हिवाळी फळांची आवक प्रचंड होत असल्याने नाशिककरांनी गोडगोड फळांवर कमी दरात ताव मारायला मिळत आहे. लालेलाल पपई, संत्री, बोर या फळांची आवक टिकून आहे. यामुळे दरही पंधरा ते तीस रुपये किलोदरम्याने स्थिर झाले आहेत. द्राक्षेही बाजारात दिसू लागली आहेत. बारमाही दिसणारे सफरचंदचे दरही शंभर रुपये किलोपर्यंत असल्याने चांगली मागणी होत आहे.
गेल्या महिनाभरापासून पपई व संत्र्यांची प्रचंड आवक होत आहे. यामुळे दर घसरले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून आवक थोडी घटली आहे. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने फळे लवकर परिपक्व होत आहेत. यामुळे आवक वाढली आहे. सध्या संत्र्यांचे दर पंधरा ते वीस रुपये किलो तर दर्जेदार संत्री तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. पपईचे दरही तीस रुपये किलोवर स्थिर झाली आहे. केळी, सफरचंद, किवी, पेरू, द्राक्षे, चिकू, सीताफळ यांच्यात दरात चढउतार सुरू आहे. सण, उपवास यानुसार या फळांचे दर कमी जास्त होत आहेत. आगामी काही दिवस तरी या फळांच्या दरात फारशी वाढ होण्याची चिन्हे नाहीत. अॅपल बोर तसेच कडाखा व उमराण या बोरांची बाजारात आवक वाढली असली तरी दर तीस रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. द्राक्षांची पुढील आठवड्यापासून आवक वाढण्याची शक्यता आहे.
कोथिंबीरचे दर कडाडले
गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. पालेभाज्या व फळभाज्यांची आवक कमी झाली असल्याने दर चाळीस ते पन्नास रुपये किलोदरम्यान स्थिर झाले आहेत. कोथिंबीरचे दर तीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी व कळवण या प्रमुख तालुक्यांमधून आवक काही प्रमाणात घटल्याने भाज्यांचे दर कमी होण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत.
हिवाळ्यात मेथी, वांगे, कोबी, फ्लॉवर, गवार या भाज्यांची मागणी वाढते. मात्र, यंदा पावसाअभावी सर्वच भाज्यांची आवक रोडावली आहे. कोबी व फ्लॉवर यांचे दर सुध्दा पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. गिलके, दोडके, कारले यांचे दर आजही पन्नाशीपल्याड आहेत. आवडीचे काकडी व टोमॅटोच दरही ३०ते ४० रपुये किलोदरम्यान आहेत. सर्वांच्या जिव्हाळ्याच्या कांद्याचे दर पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. शेपू व पालकचे दर मात्र घसरले आहेत. शेपू दहा ते बारा रुपये जुडी तर पालकाची जुडी पाच रुपयांना मिळत आहे.
नाशिकमधून मुंबई व गुजरात येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी जातो. यामुळे मागणीही वाढली आहे. पाणीटंचाईमुळे आगामी काळात भाजीपाल्याची आवक घटणार असल्याने दर आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत. कोथिंबीरचे दर तीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट