January 30, 2016, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर दि ब्लाईंड अॅण्ड डिसेबल्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन व डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या मातोश्रींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त अंध व डोळस व्यक्तिंसाठी देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मनोज चोपडा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विजेत्यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे व डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. डॉ. मनोज चोपडा यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. अतकरे यांनी संस्थेच्या निवासी कॉम्प्युटर केंद्रास पाच कॉम्प्युटर उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. सुरमणी शुक्ल व विनोद पटवर्धन यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रास्ताविक विकास शेजवळ यांनी केले. डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेतील विजेते १. असावरी सरदेसाई, २. जी. एन. शेख, ३. गणेश बागुल. उत्तेजनार्थ - आर्या मोरे, एम. डी. रज्जाक, रोहन कांबळे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 30, 2016, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामपंचायती बळकट झाल्या पाहिजेत. तरच हा कारभार अधिक ताकदीचा आणि पारदर्शी होऊ शकतो,' असे प्रतिपादन अॅड. भगवान भडांगे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनी पेठ तालुक्यातील कोपुर्ली या ग्रामपंचायतीत एक आगळीवेगळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. दिशा फाउंडेशन, गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एनबीटी लॉ कॉलेजचे एलएलएमचे विद्यार्थी आणि नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने 'कायदेविषयक जाणीव-जागृती व मदत शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ग्रामस्थांना माहिती देताना ते बोलत होते.
भडांगे म्हणाले,'भारत हा ग्रामीण देश आहे. त्यामुळे ग्रामसभा ही ग्रामीण लोकशाही व्यवस्थापनातील सर्वोच्च यंत्रणा आहे. ग्रामसभा या तालुक्याच्या, जिल्ह्याचा व पर्यायाने राज्याच्या कारभारावरही परिणाम करू शकते. ही ताकद अनेक ग्रामपंचायतींनी दाखवून दिली आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये ग्रामपंचायतीला अनेक अधिकार दिले आहेत, त्याची माहिती करून घेणे, ग्रामस्थांसाठी महत्त्वाचे आहे.'
ग्रामस्थांना कायद्याची परिपूर्ण माहिती असावी, तसेच कायद्यातील विविध तरतूदींची जाणीव नागरिकत्त्वाच्या दृष्टीने त्यांना असावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अॅड. मिलिंद बाबर आणि अॅड. भगवान भडांगे यांनी प्राधिकरणातर्फे उपलब्ध असलेल्या मोफत विधी सेवेविषयी माहिती दिली. 'ग्रामस्थ हे त्यांच्या अधिकारांसाठी सरपंचामार्फत तक्रार नोंदवू शकतात आणि प्रस्ताव देखील मांडू शकतात' असे त्यांनी यावेळी सांगितले. एनबीटी लॉ कॉलेजच्या जागृती ठाकरे आणि कांचन सोनवणे यांनी आदिवासींसाठी असलेले जमिनीचे कायदे, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना आणि इतर उपयुक्त योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी दिशा फाउंडेशनच्या रेखा साबळे, संजय गवळी यांनी परिश्रम घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 30, 2016, 12:58 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइन (आयएनआयएफडी) नाशिक केंद्राच्या फॅशन डिझाइन शाखेच्या विद्यार्थ्यांचे आज (३१ जानेवारी) हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये 'ओरा २०१६' या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या फॅशन शोमध्ये इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध कलेक्शन सादर करण्यात येणार आहेत.
आयएनआयएफडी इन्स्टिट्यूटतर्फे बदलत्या जीवनशैलीला अनुसरून फॅशन डिझाइनचे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकविले जातात. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी विविध उपक्रम देखील राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थ्यांच्या शिक्षण कौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. फॅशन डिझाइन उद्योगातील संधी अधोरेखीत करणाऱ्या या शोमध्ये किड्स फॅशन शो देखील सादर होणार आहेत. तज्ज्ञ फॅशन फॅकल्टीजच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३१ कलेक्शन सादर करण्यात आले. त्यात ट्रेडिशनल व वेस्टर्न आऊटफिट्सचा समावेश असणार आहे. तसेच, नॅबच्या सदस्यांतर्फे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 30, 2016, 1:59 pm
जंक्शनच्या मूळ कामाकडे पोलिस आणि एनएचआयचे दुर्लक्ष
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लेखानगर येथील जंक्शनवर शहर वाहतूक पोलिसांनी शनिवारी बॅरकेडिंग केले. यामुळे वाहनचालकांचा वळताना गोंधळ होणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र, हा प्रकार जखम पायाला आणि मलम शेंडीला अशा प्रकारातील आहे. पोलिस आणि नॅशनल हायवे अॅथोरटी (एनएचआय) लेखानगरच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून, नागरिकांच्या सोयीसाठी उड्डाणपुलाखाली दुसरा पर्यायी मार्ग त्वरीत सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली जाते आहे.
इंदिरानगर येथील अंडरपास बंद करताना शहर पोलिस व एनएचआयने लेखानगर येथून एक नवा पर्यायी रस्ता सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे इंदिरानगर भागातून येणाऱ्या वाहनचालकांना लेखानगर येथील जंक्शनवर जाण्याचा प्रश्नच राहिला नसता. नागरिकांना पडणारा लांब फेराही कमी झाला असता. मात्र, इंदिरानगर अंडरपास बंद करून अनेक महिने उलटले असले तरी हा नवीन रस्ता तयार झालेला नाही. इंदिरानगर, सिडको आणि पाथर्डी फाट्याकडून येणाऱ्या वाहनचालकांची एकच गर्दी लेखानगर जंक्शनवर होते. मोठ्या वाहनांना वळण्याइतपत येथे टर्निंग रेडियस नसल्याने वाहतूक कोंडी होते. याबाबत काही तक्रारी आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी येथे शनिवारी सकाळी बॅरकेडिंग लावले. यामुळे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली. मात्र, हा उपाय कायमस्वरूपी होऊ शकणार नाही. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लेखानगर जंक्शनच्या अलीकडे उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत रस्ता तयार होणे आवश्यक आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएचआय आणि वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिथे सर्व्हे करून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही स्थानिकांनी त्यांना दमबाजी करीत पिटाळून लावल्याची चर्चा आहे. इंदिरानगर अंडरपास बंद करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पोलिसांवरच नवीन रस्ता तयार करताना दमबाजी होत असेल तर या प्रकरणाची पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त असल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 30, 2016, 7:01 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
झारखंडमधून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा एका ट्विटमुळे शोध लागला. मुलीच्या आईने प्रसंगावधान राखून रेल्वे मंत्री सुरेश प्रभु व रेल्वे मंत्रालयाच्या अंकाऊंटला ट्विट करून मदत मागितली. त्यानंतर लागलीच सारी यंत्रणा हलली आणि नाशिकरोड येथे दोघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. रेल्वे मंत्रायलाच्या सतर्कतेमुळे ही मुले पुढील धोक्यापासून वाचली.
झारखंडमधील एका नावाजलेल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेल्या पालकाची १५ वर्षीय मुलगी शाळेत जाते. तिथेच तिचा १७ वर्षाचा मित्रही असतो. घरच्यांची ओळख असल्याने या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघांनी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. दोघांनी हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेसमध्ये एस ३० या बोगीत रिझर्व्हेशन केले. शुक्रवारी त्यांनी घरातून पलायन करून ट्रेनमधील प्रवास सुरू केला. अल्पवयीन मुलगी व मुलगा बेपत्ता झाल्याने चिंतेत असलेल्या पालकांनी मित्र परिवाराकडे चौकशी केली. त्यातून काही धागेदोरे सापडले. मात्र, रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुलांना कसे शोधायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. मुलीच्या आईने मुलांबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभु आणि रेल्वे मंत्रालयाला ट्विटद्वारे माहिती दिली. यानंतर रेल्वेची यंत्रणा गतिमान झाली. मुलीच्या आईचे ट्विट आले, त्यावेळी गितांजली एक्सप्रेसने भुसावळ स्टेशन सोडले होते. संध्याकाळच्या सुमारास ही ट्रेन नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पोहचली. दिल्ली व मुंबईतून संदेश मिळाल्यानुसार तैनात असलेल्या लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी काही सेकंदांत गितांजली एक्स्प्रेसची झडती घेऊन मुलांना ताब्यात घेतले. मुले सध्या नाशिकरोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी केली जात आहे.
''एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर आम्हाला या मुलांची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही सर्व तयारी केली होती. दोन्ही मुलांनी प्रेमप्रकरणातून घर सोडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मुलांचे पालक विमानाने मुंबई येथे पोहचले. तेथून ते नाशिकला आले.''
चंद्रशेखर भाबळ, पोलिस निरीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 31, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, येवला
पालखेडच्या आवर्तनात मिळालेले अत्यंत कमी पाणी अन् त्यामुळे पालिकेच्या साठवण तलावात सध्या असलेला पाणीसाठा लक्षात घेता येवला नगरपालिकेने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरवासीयांना आज (१ फेब्रुवारी) पासून सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पालखेड पाटबंधारे विभागाने नुकतेच पिण्यासाठी आवर्तन सोडताना येवला नगरपालिकेला पाणी दिले खरे, मात्र त्या आवर्तनात केवळ २७.६९ दशलक्ष घनफूट इतकेच पाणी मिळाले होते. पाणी कमी मिळाल्याने येवला शहरानजीकचा पालिकेचा ५० दशलक्ष घनफूट क्षमतेचा साठवण तलाव जवळपास अर्धा रिकामाच राहिला होता. दररोज साधारणतः पाच सेंटीमीटरने साठवण तलावातील पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र समोर आले होते.
पालिकेच्या साठवण तलावात सध्या केवळ २० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध असून, एप्रिल अखेर हे पाणी शहराला पुरवताना नगरपालिकेची दमछाक होणार आहे. अशातही पालखेडचे पुढील आवर्तन मिळण्यास उशीर झाला, तर शहरवासीयांसमोरील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होणार आहे. त्यामुळेच पालिका प्रशासनाने शनिवारी दुपारी तत्काळ बैठक घेताना शहराला आता सहा दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीस नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, पाणीपुरवठा सभापती रिजवान शेख, नगरसेविका शबानाबानो शेख, नगरसेवक संजय कासार, बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी राहुल वाघ, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जनार्धन फुलारी आदी उपस्थित होते. येवला शहराला सध्या पाच दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा होत होता.
प्रशासनाने घेतला कारवाईचा पवित्रा येवला शहरातील अनेक नळांना तोट्याच नसल्याचे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पालिका प्रशासाने आता अशा नळकनेक्शन धारकांवर कडक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केला आहे.
पालिकेच्या साठवण तलावात सध्या असलेला पाणीसाठा अन् हे पाणी एप्रिल अखेरपर्यंत पुरविण्याची गरज बघता आता शहराला सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी काळजीपूर्वक पाणी वापरावे. पुढील काळात साठवण तलावातील साठ्याचा पुन्हा आढावा घेत पुढील पाणीपुरवठ्याचा कालावधी निश्चित केला जाईल. - राहुल वाघ, मुख्याधिकारी, येवला नगरपालिका
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 1:30 pm
नाशिकरोड जेल प्रशासनाला कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा
arvind.jadhav
@timesgroup.com
नाशिक : मोबाइल व अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात नियुक्त केले जाणारे गृहरक्षक दलाचे जवान यापुढे घेऊच नये, अशी भूमिका जेल प्रशासनाने घेतली आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहाला तब्बल ७० कर्मचाऱ्यांची कमरता असून, ते मिळाल्यानंतर सध्याच्या २५ होमगार्डची सुटी करण्यात येणार आहे.
सेंट्रल जेलमध्ये मोबाइल व अंमली पदार्थांची नियमित तस्करी होत असते. त्याचे पुरावे सापडल्यानंतर कर्मचाऱ्यांवर लागलीच कारवाई होते. काही दिवसांपूर्वी जेलच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या दोघा होमगार्डसने बुटांमध्ये लपवून जेलमध्ये अंमलीपदार्थ नेण्याचा प्रयत्न केला. तपासणीमध्ये होमगार्डचे कृत्य उघड झाल्यानंतर त्यांच्यावर नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या जेलची सुरक्षा होमगार्डसवर कशी सोपवली जाते, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला.
नाशिकरोड सेंट्रल जेलचे तुरूंग अधीक्षक रमेश कांबळे यांनी सांगितले की, वास्तविक जेलच्या सुरक्षेसाठी होमगार्डची मदत घेतली जात नाही. मात्र, कारागृह शिपायांच्या मंजूर ३१० पदांपैकी सध्या २४० कर्मचारी तैनात आहेत. ७० कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने २५ होमगार्ड नियुक्त करण्याचा निर्णय काही काळापूर्वी घेण्यात आला. कारागृह शिपायांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षेसाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध झाल्यास बाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार नाही, असे कांबळे यांनी स्पष्ट केले. सेंट्रल जेलमध्ये तीन हजार ११८ पुरूष तर ६० महिला कैदी समावण्याची क्षमता असून, आजमितीस येथे दोन हजार ७९ बंदी आहेत.
जेलमधील एकूण दोषींची संख्या - १४३३ कच्च्या कैद्यांची संख्या - ६४६
तुरुंगाचे क्षेत्रफळ फार मोठे असून, त्यातील संवेदनशील भागात बाहेरील व्यक्ती किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश मिळतच नाही. होमगार्डस सुध्दा तिथे पोहचत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने जेल प्रशासनाचे कर्मचारी पूर्णक्षमतेने उपलब्ध असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच रिक्त पदे भरली जातील.
- रमेश कांबळे, तुरूंग अधीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 1:59 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळवून त्या आधारे सरकारी नोकरी मिळविणाऱ्यांत महाराष्ट्र अग्रेसर आहे. राज्यात आतापर्यंत २ हजार ४४६ सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे बोगस प्रमाणपत्रे आढळली असून, त्यांच्या जागी पात्र अनुसूचित जाती जमातींच्या उमेदवारांची नेमणूक करा, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष रामेश्वर ओरान यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. अशा प्रकारे सरकारची फसवणूक करून आदिवासी आरक्षणांच्या नोकऱ्यांवर डल्ला मारणाऱ्यांची संख्या २५ हजारांपर्यंत असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष रामेश्वर ओरान सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. स्थलांतर स्वीकार तथा संशोधन केंद्राद्वारे दिशा फाऊंडेशन आणि आदिवासी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ते नाशिकमध्ये आले आहेत. सरकारी विश्रामगृहावर ते म्हणाले, 'आदिवासी नसतानाही आदिवासी असल्याची बोगस प्रमाणपत्रे मिळवून त्या आधारे सरकारच्या डोळ्यात धूळफेक करण्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश अशी दोन राज्ये देशात आघाडीवर आहेत. त्यातही महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागत असल्याची माहिती त्यांनी दिली. अलीकडेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत ४३ उपजिल्हाधिकारी निवडण्यात आले. त्यापैकी २५ जणांनी बोगस आदिवासी प्रमाणपत्र सादर केल्याचे उघडकीस आले. या सर्व पार्श्वभूमीवर ओरान यांनी पुण्यात गुरुवारी (दि. २९) बैठक बोलावली होती. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली.राज्यात २५ हजारांहून अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी अशी बोगस प्रमाणपत्रे मिळवून सरकारी नोकरी मिळविल्याची शक्यता वर्तविण्यात आली. राज्य सरकारने सुरू केलेल्या पडताळणीत आतापर्यंत २ हजार ४४६ असे बोगस प्रमाणपत्र धारक आढळले आहेत.
या जागांवर अनुसूचित जाती जमातींमधील पात्र उमेदवारांची नेमणूक करा, असे आदेश सचिवांना देण्यात आले आहेत.
आयोगाने केलेल्या आदेशांचे आणि सूचनांचे पालन झाले की नाही, याचा आढावा तीन महिन्यांनी घेणार असल्याची माहिती ओरान यांनी दिली. यापुढे कुणालाही आदिवासी बोगस प्रमाणपत्रे मिळणार नाहीत याची काळजी घेतली जात असल्याची माहिती सचिवांनी आयोगाला दिली.
अन्य जागी सामावून घेणार?
बोगस प्रमाणत्रांद्वारे नोकरी मिळविणाऱ्यांना नोकरीतून काढल्यास जटील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांनाही सरकारी सेवेत अन्य जागी सामावण्याचा पर्याय अवलंबिता येईल का हे पहा, अशी सूचना सचिवांना करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 2:02 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पेशंटच्या जीवांशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा पोलिस आणि महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शोध घेतला जात आहे. रविवारी उपनगर परिसरातील एक बोगस डॉक्टर या संयुक्त पथकाच्या हाती लागल्याचे सांगितले जात असले तरी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
शहरात काही व्यक्ती तज्ज्ञ डॉक्टर असल्याचे सांगत पेशंटची फसवणूक करीत असल्याचे पुरावे समोर येत असतात. त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली. पोलिस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे एक पथक स्थापन करून सर्वांनी परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर या पोलिस स्टेशन हद्दीतील हॉस्पिटल्स व दवाखान्यांची तपासणी केली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत उपनगर येथील एक बोगस डॉक्टर या पथकाने हुडकून काढला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल नव्हता. याबाबत डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले की, बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहीम सुरू असताना एखाद्या व्यावसायिकाबाबत संशय निर्माण झाल्यास त्याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. उपनगर येथे झालेल्या कारवाईबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 31, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, येवला
येवला शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगासागर साठवण तलावातून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने पालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवली. साठवण तलावानजीक असलेल्या विहिरींवरील वीजजोडण्या खंडित करण्याबरोबरच पंप जप्तीची कारवाई करण्यात आली.
येवला शहराला पालखेड धरणातून नुकतेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळाले. गंगासागर साठवण तलावातील हे उपलब्ध पाणी पुढील आवर्तन मिळेपर्यंत पुरवणे गरजेचे असल्याने पालिकेने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबवली. येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर साठवण तलाव अन् याच तलावानजीक असलेल्या शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरी हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा ठरला आहे. साठवण तलावालगत असलेल्या सुमारे २६० विहिरींमधून पाण्याचा सर्रास उपसा सुरू आहे. या विहिरींमध्ये साठवण तलावातील पाणी झिरपत आहे. दिवसाला ८० लाख लिटर पाणी वाया जात आहे. तलावातील उपलब्ध पाणी अधिकाधिक दिवस पुरवावे लागणार असल्याने साठवण तलावालगत असलेल्या शेकडो विहिरींवर आता पालिकेची नजर गेली असून, पालिकेने कारवाईचा पवित्रा घेतला.
गंगासागर साठवण तलावालगत असलेल्या अनेक विहिरींमधून पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा सुरू राहिल्यास पाणी लवकर आटत जाईल, हे लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून येवला नगरपालिका प्रशासनाने आजूबाजूच्या चार विहीर मालकांना नोटिसा दिल्या आहेत. तसेच, पाणी उपसा करताना पाणीविक्री सुरू ठेवणारे सुनील जाधव व मोहम्मद बोंबीलवाले यांच्या विहिरीवरून पालिकेच्या पथकाने वीजपंप देखील जप्त केले. येवला नगरपालिका प्रशासनाच्या कारवाईमुळे परिसरातील विहीर मालकांचे धाबे दणाणले आहे.
वीज कनेक्शनही खंडित पालिका मुख्याधिकारी राहुल वाघ, उपमुख्याधिकारी ए. वाय. शेख, पाणीपुरवठा अभियंता जनार्दन फुलारी, अर्जुन शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पालिकेच्या पत्रानुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महावितरणने देखील जोरदार मोहीम राबवत साठवण तलावानजीकच्या ११५ विहिरींचे वीज कनेक्शन तोडले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सरकारकडून शेतीमालावर घालण्यात आलेले निर्बंध आणि ग्राहक हिताच्या गोंडस नावाखाली राबविण्यात येणारी घातकी धोरणे, यांच्या परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढच होते आहे. सत्तेत येणारे सरकार कुठल्याही पक्षाचे का असेना ते केवळ संधीसाधूच असते हा शेतकऱ्यांचा अनुभव यंदा सत्ता बदलानंतरही अधोरेखित झाला आहे, अशी खंत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्यानंतर संघटनेच्या आगामी काळातील वाटचालीची दिशा आणि धोरणे ठरविण्यासाठी संघटनेच्या कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिकमध्ये झाली. टिळकपथवरील सावानाच्या मु. श. औरंगाबादकर सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यातील विविध भागांमधून शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत काही ठरावही मांडण्यात आले. कृषी क्षेत्राच्या उदारीकरणाची प्रक्रिया केंद्राच्या धोरणांमुळे थांबल्याने संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. दरवर्षी १२ डिसेंबर रोजी संघटनेचे अधिवेशन आयोजित करण्यात यावे. विकासवादाला गती देण्यासाठी उदारीकरण व स्वातंत्र्यवादासाठी भक्कम आघाडी हवी, यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची एक प्रतिनिधी बैठक घ्यावी, शेतकरी संघटना ट्रस्टच्या सहाय्याने स्वायत्त वाटचाल करण्यात यावी. आंबेठाण येथे शेतकरी संघटना ट्रस्टच्या वतीने शरद जोशी लिबरल अकादमी सुरू करण्यात यावी, यासाठी दोन कोटींचा भांडवली खर्च व २५ लाख रुपये आवर्ती वार्षिक निधी उभारण्याचा संकल्पही जाहीर करण्यात आला. इ अकादमीसाठी देणगीदारांच्या देणगीतून सुमारे १९ लाख रुपयांच्या देणग्या बैठकीस उपस्थित शेतकऱ्यांनी घोषित केल्या. या पत्रकार परिषदेस विश्वस्त रवी काशीकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला देशपांडे, विश्वस्त रामचंद्र पाटील, माजी आमदार वामनराव चटप आदी उपस्थित होते.
वचननाम्याचे काय झाले?
विद्यमान सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेला शेतकरी हिताचा वचननामा अपयशी ठरला आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या चाचण्यांवर सरकारकडून घातली जाणारी बंधने, कपाशी सारख्या पिकांच्या पाठीची काढली जाणारी मदत अन् केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उडविली जाणारी खिल्ली ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक असल्याचे शेतकरी संघटनेचे विश्वस्त रवी काशीकार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी परत केले पुरस्कार
शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांना यंदा जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर या बैठकीस चंद्रपूर जिल्ह्यातून उपस्थित शेतकरी मोरेश्वर झाडे व हेमंत शेंद्रे यांनी राज्य सरकारचे अनुक्रमे 'कृषीभूषण' व 'शेतीनिष्ठ शेतकरी' हे पुरस्कार सरकारला परत केले आहेत. शेती व्यवस्थाच संकटात असताना पुरस्कारांचा देखावा कशासाठी? असाही सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 2:04 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लंपास केले. ही घटना पाथर्डी रोडवरील सुदर्शन लॉन्स जवळील गजानन महाराज मंदिराजवळ शनिवारी दुपारी घडली.
पुणे शहरातील कर्वेनगर परिसरातील गुरुदत्त कॉलनी येथे राहणारे ललित शांताराम सूर्यवंशी आईसोबत एका विवाहासोहळ्यासाठी आले असताना स्नॅचिंगची घटना घडली. सूर्यवंशी कुटुंब रस्त्याने पायी जात असताना एक दुचाकी त्यांच्याजवळ अलगद पोहचली. चोरट्यांनी कोणाला काही कळायच्या आत महिलेच्या गळ्यातील गंठण तोडून पोबारा केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तोडफोडीचे गुन्हे दाखल
गंजमाळ येथील पवित्र स्तंभाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून दगडफेक करणाऱ्या दोन टोळक्यांविरोधात भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल. द्वारका येथील नागसेनवाडी येथे एसटी बस क्रमांक एमएच १५ एके ८०९७ हिच्यावर दगडफेक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, गंजमाळ येथील सूर्यरथ नगर हौसिंग सोसायटी येथे खासगी वाहने व बसेसवर दगडफेक करणाऱ्यांविरोधात भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुरे मालकांवर कारवाई
विनापरवाना गुरांचा सांभाळ करणाऱ्यांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले. विनापरवाना गुरे पाळणे महाराष्ट्र शासन अधिनियम १९७६ च्या कलम तीन, सात आणि १३ अन्वये ही कारवाई झाली.
पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी दोन गुन्हे दाखल झाले. शुक्रवारी देखील अशाच पध्दतीचे काही गुन्हे वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात वासुदेव लोटण बडगुजर यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी हिरावाडी येथील रवी शेलभाई भरवाड व इतर १२ आरोपी तसेच रघु नाथा भरवाड व इतर तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आर्म्स अॅक्टनुसार तिघांवर कारवाई करण्यात आली.
तिघांविरोधात गुन्हा
मागील भांडणाच्या कारणावरून गावठी पिस्तूल दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तिघा संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यातील कलम तीननुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शरणपूररोडवरील शासकीय वसाहत येथे राहणारा गौरव विजय पाटील (वय २२), तपोवनातील रामानुजनगर येथील शुभम अभिमान चौधरी (वय १९) आणि शरणपूररोडवरील सिध्दीविनयाक कॉलनीतील पवन गोपीनाथ पाटोळे (वय २५) अशी या संशयितांची नावे आहेत. काही जणांसोबत झालेल्या किरकोळ वादातून पवन पोटोळेने आपल्याकडील गावठी कट्टा दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर पोलिस कर्मचारी गाढवे यांनी तक्रार दिली.
पालकांवर गुन्हा
आपल्या दोन अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त करून त्याद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या मातापित्यांविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये बाल न्याय अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संदीप जाधव आणि गीता जाधव अशी या पालकांची नावे आहेत. जाधव दाम्पत्याने आपल्या ११ वर्षीय जयश्री व तीन वर्षाच्या प्रियंका या दोन मुलींना रस्त्यावर भीक मागण्यास प्रवृत्त केले. भोसला स्कूलजवळ मुली भीक मागत होत्या.
खंडणी उकळण्याचा प्रयत्न
नाशिकरोड परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमोद गुलाब बागुल विरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
गंधर्वनगरीतील पद्मिनी सोसायटीत राहणाऱ्या नीलेश विजय काळे यांनी प्रकरणी तक्रार दिली. काळे यांचा बांधकाम व्यवसाय असून, रेजिमेंटल प्लाझा येथे कार्यालय आहे. काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या प्रमोद बागुलने २० ऑगस्ट २०१५ रोजी रेजिमेंटल प्लाझातील शॉप नंबर ५० मध्ये येऊन दमबाजी केली. लोखंडी रॉडचा धाक दाखवून बागुलने वेळोवेळी तब्बल पाच लाख रुपये उकळल्याचे बागुल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याच बरोबर त्याने आणखी १० लाख रुपये खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, काळे यांच्या मालकीचे दोन गाळे असून, त्यात बागुलने दोन भाडेकरू ठेवले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्यासंबंधी कागदपत्रे तपासण्याचे काम पोलिस करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पाण्याची टंचाईमुळे माल विकण्याची घाई, बाहेरील बाजारपेठांमध्ये घटलेली मागणी यामुळे पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांचे दर घसरले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते बारा रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत. यामुळे ग्राहक समाधानी असला तरी शेतकऱ्यांचे मात्र मजुरी व गाडीभाडेही सुटत नसल्याचे चित्र दिसत आहे.
पालेभाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. कोथिंबीर वगळता मेथी, कांदापात, शेपू, पालक या भाज्यांचे दर दहा रुपये जुडीच्या आत आले आहेत. मेथी आणि कांदापात तर मातीमोल भावात विकली जात आहे. मिरची, वांगे वगळता इतर भाज्यांचे दरही दहा रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे शहरी ग्राहकांचे बजेट
सावरले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सर्वच भाज्यांचे दर चाळीस ते साठ रुपये किलोपलीकडे गेले होते. मात्र शेवटच्या आठवड्यात हेच दर कमालीचे खाली आले आहेत.
पाणीटंचाईचे सावट
पाणीटंचाईमुळे भाज्यांचा दर्जा खालावला आहे. यामुळे शेतकरी या भाज्या लवकर विक्री करून दोन पैसे पदरात पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. माल उत्तम दर्जाचा नसल्याने दरही कमी झाले आहेत. आवक जास्त नसली तरी दर्जा नसल्याने दर घसरत आहेत.
स्थानिकवरच भर
सध्या मुंबई व गुजरात येथे भाजीपाला विक्रीसाठी जात नसल्याने स्थानिक बाजारपेठेत विकावा लागत आहे. मागणीही जेमतेमच असल्याले दरावर परिणाम झाला आहे. यामुळे गाडीभाडे व मजुरीही सुटत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन दुष्काळात कमी पाण्यावर पिके जगवूनही कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
मिरची तिखटच गेल्या महिनाभरापासून हिरची चांगलीच तिखट झाली आहे. पन्नास रुपये किलोप्रमाणे मिरचीची विक्री होत आहे. प्रत्येक भाजीत लागणारी व हॉटेल चालकांसाठी अनिवार्य असणारी मिरची आगामी काळातही रडवणार आहे. उन्हाचे चटके जाणवू लागताच गृहिणी मसाला बनवायला सुरुवात करतात. यामुळे मिरचीची मागणी दुप्पटीने वाढते. कोरडी मिरचीचे दर कडाडणार असून मसाल्याचे बजेटी कोलमडणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 31, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
महानगरपालिकेतर्फे मोसम नदी पात्राच्या स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचारी दर शनिवारी श्रमदानातून या पात्राची स्वच्छता करतील. या कामाची सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी पाहणी करीत कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
मालेगाव शहरात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरात सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले होते. त्यावेळी मोसम नदीपात्र स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर महानगरपालिकेने स्वच्छतेस सुरुवात केली. त्याची पाहणी भुसे यांनी केली. मोसम नदीपात्राची संपूर्ण स्वच्छता करावी. नागरिकांनी केरकचरा नदीपात्रात टाकण्याऐवजी कुंड्यांमध्ये टाकावा. नदीपात्र स्वच्छ कसे राहील याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच, मोसम नदीपात्र स्वच्छतेच्या कामात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव उपस्थित होते.
मोसम नदीपात्राला गेल्या काही वर्षांपासून गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सामाजिक संघटनाही या विरोधात आवाजही उठवला. मात्र, काहीही झाले नाही. विद्यार्थी व शिक्षकांनी मानवी साखळी करून मोसम नदीच्या अस्वच्छतेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुंभकर्ण झोपेत असलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. आता उशिरा का होईला महापालिकेने नदी स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 2:06 pm
आदिवासी समाज अजूनही मागासलेपणाचे जीवन जगत आहे. त्याच त्या समस्या व दारिद्र्य, बेरोजगारीमुळे ते स्थलांतरीत होतात. पाल्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही. अशिक्षितपणामुळे त्यांच्या समस्यांमध्ये भरच पडते. सरकार कोणतेही असो आदिवासींकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत नाही, असा अनुभव आहे. सत्तारूढ भाजप सरकारने आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणले तर आनंदच होईल, अशी भावना राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष रामेश्वर ओरान यांनी व्यक्त केली.
अनेक घटकांना आरक्षण हवंय, तुम्हाला काय वाटते?
अलीकडे आरक्षण मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातही धनगर समाजाने अन्य राज्यांचे दाखल देत आदिवासी म्हणून आरक्षण मागितल्याने पेच वाढला आहे. झारखंडमध्ये ओराव धांगड अशी जमाती आहे. धांगड आणि धनगर यांचा मेळ घालणे संयुक्तिक वाटत नाही. सरकारने धनगर समाजाला आदिवासी म्हणून आरक्षण दिलेच तर तो राजकीय स्वरुपाचा निर्णय असेल. समाज त्याला स्वीकारलेच असे नाही.
महाराष्ट्र पाहणी दौऱ्यात काय आढळले?
मी संगमनेर तालुक्यातील कोळवाडे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहळ येथील आश्रमशाळांची पाहणी केली. आदिवासी भागात पुरेसे अन्न, रोजगार, शिक्षण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह अशा सर्वच मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. परिणामी हा भाग विकासापासून अजून बराच दूर आहे.
आदिवासी समाजापुढील मुख्य आव्हाने कोणती?
आदिवासी समाजाला दोनच गोष्टी प्राधान्याने हव्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे संरक्षण आणि दुसरे म्हणजे विकास. प्रकल्पांसाठी त्यांच्या जमिनी संपादीत केल्या जातात. मात्र, त्यांना पर्यायी जमीन किंवा पुरेसा मोबदलाही दिला जात नाही. उत्पन्नाचे साधन गेले की स्थलांतराशिवाय पर्याय उरत नाही. निवारा, पिण्याचे पाणी, औषधोपचार अशा सर्वच बाबतीत त्यांची परवड सुरू आहे.
आदिवासींचे स्थलांतर वाढण्याचे कारण काय?
स्थलांतर हे चांगले आणि वाईट देखील असू शकते. एखादी व्यक्ती झारखंडमधून बाहेर पडून दिल्लीत रूळते हे स्थलांतर त्या व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टीने पोषक ठरते. मात्र, स्थलांतर करूनही रोजीरोटीचा प्रश्न सुटत नसेल तर ते मारक ठरते.
रोजगाराच्या समस्येवर तोडगा कसा निघेल?
राज्य आणि केंद्र सरकारची इच्छाशक्ती असेल तर आदिवासी समाजाच्या समस्या सोडविणे कठीण नाही. नाशिकमधीलच उदाहरण घ्यायचे तर त्र्यंबकेश्वर विभागात जलसंपदाचे नऊ प्रकल्प रखडले आहेत. ९५ टक्के कामे पूर्ण झाली असली तरी पाच टक्के कामे बाकी आहेत. त्यांना रोजगार मिळू शकेल. ओरीसा, झारखंड आणि काश्मिर आणि महाराष्ट्रातही आदिवासींसाठी काही चांगले प्रयोग होत आहेत. असे प्रयोग व्यापक स्तरावर होण्यासाठी पाऊले उचलली गेली पाहिजेत.
शिक्षणाचा प्रश्न कसा सोडवावा?
आदिवासी भागात पाचवीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पाच ते सात किलोमीटर दूर जावे लागते. सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना शिक्षण सोडावे लागते. म्हणूनच प्रत्येक गावात किमान दहावीपर्यंत शाळा असायला हवी. रोजगारासाठी पालकांसमवेत स्थलांतरीत होणाऱ्या मुलांना ते जातील तेथे शाळेत प्रवेश दिला गेल्यास शिक्षणाचा खर्च निकाली निघेल.
(शब्दांकन : प्रवीण बिडवे)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक शांततेत पार पडली. आज (१ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेपर्यंत मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
छत्रे विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली. उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या भाऊगर्दीमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. व्यापारी गटात अधिक उत्साह दिसून आला. माजी आमदार संजय पवार, सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, बापूसाहेब कवडे यांच्या शिवनेरी पॅनलला जिल्हा बँकेचे माजी संचालक चंद्रकांत गोगड, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, प्रकाश घुगे यांच्या नम्रता पॅनलने आव्हान निर्माण केल्याचे चित्र होते. अपक्षांचाही बोलबाला दिसून आला.
दोन्ही पॅनलचे नेते मतदान केंद्र परिसरात तळ ठोकून होते. एकूण १८ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य मतदार पेटीत बंद झाले. सोमवारी सकाळी ६ वाजता मनमाड सार्वजनिक वाचनालय इथे मतमोजणी होणार असून, मनमाड बाजार समितीवर कोणाची सत्ता हे दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.
नांदगाव बाजार समितीत शिवसेनेने आमदार पंकज भुजबळ व माजी आमदार अनिल आहेर यांच्या पॅनलचा पराभव केला होता. यामुळे मनमाड बाजार समितीत नांदगावची पुनरावृत्ती होते का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
थंडीचा जोर हळूहळू ओसरू लागला असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यामुळे रसाळ फळांना मागणी वाढू लागली आहे. चौकाचौकात रसवंती व ज्यूसचे हातगाडे दिसू लागले आहेत. मात्र, मागणी वाढूनही फळांच्या किमतीत फारसा फरक पडलेला नाही. पपई, संत्री यांच्या किमती वीस रुपये किलोपर्यंत स्थिर असून, इतर फळांच्या किमतीही जैसे थे आहेत.
पपई, संत्री पाठोपाठ शहरात अॅपल बोरांची आवक वाढली आहे. वीस ते तीस रुपये किलोप्रमाणे अॅपल बोर मिळत आहेत. नाशिकची खास ओळख असलेले द्राक्ष तूरळक ठिकाणी नजरेस पडू लागले आहेत. शंभर रुपये किलोने द्राक्षांची विक्री होत आहे. सफरचंद, चिकू, सीताफळ, अननस, नारळ, केळी यांच्या किमती जैसे थे आहेत.
फळांचे दर (किलोमध्ये)
द्राक्ष - ११० रुपये
डाळिंब - ४० ते ७० रुपये
पपई - २० रुपये
चिकू - ६० ते ८० रुपये
संत्री - २० ते ३० रुपये
सीताफळ - ६० रुपये
सफरचंद - ८० ते १००
नारळ - ३० रुपयाला एक
किवी - ३० रुपयाला एक
केळी - ३० डझन
अननस - ३० ला एक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
January 31, 2016, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
बागलाण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी येथील यश कॉम्प्युटर्सचे संचालक योगेश अहिरे यांनी सटाणा ए टू झेड या अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपचा शुभारंभ शिवचरित्राचे अभ्यासक प्रशांत देशमुख व सटाणा कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सटाणा ए टू झेड या अॅपद्वारे नागरिकांना सटाणा शहरातील सर्व शाळा, कॉलेज, डॉक्टर्स, रुग्णवाहिका, विविध व्यापारी प्रतिष्ठाने, व्यापारी, शासकीय व निमशासकीये कार्यालये, खासगी प्रवाशी वाहतूक, शुभविवाह, उपहारगृहे, शेतीमाल बाजारभाव, गॅस एजन्सीज, गॅस उपकरणे, सुतार, पेंटर, कारागीर, माध्यमे यांच्याशी संपर्क साधणे सुलभ होणार आहे.
मोबाइलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन सटाणा ए टू झेड असे टाईप करून हे अॅप मोफत डाऊनलोड करता येणार आहे. सध्या अॅपची पहिली १.० ही नमुना आवृत्ती ठेवण्यात आली असून, येत्या ९ रोजी या अॅपची परिपूर्ण आवृत्ती शहरवासीयांच्या सेवेत रूजू होत आहे. या अॅपमध्ये नाव नोंदणीसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. हे जमा झालेले शुल्क आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदतीसाठी देण्यात येणार आहे. यामुळे या दुहेरी उद्देश साजरा होणार असून, नागरिकांनाही मदत होणार आहे.
अॅपद्वारे मिळणारे उत्पन्न नाम फाऊंडेशनला मदतीसाठी देण्यात येणार आहे. संगणक क्षेत्रात काम करीत असताना नाम संस्थेला २६ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी दिला. अॅपद्वारे नागरिकांना अनेक गरजवतांसाठी संपर्क साधणे सुलभ होणार आहे. - योगशे अहिरे, यश कॉम्प्युटर्स
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला इंदिरानगर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा येथून अटक केली. हे सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून, एका रिक्षातून पळून जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली.
समीर अब्दुल रहेमान (वय ४२, रा. नानावली), सादीक इस्माईल शहा (वय २३, रा. द्वारका), वसीम निसार शेख (वय २३, रा. भारतनगर), गुलाम अलीबक्ष अन्सारी (वय २५, रा. जुने नाशिक) आणि वसीम अब्दुल शेख (वय २३, रा. भारतनगर) अशी या संशयितांची नावे आहेत. यातील, वसीम शेख तसेच गुलाम अन्सारीविरोधात भद्रकाली, सरकारवाडा आणि विल्होळी पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी रात्री, इंदिरानगर पोलिस स्टेशनचे एपीआय जी. आर. शेख, एपीआय राजेंद्र गवळी व कर्मचाऱ्यांचे पथक गस्त घालत असताना एमएच १५ झेड ८३८९ संशयित पध्दतीने पाथर्डी फाटा येथून वेगात जाताना दिसली. रिक्षात वरील पाच संशयित आढळून आले. पाथर्डी फाटा परिसरात घरफोडी करण्याच्या इराद्याने ते संशयित फिरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून धारदार शस्त्रे जप्त केली असून, त्यांना कोर्टात एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
January 31, 2016, 2:30 pm
संदीप देशपांडे, मनमाड
लहानपणी डोळ्यात बाभळीचा काटा गेल्याने त्याचा एक डोळा निकामी झाला. त्याची दृष्टी गेली. नंतर तर दुसऱ्या डोळ्यानेही दिसेनासे झाले. अंधत्चाचा शाप त्याच्या माथी बसून सारं आयुष्यच अंधारमय झालं. पण, जगणे अवघड झालेले असताना आणि पराकोटीची वेदना, काळीज कुरतडत असताना तो हरला नाही. अठरा विश्वे दारिद्र्य घरात नांदत असताना हार न मानता पोटाची खळगी भरण्यासाठी तो ऊसतोड करू लागला. ही कथा आहे नांदगाव तालुक्यातील शंकर पवार या बावीस वर्षीय तरुणाची.
स्वतःच्या आयुष्यातील काळोख जिगरबाजपणाने बाजूला सारत ऊसतोडीसारखे अवघड काम दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही लीलया करणारा नांदगाव तालुक्यातील शंकर पवार हा बावीस वर्षीय तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तुफानातुनी पुढे जायचे हे आव्हान स्वीकारू या हा त्याचा बाणा एखाद्या दीपस्तंभासारखा इतरांनाही लढण्याचे धडे देणारा आहे. धारदार कोयत्याने ऊस तोडताना हाताला लागेल, जखमी होऊ या चिंतेपेक्षा घरी जाताना थोडे पैसे तरी मिळतील का ही काळजी शंकरला भेडसावत असते. मग, जगण्याची वाट चालताना त्याने आपल्या व्यंगावर मात करीत दुःखाचे ही गाणे केले.
अंध शंकरची ऊसतोडीची करामत भल्याभल्यांना अगदी डोळस, धडधाकट लोकांनाही अचंबित करते. परधडी येथे शंकर ऊसतोडीचे काम करीत असून, तसूभरही दृष्टी नसताना तो करीत असलेले ऊसतोडीचे काम माणसाला जगण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते याचा मूर्तिमंत पुरावा आहे. लहानपणी डोळे गेले. अंधत्व आल्याने आयुष्याचीही वाट लागली. पोटाचे चटके सहन होईना. परिस्थिती हलाखीची....दोन घास खाण्याचे वांदे तिथे डोळ्यांवर उपचार कसले होणार? तिथूनच झाली शंकरच्या आयुष्याच्या कथेची व्यथा! रोजच्या जीवन मरणाचा
प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याने हातात चक्क कोयता घेतला. शंकरचे धाडस आणि जिद्द त्याला ऊसतोड कामगार म्हणून ओळख आणि रोजगार देणारी ठरली. त्याची ही कहाणी हसू आणि आसू यांचा मिलाफ आहे. अंध म्हणून मदत सवलत योजना असं काही त्याच्या वाट्याला आले नाही. सरकार आधार देतं, मदतीचा हात देतं हे त्याच्या गावीही नाही. पोट भरतंय काम मिळतंय, चुल पेटतेय हीच गोष्ट शंकरसाठी लाखमोलाची आहे. कणखर मन आत्मविश्वास हाच त्याचा जणू डोळा आहे. म्हणून की काय कोयत्याने हात रक्तबंबाळ होतात. कुठेतरी जखम होते. तरी तो कोणाच्या तरी शेतात उसावर घाव घालतोच आहे. संकटांशी झुंजतोच आहे. त्याची जबरदस्त इच्छाशक्ती हीच त्याची जणू दृष्टी ठरली, एवढं मात्र नक्की!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧