सुरगाणा तालुक्यातील घोडांबे धरणात पाण्याचा साठा वाढावा, यासाठी दोन वर्षापूर्वी सांडव्याची उंची वाढवण्याचे काम कळवण पाटबंधारे उपविभागातर्फे करण्यात आले. परंतु, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाण्याची गळती सुरूच आहे. पाणी वाया जात असल्याने किमान रब्बीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पाण्यासाठी सर्वत्र रान पेटलेले असताना या ठिकाणी वाया जाणारे पाणी पाहता संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने जलसंपदा तथा पालकमंत्री याकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोरगाव, घाटमाथा परिसरातील घोडांबे धरण नागशेवाडी, घोडांबे, बोरगाव, पोहाळी, पासोडी, साजोळे, हतगड, उंडओहळ, हिरीडपाडा, खरुडे आदी गावांकरिता पिण्यासाठी व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधण्यात आले आहे. परंतु, धरणाच्या जागेत लोकांनी अतिक्रमण करून विहिरी खोदल्या आहेत. सदर पाणी हतगड परिसरातील हॉटेल व्यवसायासाठी वापरले जाते.
घोडांबे धरणातील पाण्याचा वापर बोरगाव, घोडांबे, हिरीडपाडा, खरुडे गावांना पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक कारणासाठी केला जातो. या धरणाकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या सांडव्याच्या खालच्या बाजूला काही ठिकाणचा तळ तुटला असून, सांडव्याचे पाणी शेतात जाऊ नये यासाठी बांधलेली संरक्षण भिंत तुटली आहे. पावसाळ्यात सांडाव्याचे पाणी शेतात शिरते. धरणाचा पाट पूर्णपणे बुजला असून, पाटात झाडी झुडपी वाढली आहेत. काही मोऱ्यांचे बांधकाम तुटले आहे. काही मोऱ्यांमधे गाळ साचला आहे. घोडांब्याकडे जाणाऱ्या पाटाचीही तीच अवस्था झाली आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून, आदिवासी शेतकऱ्यांना पाटाच्या पाण्याची आवश्यकता आहे. पाटाला पाणी सोडण्याची मागणी बोरगांव, हिरीडपाडा, चिखली, खरुडे आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.
कुठलेही पाणी वाया जात नसून, ते नदीलाच जाऊन मिळते. कामासाठी निधी सद्यस्थितीत उपलब्ध होत नाही. एकंदरीत पाण्याची उपलब्धता पहाता पाणी पिण्यासाठी महत्त्वाचे असून, सिंचनाला पाणी देऊ नये अशा वरिष्ठ पातळीवरून सूचना
आहेत.
- श्यामसुंदर विसपुते, शाखा अभियंता, कळवण पाटबंधारे उपविभाग
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट