धनंजय गोवर्धने
शाळेत असताना माझा मित्र अनिल जोशी रविवार कारंजावर राहात असे. आम्ही मित्र त्याच्या घरी जमायचो. त्याचे आईवडील परगावी गेले की, रात्रभर गाणी, गप्पा धमाल असायची. अर्ध्या चड्डीतून बेलबॉटममध्ये आल्यानंतरही कॉलेजमध्ये असताना त्या वाड्यात जमत असू. सात पायऱ्यांचा वाडा म्हणून तो प्रसिध्द होता. पूर्वेला दगडी चिरेबंदी सात पायऱ्या त्याच्या दोन्ही बाजूला घडीव दगडाचे दोन कट्टे. या कट्ट्यांवर बसत आम्ही सहलींचे नियोजन केले, कोणत्या सिनेमाला जायचे अन् मिसळ कुठे खायची याची चर्चाही केली.
सात पायऱ्या दगडी चढून वर आलं की, एक मोठ्ठा जाडजूड कोरीव काम केलेला दरवाजा. त्याला एक मोठ्ठी जुन्या पध्दतीची कडी, उंबरा ओलांडून आत आलं की दरवाजा बंद करताना लावायचा एक मोठ्ठा अडसर, अडसर म्हणजे दरवाजा दोन्ही बाजूंना भिंतीत असलेल्या गोलाकार जागेत आत सरकवलेलं जाडजूड गोलाकार लाकूड ते दरवाजा बंद करताना लावावं लागे. रात्री बाहेर सिनेमाला जायचं असेल तर दरवाजाच्या आत असलेल्या लोखंडी कडीला कुलूप लावून जायचे म्हणजे अन्य कोणीही अडसर लावीत नसे. रात्री कोणीतरी उशिरा येणार आहे हे त्यांना त्यावरुन समजायचे उंबरा ओलांडून आत आलं की, एक मोठी २० बाय २० ची मोकळी अंधारी जागा. मधोमध एक लाकडी जाड खांब दगडी जोत्यावर भक्कम उभा, वरती चौरस धिरे, त्यावर नक्षीकाम गोट मारलेले, आडव्या सरया आणि गोल काळे वासे, पुढे दगडी चौक आत दोन दगडी पायऱ्या आणि पाण्याचा हौद. चौकातल्या खांबांना आडवी गोलसर खोळ, दोन लाकडं खोळात गुंतवलेली, वरच्या लाकडावर बसून खालच्यावर पाय टेकवत गप्पा मारायच्या, चौकातल्या चारही बाजूंच्या खांबांना वरती लोखंडी गोलाकार कडी, कधीतरी कार्यक्रमासाठी छताची गरज भासल्यास त्या कड्यांना ते बांधता यायचं, सूर्याचं उन परावर्तीत होऊन चौकात प्रकाश पाझरे पण त्या मोकळ्या जागेतल्या खांब गूढ वाटे. त्या खांबाभोवती पाय न टेकवता सायकलने गोल चक्कर मारायची स्पर्धा लागे. अशा चकरा मारणे मोठ्यांना आवडत नसे. पुढे एक बोळ होती त्यातून येणाऱ्या उजेडात माणूस ओळखू येत नसे. त्याची काळी आकृती फक्त दिसे. एकदा दुपारच्या शांत वेळी या बोळीत दोन मांजरांचं भांडण बघून अंगावर काटाच आला. पुढे पाऊल टाकण्याची माझी हिम्मतच झाली नाही.
बोळीच्या बाजूला उखळ जमिनीत पुरलेलं होतं. उजव्या बाजूला अनिल राहत असे. वरती सुरेश. पुढच्या मोठ्ठ्या अंगणात मधोमध एक छान तुळशी वृंदावन. त्याच्या जवळच एक पारिजातकाचं मोठ्ठं झाड अनेक वर्ष श्रावणात लाल फुलांचा अभिषेक कुणीही न सांगता करत असे. उजव्या कोपऱ्यात पिठाची गिरणी त्याच्याजवळ अनिलच्या जुन्या गाडीचं गॅरेज, डावीकडे रामचंद्र हलवाई. उजव्या बाजूच्या कंपाऊंडच्या बाजूच्या भिंतीत दोन्ही वाड्यात सामाईक आड होता अनेक वर्ष गुण्यागोविंदाने भरुन राहिलेला. त्या वाड्याविषयी मला इतकं आकर्षण का वाटत होतं? माहीत नाही, मी अनेक वर्ष त्या वाड्यात जातयेत होतो. त्यावर लिहावे म्हणून शोध घेतला तर असंख्य गोष्टी कळाल्या.
शंभर दिडशे वर्षांपूर्वी नारायण गणेश लेले हे इंदोरहून नाशिकला आले. खरं तर लेले हे मुळचे कोकणातल्या मालगुंडचे ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी. कोंडो केशव लेले हे ज्ञात असलेले सातव्या पिढीतले. मुळपुरुष लेलेकडे इंदोरच्या होळकरांची इरासदारी होती. चातुर्मासात तीर्थस्थळी राहावे म्हणून त्यांनी हा वाडा बांधला. काशीच्या लेले शास्त्रींच्या शिष्यांच्या ज्ञानाबाबत शंका घेऊन त्याला अपमानीत केले गेल्याने व्यथित होऊन काशिनाथ शास्त्री लेले नाशिकला आले. ते या लेले वाड्यात वेद पाठशाळा चालवीत इथे दररोज वेद अध्ययन होत असे. पुढे पुढे विद्यार्थी मिळेनासे झाले वेदशाळा बंद पडू लागली. अनेक वर्ष इतक्या मोठ्या वाड्यात कोणीच राहात नव्हते. कधीतरी लेले नाशिकला येत. पण वास्तुची देखभाल व्हावी, साफसफाई करुन रोज दिवाबत्ती करावी एवढ्याच मोबदल्यावर माणसांना राहण्याची विनंती केली. तेव्हा तो वाडा माणसांच्या हालचालींनी जिवंत राहिला. वाड्याला वाडपाच्या प्रचंड जाडजुड भिंती, दुमजी बांधकाम आणि वरचा लवण मजला म्हणजे माळा, ज्याचं छत एका बाजूला खाली उतरतं असल्याने लवून जावं लागे म्हणून लवण मजला. छपरावरती थापीची चपटी कवले. नळीची अर्धगोलाकार लांबट कवले. गरिबांची, मध्यमवर्गाची थापीची चपटी पुस्तकाच्या आकाराची आणि श्रीमंतांची मंगलोरी असत.
श्री वामन शास्त्री लेले हे काशिनाथ शास्त्री लेलेंकडे वेदविद्या शास्त्र शिकलेले. वैदिक अभ्यासात ते पारंगत होते. त्यांच्या विद्वतेचा यथोचित सन्मान शासनाने केलेला होता. त्यांच्याकडे अनेक जुन्या पोथ्या, हस्तलिखित होती. युध्दकलेचे शास्त्र, वेदपुराण अशी दोन बैल गाड्या भरुन असलेली ग्रंथसंपदा त्यांनी त्यांचे स्नेही अभ्यासक सखाराम शास्त्री खेडकर यांना दिली. त्यांच्या वाड्याच्या भिंती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा मातीच्या उदरात लुप्त झाली. नारायण गणेश लेले यांनी अध्यानाने संप्रुत जीवन जगलेले त्यामुळे माणसाने जीवनात चारही आश्रमाचा अनुभवावा म्हणून अतूर संन्यास घेतला. अतूर संन्यास म्हणजे सर्व सामान्यांसारखे हे ऐच्छीक जीवन सोडून नदी किनारी जाऊन स्वतःचे उत्तरकार्य करायचे, स्वतःचे पिंडदान तर्पण करायचे, नदीत उभे राहून सर्व संगाचा वस्त्रांचा त्याग करायचा. मग संन्यासी त्याला भगवी वस्त्रं देतो ती वस्त्रं परिधान करुन संन्यासी म्हणून उर्वरित जीवन जगायचे लेलेंनी असं संन्यासी आयुष्य व्यतीत केलं. एके दिवशी ध्यानधारणा करीत असताना त्या अंधाऱ्या जागेतल्या मधोमध असलेल्या खांबाला पाठ टेकवलेल्या स्थितीत त्यांनी देह सोडला. ते योगी होते. सर्व सामान्यांप्रमाणे कोणत्या पंचेंद्रियाद्वारे त्यांचे प्राणोत्क्रमण झाले हे कळू शकले नाही. डोळे मिटलेले, तोंडही मिटलेले. चेहरा शांत प्रसन्न, ना दुर्गंधी ना अन्य काही सुचक खुण, जाणत्यांच्या मते ध्यानधारणेमुळे त्यांनी त्यांचे प्राण कुंडलिनी जागृत करुन मोक्षाप्रती आणलेले असावेत आणि त्यांचे प्राण ब्रह्मरंध्रापाशी अडले असावेत म्हणून जाणत्या माणसाने शंखाने त्यांचे ब्रह्मरंध्र फोडून प्राण मोक्षाप्रती मुक्त केले. त्यांची समाधी मोदकेश्वर मंदिराच्या समोरच्या जागेत होती. लेलेंचे पूर्वज कोजागिरी पौर्णिमेला विधीवत त्यांची पूजा करत असत. नगरपालिकेने रस्त्याच्या बांधकामाचे वेळी त्याबाबत नोटीस पण जाहीर केली होती. त्यानुसार मग विधीवत पूजा करुन समाधी विसर्जन करण्यात आलं.
लेले वाड्याच्या निमित्ताने नगरपालिकेचे तत्कालीन कामकाजाच्या भाषेची माहिती मिळते. लेले वाड्याचा घर नं ६३३ होता. तो बदलून ६७१ करण्यात आल्याची नोंद आहे. नाशिक म्युनिसिपालटी जाहीर खबर घरपट्टी व सफाई पट्टीची दिनांक ३१ मे १८९३ रोजीची घरपट्टी व सफाईपट्टीची सन १ एप्रिल १८९३ ते ३१ मे १८९४ सालाची आकारणी रजिष्टर तयार झाली असून ती ज्यास पहावयाची असतील त्यांनी म्युनिसिपालटीचे कचेरीत वेळात येऊन पहावीत. अशा नोंदी बघायला मिळाल्या. दिनांक १-७-१९१२ रोजीच्या नोटीशी नुसार नाशिक शहरातील मोठमोठ्या रस्त्यांमधून पाण्याचे नळ नेण्याचे काम बहुतेक पूर्ण झाले आहे. परंतु लोकांच्या सोयीसाठी गल्ल्यात नळ घालणे आवश्यक वाटल्यावरुन नळ जोडणीची तरतुद व अर्धा इंची तोटी घेणाऱ्यास सालाना १२ ते १५ व एक इंची तोटी घेणाऱ्यास रुपये २५ पेक्षा जास्त खर्च येणार नाही.
पूर्वीचा आग्रारोड लेले वाड्यावरुन जात होता. रविवार कारंजाजवळ यशवंत मंडई आहे. त्या परिसरात तुरुंग होता आणि बाहेरच्या बाजूला दुकान होती. नवीन तांबट गल्ली ही त्यानंतरची वस्ती. जुना ६७१ लेले वाडा त्याच्यासमोर वैद्यांचा वाडा, दगडु तेली यांचे जुने दुकान, वीज मंडळाचं कार्यालय, लेले वाड्यातलं रेशनचं दुकान, तो दगडी सात पायऱ्यांचा वाडा त्यावर बसून केलेली चर्चा श्रीकांत कुलकर्णी, अनिल जोशी, सुरेश खरे, मंगळवारी दुकानाला सुट्टी असल्यावर येणारा चंदु सुगंधी, विनायक कोल्हटकर कॉलेजच्या दिवसातल्या नाटक चर्चा सारं आठवतं पण सात पायऱ्यांचा तो लेलेंचा वाडा आता नाहीये तिथं आहे एक भव्य व्यापारी संकुल. नव्या काळाची नवीन फसाल्ड काचेची वस्त्रे लेवून जुन्या आठवणींच्या जखमांवर साकाळून आलेल्या खपल्यासारखी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट