नर्सरी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या वयाची अट २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून निश्चित करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय ३१ जुलैपर्यंत ३ वर्षे पूर्ण आहे त्यांनाच नर्सरीत प्रवेश दिले जातील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या वतीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व मंडळांशी संलंग्न असलेल्या शाळांना लागू असणार आहे. नर्सरीत प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत ३ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षात त्या विद्यार्थ्याला इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्याचे वय ५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. २०१७-१८ साली ५ वर्षे व ४ महिने, २०१८-१९ साली ५ वर्षे ८ महिने तर २०१९-२० साली पहिली प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण असण्याचे निकष या निर्णयात लावण्यात आले आहे. गेल्या वर्षी आरटीईनुसार ६ वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे शिक्षकांनी आंदोलनेही केली होती. त्यामुळे मागील शासन निर्णयात दुरूस्ती करून सुधारित निर्णय जारी करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत निर्णय निष्प्रभ?
प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यावतीने हे परिपत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत नर्सरीचे प्रवेश हे नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाचे अवलंबन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात कितपत होईल, असा प्रश्न शिक्षकांतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट