बागलाण तालुक्यातील नामपूर येथे उन्हाळ्याची दाहकता जाणवू लागली असून, ऐन उन्हाळ्याच्या सलामीपूर्वीच गावात तब्बल १८ दिवसाआड पाणीपुरवठा होऊ लागला आहे. यामुळे नामपूरसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीषण पाणीटंचाईमुळे महिलांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आताच आल्याने मार्च, एप्रिल व मेमधील परिस्थितीने तर अंगावर शहारे आणले आहेत.
सटाणा शहरानंतर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून नामपूरला ओळखले जाते. मोसम खोऱ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील म्हणून या गावाचा उल्लेख होतो. आजमितीस या गावाची लोकसंख्या ३५ हजारांच्या आसपास आहे. आजही या ठिकाणी सुमारे ४५ वर्षापूर्वींच्या जुन्या विहिरींद्वारेच पाणीपुरवठा होत आहे. गावाबरोबरच परिसरात नववसाहतींनी नवनिर्मिती केली आहे. नववसाहत वगळता संपूर्ण गावाला जुन्या जॅकवेलद्वारे सार्वजनिक पाणीपुरवठा होतो. नामपूर ग्रामपंचायतीच्या एकूण पाच विहिरी आहेत. या पाच ही विहिरींचे पाणी एकत्रित करून जॅकवेलच्या माध्यमातून नामपूरला पाणीपुरवठा होत असतो.
मोसम खोऱ्याची जीवनवाहिनी असलेल्या हरणबारी धरणातून जानेवारी महिन्यात सुमारे ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग आला. मात्र, सदरचे पाणी पूर्णत: पिण्यासाठी आरक्षित केल्याने पाटचाऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. परिणामी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना या पाण्याचा लाभ झाला नाही. ग्रामपंचायतीच्या विहिरी आटल्याने गावातील ग्रामपंचायत सदस्या पुष्पा मुथ्या, किरण अहिरे, ग्रामपुरोहित किरण भातखळे यांच्या विहिरीतून पाणी उपलब्ध होऊन देखील पाण्याची टंचाई कमी होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होत नाही तोच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद झाल्याने टँकरची संख्या वाढणार आहे.
नामपूरचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी सन २००७ मध्ये सुमारे एक कोटी रुपयांची जलस्वराज योजना मंजूर झाली होती. या योजनेला दीड वर्षात पूर्ण करण्याची अपेक्षा असताना ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे सदरची योजना तब्बल सात वर्षाचा कालावधी योजना पूर्णत्वासाठी घेण्यात आला. मात्र, योजना साकार होऊन देखील पाण्यासाठी तीळमात्र सुधारणा झाली नसल्याने योजनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नामपूर गावात नळपाणीपुरवठा योजना असताना नळांना पाण्याचा थेब नाही. नववसाहत परिसरातील नागरिकांना वर्षभर दुष्काळाचे चटके बसत असतात. वर्षभरापेक्षाही उन्हाळ्यातील परिस्थिती नववसाहतमधील नागरिकांना जीवघेणी ठरत असते. यामुळे कायमस्वरूपी पिण्याचे पाण्याचे संकट सोडविण्यासाठी ग्रामपालिकेने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
नामपूर गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरीची खोलीकरण करून आडवा बोअर मारण्यासाठी प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. - प्रमोद सावंत, सरपंच नामपूर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट