अचूक माहिती देता येत नसल्याने खासदार चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आदींनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना या बैठकीपेक्षा अन्य कामे अधिक महत्त्वाची वाटतात काय, असा सवाल उपस्थित केला. तसेच संबंध‌ति अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. हे अधिकारी बैठकीला का आले नाहीत याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहीम ब‌ीचवर?

$
0
0

मनपा आरोग्य विभागाची बनवेगिरी; स्वच्छता मोहिमेचा फियास्को

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या स्वच्छता विभागाची बनवेगिरी स्वच्छता मोहिमेच्या निम‌ित्ताने समोर आली आहे. स्वच्छता पंधरवडा मोहिमेच्या अंतर्गत करण्यात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता कागदावरच करण्यात आली असून, स्वच्छता मोहीम दाखविण्यासाठी माध्यमांना चक्क मुंबईतल्या बीचवरील स्वच्छतेचे फोटो छापण्यासाठी देण्यात आले आहेत. आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना स्वच्छता मोहीम कुठे राबविण्यात आली याची साधी माहितीही देता आली नसल्याने स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान मोहिमे अंतर्गत महापालिकेडून १ फेब्रुवारीपासून स्वच्छता पंधरवाडा सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील नद्या, खेळांची मैदाने, सांस्कृतिक ठिकाणांची स्वच्छता केली जात आहे. महापालिकेने या मोहिमेला जनसहभागाचे स्वरुप दिले. शहरातील नागरिक मंडळे, संस्था, विविध संघटनांची मदत घेतली जाईल. यासाठीचे लिस्ट‌िंग महापालिकेने केले आहे. शहरातील विविध मंडळे, संस्था यांच्या मदतीने मोहीम राबविली जाणार होती. शनिवारी खेळांचे मैदाने, शाळा कॉलेजेसची स्वच्छता केली जाणार होती. परंतु महापालिकेची स्वच्छता मोहीम कुठे दिसलीच नाही.

नागरिकांचा सहभागही त्यात कुठे दिसला नाही. मोहिमेचा फियास्को झाल्याने माध्यमांना माहिती देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी थेट बनवेगिरीच केली. स्वच्छते मोहिमेचे चक्क मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छतेचे फोटो देण्यात आले. मुंबई किनाऱ्यावरील स्वच्छतेचे फोटो देताना नाशिकच्या स्वच्छतेची माहीती देण्यात आली तर, चक्क कुठे कुठे स्वच्छता झाली याची माहिती देतांनाही डॉ. डेकाटे यांची बोबडी वळाली होती. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम ही कागदावरच राबविण्यात आल्याचा आरोप आता केला जात आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने सारवासारवीचे प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता पाणीपुरवठ्याचे तांत्रिक ऑड‌िट

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाण्याचे सोशल ऑड‌िट केल्यानंतर महापालिकेने आता पाणीपुरवठयाचे तांत्रिक जल लेखापरिक्षण (वॉटर ऑड‌िट) करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी मुंबई स्थित एन. जे. एस. इंजिनीअर्स इंडिया या तांत्रिक संस्थेची नेमणूक केली आहे. यात नळ कनेक्शनबाबत सविस्तर माह‌ीती घेण्यासह पाणी मिटर व पाण्याचे कनेक्शन तपासणे, पाण्याची बिले तपासली जाणार आहेत. त्यामुळे या सर्व्हेक्षणाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केली आहे.

महापालिकेने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या साहाय्याने पाणी पुरवठयाचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑड‌िट) करण्यात आले. त्यात नागरिकांनी व नगरसेवक व पदाधिका-ऱ्यांनी नोंदविलेला सहभाग व केलेले सहकार्य चांगले केले. त्यामुळे पालिकेने आता पाणीपुरवठयाचे तांत्रिक जल लेखापरिक्षण (वॉटर ऑडीट) करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी एन. जे. एस. इंजिनीअर्स इंडिया प्रा. लि. मुंबई या तांत्रिक संस्थेची नेमणूक केलेली आहे. संस्थेचे अभियंता, कर्मचारी यांना महारपालिकेमार्फत तात्पुरत्या स्वरुपात ओळखपत्र देण्यात आली आहेत. या ऑड‌िटला सुरूवात झाली आहे.

या ग्राहक सर्वेक्षणात नळ कनेक्शन बाबत सविस्तर माहीती घेणे, पाणी मीटर तपासणे, पाण्याचे कनेक्शन तपासणे, पाण्याची बिले तपासणे, दुसरे तात्पुरते मीटर बसवून त्याचे दररोज १५ दिवस रिड‌िंग घेणे आणि पाण्याचा दाब मोजणे समावेश आहे. नाशिक शहरातील सर्व नळ कनेक्शन ग्राहकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, या शासकीय कामास कोणताही अडथळा न करता काम पूर्ण करणेसाठी सदर संस्थेस व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
महापौरांचा आरोप
जलसंपदा विभागाने महापालिकेला ३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिले तरी, जुलै अखेरपर्यत नाशिकच्या पाण्याची तहान भाग‌विण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दुसऱ्या पाणी नियोजनात पालकमंत्र्यांनी महापौरांना विश्वासात न घेताच निर्णय घेतल्याने महापौरांनी आता पाणी पुरवठ्यापासूनच अंतर ठेवले आहे. उर्वरीत काळात शहराला पाणीपुरवठ्याची जबाबदारी ही आता शासनाचीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाण्यावरून सत्ताधारी मनसे व भाजपमधील द्वंद कायम राहणार आहे. पालकमंत्र्यांनी अतिरिक्त ३०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून दिले आहे. परंतु तरीही जुलैपर्यंत २७ दिवसांचा तुटवडा जाणवणार आहे. ३०० दशलक्ष पाणी देताना पालकमंत्र्यांनी महापौरांनाच विश्वासात घेतले नाही. त्यामुळे महापौरांनी आता हात वर केले असून, शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महामार्गासाठी ३१४ वृक्षांवर कुऱ्हाड

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका क्षेत्रातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी ३१४ वृक्षांची तोड करण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. या वृक्षांसोबतच शहरात सात वृक्षांच्या तोडीस मंजुरी दिल्याने तब्बल ३२१ झाडावर कुऱ्हाड चालणार आहे. दरम्यान, शहरातील मनपाच्या मालकीच्या वृक्ष छाटणीचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांऐवजी समितीकडेच ठेवण्याचा निर्णयही श‌निवारच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची शनिवारी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात ३२१ वृक्षतोडीस परवानगी देण्याच्या विषयासह शहराच्या हद्दीतील वृक्षांची छाटणी करण्याचे अधिकार विभागीय अधिकाऱ्यांना देण्याचा विषय बैठकीत होता. त्यात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी द्वारका सर्कल ते दत्तमंदीर चौकापर्यंतचे ७८ व सिन्नर फाटा ते दारणी नदीपर्यंतचे २३६ असे एकूण ३१४ वृक्ष तोड करण्यास परवानगी देण्याचा विषय होता. त्यास समितीने मंजुरी दिली असून, प्रत्येक वृक्षांच्या बदल्यात दहा झाडे लावून त्याची पाच वर्षापर्यंतची देखभाल संबंध‌ित कंपनीला करावी लागणार असल्याचे आदेश समितीने दिले आहेत.

त्यामुळे कंपनीला तीन हजार १४० वृक्ष कंपनीला लावावे लागणार आहेत. त्यात पिंपळ व वडाची वृक्ष अधिक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोबतच शहरातील विविध भागातील सात वृक्षांच्या तोडीलाही परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर धोरणाविरुद्ध मनसे कोर्टात

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या टीडीआर धोरणाला मनसेने तीव्र विरोध केला असून, या धोरणा विरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. सदरच्या आदेशा विरोधात मनसेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. हा निर्णय जनहित विरोधी असून, शासन सर्वसामान्यांच्या बाजूने विचार न करता अधिकारधार्जिणे निर्णय घेत असल्याचा आरोप गटनेता अनिल मटाले यांनी केला आहे. त्यामुळे टीडीआर धोरणावरून मनसे आणि भाजप सरकार आमने सामने आले आहे.

राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या नव्या टीडीआर धोरणात नऊ व साडेसात म‌ीटर रुंदीच्या रस्त्यांवर आता टीडीआर देण्यास मनाई करण्यात आली आहे. नाशिकचे बहुतेक रस्ते ६, ७.५० व ९ मीटरच्या आतच आहेत. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फटका नाशिकच्या विकासाला बसणार आहे. नव्या डीपीत प्लॉटधारकांना अधिक टीडीआर देऊन घरे स्वस्त करण्याचा प्रयत्न होत असतानाच, शासनाच्या या निर्णयाने सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न भंगणार आहे. या निर्णयावर शासनाने तात्काळ फेरविचार करून तो मागे घ्यावा, अशी मागणी मनसेने केली होती. परंतु त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने मनसेच्या वतीने शनिवारी हायकोर्टात या आदेशा विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. न्या. अभय ओक यांच्या पीठाने ही याचिका दाखल करून घेतली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता असल्याची मटाले यांनी सांगितले. मनसेच्या वतीने अॅड. सचिन गोरवाडकर, अॅड. शाम साळवे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीला हवी संशोधनाची जोड

$
0
0

मेट्रो VIEW- कृषी



नाविन्याची कास धरली व विचारपूर्वक त्या दिशेने वाटचाल केली की विकासाची प्रक्रिया सुरू होते. वाटचाल करतांना अनेक अडचणी येतात पण, त्यावर संशोधनपूर्वक उपाययोजना केली तर तो विकास अधिक परिणामकारक होतो. पेठ व सुरगाणा भागात आज संशोधनामुळे स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पन्न घेतले जात आहे. यामुळे शेती उद्योगाला योग्य संशोधनाची जोड मिळाली तरया उद्योगाला भरभराटी येऊ शकेल.
- प्रा. अशोक सोनवणे
नाशिक जिल्ह्यातील पेठ-सुरगाणा भागातील आदिवासी शेतकरी गेली काही वर्षे निफाड-दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष शेतीवरच मजुरी करीत असत. आजही द्राक्ष शेतीत प्रामुख्याने हा आदिवासी शेतकरी काम करीत आहे. लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेतलेला हा आदिवासी शेतकरी द्राक्ष शेतीत वर्षानुवर्षे काम करीत आहे. त्याने या शेतीतील अनेक बारकावे आत्मसात केलेले आहेत. अनेक आदिवासी द्राक्ष शेतीतील तज्ञ झालेले आहेत. खरतर हा शेतकरी पूर्वी आपल्या भागात परंपरागत शेती करायचा. पावसाळ्यात सरासरी १५०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडणा-या या भागात तांदूळ, नाचणीची पिके घेतली जात. उन्हाळ्यात मात्र सर्वत्र पाणीटंचाई. अशा प्रकारच्या कृषी हवामानातील शेतकरी स्वयंपूर्ण होऊ शकला नाही म्हणून या शेतकऱ्याला आपली उपजीविका चालविण्यासाठी मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून हा आदिवासी शेतकरी गेली अनेक वर्षे द्राक्षशेतीमध्ये मजुरी करीत आहे.

आज मात्र काही आदिवासी शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीची कास धरली असून, त्यामुळे विकासाचे सकारात्मक बदल दिसू लागलेले आहेत. आज पेठ आणि सुरगाणा या भागात अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीची कास धरली आहे. एकेकाळी स्ट्रॉबेरी हे पीक केवळ महाबळेश्वर परिसरात घेतले जात असे. पर्यटकांना तेथे खुणावणारे हे पीक आज नाशिक जिह्यातील आदिवासी भागातील महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. परंपरागत शेती करणारा किंवा मजुरी करणारा शेतकरी नवीन तंत्राची कास धरून स्ट्रॉबेरीची शेती करीत आहे. काही आदिवासी शेतकऱ्यांनी द्राक्षशेतीही सुरू केलेली आहे. हे आदिवासींच्या बदलत्या जीवनमानाचे प्रतीक आहे.

स्ट्रॉबेरी हे पीक नाशिक जिल्ह्याच्या कृषी हवामानामध्ये येऊ शकते का? याचा अभ्यास कृषीखात्यातील काही अधिकाऱ्यांनी व काही शेतकऱ्यांनीही केला. काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीची शेतीही केली. पेठ-सुरगाणा भागातील कृषी हवामानामध्ये स्ट्रॉबेरीची शेती चांगल्या प्रकारे करता येईल याची खात्री झाल्यानंतर कृषीखात्याने काही शेतकऱ्यांच्या शेतावर स्ट्रॉबेरीची लागवड केली. आदिवासी शेतकऱ्यांना अनेक अडचणी आल्या. तेव्हा कृषी खात्याने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतली. या केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सूर्या गुंजाळ व प्रा. डॉ. हेमराज राजपूत यांचे या कामी योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी या स्ट्रॉबेरी उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी त्यांच्या शेतीवर जाऊन त्यांना मार्गदर्शन व मदत केली. शेतकऱ्यांच्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन त्यांनी उपलब्ध करून दिले. या तांत्रिक मदतीमुळे स्ट्रॉबेरी शेती अधिक चांगल्याप्रकारे करणे शक्य झाले. यावरून तांत्रिक ज्ञान किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येते. अशा प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन जर कृषीविद्यापीठांनी आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी उपलब्ध करून दिले तर शेतकरी अधिक चांगल्याप्रकारे प्रगती करू शकतील.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती एका बाजूला होत असताना त्यासंबंधीची जागृती शेतकऱ्यांमध्ये होणे आवश्यक आहे. ते संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. तसे झाले तर शेतकरी निश्चितपणे प्रगती करू शकतात. विकसित देशात सरकारी यंत्रणा शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्यामुळेच आदिवासी शेतकऱ्यांना विकासाचा आशेचा किरण दिसू शकला आहे. असं सर्वत्रच चित्र दिसायला हवं. अर्थात असं असलं तरी स्ट्रॉबेरीची शेती सोपी नाही. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. स्ट्रॉबेरीची रोपे अद्यापही मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर किंवा तेथील जवळपासच्या प्रदेशातून आणावी लागतात. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात आधुनिक तंत्रज्ञानाने चालविली जाणारी रोपवाटिका कृषीविभागाने तयार करायला हवी. मातृवृक्ष चांगल्या जातीचा असायला हवा. त्यापासून दर्जेदार व निरोगी रोपे उपलब्ध व्हावीत. आज अनेक शेतकऱ्यांची चांगली रोपे न मिळाल्यामुळे फसवणूक होते. निकृष्ट प्रतीच्या रोपांमुळे योग्य उत्पादन मिळत नाही. शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या शेतीकडे वळविण्याचे काम कृषीखात्याने केले आता या शेतकऱ्यांना निरोगी आणि दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी कृषीखात्यानं पुढाकार घ्यायला हवा.

सुरगाणा भागातलं स्ट्रॉबेरीचं उत्पादन वाढलं याची जाणीव सापुताराच्या रस्त्यानं प्रवास केला की लगेच होते. आदिवासी शेतकरी रस्त्यावर स्ट्रॉबेरी विकण्यासाठी बसलेले असतात. काही प्रमाणात नाशिक येथेही स्ट्रॉबेरी विक्रीसाठी पाठविली जाते. पण, स्ट्रॉबेरीला खरी बाजारपेठ मिळते ती गुजरातमध्ये. सध्या गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद आदी मोठ्या शहरात स्ट्रॉबेरी विक्रीसाठी पाठविली जाते. सुरगाण्याला गुजरातची सीमा लगतच आहे, त्यामुळे गुजरातला स्ट्रॉबेरी विक्रीसाठी पाठविली जाणे स्वाभाविक आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या इतर शेतमालाच्या विक्रीची जी व्यथा आहे तीच व्यथा स्ट्रॉबेरीची आहे. स्ट्रॉबेरीच्या विक्री प्रक्रियेत दलालांचा सुळसुळाट झाल्यामुळे दलालांचा जास्त फायदा होतो. उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात फारसा लाभ पडत नाही. खरं म्हणजे शेतकरी मोठ्या कष्टाने शेती करतो, निविष्ठांसाठी मोठा खर्च करतो. त्याचा खर्च वजा जाता दोन पैसे त्याला मिळायला हवेत. त्यासाठी विपणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या हिताची व्हायला हवी.

खरं म्हणजे कृषी विभाग आणि आत्मा यांनी एकत्रितरित्या उत्पादन आणि विपणन या क्षेत्रात अधिक भरीव स्वरूपाचे काम करायला हवे. कृषीखात्याने सुरुवातीला खूप चांगले काम केले. स्ट्रॉबेरीची शेती नाशिक जिल्ह्यात आणि विशेषतः आदिवासी भागात सुरू झाली याचे श्रेय कृषी खात्याला द्यावेच लागेल. पण, त्यापुढेही जाऊन काम करावे लागेल. शेतकऱ्यांना चांगली आणि निरोगी व अधिक दर्जेदार उत्पादन देणारी रोपे उपलब्ध करून द्यावी लागतील. या शेतीला तांत्रिक मार्गदर्शन करावे लागेल. आत्मा आणि अपेडा यांच्याकडून विपणनाचे नियोजन करावे लागेल. परवा साताऱ्याकडील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीपासून वाईन तयार केल्याची बातमी वाचली. तेंव्हा स्ट्रॉबेरीपासून अनेक पदार्थ तयार होतात म्हणून प्रक्रिया उद्योग वाढण्यास मोठा वाव आहे. स्ट्रॉबेरीची निर्यात वाढविता येईल का? याचे संशोधन अपेडाने करायला हवे. नाशिकचे काही शेतकरी एकत्र येऊन या दिशेने पुढाकार घेत आहेत. अधिक शास्त्रीय नियोजन झाले तर द्राक्षांबरोबरच नाशिक हे स्ट्रॉबेरीसाठी ओळखले जाईल. आदिवासी शेतकरी यशस्वीपणे स्ट्रॉबेरी पिकवतो ही कौतुकाची बाब आहे. स्ट्रॉबेरीचे अधिक दर्जेदार उत्पादन होऊन त्यावरील प्रक्रिया उद्योग वाढतील व निर्यातही वाढेल व शेतकऱ्याच्या हातात त्याच्या कष्टाचा योग्य मोबदलाही मिळेल तेंव्हाच स्ट्रॉबेरीची शेती कौतुकाची होईल.

(लेखक हे कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाम’ लावणार एक कोटी वृक्ष

$
0
0

अभिनेता मकरंद अनासपुरे यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. त्यानुसार 'नाम' फाऊंडेशनचे येत्या काळात राज्यात एक कोटी वृक्षांची लागवडीचे ध्येय असल्याची घोषणा अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केली. गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलमध्ये शुक्रवारी 'नाम' फाऊंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.

अनारपुरे पुढे म्हणाले की, एप्रिल महिन्यापासून रोपांच्या बिया लावण्यास किंवा जूनमध्ये पहिल्या पावसानंतर थेट झाडे लावण्यास प्रारंभ केला जाईल. नामच्या प्रत्येक स्वयंसेवकाने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत झाडे लावा, हा उपक्रम सुरू करून या काळात विद्यार्थ्यांकडे त्यांच्या झाडांचे पालकत्त्व देणे आवश्यक आहे. यामुळे पुढच्या पिढीला झाडे लावण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची सवय लागेल. त्याचा फायदा पर्यावरणाच्या संतुलनासाठी निश्चितच होईल. आज विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आपण किती झाडे लावू शकतो, याचा विचार प्रत्येकानी करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याविषयी ते म्हणाले की, मदत करण्याबरोबर त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. शिवणकाम, पशुपालन या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे अनासपुरे म्हणाले. महिलांचे शिवणकामाविषयी एक क्लस्टर उभारण्याची संकल्पनाही राबविण्याचे नियोजन हाती घेण्याच्या सूचना त्यांनी नामच्या समन्वयकांना दिल्या. तसेच, वर्धा व औरंगाबादमध्ये राबवली जात असलेली वैद्यकीय सेवा नाशिकमध्ये राबविण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सावधगिरी बाळगा

नाम फाऊंडेशन कोणासही फोन करून पैशांची मागणी करीत नसल्याने चेक मिळालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यास भुलू नये, असे सांगत सावधगिरीविषयी काही सूचनाही त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहिरात फंडा; ज्येष्ठाला गंडा

$
0
0

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : कौटुंबिक वादानंतर विभक्त राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाला आयुष्याची संध्याकाळ सुखद होण्याची अपेक्षा होती. त्यातूनच घरकाम करणाऱ्या एका महिलेचा त्यांनी शोध सुरू केला. दुर्देवाने त्यांची गाठ एका व्यक्तीशी पडली. त्या व्यक्तीने तब्बल चार महिने जेष्ठ नागरिकाला कोंडून ठेवले. त्यांच्याकडील १६ लाख रुपये काढून घेतले. गंगापूर पोलिसांकडे अर्ज आला मात्र त्यास आता वर्ष उलटत येण्याची वेळ आली असून, आजपर्यंत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर काळे यांनी हा गुन्हाच दाखल केलेला नाही.

गंगापूररोड परिसरातील नरसिंह नगरमध्ये दा. ना. जोशी हे ७८ वर्षाचे जेष्ठ नागरिक कौटुंबिक मतभेदांमुळे एकटेच राहतात. एलआयसीमध्ये क्लासवन अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या जोशींना घरकाम करण्यासाठी एका महिलेची आवश्यकता होती. त्यानुसार त्यांनी २०१४ मध्ये स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली. काही महिला आल्यात मात्र राहणीमान अथवा इतर कारणांमुळे त्यांना जोशींनी परत पाठवले. या ​जाहिरातीच्या आधारे दिगंबर आव्हाड या व्यक्तीने जोशींशी संपर्क निर्माण केला. तुमच्या मदतीसाठी एक महिला पाठवत असल्याचे आव्हाडने एक दिवस जोशींना सांगितले. त्यानुसार ती महिला नरसिंहनगरमधील जोशींच्या घरी पोहचली. मात्र, जोशींनी तिला परत पाठवले. यानंतर १५ नोव्हेंबर २०१४ रोजी आव्हाड चारचाकी वाहन घेऊन आला. जेवणासाठी जाऊ असे सांगत त्याने जोशींना सोबत घेतले. द्वारका येथे आणखी एकास घेऊन आव्हाड उपनगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका इमारतीत पोहचला. घरी जाताच आव्हाड व त्याच्या साथिदाराने जोशींना मारहाण करण्यास सुरुवात केली. जोशी यानंतर चार महिने दररोज मार खात राहिले. मद्य प्राशन केल्यानंतर आव्हाड 'नाना' अत्याचार करायचा हे सांगताना जोशींचे डोळे आजही भरून येतात. या दरम्यान आव्हाड व त्याच्या सा​थिदाराने जोशींच्या बँक खात्यात जमा असलेले जवळपास १६ लाख रुपये काढून घेतले. १२ मार्च २०१५ रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास खोलीचा दरवाजा उघडा असल्याने त्यांनी तेथून पळ काढला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी गंगापूर पोलिस स्टेशन गाठले. झालेली आपबिती सांगितली. मात्र, पोलिस ढिम्मच राहिले. वर, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, नादी लागू नका अशी दमबाजी करीत जोशींना अक्षरशः हुसकावून लावले.


गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर काळे यांच्याकडे दोनदा अर्ज सादर केला. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. एफआयआर नोंदवण्याचा हक्कही हिरावून घेण्यात आला. पोलिसांच्या सहकार्यापेक्षा गुंडाकडून पैसे वसूल करून घेण्यात मी यशस्वी झालो असतो. आता वर्ष उलटत आले असून, मला आजही दहशतीचा सामना करावा लागतो. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याची जबाबदारी गंगापूर पोलिसांवर असेल.

- दा. ना. जोशी, पीडित जेष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हॉटस अॅप’मुळे विवाहितेचा छळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवा मोबाइल घ्यायचा नाही, व्हॉट्स अॅप वापरायचे नाही आणि माहेरून १० लाख रुपये हुंडा आणायचा या कारणासाठी जेलरोड येथील विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेलरोड परिसरातील समतानगर येथे राहणाऱ्या अश्विनी सुनील तेजाळे यांनी पतीसह सासरच्यांविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

व्हॉटस अॅप आवश्यक असले तरी त्याचा कितपत वापर व्हावा, यावरून पती-पत्नी, पालक-मुले यांच्यात मतभेद तयार होतात. यात सामंजस्य पध्दतीने तोडगा निघाला तर ठिक अन्यथा हे वाद थेट पोलिसांपर्यंत पोहचतात. याबाबतची अशीच एक घटना तेजाळे यांच्यासंदर्भातही झाली. लग्नानंतर म्हणजेच १५ फेब्रुवारी २०१५ पासून अश्‍विनी तेजाळे यांचे पती सुनील भागवत तेजाळे, सासरे भागवत भिकाजी तेजाळे, सासू रजनी भागवत तेजाळे, भाया संदीप भागवत तेजाळे, ननंद स्मिता भागवत तेजाळे यांनी अश्‍विनी यांना व्हॉट्स अॅप वापरण्यास बंदी केली. समतानगर येथील रहिवाशी असलेल्या संशयितांनी त्यांना चांगला नवीन मोबाइलही घेऊ दिला नाही. हे कमी होते म्हणून नंतर सासरच्यांनी विवाहितेकडे घर बांधण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी केली. या कारणावरून तेजाळे यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला. या त्रासाला कंटाळून अश्‍विनी तेजाळे यांनी पतीसह सासरच्या लोकांविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील कलम ४९८ नुसार गुन्ह्याची नोंद केली असून, या घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार

नाशिकरोड : चार वर्षाच्या मुलीवर शेजारील सतरा वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना शिंदेगाव येथे घडली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयिताला ताब्यात घेतले आहे. दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. फिर्यादी महिलेची मुलगी घराजवळच खेळत होती. मुलगी दिसली नाही म्हणून आई शोध घेऊ लागली. तिला या मुलाच्या घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तक्रार दिल्यावर युवकाला ताब्यात घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षार्थींसाठी फेब्रुवारी अखेर ग्रंथालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी अखेर ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पाच मार्चला होणाऱ्या कार्यशाळेत परीक्षेद्वारे युवकांची निवड करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मतंडा राजा दयानिधी, कळवण आदिवासी प्रकल्प अधिकारी गंगाथरण, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, पुण्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे आदी उपस्थित होते.

यावेळी राजा म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची असून, आपल्या सवयींमध्ये एकाएकी फारसा बदल न करता टप्प्याटप्प्याने अभ्यासाच्या विविध पैलूंचा समावेश करावा. लोकांच्या जीवनात बदल घडविण्याची क्षमता भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये असते. एखाद्या लहानशा बदलाने आपण मोठे परिवर्तन घडवू शकतो, या प्रेरणेने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. आपण काय करतो आणि कसे करतो याचे निरीक्षण करताना सवयींमध्ये हळूहळू बदल घडवून आणणे योग्य ठरेल. विचलीत होणे हा मानवी स्वभाव आहे. त्याचा तणाव न घेता त्यावर लक्ष केंद्रित केल्यास मानसिक तयारी चांगली होते. अभ्यासक्रमाचा सुक्ष्म अभ्यास, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, वृत्तपत्रीय वाचन देखील परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुशवाह म्हणाले, प्रशासकीय अधिकारी ही सामान्य माणसाची शेवटची आशा असते. त्याचा व्यवस्थेवरचा विश्वास कायम राहील एवढी संवेदनशीलता स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच युवकांनी ठेवावी. स्पर्धा परीक्षेतील चुका टाळता याव्यात आणि परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. नकारात्मकता टाळण्याचा संदेश देताना बेडसे म्हणाले, चांगली मानसिक तयारी करण्यासाठी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि अपयश पचविण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही विषयाची भीती मनात न बाळगता विषयांचा नीट क्रम अभ्यासासाठी निश्चित केल्यास कमी वेळेत अधिक अभ्यास शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मैत्रेय’ संचालकांच्या शोधासाठी पथक तैनात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागून असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या फरार संचालकांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकातील अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील पालघल तालुक्यातील माणिकपुरी येथे तळ ठोकला असून, कंपनीच्या मालमत्तेचा शोध घेतला जात आहे.

प्लॉट डेव्हलपमेंटच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या मैत्रेय ग्रुपचे मुख्य कार्यालय माणिकपुरी येथे आहे. राज्यभरात १०७ शाखा व साडेतीन लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदार असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या रीअल्टर अॅण्ड कंस्ट्रक्शन प्रा. लि. आणि मैत्री सुवर्णसिध्दी प्रा. लि. तसेच मैत्री प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चरल प्रा. लि. या कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना काही महिन्यांपासून परतावा मिळणे बंद झाले आहे. सेबीने आर्थिक निर्बंध टाकल्यापासून गुंतवणूकदारांना देण्यात येणारे चेक वटतच नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यातील काही गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे धाव घेतल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी मैत्रीय ग्रुपच्या संचालिका वर्षा मधूसुधन सत्पाळकर आणि संचालक जनार्धन अरविंद पारूळेकर यांच्याविरोधात गुरुवारी मध्यरात्री कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल केला. एकीकडे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे पोलिसांच्या एका पथकाने कोर्टाच्या मंजुरीने वर्षा सत्पाळकरांना अटक केली. सध्या त्या पोलिस कोठडीत असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली. या प्रकरणात जनार्धन पारूळेकर यांचा पोलिस शोध घेत असून, या कंपनीची एकूण मालमत्ता, कागदपत्रे तपासली जात असल्याचे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. या संदर्भांत गुंतवणूकदारांना तक्रार द्यायची असल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त जगन्नाथन यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीमुळे योगेशला बहिरेपण

$
0
0

नाशिक : शाकीबला सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्या वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले तिथेच पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या एका युवकावर उपचार सुरू आहेत. योगेश दिलीप लोखंडे (वय २६), असे या मुलाचे नाव असून सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनी त्यास मारहाण केली आहे. या मारहाणीत योगेशच्या डाव्या कानाला जबर मार बसला असून, त्याला ऐकू येणे ही कमी झाले आहे.

अशोकस्तंभ परिसरातील राजवाडा येथे राहणारा योगेश पदवीधर असून, सध्या एमपीएससी परीक्षांची तयारी करीत आहे. परिस्थिती बेताची असलेला योगेश चुलत्याकडेच राहतो. जानेवारी महिन्या अखेरीस त्याचे याच परिसरातील एका युवकासोबत वाद झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात जबाब नोंदवयाचे असल्याचे सांगत पीएसआय राऊत यांनी योगेशला बोलावून घेतले. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास योगेश सरकारवाडा पोलिस स्टेशनला गेला असता पीएसआय संदीप कांबळे यांनी त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. बेल्ट, हाता बुक्यांनी कांबळेंनी योगेशला मारझोड केली. यात त्याच्या कानाला तसेच छातीला जबर मार लागला. यानंतर पोलिसांनी त्यास सोडून दिले. कायद्याची माहिती नसलेला योगेश घरी पोहचला. मात्र, कानाचा आजार वाढला. त्याने खासगी दवाखान्यात दाखवले. पण, खर्च परवडत नव्हता. शेवटी त्याने खासदार हेमंत गोडसे यांना पत्र पाठवून आपली कैफियत मांडली. त्यानंतर ३ जानेवारीला योगेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, योगेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती कळताच सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी दमदाटी करीत योगेशकडून शपथपत्र लिहून घेतले. पोलिसांनी कोणतीही मारहाण केली नसल्याचे त्या शपथपत्रात नमूद करण्यात आले. आजमितीस योगेश पूर्णतः धास्तावला असून, अनोळखी व्यक्तीसमवेत चार शब्दही बोलण्यास धजावत नाही. पोलिस यंत्रणेवरचा त्याचा विश्वास उडला असून, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांना त्याचे कोणतेही सोयरेसूतक नसल्याचे दुर्देवी चित्र निर्माण झाले आहे.


कारवाईऐवजी सीपींकडून पाठराखण

शहर पोलिस दलातील बेजबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याबाबत पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तक्रारदारच आमच्याकडे येत नसल्याचे शुल्लक कारण सांगितले. पोलिस दलाचा आलेला वाईट अनुभव पाहून सर्वसामान्य नागरिक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याची हिंमत दाखवत नाही. एवढेच नव्हे तर वरिष्ठांकडे न्याय मिळण्याची शाश्वती नसतेच. दोन दिवसांपूर्वी पोलिस उपायुक्त कार्यालयात नानावलीतील एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस आपले म्हणणेच ऐकून घेत नसल्याचे पीडित युवकाचे म्हणणे आहे. एकतर पोलिस आयुक्तांना त्यांचेच सहकारी चुकीची माहिती देत आहेत किंवा पोलिस आयुक्त माहिती असूनही कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक कचऱ्यासाठी स्वतंत्र ‘रॅगपिकर्स’

$
0
0

राष्ट्रीय नागरी रोजगार अभियानांतर्गत सहकारी तत्वावर या रॅगपॅकर्सना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. नव्या घंटागाडी ठेक्यात घंटागाडी ही बंदिस्त असणार आहे. त्यात ओला व सुका कचऱ्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. यावर उपाय म्हणून महापालिका शहरातील सध्याच्या कचरा वेचणाऱ्यांना मुलांना स्वतंत्रपणे रॅगपिकर्सचे काम देणार आहे.

शहरातील सातशे ते आठशे रॅगपिकर्सची संघटना करून त्यांना शहरातील घरोघरीचा कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. यासाठी त्यांना स्वतंत्र विभाग वाटून देण्यात येणार आहे. या रॅगपिकर्स लोकांना संकलनासह विघटनाचीही जबाबदारी देण्यात येणार असून त्यातून त्यांना रोजगारही मिळणार आहे.

मनपा देणार मदत प्लास्टिक गोळा करणाऱ्यांना मदत करणार असून सहकारी तत्वावर महापालिका हा प्लास्टिक कचरा संबंधित प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यापर्यंत पोचविणार आहे. त्यामुळे शहरातील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले सोन्याचे दागिने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून ग्रामीण भागातील महिलांना भुरळ घालून सोन्याचे दागिने पळविण्याच्या दोन घटना घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. सलग दोन दिवसात भरवीर खुर्द व कांचनगाव येथे घडलेल्या या घटनेत भामट्यांनी जवळपास दहा तोळ्याचे दागिने अर्थात दोन लाख दहा हजारांच्या ऐवजासह पोबारा केला.

इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरवीरखुर्द येथे शनिवारी मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी गंगुबाई श्रीरंग शिंदे यांच्या घरी जाऊन सोन्याच्या दागिण्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितले. सीलबंद डब्यात दागिने टाकून त्यात काहीतरी औषध टाकले व पंधरा ते वीस मिनिटांनी डबा काढून घ्या व सोन्याची चमक बघा असे सांगून ते रवाना झाले. सांगितल्याप्रमाणे चमक पाहिली असता डब्यात दागिने नसल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेत त्या दोघा भामट्यांनी जवळपास सात तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. गाजावाजा होताच ग्रामस्थांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु, मोटरसायकलवरील दोघेही भामटे पसार झाले होते.

कांचनगाव येथेही हाच प्रयोग करण्यात येऊन यशोदाबाई कचरू गव्हाणे या वृद्धेलाही रविवार मोटरसायकलवर आलेल्या दोघा युवकांनी घरी येऊन सोन्याचे दागिण्यांना पॉंलिश करून देतो, असे सांगून वरील घटनेप्रमाणेच भुरळ घालून सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन भामटे पसार झाले.

घोटी पोलिस स्टेशन हद्दीत सोन्याच्या दागिण्यांना पॉलिश करून देतो असे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी भरवीर खुर्द व कांचनगाव येथे फसवून सोने चोरी केले आहे. या दोन्ही भामट्यांकडे निळ्या रंगाची मोटरसायकल आहे. ग्रामस्थांनी सतर्क राहून अशा व्यक्तींचा शोध घ्यावा व मिळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. - प्रभाकर पाटील, पोलिस निरीक्षक, घोटी पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड नगरपंचायतीला ३५ लाखांची दंड नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड नगरपंचायतीने निफाड येथील गट नंबर सहाच्या जागेवरूप ६५७ ब्रास विनापरवाना अनधिकृत मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी निफाडचे तहसीलदार संदीप आहेर यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांना ३५ लाख ४७ हजार ८०० रुपये दंड का आकारू नये, अशी नोटीस बजावल्याने निफाड शहरात खळबळ उडाली आहे.

निफाड नगरपंचायतीने गट क्रमांक सहामध्ये कोणतीही परवानगी न घेता मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे नगरसेवक किरण कापसे यानी महसूल यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले. उत्खनन होत असलेल्या ठिकाणी मंडल अधिकारी व तलाठी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दीपक भुतडा यांच्या पोकलेन मशीनद्वारे उत्खनन होत असल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. त्यानुसार तहसीलदारांनी मुख्याधिकाऱ्यांना नोटीस काढून ६५७ ब्रास मुरुमाची बाजारमूल्याच्या पाच पट ३५ लाख ४७ हजार ८०० रुपये दंड का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करून याबाबत ११ फेब्रुवारीपर्यंत खुलासा करण्यासाठी तहसील कार्यालयात हजर राहावे, अन्यथा दंडाबाबत अंतिम आदेश पारित करण्यात येईल, अशी नोटीस बजावली.

भुतडा यांनाही नोटीस गट क्रमांक सहा येथूनच दीपक भुतडा व सुदर्शन भुतडा यांनी अवैधरित्या १५० ब्रास मुरूम उत्खनन करून हा मुरूम त्यांच्या मालकीचा गट न. ८१९ मध्ये ट्रॅक्टर व डम्‍परने वाहतूक करून टाकला. त्याचा पंचनामा करून भुतडा यांना आठ लाख दंड रुपये का आकारू नये, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे. निफाड नगरपंचायत व दीपक भुतडा यांना ही नोटीस बजावल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या नोटिसीबाबत प्रतिक्रियेसाठी निफाड नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी संजय जाधव हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images